“इनव्हेस्टमेंटचं कटुसत्य”
बदलती जीवनशैली यामुळे सहजिकच समाजावर व पर्यायाने कुटुंबावर परिणाम होऊ लागला आहे. आजकाल सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये “हम दोनो और हमारा एक” या कुटुंब संकल्पनेमुळे मुलांना अमूल्य वेळ देखील पालक देऊ शकत नाही, त्यातून दूरचित्रवाणी, सोशल नेटवर्कींग साईट्स चा त्यांच्यावर होणारा दुष्परिणाम हे सर्व रत्नाकर मतकरींनी आपल्या खास दिग्दर्शनाच्या व लेखन शैलीतून “इनव्हेस्टमेंट” या चित्रपटातनं मांडलेलं दिसून येईल.
“इनव्हेस्टमेंट” या रत्नाकर मतकरींच्याच पुस्तकांवरुन चित्रपटाची कथा मांडली आहे, प्राची आणि आशिष घोरपडे हे तरुण जोडपं आणि शोहेल घोरपडे हा त्यांचा मुलगा असं हे त्रिकोणी उच्चमध्यमवर्गीय कुटुंब. कामानिमित्त प्राची आणि आशिष ऑफिसात तर १२-१४ वर्षांचा शोहेल हा विद्यार्थी आपल्या आई-वडिलांकडून वेळ न मिळाल्याची जाणीव शोहेल व त्याच्या पालकांच्या मनात आहे म्हणून त्याला आवडणार्या प्रत्येक वस्तूचा हट्ट देखील पूर्ण करत आहेत; तसंच आपला मुलगा म्हणेल तेच खरं आणि तो जी कृती करेल तेच बरोबर अशी समजुत तो करतो व दुजोरा दिल्यामुळे शोहेलच्या मनोवृत्तीत फरक पडत जाऊन त्याचं व्यक्तिमत्व “अॅग्रेसिव्ह” आणि “मला जे पाहिजे ते मिळवणारच”… या पद्धतीचं बनत गेल्यामुळे गुन्हा घडतो आणि तरीपण आपल्या मुलाने जे केलं आहे ते बरोबर असंच त्याच्या आईला वाटत राहतं, वडिलांची मनस्थिती ही संपूर्ण चित्रपटात अगदी द्विधा अवस्थेत सापडलेली दिसते, चित्रपटात आजीची व्यक्तिरेखा साकारणार्या सुलभा देशपांडे ह्या निवृत्त शिक्षिका आहेत, ज्यांनी आयुष्यभर नितीमूल्यांच पालन केलं आहे. घडलेल्या गुन्ह्याला पाठीशी घालणं तिच्या स्वभावात नाही, अगदी स्वकीयांकडून झाला असेल तरीही. या पार्श्वभूमीवर शोहेलनी केलेल्या दुष्कृत्यामुळे त्याच्यावर आणि कुटुंबावर कोणते परिणाम होतात हे अगदी नेमकेपणाने दिग्दर्शकांनी मांडला आहे, तुषार दळवीची आशिष ही व्यक्तीरेखा फक्त सुरुवात वगळता, चित्रपटाच्या शेवटपर्यंत कोणतीच प्रतिक्रीया देत नाही, “हो ला हो” असं हे कॅरेक्टर असून, प्राचीची व्यक्तिरेखा साकारणार्या सुप्रिया विनोद ही मॉडर्न आई शोभते, पण मुलांनी केलेला अक्षम्य अपराध, ही कितीही पुढारलेली आई अशा गंभीर गुन्ह्यांकडे कानाडोळा करणार नाही. बालकलाकार म्हणून प्रहर्ष नाईकाची शोहेल ही व्यक्तीरेखा उत्तम झाली आहे असं म्हणावं लागेल, कारण दिग्दर्शकाला जे या कॅरेक्टर कडून अपेक्षित होतं ते प्रकर्षाने आपल्या अभिनयातून साकारलं आहे; सुटसुटीत संवाद तर आहेतच पण पटकथेची आणि कलाकार निवडीची गल्लत झाल्याचं देखील लक्षात येईल. कलाकारांचा अभिनय चांगला झाला आहे, संदीप पाठक, पंकज विष्णू व इतर कलाकार देखील, अभिनयाच्या दृष्टीनं उजवेच ठरतात; तांत्रिक, निर्मितीमूल्य ही दर्जेदार आहेत.
एकूणच चित्रपटाची कथा, ही दिग्दर्शकानं आजपासून पन्नास वर्षांपुढील चित्र कसं असेल हे दर्शवलेलं आहे, जर नितीमूल्य, संस्कार किंवा मुलांना “क्वालिटी टाईम” पालकांकडून मिळत नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात या सर्वांचं सुंदर आलेखन “इनव्हेस्टमेंट” च्या माध्यमातून मांडलेलं दिसतं. वास्तवपूर्णता असल्यामुळे विषय मनाला भिडतो, विचार करायला देखील भाग पाडतो, वेगळा विषय आणि त्यातून काय बोध मिळेल या सर्वांची मांडणी मतकरींनी या निमित्ताने केलेली आहे; बदलत्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचा हा चित्रपट जणु आरसा आहे असा हे दिग्दर्शकला अभिप्रेत आहे; त्यामुळे एखाद्या अनोख्या पण गंभीर, बोधपूर्ण चित्रपट पहायचा असेल तर इनव्हेस्टमेंट ला पर्याय नाही.
— सागर मालाडकर


Leave a Reply