नवीन लेखन...

मला देव दिसला – भाग २

त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती. कित्येकांनी भक्ती व तपश्चर्या तेथे जाऊन अर्पण केलेली. ती भूमि, तो परिसर पवित्र करण्यात सहभाग घेतलेला. तेथील देवदेवतांच्या मुर्तीमध्ये दिव्यत्वाच्या शक्तीची साठवणूक केलेली, अशा मंदिर परीसरांना भेट देण्याचा प्रयत्न केला गेला. यथासांग पूजा, भजन व दर्शन घेत गेलो. त्या देवतांमध्येच श्री जगदंबेला बघण्याचा प्रयत्न केला.

हे सारखे शारीरिक होत होते. मनाला, भावनेला भक्तीला समर्पण करण्याचा प्रयत्न होत होता. हे सारे क्रियात्मक, योजनात्मक (preceednral approch) होत होते. ईश्वरप्रातीसाठी काहीतरी रचनात्मक आणि परंपरागत गोष्टी करीत असल्याची भावना होत होती. समाधान मिळत होते. आनंद प्राप्त होत होता. परंतू शांतता अर्थात ‘मनाची शांतता’ मात्र मुळीच हाती लागली नाही. दैनंदिन पूजा-अर्चा, नामस्मरण, भजन-किर्तन, पवित्र स्थळांचे , मंदिरांचे दर्शन, पवित्र नद्यांचे-जलांचे स्नान ह्या सर्व बाबी मन एकाग्र करून भक्तीने करीत गेलो, परंतू खरी ‘मानसीक शांतता’ केव्हाच मिळाल्याचा भास झाला नाही. माझे गुरू श्री शंकराचार्य जेरेस्वामी 5  यांना शरण गेलो. चर्चा झाली. सान्तवन केले गेले. मार्ग सुचविले गेले. त्यावर चिंतन करून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न झाला.

स्वभावाची ठेवण, वागणूकीची पध्दत, मनाचे विकार हे सारे ‘खरी शांतता’ मिळण्या मधल्या बाधा होत्या. आजपर्यतेचे जे प्रयत्न झाले. हे सारे बाह्यांगी होते. त्याचा आनंद व समाधान तीतकाच सिमीत होता. आत्मीक आनंद प्राप्त करायचा. असेल तर अंतरमुख होण्याची गरज होती. चांगला, प्रेमळ व निस्वार्थी स्वभावात नेहमी राहण्याची सवय ही खरी प्राथमिक महत्वाची पायरी होती. सभोवताली असलेल्या वातावरणाशी, दैनंदीन संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीशी संसार होत जाणाऱ्या घटनांशी मनाचा, विचारांचा सतत संपर्क येत असतो. मन त्या संपर्काला त्याप्रमाणेच प्रतिसाद देत असते. वैचारीक स्वभावाची ठेवण, राग, लोभ मोह इत्यादी पढरिपूंचा पगडा ह्याचा परिमाम प्रत्येक घटनेशी प्रतीक्रीया होण्यात होतो. ह्या ठिकाणी योग्य वा अयोग्य ह्या परिणामापेक्षा इच्छा व आवड ह्या भावनीकबाबींचा जास्त विचार मन करते. शेवटी त्या परिस्थीतीतून उत्पन्न होते ती अशांत “मनाची अवस्था” शांत मनाने विचार केला, चिंतन केले तर तुम्ही  गरजेशिवाय प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या संवादामध्ये, सहववासामध्ये विनाकारणच स्वत:ला गुरफटून गेत असल्याची सत्यता पटेल. जेथे सहवास तेथे विरोधाभास होण्याची खूपच शक्यता असते. हे तत्वज्ञान जर उमगले, अंगीकारले तर बऱ्याच अंशाने मनाच्या अंशात  होण्याला पायबंध पडू शकतो. अभ्यासपूर्वकच आपल्या मनाची ठेवण व विचारसरणी कशी निर्माण झालेली आहे त्याचे चिंतन व्हावे. त्याचबरोबर इतरांच्या विचार व योजनाबदल सजग असावे. जगाला बदलून टाकण्याचा त्यांच्यावर आपले विचार थोपविण्याच्या प्रयत्नापेक्षा स्वत:च्या मनाला विचारांना परिस्थीतीनुसार ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न व्हावा. आपण बदलेला तर जग बदलले ही बाब तुम्हाला दिसू लागले.

