नवीन लेखन...

देवगड हापूस 

मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला “सगळ्यांचो बापुस” असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही. तुकतुकीत कांतीचा, पिवळाजर्द रंगाचा, तजेलदार असतो देवगड हापूस. त्याचा गंध, सुवास तुम्हाला मंतरल्यासारखा आपल्याजवळ खेचून घेतो. तो नाकाला लावू त्याचा सुवास घ्यावा लागतच नाही. बाजारात फिरताना अगदी लांबूनही तो सांगतो,

“मी इथे आहे”.
त्या गंधाच्या दिशेने वाट काढत पोहोचल्यावर तो हमखास भेटतो. देवगड हापूसची?फोड खाताना त्याची अत्यंत पात्तळ साल, अलगद तुटून तोंडात येते आणि कुठेही न अडखळता गराबरोबर अगदी सहज पोटात जाते.
आजकाल प्रत्येक आंबा विक्रेता म्हणत असतो,

“आमचा देवगड हापूस .”?
पण त्याच्या बोलण्यातला खरेपणा अस्सल देवगडकराच्याच लक्षात येऊ शकतो, कारण त्याचं देवगड हापुसशी ? नातं पंचेंद्रियानी जोडलेलं असतं.

कानांवर देवगड हापूस,? आल्याची गोड बातमी पडते, घरात पेटी उतरते. पेटीतून बाहेर पडण्याआधीच त्याचा दैवी सुगंध नाकाने घेतलेला असतो. पेटी उघडते आणि त्याच्या पहिल्या दर्शनाने डोळे आनंदाने भरून येतात. अलगद त्यातल्या एकाला उचलून हातात घेताच त्याचा तुकतुकीत स्पर्श त्वचेला आणि मनाला मोहून टाकतो. आणि अखेर त्याच्या फोडीचा पाहिला घास जिभेवर उतरतो, त्यापुढे मात्र ब्रह्मानंदी टाळी लागते, दोघांमधला द्वैत भाव सरून दोघंही एक होऊन जातात.

|| इति देवगड हापूसोध्याय: संपूर्ण ||

फळांचा बापुस
सुरू होतो सिझन –
आंबा नावाच्या हिरोचा,
पिवळ्याधम्मक रूपाने तो –
ठाव घेतो मनाचा.
आपल्याच तोऱ्यात असतो –
भाव खातो फार,
किंमत ऐकून त्याची आम्ही –
हळूच घेतो माघार.
आपल्याच धुंद नादात –
गवतात पहुडलेला सुखात,
आम्ही त्याच्या अवती भवती –
भाव उतरायची वाट पहात.
मे महिना उजाडतो तसा –
तो ही अंमळ माणसाळतो,
परवडणाऱ्या रुपात घरोघरी –
जाऊन आपला विसावतो.
रोज जेवणात फोड ओठी –
त्याविना न घास उतरत पोटी,
दूधआंबा, साखरआंबा, आमरस पुरी –
किंचितही न सहन होत त्याची दुरी.
संपले की मागवा –
हे सुरूच असतं ,
रूप डोळ्यांसमोरून –
हलतच नसतं.
जून महिना उजाडतो तसा –
त्याचा आब उतरतो,
मुक्काम आपला हलवून तो –
निरोप घ्यायचं ठरवतो.
सारिकडून हळुहळु त्याचं –
अस्तित्वच संपून जातं,
पुढच्या सिझनपर्यंत नशिबी –
वाट पहाणं उरतं.
आंबा नावाच्या राजाला भरून –
निरोप सारे देतात,
विस्मरणात गेलेली फळफळावळ-
सुटकेचा निःश्वास सोडतात.

प्रासादिक म्हणे

–प्रसाद कुळकर्णी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..