नवीन लेखन...

मानसकोंड-मासा

— त्यांच्या हातात झेंडे होते .
चेहरे थकलेले आणि देह रापलेले वाटत होते .
हातातल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ते हलवीत होते .
त्यांची पाण्याची गरज त्यातून जाणवत होती .
पण महामार्गावर थांबता येत नव्हते . वाहने सुसाट पळत होती .
तरीही गाडीचा वेग कमी करीत मी थांबण्याचा निर्णय घेतला .
गाडी उभी केल्यावर त्यातल्या एकाला बोलावले आणि गाडीतल्या पाण्याच्या दोन बाटल्या त्यांना दिल्या .
” पुळ्याला चाललोय , नगरहून आलोय चालत , पन्नास किंवा शंभर रुपये द्या ”
त्यानं सरळ मागणी केली . माणुसकी म्हणून मी पाणी दिलं , तर हा पैसे मागू लागला होता . गरज असेल असं समजून त्याला शंभर रुपये दिले आणि मी न बोलता गाडी सुरू केली .
त्याच्या मागणीचं थोडं आश्चर्यच वाटलं पण प्रवासाच्या नादात मी विसरलो .
पण दुसऱ्या दिवशी त्याच मार्गावरून परत येताना , त्याच ठिकाणी , तीच माणसे , तशाच पद्धतीने अनेकांकडे हात पसरताना दिसत होती . काल एकच ग्रुप होता , आज तीन वाढले होते . थोडे अंतर राखून पाण्याच्या बाटल्या हलवण्याचा त्यांचा उद्योग सुरूच होता . लोकांच्या दयेचा , सहानुभूतीचा ,माणुसकीचा गैरफायदा घेणं सुरूच होतं .त्यातल्या एकाला मी ओळखलं , कारण त्यानेच काल माझ्याकडे पाणी , पैसे मागितले होते .
मी ओळखलं हे त्याच्या बहुधा लक्षात आलं , तो मला टाळून दुसऱ्या गाडीकडे पळाला , माणुसकीचा धंदा करायला .
मला काल ते पायी वारी करणाऱ्यांपैकी वाटले होते .
पण आज माझा भ्रमनिरास झाला होता .

त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकांना हे ठाऊक नव्हतं , की हाही एक धंदा आहे . कारण ते पाणी पैसे देऊन निघून जात होते .
मनातून सुखावत होते . आपण माणुसकी दाखवली या आनंदात ते जात होते . लोकांच्या भावनेचा धंदा करता येतो आणि लोक फसत राहतात , हे पुन्हा पुन्हा जाणवत होतं .

– एकाएकी कुणीतरी हसल्याचा आवाज आला आणि मी महामार्गावरच्या भल्यामोठ्या खड्यात गाडी गेल्यावर धक्का बसावा , तसा गाडीतल्या गाडीत उडालो .
पाठून हसण्याचा आवाज येतच होता .
मी पाठी बघितलं आणि पुन्हा धक्का बसला .
पाठच्या सीटवर एक मोठा रंगीत मासा गडबडा लोळत हसत होता .
मी डोळे चोळून पुन्हा पाठी बघितलं .
मासाच होता तो .
पण हसत लोळत होता , तडफडत नव्हता .

” तडफडेन कसा ? मी काय साधा मासा नाही .”
मी न विचारता माझ्या मनातल्या प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं .
” गाडी कुठल्यातरी बाजूच्या लहानशा रस्त्यावर उभी कर . आता तुला धक्केच धक्के देणार आहे मी . अपघात होईल , त्यापेक्षा …”
मी न बोलता गाडी दुसऱ्या रस्त्यावर नेऊन उभी केली .
तो टुणकन उडी मारून माझ्या शेजारच्या सीटवर पडला .
आता माझं त्याच्याकडे नीट लक्ष गेलं .
निळ्या पांढऱ्या रंगाचा मासा होता तो . डोळे थोडे मिश्किल वाटत होते . कल्ले अजून कुठल्या तरी रंगाचे आणि तोंड सतत बडबड करणाऱ्या माणसासारखं होतं . समोरून पाहिलं तर , याला खूप काहीतरी सांगायचं असावं असं वाटत होतं .