ईश्वर दर्शन जे सर्व प्रयत्न करून भेटत नव्हते, दिसत नव्हते. त्याचे कारण आता लक्षात आले. असमाधानी, अशांत, लोभी, रागीट, अहंकारी, हेकेखोर, खोटे, दिशाहीन आणि अशाच दुर्गुनांनी घेरलेले, मन शांततेमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नाही. ही दुर्गुणाची झाकणे प्रथम दूर व्हावयास हवीत. तरच मन शुद्ध व पवित्र स्थितीमध्ये राहील हे सत्य आहे. सत्यच फक्त ईश्वराशी एकरूप होवू शकते. इश्वरी सानिध्याच्या प्रयत्नामधील प्रमुख बाधा लक्षात आली. संकल्प तर दृढ होता, विश्वास अटळ होता. भावना ईश्वरी दर्शनासाठी प्रेरीत होत्या. त्यामुळे मनाच्या शुचिर्भूतेकडे, शुध्दतेकडे, पवित्रतेकडे जोमाने, तिवृतेने प्रयत्न करू लागलो.  प्रश्न पडला केव्हा मिळणार दर्शन त्या ईश्वराचे? प्रयत्न करून आजपर्यत झाले नव्हते. जे कालचक्र भूतकाळांत गेले होते, ते कायमचे हातातून गेले होते. माझ्यासाठी तो ‘असत्य काळ’ होता.

भविष्यकाळ अर्थात येणारा, भावी काळ. निसर्गचक्रामधला एक माहित असलेला काळ, परंतू तो येवू घातलेला असल्यामुळे मानवासाठी, जीवांसाठी त्याचा प्रत्येक क्षण अनिश्चीत व अतार्कीक असा असतो. भविष्याच्या कोणत्याही अंगाची मुळीच कल्पना करता येत नाही. त्यामुळे खऱ्या विचाराने भविष्यकाळ हा देखील ‘असत्य काळ’ ह्याच सदरात जातो.परमेश्वर मला उद्या दिसेल हे हास्यापद ठरणारे आहे. कारण भविष्यकाळच जर असत्य समजला गेला तर तेथे सत्य असा तो ईश्वर कसा दिसणार?

सत्य फक्त वर्तमानकाळ हेच असते. भविष्यकाळ छलांग मारित येतो आणि क्षणातच भूतकाळामध्ये अदृष्य होतो. त्यामुळे वर्तमानकाळाचे स्वरूप क्षणाचेच भासते. येणे आणि जाणे ह्या सीमारेषांवर. मानवी विचारांच्या मोजमापांत (DIamention) ह्या वर्तमानकाळाचे अस्तित्व जाणणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आश्चर्य म्हणजे फक्त हा क्षणीक वा समयशून्य वर्तमानकाळाच ‘एक सत्य’ समजला गेला. ह्याच काळांत जर झाले तर त्या ईश्वर शक्तीचे दर्शन होण्याची शक्यता असते.

श्री. गुरूंचे मार्गदशन होते की “फक्त वर्तमान काळातच तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हास ईश्वर दर्शन होवू शकते.”

अध्यात्मज्ञान श्री गुरूमुळे मिळाले होते व वैद्यकीय ज्ञान जे मला संसारक्षेत्रात मिळाले त्या दोन्हींचा उपयोग घेण्याचे मनाने ठरविले. “क्षणयुक्त वर्तमानकाळ ईश्वर दर्शनासाठी फक्त मिळू शकेल” हे एक प्रचंड आवाहन होते. Challenge for my efforts and instinct desire. निसर्ग जसा मला वर्तमानकाळ देत आहे, जेवढा वेळ मला देत आहे तेवढाच वेळ स्वीकारण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. मी माझ्या इच्छेनुसार, गरजेनुसार तो काळ बदलू शकत नव्हतो. जो वेळ आहे जसा आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढ्याच वेळात मला माझा इच्छीत संकल्प प्राप्त करायचा आहे.

ह्यावर मी चिंता करू लागलो. मेंदू हा एक अवयव (इंद्रिय) आहे. शरिरातील मन व बुध्दी ही मेंदूशी निगडीत असते “विचार करणे” हे मेंदूचे कार्य. हे कार्य ,सतत आणि क्षणाचीही विश्रांती न घेता मेंदू करीत असतो. हे एक जीवंतपणाचे लक्षण आहे. जोपर्यत मेंदू जीवंत आहे, विचारकार्य चालू राहते. जागृत, निद्रेत, गाढ निद्रेत, बेशुध्दावस्तेत अथवा कोणत्याही स्थीतीत जीवंत मेंदूचे ‘विचार कार्य’ अविरत चालत असते. विचार लहरी लहान असोत वा मोठ्या ह्या उत्पन्न होत राहतात. एक मात्र सत्य आहे की एकावेळी फक्त एकच विचार आले त्यांची गर्दी झाली हे जरी वाटत असले तरी ‘विचार उत्पन्न’ होण्याची क्रिया आणि क्षमता एकावेळी फक्त एक विचार उत्पन्न होणे हेच असते. विचार उत्पन्न होण्याचा वेग हा मात्र कमी जास्त असू शकतो. एका मागून एक विचार चटकन येत राहणे हा निसर्ग असतो. शरीरात ‘वासना’ वा इच्छा (or Desire) हा शरीरामधला एक नैसर्गीक वा इश्वरी गुणधर्म असतो, विचार निर्मीती ही त्या वासना गुणाचाच परिणाम असतो.

विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेशनासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम कला साध्य झाली पाहिजे. गेलेल्या विचाराला जावू देणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हे आधी अवगत केले पाहिजे. त्याचक्षणी येणाऱ्या अर्थात उत्पन्न होणाऱ्या विचारावर सर्व शक्तीने लक्ष केंद्रीत करीत त्याच्या उत्पन्नावर रोख लावली पाहिजे. मनावर अर्थात विचारावर लक्ष केंद्रित करण्याची एक कला असते. एक योगीक असतो. सततच्या योग धारणेने वा प्रयत्नाने ही कला साध्य होते. विचारांचा प्रवाह थोडावेळ थांबविण्याचा प्रयत्न योग्य प्रयत्नानंतर साध्य होतो. हे अनुभवाने सांगता येते. येणाऱ्या विचाराला त्याच्या प्रवाहाला क्षणीक वा काही वेळेपर्यत थांबविणे म्हणजेच त्या विशिष्ठ वेळेत तुम्ही ‘विचार शून्य’ अशा एका स्थितीमध्ये काही वेळेसाठी जातात. गेलेला विचार दुर्लक्षीत करणे व येणारा विचार थोपवून धरणे म्हणजेच तुम्ही तुमच्यासाठीचा वर्तमानकाळातला रूंद करता आहात, वाढविता आहात. वर्तमान काळाला व्यापक करता आहात. हाच तो काळ जेथे न विचार न हालचाल न अस्तित्वाची जाण न प्रकाश न अंधकार. सर्वत्र शांततेचा भास होतो.

वर दिलेले वर्णन ‘वर्तमानकाळ’ हा तुमच्यासाठी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे अथवा वर्तमानकाळाच्या सीमारेखा (काल्पनीक) रूंदावण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्याच थोड्याशा काळामध्ये तुम्हाला त्या महान ईश्वराचे दर्शन घडणारे असमार त्यासाठीची ही वातावरण निर्मीती.

योग सामर्थ्य आणि प्राणायाम या क्रियांची शक्ती प्रचंड असते. शरीराच्या बाह्य तसेच आंतर हालचालींवर ताबा निर्माण करण्याची ही एक साधना आहे. परिणामी शरीर अर्थात इंद्रिये मन आणि बुध्दी (विचार) ह्या सर्वावर एकप्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ह्या साधनानी प्राप्त होते. ही साधना अत्यंत अवघड आहे. प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रयत्नाने, नियमित दैनंदिन केलेल्या सरावाने आणि जाणीवपूर्वक अशा लक्षकेंद्रीत करण्यानेच साध्य होणारी असते. ही एक प्रकारची तपश्चर्या असते. कित्येक योगी ह्रदयाच्या, फूफ्फूसांच्या, आतड्यांचा होणाऱ्या नैसर्गीक  अनैच्छीक हालचालींवरसुध्दा मर्यादीत ताबा मिळवू शकतात. हे फक्त योग साधनेमुळे, ह्याच तत्वाने मेंदूच्या हालचालींवर  देखील मर्यादीत नियंत्रण करता येते. त्याच्या कार्यावर ऐच्छीक ताबा मिळवता येतो. हीच गोष्ट मेंदू अर्थात बुध्दी सतत करीत असलेल्या विचारावर मर्यादीत ताबा मिळवून त्याचे विचार उत्पन्नाचे कार्य थोडावेळ बाधीत करण्यात होवू शकते.    ध्यान धारणा ही योगामधली सर्वश्रेष्ठ साधना समजली गेली. स्वत:ची ओळख जाणण्यासाठी ‘मी कोण आहे’ ‘self-realigation’ ईश्वर म्हणजे काय? जीवात्मा विषयीचे ज्ञान ह्या साऱ्या प्रश्नाची उकल केवळ ध्यानसाधनेमुळे होवू शकते.

(क्रमशः)

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..