नवीन लेखन...

काव्यसुमनांजली – म्हणजेच अपेक्षा वाढविणार्‍या कविता

एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला आहे. ‘काव्यसुमनांजली’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून ते आता सर्व वाचकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या या सेवेला मन:पूर्वक धन्यवाद!

p-22946-Kavyasumananjali-Coverहरिश्चंद्र कोळी हे मुळात शिक्षक असल्यामुळे शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, सुट्टी, बालमन, सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत, साक्षरता, शिक्षकदिनासह, निरोपसमारंभ गीता पर्यंतचे सर्व विषय त्यांच्या कवितांमधून आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांनी रुजवलेले शिक्षण प्रमाणभूत मानल्यामुळे सामाजिक मूल्ये त्यांच्या कवितांमधून आलेली दिसतात. म्हणूनच, ‘शाळा माझी माऊली’ या कवितेत ते म्हणतात –

‘शाळा आपुली माय माऊली

तिच देते तुम्हां साऊली

हसा, खेळा, पडा, धडपडा

राखा देशाचा मान

वेचा कण-कण ज्ञान’

हसत खेळत शिक्षण घेण्याचे मूल्य रुजतांनाच देशाचा मान राखण्याचा संस्कार ही ते मुलांवर करतात. साने गुरुजींचा आदर्श जपण्याचा ते प्रयत्न करतांना दिसतात.

स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का? ‘स्वातंत्र्या नंतरही’ या कवितेमध्ये आजच्या भ्रष्ट समाजाचा आरसा तर ते दाखवतातच पण आपण या स्वतंत्र राष्ट्रात सुरक्षित आहोत का? असा प्रश्नही विचारतात. आणि मुलांना सांगतात –

‘एक दिलाने गाऊ आपण

देशाचे गुणगाण रे

श्रमातुनी आणि त्यागातुनी

घडवू भारत छान रे

घडवू भारत छान’

श्रम आणि त्यागाचे मूल्य सांगतानाच ‘कुठलंही व्यसन न करण्याचा’ आदर्श व्यक्त करतात. जीवन म्हणजे काय? जगणं म्हणजे काय? सुख – दु:ख म्हणजे काय? याची सुंदर व्याख्या ‘जीवन’ या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात –

‘जीवन म्हणजे केवळ जगणं नसतं तर

सुख – दुःखाच्या दरम्यान

श्वास आणि उच्छवास

यातील अंतर

म्हणजे खरं जीवन’

जीवनाची अशी व्याख्या त्यांच्या विचारांचा पोत ठरवते. ‘महिला दिन’ या कवितेमध्ये इतिहासातील अनेक क्रांतिकारी स्त्रियांचे दाखले देत असतांनाच… आजच्या स्त्रीला प्रेरणा देण्यासंबंधी भाष्य करून तिचा पाय मागे न ओढण्याची विनंती करतात.

‘शाळेतील मुलांना मला शिकवायचे आहे

समाजात जगण्यालायक बनवायचे आहे’

(आदर्श शाळा)

त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, नैतिकमूल्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन, साक्षरतेचा प्रसार करण्याचा मार्ग ते सुचवतांना दिसतात –

‘एका जागी राहून उभा

आला असेल वीट

विठ्ठला s s s सोड तुझी वीट’ (वारकरी)

असे विठ्ठलाला अगदी सहजपणे सांगतात. ‘उन्हं पाहून पाठ फिरवणारी माणसं’ त्यांना नको आहेत. ‘भाकरीचा चंद्र शोधणारी माणसं हवी आहेत.’ ‘मी अडाणी कसा’ या कवितेमध्ये नैतिकता ही शिक्षणावर अवलंबून नसते तर ती नैतिक वागण्यावर अवलंबून असते. हे सांगताना कवी म्हणतात, ‘निरक्षर माणसाला लिहिता वाचता येत नाही पण बाकी सगळा व्यवहार समजतो. मान – अपमान समजतो. भ्रष्ट्राचार लक्षात येतो. पाहुणचार करता येतो’ मग असा माणूस अडाणी कसा? भ्रष्ट वागणारे साक्षर शहाणे कसे?… विचार करायला लावणारा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे.

‘आम्ही सालस प्रेमळ

निर्व्यसनी माणसं पेरली

पण निरक्षर, लाचार

पण हावरट माणसंच जन्मली’ (निर्दयी माणसे)  

या काव्यसंग्रहातील ‘भारती’ ही भारत मातेची आजची अनावस्था दाखविणारी कविता मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘गर्दी’, ‘जगणं’, ‘कलियुग’, ‘बाप’, ‘चेंडू’, ‘पोर वयात आली’, ‘विटंबना’, ‘वादळ’ सारख्या कवितांनी कवी बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. साध्या – सोप्या सरळ भाषे मधील कविता गेय, गझल, मुक्तछंद, चारोळ्या, लावणी वगैरे प्रकारातील असून काही कविता गीतांच्या चालीवर लिहिलेल्या आहेत.

हरिश्चंद्र कोळी यांचा लिहिता हात आहे. विचारांची झेप आहे. ती अधिक खोल व व्यापक व्हावी. त्यांना त्यांची लय सापडावी. भविष्यातील अधिकाधिक कसदार लेखनासाठी त्यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! आणि ‘काव्यसुमनांजली’ या पहिल्या कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत!  

 

– नीलम माणगावे,

कवयित्री व लेखिका, जयसिंगपूर

 

Title – Kavyasumananjali (काव्यसुमनांजली)

Poet – Harishchandra Mahadev Koli  (हरिश्चंद्र महादेव कोळी)

Edition – First Edition

Price – Rs. 100/- (मूल्य 100/- रुपये)

Publisher – Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)

Publication – KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)

Contact – 02322 – 225500, 09975873569

Email – kavitasagarpublication@gmail.com

 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..