” झालं निरीक्षण ? आता मी इथे कसा तेही सांगतो . काल तू कोल्हापूरजवळच्या कळंबा तलावाजवळ गेला होतास . त्या तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या एका झाडाचा तू फोटो काढलास . नंतर कात्यायनीच्या देवळासमोरच्या तळ्यातील कासवांचे फोटो काढलेस . खरं आहे ना ? ”
” खरं आहे पण तुला कसं कळलं ? ”
” त्या तलावातूनच तुझ्या नकळत मी गाडीत आलो होतो . ”
” पण पाण्याशिवाय मासा जगत नाही . तो बोलत नाही . हसत नाही . गडबडा लोळत नाही .”
” ते इतर सर्व माशांना लागू होतं , मी वेगळा आहे . मला माशांच्या प्रजातीतील कुठलेच नियम लागू होत नाहीत . हा मला मिळालेला शाप आहे आणि समानधर्मा मिळाल्याशिवाय मी शापमुक्त होणार नाही .”
” पण तो समानधर्मा केव्हा मिळणार ? ”
” तू कोण आहेस मग ? मला शापमुक्त करणारा समानधर्माच आहेस . ”
“मला नाही कळलं .”
” सगळ्याच गोष्टी एकदम , एकाच वेळी कळायला हव्यात , असं कुठं लिहिलंय ? तुला तर अजूनही अनेक गोष्टी कळलेल्या नाहीत . पण मी जसजसा बोलत जाईन , तसतसं तुला सगळ्या गोष्टीचं आकलन होईल . अर्थात त्याला फार उशीर झालाय , पण त्याला आपण काहीच करू शकत नाही . काही गोष्टी नियतीच्या अधीन असतात , त्यांचं आकलन पटकन होत नाही . बऱ्याच गोष्टी जाणवतात पण त्या ओठावर आणता येत नाहीत . मानसकोंड माहितेय ना तुला ? ती फार चमत्कारिक असते . तू काय अगर मी काय , मानसकोंडीत घुसमटत असतो .कोंड मोठी , खोलवर पसरलेली असते . अथांग , काळीशार अंतहीन कोंड ! त्या कोंडीत आपण पडलो की घुसमट , चरफड , चिडचिड , वैफल्य आणि बरंच काही असं प्राक्तन असतं मग . कोंडीच्या काठावरचं उभं असणारं सत्य , प्रामाणिकपणा , निष्ठा , सद्हेतू , आपल्याला दिसत असतात . पण तिथे जाण्यासाठी आपण जितके प्रयत्न करतो , तितके कोंडीत अडकत जातो आणि हतबल होऊन जातो . ”
” मला काही कळलं नाही . ”
” सांगेन हळूहळू .त्यासाठीच तर मी तुझ्यापाठून आलोय . तुला सांगायलाच हवं नाहीतर मला शापमुक्त कसं होता येईल ? चल , गाडी सुरू कर . आणि हो काळजी करू नकोस , तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाला दिसणार नाही . ”
तो हसला आणि सीटवर पडून राहिला .

मी यंत्रवत गाडी सुरू केली.
मुख्य रस्त्याला आलो .
पण , उद्या तो काय सांगणार आहे , हा विचार डोक्यातून जात नव्हता .
आणि रस्त्यात माझ्याकडे पाणी मागणारे ते कोण होते , हे ही कळलं नव्हतं …

( क्रमशः )

– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
————
* ही एक वेगळी कथामालिका आहे .
* रोज किंवा एक दिवसाआड ती आपल्याला वाचायला मिळेल .
*आवडली की नाही हे नेहमीप्रमाणे कळवलाच .

* नावासह सर्वांना पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..