नवीन लेखन...

मला देव दिसला !

बाल वयात सभोवतालच्या जगाविषयी समज येऊ लागली. त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा, त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थिर होऊ लागला. जन्म, संस्कार आणि कौटुंबिक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरित पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पाऊ लागले. कसलाही विरोध न करता ग्रहण करणे, आत्मसात करणे ही मनाची ठेवण व स्वभाव बनू लागला. अनेक कविता, श्लोक, सुभाषिते ज्यांचा अर्थ त्यावेळी मुळीच कळला नव्हता, ती मुखपाठ करू लागलो.  त्यात महान तत्वज्ञान भरलेले आहे. चांगले विचार आहेत. भावनांचे उच्च स्तर आहेत. ईश्वरी श्रध्देचे वर्णन आहे. जीवन कशासाठी व जगायचे कशाकरीता ह्याचा अर्थ भरलेला आहे. हे सारे आम्हास सांगितले गेले. ते आम्ही जसे आहे तसेच पाठांतर करून नियमीत रूपाने व्यक्त करीत होतो, म्हणत होतो. त्यावर फारसे चिंतन केले नव्हते. कित्येक संस्कृत श्लोक मुखोद्गत केले व म्हटले गेले ज्याचा आजही अर्थ व्यवस्थित कळत नाही. एक मात्र झाले की सर्वांमधून त्या ईश्वराची महानता, भव्यता, दिव्यता, अथांगपणा, शक्तीसामर्थ ह्या गुणांची प्रचिती येवू लागली. फक्त ओळख पटू लागली. ह्यातच जाणीव निर्माण होवू लागली की त्या दिव्य अशा परमात्म्याला कसे भेटावे, बघावे आणि खऱ्या अर्थाने कसे जगावे.

कौटुंबिक धार्मिक संस्काराचा पगडा मनावर बसत असत होता. पूजाअर्चा, मंत्र विधींचा प्रभाव पडू लागला. देवघरातील मुर्ती, तसबीरी मनाला आनंद देणाऱ्या वाटू लागल्या. कर्मकांडात मन गुंतू लागले. पूजापाठ, भजन ह्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न झाला. धार्मिक पुस्तक संग्रह गोळा करू लागलो. पूजा विधी कशी नीटनेटकी होईल. ह्याकडे लक्ष केंद्रित करू लागला. कोणतीही वस्तू वा साधने जर पूजाविधीत कमी पडली तर खंत वाटू लागली. त्याची योजना व काळजी घेतली जाई. समोर असलेल्या मूर्ती व तसबिरीबद्दल ज्ञान मिळण्याची उत्सुकता लागली. माहितीसाठी अनेक पौराणिक ग्रंथाचे वाचन करू लागलो. अर्थात् ते अभ्यासणे म्हणण्यापेक्षा चाळणे असावयाचे. प्रचंड धार्मिक पुस्तके वाचली. देवदेवतांची वर्णने, त्यांच्या विषयीच्या अनेक कथा, त्यांची उत्पती अथवा अवतार पावणे, प्रासंगिक कथा, शाप-वरदानाच्या गोष्टी   वाचल्या. अनेक संख्या असलेले म्हणजे ३३ कोटी देवांची संख्या असलेले वर्णन, अनेकांची कार्ये व विश्वाची योजना इत्यादी प्रचंड प्रमाणात असलेली माहिती घेतली. वाचता वाचता, संकलन करता करता, मन आनंदून जात असे. त्याचवेळी मनात असंख्य प्रश्नांची गर्दी होऊ लागली. कित्येक कथा प्रसंग, वर्णने आणि परिणाम मानव जीवनचक्राला समोर ठेवून केल्याचे भासले. त्यामध्ये थोडीशी भव्यता, दिव्यता प्रदर्शीत होत आहे. मानवी जीवनाचा वरचा स्तर, उच्चता फक्त प्रतीत होत होती. कित्येक प्रसंग वा वर्णने मनाच्या श्रध्देला विचलीत करीत होते. ती अंधश्रध्देच्या दालनात नेवून ठेवीत होते. मनाचा एक प्रकारे कोंडमारा होत असल्याची जाणीव होत होती.

