नवीन लेखन...

महापूर – कथा – १

म्हातारी कमरेत पार वाकली होती .

काठीच्या आधारानं , लटपटत्या पायांनी , शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी , गळणाऱ्या भांड्यातून आणत होती .

चार दिवसांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले , पाच मृतदेह , माती बाजूला करून कुणीतरी वर आणून ठेवले होते .
त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृतदेहावर , म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करीत होती .

म्हातारा नवरा , मुलगा , सून , नातवंडं मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यावर , त्या देहाकडे बघताना , खाचा होत चाललेल्या डोळ्यांतलं पाणी केव्हाच आटून गेलं होतं .
ऐंशी वर्षाचा तिचा सुरकुतलेला देह अधिकच आक्रसून गेला होता .

पाण्यानं ते सडलेले मृतदेह धुण्याचं तिचं काम सुरूच होतं

समोर बघ्यांची गर्दी , हातातल्या मोबाईलवर त्यादृश्याचा व्हिडीओ काढण्यात गर्क होती .

चॅनलवाले शूटिंग करीत होते. म्हातारीचा बाईट घेण्यासाठी धडपडत होते .

त्यांचे प्रश्न तयार होते .
– या बॉडी कडे बघताना आता मनात काय भावना आहेत ?
– नातवंडं कशी ओळखली ?
– घर गाडलं जात असताना , त्या प्रसंगाकडे कसं बघता तुम्ही ?
– समाजाला काय सांगाल ?

एक ना दोन , अनेक प्रश्न तयार होते , पण म्हातारी त्यांच्याकडे बघत नव्हती .
त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता .
रिकामटेकडे बघे मात्र चर्चा करीत होते .

थोड्या वेळाने म्हातारीने एक पितळी डबा हाती घेतला . त्याच डबक्यातल्या पाण्याने धुतला . आणि उघडून बघ्यांच्या गर्दीतल्या सर्वांसमोर धरला .
त्यात पाचशेच्या दहाबारा नोटा होत्या .
एक सोन्याचं मंगळसूत्र होतं . आणि चांदीचे चार वाळे होते .

” हे घ्या सोनं , चांदी आणि होते नव्हते ते पैसे . तुम्हाला या मदतीची गरज आहे ! यातून तुम्हाला नवीन मोबाईल घेता येईल , प्रसिध्दी मिळेल आणि फेसबुक की कायसं असतं ना , त्यावर टाकता येईल . हे घ्या . मला आता याचा उपयोग नाही . टिव्ही वाल्यांना पण द्या . ”

म्हातारीनं सगळ्यांसमोर डबा ठेवला . पाठी वळली .

गर्दीतल्या बघ्यांच्या माना खाली झुकल्या होत्या . मोबाईल बंद झाले होते. चॅनल वाल्यांचे बूम बंद पडले होते . आणि कॅमेरा वाल्यांनी अँगल बदलला होता .

आता मात्र खाली झुकलेल्या प्रत्येकाला जाणवत होतं…

– आपले पाय मातीनं जरा जास्तच बरबटले आहेत …!

– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
——–
कथा नावासह शेअर करायला माझी काहीच हरकत नाही .
मात्र कथेतील आशयावर चिंतन जरूर करा .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..