नवीन लेखन...

जगातील निरनिराळ्या कालगणना पध्दती

जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो, शेकडो वर्षापासून, त्या पध्दतींनी, प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या जन्मतिथीशी निगडीत असते. एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय संस्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते आणि काही अनुयायी ही पध्दत शेकडो, हजारो वर्षे पाळतात.

ग्रेगोरिअन दिनदर्शिकेच्या कालगणनेनुसार २०१३ व्या वर्षाचा जानेवारी हा पहिलाच महिना. मंगळवार १ जानेवारी २०१३ ला आपण नुकतंच नववर्षाचं स्वागत केलं आहे.

भारतीय राष्ट्रीय कालदर्शिकेनुसार. सौर चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) दरवर्षी २२ मार्चलाच येतो. लीप वर्षात तो २१ मार्चला येतो. ही कालदर्शिका डॉ. मेघनाद साहा यांनी तयार केली असून ती इसवी सन १९५७ सालापासून भारत सरकारने स्वीकारली आहे. १ जानेवारीला अवकाशात, पृथ्वीसंबंधीत अशी कोणतीही घटना घडत नसते. पण सौर चैत्र प्रतिपदा या नववर्षदिवशी सूर्य विषुववृत्तावर येत असल्यामुळे दिवस आणि रात्र बरोबर १२ तासांचे असतात. त्यादिवशी सूर्य जेथे उगवतो ती खरी पूर्व दिशा आणि जेथे  तो मावळतो ती खरी पश्चिम दिशा असते. म्हणून या गुढीपाडव्यास शास्त्रीय बैठक आहे.

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर २२ मार्च १९५७ पासून स्वीकारण्यात आले आहे. त्याला शालिवाहन शके असे स्वीकारण्यात आले आहे. या दिनदर्शिकेचे प्रत्येक वर्ष शालिवाहन शकाचे वर्ष समजण्यात येते. म्हणजे आपण शालिवाहन शकाची सुधारित पध्दती स्वीकारली आहे.

इसवीसनाच्या वर्षातून ७८ वजा केले की शालिवाहन शकाचे वर्ष मिळते. १९५७ मधून ७८ वजा केले की १८७९ हे शालिवाहन शक मिळते. म्हणजे ज्या दिवसापासून हे राष्ट्रीय कॅलेंडर भारत सरकारने स्वीकारले त्यादिवशी चैत्र प्रतिपदा शके १८७९ होते. ग्रेगोरियन कॅलेंडरानुसार तो दिवस २२ मार्च १९५७ होता.

आता १ जानेवारी २०१३ या दिवशी, भारतीय राष्ट्रीय कालगणनेनुसार शके १९३४ च्या पौष महिन्याची ११ तारीख होती. तर पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष कृष्ण चतुर्थी, शके १९३४ होती. शालीवाहन शक ही कालगणना इसवीसन ७८ साली सुरू झाली.

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडराचे लीप वर्ष जाणण्यासाठी शक वर्षात ७८ मिळवून येणारे इसवीसनाचे वर्ष जर लीप वर्ष असेल तर राष्ट्रीय कॅलेंडराचे शकवर्ष, लीप वर्ष समजतात. लीप शक वर्षात, चैत्र प्रतिपदा २१ मार्चलाच येते. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, पर्शियन दिनदर्शिकेशी बरीच मिळतीजुळती आहे.

पारंपारिक गुढीपाडवा साधारणपणे एप्रिल महिन्यात येतो. गुरुवार ११ एप्रिल २०१३ रोजी पारंपारिक गुढीपाडवा आहे. त्या दिवसापासून विजयनाम संवत्सर सुरू होऊन शालिवाहन शके १९३५ चा प्रारंभ होणार आहे. त्या दिवशीही आपण नववर्षाचे स्वागत करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत.

रविवार १८ ऑगस्ट २०१३ रोजी पारशी बांधवांचा नववर्षदिन म्हणजे पतेती आहे. त्या दिवसापासून पारशी सन १३८३ ची सुरूवात होणार आहे. त्या दिवशी पारशी बांधव एकमेकांना आणि आपण आपल्या पारशी मित्रांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत.

सोमवार ४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिवाळीचा पाडवा आहे. त्या दिवसापासून विक्रम संवत २०७० चे विश्वावसुनाम संवत्सर सुरू होणार आहे. तसेच महावीर जैन संवत २५४० चाही प्रारंभ होणार आहे.

मंगळवार ५ नोव्हेबर २०१३ रोजी (दिवाळीची भाऊबीज) मुस्लिम नूतन वर्ष हिजरी सन १४३५ चा प्रारंभ होणार आहे.

अर्थात या सर्व नववर्षांच्या पहिल्या दिवशी, काही भारतीय नागरिक, भारतातच नव्हे तर परदेशीही, पारंपारिक प्रथांनुसार, आपापले नववर्षदिवस साजरे करून एकमेकांना शुभेच्छा देणार आहेत. अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्षदिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत.

आपापले नववर्षदिवस साजरे करण्यामागे सामाजिक रूढी आणि परंपरा आहेत. उत्सवप्रियता आणि समाजबंधन या तत्वावर हे सण साजिरे केले जातात. त्यात दैविक किंवा अध्यात्मिक भाग नाहीत, केवळ संकल्पना आहेत.

निरनिराळ्या कालगणन पध्दतींना जरी शास्त्रीय बैठक असली तरी त्यांच्या आरंभ दिवसाला, म्हणजे त्या त्या कालगणन पध्दतीच्या नववर्ष दिवसाला विज्ञानीय आधार नाही. आदले दिवशी त्या कालगणनेनुसार १ वर्ष पूर्ण झाले असले तरी ३६५ दिवस पूर्ण झाले असतातच असे नाही.

सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्रे वगैरे खगोलांच्या आकाशातील स्थितीवरून आणि त्यांच्या परिभ्रमण काळावरून महिने, वर्षे आणि शतके, सहस्त्रके ठरविली जातात आणि कालगणना केली जाते. कालमापन हे पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे. सूर्याभोवती १ प्रदक्षिणा करण्यास लागणार्‍या काळात, पृथ्वीची स्वत:भोवती ३६५ परिभ्रमणे होतात. म्हणून ३६५ पूर्ण दिवसांचे १ पृथ्वीवर्ष होते हे वास्तव आहे, संकेत नाही. वास्तविक, प्रत्येक सेकंदाला आणि सूर्याभोवतीच्या परिभ्रमण कक्षेतील प्रत्येक बिंदूला, पृथ्वी, आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असते आणि पुढच्या सेकंदाला नवीन वर्ष सुरू करीत असते.

गजानन वामनाचार्य
१८०/४९३१ पंतनगर, घाटकोपर, मुंबई ४०००७५
फोन : ६५६१०१९१ / ९२२३५८९७६०

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..