आपलीही एक बुध्दी आहे, विचार करण्याची आपलीपण क्षमता आहे. हे वाटू लागले. एखादा विचार जो वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्याचे मुळ अज्ञात आहे. त्यात बरेच फेर बदल झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो विचार आजच्या घडीला स्थिर झाल्याप्रमाणे भासतो. तो आहे तसाच मान्य करावा का? ह्यामध्ये मन हेलकावे घेऊ लागले. तरी आपल्या अभ्यासाच्या मर्यादा जाणल्या. ते पौराणिक चित्र, त्या कथा तशाच मान्य कराव्यात हे मनाने ठरविले. जे पूर्ण पटले, आवडले त्याला श्रध्देने मान्यता दिली. जो भाग विपरीत वाटला, त्यावर भाष्य न करता विचारांच्या दालनातून वेगळा करून दिला.

पौराणिक कथा व कथासार वाचण्याने मनाच्या धार्मिक वृत्तीला, ईश्वरी सान्निध्याची ओढ लागली. ईश्वरी रूप मनामध्ये दृढ होवू लागले. सगुण ईश्वरी साधना मनास आनंदी देईल, समाधान देण्यासाठी मदत करेल हा विचार दृढ झाला. अनेक सगुण रूपी ईश्वरांच्या प्रतिमांनी मनात एकच गर्दी केली. ‘ ओम् नमो भगवते वासूदेवाय नमः  ह्याचे भव्यतेमध्ये महाविष्णूची प्रतिमा डोळ्यापुढे आली. ‘ जय जगदंबेच्या ‘ स्वरूपात विश्वाची जगत जननी श्री अंबामाता तिच्या सिंहरूप वाहन व आयुधे यांनी मन प्रसन्न होण्याचा अनुभव आला. श्री गजानन, श्री कृष्ण, श्री राम, श्री सूर्यनारायण अशा अनेक भव्य आणि दिव्य देवदेवतांचे प्रतिमामय वर्णनात्मक स्वरूप मनात तरंगू लागले. त्यांची अनेक कार्ये, शक्ती महत्व आणि कृपादृष्टी यांची वर्णने धार्मिक पुस्तक संग्रहामधून होऊ लागली. त्याचा मनावर पगडा बसू लागला. सर्वांविषयी श्रध्दा निर्माण होऊ लागली.

पुस्तकांच्या ह्या संग्रहामधून पौराणिक जगातून आधुनिक जगामध्ये येऊ लागलो. आधुनिक जगाचा ईश्वरी मार्गदर्शनाच्या इच्छेने अभ्यास होऊ लागला. थोर संत मंडळी, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज, श्री. संत एकनाथ महाराज,  श्री. संत नामदेव  महाराज आणि चरित्रे व कार्य वाचले. ह्यांनी अशाच थोर संत मंडळींनी आपल्या ज्ञानांने, भक्तीरसांनी आणि विशेष म्हणजे आपल्या उच्चतम मानवी वागणुकींनी समाजात आदर्श घालून दिला. भक्तीमार्गाच्या दिशांचे मार्गदर्शन केले.  ते मनाला खूपच आनंद व समाधान देणारे वाटले. अनेक देवदेवतांचे वर्णन व त्यांचे दिव्यत्व ह्यांचे ज्ञान होवू लागले. परमेश्वराचे एक रूप, त्याचे सर्व ठिकाणचे अस्तित्व आणि तो सर्व शक्तीमान असल्याची जाणीव त्यांच्या लेखनातून, अभंगातून तीव्रतेने होऊ लागली. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही एका देवाला समर्पित व्हा, त्याच्यावरच आपली श्रध्दा, भक्ती अर्पण करा, त्याच्या एकाच सगुणरूपामध्येच त्या निर्गुण, निराकार परमात्म्याला बघा. त्या तुमच्या इष्ट देवामध्येच तुम्ही त्याला जाणू शकाल. तुमचे प्रेम, समर्पण व भक्ती ही शेवटी जी प्रमुख देवता शक्ति असेल तिलाच मिळते. निरनिराळ्या सगुण देवतांच्या वर्णनामुळे चंचल मनाची जी संभ्रमावस्था होत असे तिला बंधन पडले. कोणता देव मोठा, कोणता महान, कोणता कृपावंत वा कोणता आपल्या भक्तीला पावेल ह्या वैचारिक वादळाची शांतता झाल्याचे वाटले. आता भक्ती व समर्पण भावना फक्त एकाच देवाच्या चरणीं अर्पण करण्याचा संकल्प मनाने घेतला.

