नवीन लेखन...

हवामान बदलाचे गहिरे संकट!

“मृगात पाऊस वेळेत यावा. ज्येष्ठात संततधार असावी, आषाढात तो मनमोकळा कोसळावा, श्रावण-भाद्रपदात ऊन-पावसाचा मोहक खेळ  रंगवा,परतीच्या एक दोन दमदार सरी बरसाव्या..नद्या-नाले, ओढे-तलाव खळखळून वाहावेत. आणि पावसाळा संपून जावा”. आदर्श आणि उपयुक्त पावसाळा यापेक्षा वेगळा असू शकत नाही. परंतु, गेल्या काही वर्षात मान्सूनचा पॅटर्न बदलत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवतेय. मान्सून आता जूनमध्ये दाखल झाला तरी, त्याची खरी सुरुवात जुलैमध्ये होते आणि ऑगस्टमध्येच तो खर्‍या अर्थाने सक्रिय होताना दिसतो. साधारणतः सप्टेंबरच्या मध्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू व्हायला हवा. पण अनेकदा मान्सून नोव्हेंबपर्यंत सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. शिवाय पावसाचे भौगोलिक वितरण असमान आहे. दोन पावसांमधला खंडित कालावधी वाढला आहे. एकाच वेळी मुसळधार बरसल्यानंतर अनेक दिवस दडी मारून बसणारा पाऊस आता अनुभवायला मिळतोय. याचाच अर्थ पावसाचे प्रमाण आणि स्वरूप बदलत आहे, हे स्पष्ट होते. भारतातील शेती आजही बऱ्याच अंशी मान्सूनवर अवलंबून असल्याने साहजिकच त्यामुळे शेती क्षेत्रावरील अरिष्टाची छाया गडद होते आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे? नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे.

पावसाची दोन रुपे यावर्षीही आपण अनुभवत आहोत. महापुरामुळे केरळ सह अन्य काही राज्यात हाहाकार उडाला, तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अजूनही पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. यंदा सरासरी आणि चांगला मान्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. पण नेहमीप्रमाणे यावर्षीही तो चुकलाच. मृग उलटून गेल्यानंतर पावसाचे आगमन झाले. आषाढ म्हणावा तसा भिजला नाही. श्रावण-भाद्रपदातही पाऊस पाहुण्यांसारखाच होता. मध्यातच पावसाने मोठी दडी मारली. त्यामुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणचे जलसाठे भरले असले तरी काही ठिकाणि मात्र हिवाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याचे दुभिक्ष्य निर्माण होण्याचा धोका आहे. जल संरक्षणाची मोहीम यंदा मोठ्या प्रमाणात राबविली गेली. अनेक ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतोय मात्र. काही ठिकाणी समाधानकारक पाऊसच न झाल्याने भांडे तयार असूनही पाण्याची साठवणूक करता आलेली नाही. खरीप जसा तसा निंघाला पण रब्बीची संपूर्ण भिस्त आता परतीच्या पावसावर अवलंबून आहे.

 

मान्सूनचा लहरीपणा आजचा नाही. गेल्या काही वर्षापसून मान्सूनच्या एकूणच पॅटर्न मध्ये बदल होतोय. जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड, पर्यावरणाचा ह्रास यासारखी अनेक करणे यामागे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यावर उपाय योजना करणे गरजेचेच. मात्र बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी बराच वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता गरज आहे ती हा बदल समजून घेऊन स्वीकारण्याची. कारण, निसर्गावर आपली सत्ता चालत नसली तरी आपण निसर्गाशी निश्चितच जुळवून घेऊ शकतो. त्यामुळे बदल समजवून घेऊन त्याला साजेशी शेती पद्दत आता अवलंबविण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुंसार, बदलत्या हवामानांनुसार शेती पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असणारी शेती बेभरवश्याची झाल्याने परंपरागत पद्धतीने शती करुन शेतकर्‍याचा टिकाव लागणे आता श्यक्य नाही. त्यामुळे हवामानानुंसार शेतीला मान्सूनप्रुफ बनवावे लागेल. यासाठी उच्चशिक्षीत युवकांनी शेतीला एक आव्हान म्हणुन स्विकारावे, आणि आपल्या ज्ञानाचा वापर शेती विकसितकरणासाठी उपयोगी आणावा. आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने फार मोठी झेप घेतली स्वप्नवत वाटणार्‍या अनेक गोष्टी विज्ञानाने सहजशक्य बनविल्या पण शेती व्यवसाय या तंत्रज्ञानापासून काहीसा दुरच राहीला असल्याचे दिसते. त्यासाठी शेती आधुनिक करणार तंत्रज्ञान विकसीत केल्या गेल पाहिजे. केवळ शेतीतून जास्त उत्पन्न होण्यासाठीच नव्हे तर शेतीचा दर्जा टिकवण्यासाठी तिला सुपीक बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारनेही पिककर्ज, नुकसान भरपाई दिली की शेतीविषयची आपली जबाबदारी संपली असा गैरसमज करून घेवू नये तर शेतीच्या पायाभूत विकासासाठी प्रयत्न करावे. शेती व्यवसायासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून दिले गेले पाहिजे.

 

आज संपूर्ण देशात शेती सुधारणेचा विषय ऐरणीवर आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करावी असा सल्ला देणारेही कमी नाहीत. मात्र ज्या अंदाजावर शेतीचे गणित अवलंबून असते त्याबाबत दुर्दैवाने कुणी काहीच बोलत नाही. पावसाचा अचूक अंदाज जर शेतकऱयांना समजला तर शेतीतील बरेचशे नुकसान टाळत येऊ शकेल. मान्सूनच्या अचूक आगमनावर शेतकऱ्यांना पेरण्या करता येतील. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीठ याचाही अंदाज शेतकर्याना समजला पाहिजे. त्यासाठी अचूक हवामान अंदाज वर्तवणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. नुसती यंत्रणा उभारून चालणार नाही तर तिची उपलब्धता वेळोवेळी तपासली गेली पाहिजे. अतिवृष्टीचा इशारा असो की वातावरणातील उष्मा, नागरिकांना हवामानविषयक अधिकृत आण‌ि अचूक माहिती मोबाइलवर मिळावी अशी व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. आज हवामानविषयक माहिती देणारे अनेक अॅप्स मोबाईलवर उपलब्ध असले तरी त्यातून मिळणाऱ्या माह‌ितीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह असते. काळची पाऊले ओळखून बदल स्वीकारणे आणि परंपरागत मार्ग सोडून आधुनिकतेची कास धरल्यास लहरी मान्सूनचा सामना आपल्याला करत येईल. हवामान बदलाचे एक मोठे संकट आज आपल्यासमोर उभे ठाकले आहे. त्यामागील कारणांचा शोध घेणे जरुरीचे असून त्यावर वेळीच उपाय योजल्या जायला हवेत. नाहीतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येईल..!!

— ऍड.हरीदास उंबरकर
9763469184

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..