नवीन लेखन...

काश्मीर एक जाणीव – भाग चार

अवंतीपूर !

एके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !

कलात्मकता , काव्यात्मकता , कौशल्य , कणखरपणा यांचा अद्वितीय संगम !

राजाधिराज अवंतीवर्मन यांनी आठव्या शतकात वसवलेली अद्वितीय , अप्रतिम राजधानी !

चिनार , देवदार सारख्या दीर्घायुषी वृक्षांची जाणीवपूर्वक केलेली लागवड आणि जोपासना जिथे आजही अनुभवायला मिळते…

हिमशिखरांचे अचंबित करणारे तेजस्वी दर्शन जिथून घडते …

एरव्ही इतरत्र अप्राप्य असणारे , पण जिथे पाऊल ठेवताच प्रसन्न , शुद्ध हवेची ग्वाही देणारे …

नानाविध फुलांच्या मोहमयी गंधात आकंठ बुडत असताना आपली जाणीव जागृत ठेवणारे …

समृद्धीच्या काळात सदैव प्रजेच्या हिताची कामे करीत असताना हिंदू संस्कृतीचा , प्राचीन परंपरांचा आणि चौदा विद्या , चौसष्ट कलांचा एकत्रित अनुभव देणारे अवंतिस्वामी हे विष्णू मंदिर …

तिथून जवळच असणारे श्री शिवेश्र्वर हे भगवान शंकरांचे मंदिर …

सृष्टीच्या उत्पत्ती , स्थिती , लय या चक्राची कल्पना देणारे भव्य दिव्य वास्तुशिल्प…

हे सगळे जिथे आहे ते अवंतीपूर पाहायचे आणि धन्य व्हायचे .
असे मनोमन ठरवले होते .
मनाच्या कॅनव्हास वर कितीतरी चित्रे रंगवली होती .

पण…

बसमधून उतरल्यावर नजरेला पडले ते भव्यतेचे भग्नावशेष !

होय !

भग्नावशेष !!

नजर जाईल तिकडे केवळ आणि केवळ उद्ध्वस्त अवशेष .

— मी मनानं आत्ता तिथे आहे .

सभोवताली पडके खांब दिसत आहेत . त्याही स्थितीत त्यांची भव्यता , उंची आणि त्यावरील कोरीव काम दिसत आहे .
श्रद्धेला हाकारणारी मंदिरे आहेत पण त्यातील देवतांच्या मूर्ती छिन्नविच्छिन्न झाल्या आहेत .
सांस्कृतिक , पौराणिक कथाशिल्पे साकारणारी शिल्पकारांची अद्वितीय कलाकुसर पहायला मिळते आहे , पण त्यावर उन्मत्त , परकीय आक्रमकांच्या क्रूर छिन्नी हातोड्याचे घाव अगदी ताजे वाटावेत असे दिसत आहेत . आणि मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांच्या डोळ्यातील वेदना रक्ताळल्या अश्रूंनी ठिबकत आहेत .
भग्न मूर्ती , झिजलेले पण तरीही खंबीर उभे असणारे खांब , अजूनही नाजूक वाटणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या कमानी , वाहतुकीची कसलीही आधुनिक साधने उपलब्ध नसताना , बांधकामासाठी वापरलेले अजस्त्र पाषाण , इतस्ततः पसरलेले दगडगोटे , झेलम नदीचे साहचर्य आणि हे सर्व पाहताना अचंबित होणारा मी .

– अनेकजण फोटो काढत होते .
वेगवेगळ्या पोझेस घेऊन फोटोत आपली छबी कशी चांगली दिसेल असा विचार करून , लाइक्स कमेंट्स चा हिशोब मांडून लगेच सोशल मीडियावर टाकत होते .

फोटोचा मोह मलाही झाला .
काढले सुद्धा फोटो .
ज्यांना फोटो काढायला सांगत होतो , त्यांना आवर्जून सांगत होतो …
परिसराची भव्यता दिसेल आणि त्या पार्श्वभूमीवर माझे क्षुद्रत्व दिसेल असेच फोटो काढा .
कारण स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव असेल तर समोरची कुठलीही गोष्ट मनात आतपर्यंत भिडते . विश्वाच्या पसाऱ्यात आपले स्थान काय आहे , याच्या जाणिवेतून , अहंकाराच्या पोकळ आभासी विश्वातून आपण जमिनीवर येतो .
त्यासाठी फोटोत , आपण कमी आणि भव्यता जास्त दिसायला हवी असा माझा आग्रह असतो .
अर्थात हा विचार माझ्यापुरता .

अवंतीपूर मंदिर पाहताना असं खूप काही जाणवून गेलं .

त्याचा इतिहास गाईड सांगत होता . आम्ही ऐकत होतो .
फिरत होतो . फोटो काढत होतो .

फिरताना बाहेरच्या बाजूला असणाऱ्या चिनारच्या प्रचंड मोठ्या जुन्या वृक्षाजवळ आलो आणि तिथून मंदिराकडे पाहिलं .
आणि एक गोष्ट पुनः पुन्हा जाणवली .
गाईड सांगत होता की हे मंदिर महापुरात किंवा मोठ्या भूकंपात नष्ट झाले असावे .
पण नैसर्गिक आपदा निवडक वस्तू नष्ट करीत नाहीत , महापुरात किंवा भूकंपात सरसकट सगळंच संपून जात असतं .
इथे मंदिरं होती , पण मूर्ती नव्हत्या .
शिल्पाकृती होत्या पण त्या कुणी विकृतानी तोडल्यासारख्या होत्या .

मंदिराच्या रूपानं उभी असणारी प्राचीन , समृध्द संस्कृती नष्ट केलेली दिसत होती .
आणि हे काम परकीय आक्रमकांखेरीज अन्य कुणाचे असणार ?

पण इतिहास काही वेळेला अबोल होतो आणि मग जे दिसेल ते पाहावे लागते . कुणी सांगेल ते ऐकावे लागते . धावपळीच्या युगात इतिहास अबोल होतो .
हेही जाणवले .

तरीही अवंतीपूर मनात घर करून राहिले .
अजूनही .
( क्रमशः)

– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
—————————————-

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..