माझे गुरू श्री शंकराचार्य जेरेस्वामी महाराज यांचा संकल्प मनाने घेतला. त्यांचे मार्गदर्शन झाले. त्यांची पाद्यपूजाकरून आशीर्वाद घेतले. “तुझ्या कुळाची घराण्याची देवता कोणती?” अर्थात कुलस्वामी वा कुलस्वामिनी श्री. जगदंबा रेणुकादेवी आहे. त्यामुळे त्याच श्री जगदंबेचे सतत चिंतन करणे, तिची सदैव आठवण ठेवणे, तिचे नामस्मरण करणे आणि जी विविध देवता रूपे आहेत त्या सर्वाना भक्तीपूर्वक फक्त त्या जगदंबेमध्येच असल्याचे समजणे, तिच्याच रूपांत, नावात सर्व देवतांचे दर्शन झाल्याचे समाधान मनात धारण  करणे, हा उपदेश मिळाला. वैचारिक द्विधा परिस्थिती एकदम नाहीशी झाली. माझी ईश्वरी संकल्पना जी होती तिचे स्वरूप मी फक्त श्री जगदंबेच्या, फक्त एकाच देवतेमध्ये केंद्रिंत करू लागलो. तिचेच नामस्मरण व आठवण सतत राहील याची काळजी जाणीवपूर्वक घेवू लागलो. कांहीं काळानंतर जगदंबेच्या नामस्मरणाची संवय होऊ लागली. इतर कोणत्याही देवतेचे नाव जवळ जवळ विसरले जाऊ लागले.  फक्त “जय जगदंब” हेच मनात येऊ लागले. कोणत्याही देवाच्या मंदीरामध्ये जर दर्शनाला जाण्याचा योग आला तर त्या देवतेच्या मूर्तीला श्रध्दापूर्वक अभिवादन करताना, त्याचे स्तुतीश्लोक म्हणण्याऐवजी फक्त “जय जगदंब” म्हणत असे.  मी त्या देवतेच्या ठिकाणी श्री जगदंबाच असल्याची भावना व्यक्त करून नमस्कार करीत असे. असल्या वागण्याची प्रथम प्रथम मनात खंत व शंका येत होती. मन बहकले असावे असे वाटे. समोर श्री गजाजनाची वा  श्री. शंकराची अथवा श्री विष्णूची , रामकृष्ण यांची मूर्ती बघत असताना, त्याना अभिवादन करीत असताना मी मात्र ‘जय जगदंब’ म्हणत असे. त्या त्या देवताना तिच्याच रूपात नमस्कार करीत असे. परंतु माझ्या मनाचा दृढनिश्चय आणि मी केलेला संकल्प मला सतत धीर देत होता.

थोड्याशाच काळानंतर मनाची संभ्रमी अवस्था एकदम नाहीशी झाली. माझ्या भक्तिची दिशा व नामस्मरण मी केवळ जय जगदंबेच्या चरणी अर्पण करण्यात यशस्वी होऊ लागलो. त्या जगदंबेचे सततचे नामस्मरण व भक्तीपूर्वक आठवण हा देखील पूजा अर्चेचाच एक भाग असल्याची जाणीव होत होती. ते एक कर्मकांडच होते. जर देव दिसला, भेटला तर कदाचित श्री जगदंबेच्या स्वरूपात असेल ही मनाची पक्की खात्री झाली. परंतु ही सारी जरतर ची भाषा होती, समज होती.

त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवीदेवी, अमरनाथ, रामेश्वर तिरुपति आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या. देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती. कित्येकांनी भक्ती व तपश्चर्या तेथे जाऊन अर्पण केलेली. ती भूमि, तो परिसर पवित्र करण्यात सहभाग घेतलेला. तेथील देवदेवतांच्या मुर्तीमध्ये दिव्यत्त्वाच्या शक्तीची साठवणूक केलेली. अशा मंदिर परीसरांना भेट देण्याचा प्रयत्न केला गेला. यथासांग पूजा, भजन व दर्शन घेत गेलो. त्या देवतांमध्येच श्री जगदंबेला बघण्याचा प्रयत्न केला.

हे सारखे शारीरिक होत होते. मनाला, भावनेला भक्तीला समर्पण करण्याचा प्रयत्न होत होता. हे सारे क्रियात्मक, योजनात्मक (procedural  approach) होत होते. ईश्वरप्रातीसाठी काहीतरी रचनात्मक आणि परंपरागत गोष्टी करीत असल्याची भावना होत होती. समाधान मिळत होते. आनंद प्राप्त होत होता. परंतू शांतता अर्थात ‘मनाची शांतता’ मात्र मुळीच हाती लागली नाही. दैनंदिन पूजा-अर्चा, नामस्मरण, भजन-किर्तन, पवित्र स्थळांचे , मंदिरांचे दर्शन, पवित्र नद्यांचे-जलांचे स्नान ह्या सर्व बाबी मन एकाग्र करून भक्तीने करीत गेलो, परंतू खरी ‘मानसीक शांतता’ केव्हांच मिळाल्याचा भास झाला नाही. माझे गुरू श्री शंकराचार्य जेरेस्वामी,  यांना शरण गेलो. चर्चा झाली. सान्तवन केले गेले. मार्ग सुचविले गेले. त्यावर चिंतन करून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न झाला.

