नवीन लेखन...

जीवनाहून सुंदर

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. मरणामुळे संसाराला रमणीयता आहे. मरणामुळे जगात प्रेम आहे. आपण सारे अमर असतो तर एकमेकाला विचारले नसते. आपल्याला वाटते की, मरण म्हणजे अंधार. तसे नव्हे. मरण म्हणजे अमर प्रकाश. अनंत प्रकाश. भगवान बुद्ध म्हणत, स्वतःचे निर्वाण करा म्हणजेच जगावर खरे प्रेम करता येईल. स्वतःला विसरा. स्वतःची सर्व आसक्ती विसरणे, स्वतःच्या देहाच्या, मनाच्या, इंद्रियांच्या स्वार्थ वासना विसरणे म्हणजेच मरणे. हे मरण या देहात असूनही अनुभवता येते. नारळातला गोटा नारळापासून अलग होऊन जसा खुडखुड वाजतो, त्या प्रमाणे देहेंद्रियांपासून आत्म्याला अलग करून वागणे म्हणजे मरण. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणत,

आपले मरण पाहिले म्या डोळा तो सुखसोहळा अनुपम हे मरण ज्याने एकदा अनुभवले त्याला पुनश्च मरण नाही. जिवंतपणी जो मरावयास शिकला तो चिरंजीव झाला.

भारतीय संस्कृतीत मरण म्हणजे अमर आशावाद आहे. मरण म्हणजे सक्तीने अनासक्ती शिकवणे. उपनिषदे म्हणतात, अरे, जगात दुसऱ्याची झिज भरून काढ आणि मग तू स्वतः उपभोग घे. परंतु आपण हे विसरतो आणि दुःखी होतो. मरणाला भिऊ नका. मरण म्हणजे नवजीवनाचा आनंद. जिवाशिवाच्या ऐक्याचे संगीत. मरण म्हणजे प्रियकराकडे जाणे. सॉक्रेटिस मरताना अमृतत्व भोगत होता. तुकाराम महाराज रामकृष्ण हरि करीत गेले. लोकमान्य यदा यदा हि धर्मस्य हा श्लोक म्हणत गेले. पंडित मोतीलाल नेहरू गायत्री मंत्र म्हणत गेले. समर्थ म्हणाले, माझा दासबोध आहे. रडता का? भारतीय संस्कृतीने मरणाची नांगी काढून टाकली आहे. मरणाला जीवनाहून सुंदर बनवले आहे. प्राणो मृत्यूः मृत्यू म्हणजे प्राण असा सिद्धांत स्थापिला आहे. मरण म्हणजे अंगरखा काढणे. पण काहींना मरण हा शब्दही सहन होत नाही. केवळ शरीराला कुरवळणारे सारे झाले आहेत. देहाची मडकी फोडण्यासाठी जे सहज निघतील तेच भारतीय संस्कृतीचे खरे उपासक !

– साने गुरुजी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..