नवीन लेखन...

‘उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी

मौलाना … हसरत मोहानी!
संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!

सर्वात आधी “संपूर्ण स्वराज्या”ची मागणी करणार्यांचपैकी एक. त्यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते.

मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील ‘मोहान’ या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख ‘उर्दू शायर’ म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले.

दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!

अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला. अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.

हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही….’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात – मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक पैगामे वफा बादे सहर लेके गयी है (हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)

टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते – मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से सिधारे आज तिलक बलवंत तिलक, महाराज तिलक, आझादी के सरताज तिलक मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
मनमोहन श्याम से नैन लाग
निसदिन सुलग रही तन आग
मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

खूब-रुयोंसे यारियाँ न गई या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर

खूब-रुयोंसे यारियाँ न गई.

चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.

हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
=========================================
उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
=====================================
कुछ समझमे नही आता कि ये क्या है ‘हसरत’
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
=====================================
जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
======================================
तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया
इश्कने उसको सीखा दी शायरी
अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..