***  स्वभावाची ठेवण, वागणूकीची पध्दत, मनाचे विकार हे सारे खरी शांततामिळण्या मधल्या बाधा होत्या. आजपर्यतेचे जे प्रयत्न झाले. हे सारे बाह्यांगी होते. त्याचा आनंद व समाधान तितकाच सीमित होता. आत्मिक आनंद प्राप्त करायचा होता. त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज होती. चांगला, प्रेमळ व निस्वार्थी स्वभावात नेहमी राहण्याची सवय ही खरी प्राथमिक महत्वाची पायरी होती. सभोवताली असलेल्या वातावरणाशी, दैनंदिन संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तींशी,  संसार होत जाणाऱ्या घटनांशी,  मनाचा विचारांचा सतत संपर्क येत असतो. मन त्या संपर्काला त्याप्रमाणेच प्रतिसाद देत असते. वैचारीक स्वभावाची ठेवण, राग, लोभ मोह इत्यादी षड् रिपूंचा पगडा ह्याचा परिणाम प्रत्येक घटनेशी प्रतिक्रिया होण्यात होतो. ह्या ठिकाणी योग्य वा अयोग्य ह्या परिणामापेक्षा ईच्छा व आवड ह्या भावनिक बाबींचा जास्त विचार मन करते. शेवटी त्या परिस्थितीतून उत्पन्न होते ती अशांत “मनाची अवस्था”.  शांत मनाने विचार केला, चिंतन केले तर तुम्ही  गरजेशिवाय प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या संवादामध्ये, सहवासामध्ये विनाकारणच स्वत:ला गुरफटून घेत असल्याची सत्यता पटेल. जेथे सहवास तेथे विरोधाभास होण्याची खूपच शक्यता असते. हे तत्वज्ञान जर उमगले, अंगिकारले तर बऱ्याच अंशाने मनाच्या अंशात  होण्याला पायबंद पडू शकतो. अभ्यासपूर्वकच आपल्या मनाची ठेवण व विचारसरणी कशी निर्माण झालेली आहे त्याचे चिंतन व्हावे. त्याचबरोबर इतरांच्या विचार व योजनाबद्दल सजग असावे. जगाला बदलून टाकण्याचा त्यांच्यावर आपले विचार थोपविण्याच्या प्रयत्नांपेक्षा स्वत:च्या मनाला,  विचारांना परिस्थितीनुसार ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न व्हावा. आपण बदललो तर जग बदलेल ही बाब तुम्हाला दिसू लागेल.

ईश्वर दर्शन जे सर्व प्रयत्नकरून होत नव्हते, दिसत नव्हते. त्याचे कारण आता लक्षात आले. असमाधानी, अशांत, लोभी, रागीट, अहंकारी, हेकेखोर, खोटे, दिशाहीन आणि अशाच दुर्गुणांनी घेरलेले मन,  शांततेमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नाही. ही दुर्गुणांची झाकणे प्रथम दूर व्हावयास हवीत. तरच मन शुद्ध व पवित्र स्थितीमध्ये राहील हे सत्य आहे. सत्यच फक्त ईश्वराशी एकरूप होवू शकते. इश्वरी सानिध्याच्या प्रयत्नामधील प्रमुख बाधा लक्षात आली. संकल्प तर दृढ होता, विश्वास अटळ होता. भावना ईश्वरी दर्शनासाठी प्रेरीत होत्या. त्यामुळे मनाच्या शुचिर्भूततेकडे, शुध्दतेकडे, पवित्रतेकडे जोमाने, तिव्रतेने प्रयत्न करू लागलो.  प्रश्न पडला केव्हां मिळणार दर्शन त्या ईश्वराचे? प्रयत्न करून आजपर्यत झाले नव्हते. जे कालचक्र भूतकाळांत गेले होते, ते कायमचे हातातून गेले होते. माझ्यासाठी तो ‘दुर्गम काळ’ होता.

भविष्यकाळ अर्थात येणारा, भावी काळ. निसर्गचक्रामधला एक माहित नसलेला काळ, परंतू तो येवू घातलेला असल्यामुळे मानवासाठी, जीवांसाठी त्याचा प्रत्येक क्षण अनिश्चीत व अतार्कीक असा असतो. भविष्याच्या कोणत्याही अंगाची मुळीच कल्पना करता येत नाही. त्यामुळे खऱ्या विचाराने भविष्यकाळ हा देखील ‘अगम्य काळ’ ह्याच सदरात जातो. परमेश्वर मला उद्या दिसेल हे हास्यापद ठरणारे आहे. कारण भविष्यकाळच जर अगम्य समजला गेला तर तेथे सत्य असा तो ईश्वर कसा समजणार?

सत्य फक्त वर्तमानकाळ हेच असते. भविष्यकाळ छलांग मारित येतो आणि क्षणातच भूतकाळामध्ये अदृष्य होतो. त्यामुळे वर्तमानकाळाचे स्वरूप क्षणाचेच भासते. येणे आणि जाणे ह्या सीमारेषांवर. मानवी विचारांच्या मोजमापांत (Dimension) ह्या वर्तमानकाळाचे अस्तित्व जाणणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आश्चर्य म्हणजे फक्त हा क्षणीक वा समयशून्य वर्तमानकाळाच ‘एक सत्य’ समजला गेला. ह्याच काळांत जर झाले तर त्या ईश्वर शक्तीचे दर्शन होण्याची शक्यता असते.

श्री. गुरूंचे मार्गदशन होते की फक्त वर्तमान काळातच तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हास ईश्वर दर्शन होऊ शकते.”

अध्यात्मज्ञान श्री गुरूमुळे मिळाले होते व वैद्यकीय ज्ञान जे मला संसारक्षेत्रात मिळाले त्या दोन्हींचा उपयोग घेण्याचे मनाने ठरविले. “क्षणभर वर्तमानकाळ ईश्वर दर्शनासाठी फक्त मिळू शकेल” हे एक प्रचंड आव्हान होते. Challenge for my efforts and instinct desire. निसर्ग जसा मला वर्तमानकाळ देत आहे, जेवढा वेळ मला देत आहे तेवढाच वेळ स्विकारण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. मी माझ्या इच्छेनुसार, गरजेनुसार तो काळ बदलू शकत नव्हतो. जी वेळ आहे जसा आहे, जेवढी वेळ मिळेल तेवढ्याच वेळात मला माझा इच्छित संकल्प प्राप्त करायचा आहे.

ह्यावर मी चिंतन करू लागलो. मेंदू हा एक अवयव (इंद्रिय) आहे. शरिरातील मन व बुध्दी ही मेंदूशी निगडीत असते “विचार करणे” हे मेंदूचे कार्य. हे कार्य ,सतत आणि क्षणाचीही विश्रांती न घेता मेंदू करीत असतो. हे एक जिवंतपणाचे लक्षण आहे. जोपर्यत मेंदू जिवंत आहे, विचारकार्य चालू राहते. जागृत, निद्रेत, गाढ निद्रेत, बेशुध्दावस्थेत अथवा कोणत्याही स्थितीत जिवंत मेंदूचे ‘विचार कार्य’ अविरत चालत असते. विचार लहरी लहान असोत वा मोठ्या ह्या उत्पन्न होत राहतात. एक मात्र सत्य आहे की एकावेळी फक्त एकच विचार आला त्यांची गर्दी झाली हे जरी वाटत असले तरी ‘विचार उत्पन्न’ होण्याची क्रिया आणि क्षमता एकावेळी फक्त एक विचार उत्पन्न होणे हेच असते. विचार उत्पन्न होण्याचा वेग हा मात्र कमी जास्त असू शकतो. एका मागून एक विचार चटकन येत राहणे हा निसर्ग असतो. शरीरात ‘वासना’ वा इच्छा (or Desire) हा शरिरामधला एक नैसर्गिक वा ईश्वरी गुणधर्म असतो, विचार निर्मीती ही त्या वासना गुणाचाच परिणाम असतो. विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रित केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेषणासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम कला साध्य झाली पाहिजे. गेलेल्या विचाराला जाऊ देणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हे आधी अवगत केले पाहिजे. त्याचक्षणी येणाऱ्या अर्थात् उत्पन्न होणाऱ्या विचारावर सर्व शक्तीने लक्ष केंद्रीत करीत त्याच्या उत्पन्नावर रोख लावला पाहिजे. मनावर अर्थात विचारावर लक्ष केंद्रित करण्याची एक कला असते. एक योगी असतो. सततच्या योग धारणेने वा प्रयत्नाने ही कला साध्य होते. विचारांचा प्रवाह थोडावेळ थांबविण्याचा प्रयत्न योग्य प्रयत्नानंतर साध्य होतो. हे अनुभवाने सांगता येते. येणाऱ्या विचाराला त्याच्या प्रवाहाला क्षणिक वा काही वेळेपर्यत थांबविणे म्हणजेच त्या विशिष्ट वेळेत तुम्ही ‘विचार शून्य’ अशा एका स्थितीमध्ये काही वेळेसाठी जाता. गेलेला विचार दुर्लक्षित करणे व येणारा विचार थोपवून धरणे म्हणजेच तुम्ही तुमच्यासाठीचा वर्तमानकाळाला रूंद करता आहात, वाढविता आहात. वर्तमान काळाला व्यापक करता आहात. हाच तो काळ जेथे न विचार, न हालचाल, न अस्तित्वाची जाण, न प्रकाश, न अंधकार. सर्वत्र शांततेचा भास होतो.

वर दिलेले वर्णन ‘वर्तमानकाळ’ हा तुमच्यासाठी दिर्घ निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे अथवा वर्तमानकाळाच्या सीमारेखा (काल्पनिक) रूंदावण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्याच थोड्याशा काळामध्ये तुम्हाला त्या महान ईश्वराचे दर्शन घडणारे असणार,  त्यासाठीची ही वातावरण निर्मिती.

योग सामर्थ्य आणि प्राणायाम या क्रियांची शक्ती प्रचंड असते. शरीराच्या बाह्य तसेच आंतर हालचालींवर ताबा निर्माण करण्याची ही एक साधना आहे. परिणामी शरीर अर्थात इंद्रिये मन आणि बुध्दी (विचार) ह्या सर्वावर एकप्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ह्या साधनेने प्राप्त होते. ही साधना अत्यंत अवघड आहे. प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रयत्नाने, नियमित दैनंदिन केलेल्या सरावाने आणि जाणीवपूर्वक अशा लक्षकेंद्रीत करण्यानेच साध्य होणारी असते. ही एक प्रकारची तपश्चर्या असते. कित्येक योगी ह्रदयाच्या, फूफ्फूसांच्या, आतड्यांचा होणाऱ्या नैसर्गिक  अनैच्छिक हालचालींवरसुध्दा मर्यादित ताबा मिळवू शकतात. हे फक्त योग- साधनेमुळे, ह्याच तत्वाने मेंदूच्या हालचालींवर  देखील मर्यादीत नियंत्रण करता येते. त्याच्या कार्यावर ऐच्छीक ताबा मिळवता येतो. हीच गोष्ट मेंदू अर्थात बुध्दी सतत करीत असलेल्या विचारावर मर्यादित ताबा मिळवून त्याचे विचार उत्पत्तीचे कार्य थोडावेळ बाधीत करण्यात होवू शकते.    ध्यान धारणा ही योगामधली सर्वश्रेष्ठ साधना समजली गेली. स्वत:ची ओळख जाणण्यासाठी ‘मी कोण आहे’ ‘self-realization’ ईश्वर म्हणजे काय? जीवात्मा विषयीचे ज्ञान ह्या साऱ्या प्रश्नांची उकल केवळ ध्यानसाधनेमुळे होवू शकते.

परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणिक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते. संकल्प व दृढ निश्चयाला विश्वासाने सतत जागृत ठेवीत गेलो. वरील सर्व कार्यप्रणाली ही कर्मकांडाचाच एक भाग होती. हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होते. दाही दिशांनी भटकणाऱ्या चंचल मनाला एक दिशेने मार्गस्थ करण्याचे प्रयत्न होते. लक्ष  केंद्रीत करण्याचे त्या साधनेमध्ये सामर्थ्य होते. खऱ्या अर्थाने मला नितांत आनंद असीम समाधान व मनाची प्रचंड शांतता लाभली ती ध्यान योगानेच.

मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे

होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा  वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस,

गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.

ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला,  हे सत्य घडेल, तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.

जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Ecstasy of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.

ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला  जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादात्म  होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण,

निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते.

संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत ईश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती.

कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ  मिळाली नसती.

मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव  आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो.   कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि  गुरू जेरे स्वामी यांचे  आभार मानले. त्यांना  साष्टांग दंडवत.

 

— डॉ. भगवान नागापूरकर

bknagapurkar@gmail.com

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..