नवीन लेखन...

दत्त्या

काही माणसं किती विलक्षण, चमत्कारिक  असतात ना? ती लक्षात राहतात ती त्यांच्या गुणांमुळे नाही तर त्यांच्या चमत्कारिक वागण्यामुळेचं. मात्र ही जगाच्या दृष्टीने निरोपायागी, मुर्ख असतात. ‘दत्त्या’ हा अशांचपैकी एक.

मृगाला जशी त्याच्या कस्तुरीची जाणीव नसते आणि ते आपल्याच नादात दौडत असते तसेच काहीसे या दत्त्याचे होते. कारण त्याच्याही नकळत तो त्याच्या बावळटपणामुळे इतरांचे मनोरंजन करतो, त्यांना हसवतो हे त्याला माहितचं नव्हते.

दत्त्त्याचे ते विहंगम दर्शन झाले ते कॉलेजच्या पहिल्या दिवशी. शाळा संपवून कॉलेजमध्ये पदार्पण केल्याची उत्सुकता,उत्साह, हुरहूर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दत्त्याच्या चेहऱ्यावरही होती. मात्र इतर तरुणांप्रमाणे कपडे, शूज यांबाबत सर्वसामान्य असे काहीच दिसत नव्हते. ‘होते कुरूप वेडे….’ ही ओळ त्याच्यासाठीचं असावी जणू. पण शब्दशःचं. दत्त्या नावाच्या सुरवंटाचे आता एका फुलपाखरात रुपांतर झाले आहे हि भावना त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती,असे मला वाटले.

त्याच्या कपडे आणि बूटांमुळे त्याच्या विलक्षण रूपाचे (आणि स्वभावाचेहि किंचित) दर्शन झाले. कडक सफारी, पायांत पावसाळी प्लास्टिकचे बूट, डोक्याला तेलाची चंपी.. त्याचे हे रूप पाहून दत्त्याने अकरावीत प्रथमचं प्रवेश घेतला आहे की, वर्षानुवर्षे एकाच वर्गात दरवर्षी नव्याने प्रवेश घेतो असा प्रश्न पडावा. पण हा दत्त्या म्हणजे ग्रामीण जीवनातल्या अनेक नमुन्यांपैकी एक अस्सल नमुना वाटला, हे नाकारता येणार नाही.

कोल्हापूर शहराजवळचं हे एक छोटसं शहर. तसं गावचं. आणि आजूबाजूला अनेक खेडी. पण एका महान आणि दृष्ट्या नेत्यामुळे या गावाचा आणि आजुबाजूंच्या गावांचाहि विकास झाला होता. कृषी क्षेत्रात या गावांची चांगली कामगिरी होती. हे शहर तर कृषी, सहकार, राजकारण, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही गाजत होत.

गटबाजी, पुरुषसंस्कृती (नव्हे, पुरुषी अहंपणा) हा हि यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. सगळेचं साले लेकाचे स्वतःला ‘साखरसम्राट’ नाही तर ‘आमदाराचा डावा-उजवा हात-पाय (नि अजून काय-काय) समजायचे. हे समाजातील वास्तव कॉलेजविश्वातहि नसतं तर नवलचं होतं..!!

दत्त्याचंहि असचं काहीसं होत. म्हणजे तो शेतकरी पण सधन कुटुंबातला असावा. त्याच्या कुटुंबाची समाजात एक पत असावी हे त्याच्याकडे पाहून जाणवायचं.

वर्गात प्राध्यापक शिकवत असताना याची काहीतरी वेगळीच चुळबूळ चालू असायची. उगाचचं कशालाही तो हसायचा.

एकदा योगायोगाने बाजूच्या रांगेत माझ्या बाकाला शेजारीचं तो बसला होता. सहजचं त्याच्या वहीकडे माझे लक्ष गेले. अरेरे! एक पाय कुत्र्याचा आणि एक मांजराचा असे म्हनाण्यानेही या म्हणीतील कुत्र्या-मांजराचा अपमान व्हावा इतके अक्षर घाणेरडे! अशुद्ध लेखनाची तर त्याने परिसीमाचं गाठली होती. कसा आला असेल तो इथवर? कोणी पास केल असेल याला आजवर? शिक्षकांनी काय आणि कसे वाचले असतील याचे पेपर? माझचं डोक जर इतकं गरगरल तर त्या शिक्षकांचे काय झाले असेल!! बिच्चारे!

नंतर दत्त्या हळूहळू उलगडत गेला.. त्याला असचं त्याला पुढे-पुढे ढकलत आणलं होत. तो साधे-साधे शब्दही नीट लिहू-बोलू शकत नव्हता. आणि कदाचित यामुळेचं तो थोडा अबोल राहायचा. सतत चुळबूळ करत राहायचा.

दत्त्या कॉलेजला जीप मधून यायचा. हातात वह्या-पुस्तकांची छोटी चळत मिरवत आणि दुसऱ्या हाताने गिरमिट करत. किळस वाटायची. पण दत्त्याची हि लकब त्याच्या विलक्षणपणाला आणखीचं विलाक्षित बनवायची हे मात्र नक्की.

दत्त्याला कधी कोणी seriously घेतलेलं मी कधीच पहिले नाही. सतत कोणी ना कोणी तरी त्याची टर उडवायचे नाही तर त्याच्या वर्गात लक्ष न देण्याच्या सवयीमुळे प्राध्यापक त्याची वर्गातून हकालपट्टी तरी करायचे. पण यामुळे तो स्वतःला कधी अपराधी वाटून घेत असेल असं वाटायचं नाही. तो हे सगळ enjoy करायचा. वर्गातून हाकलले तरी वर्गासमोरच्या खिडकीतून, दरवाज्यातून त्याच्या मित्रांना खाणाखुणा करत उभा राहायचा.

तो आणखी एक बावळटपणा करायचा, तो म्हणजे कोणत्याही सभ्य मुलीकडे पाहून उगाचचं हसायचा. काळ्या, तेलकट चेहऱ्यावर ते पांढरे शुभ्र दात तेवढे शोभा आणायचे.

Valentine Day होता.. कॉलेजमधला पहिला ‘Valentine Day’. कसा असतो हा दिवस? काय-काय घडत असेल कॉलेजमध्ये या दिवशी? याची आम्हाला तर उत्सुकता होतीच. पण आपल्या दत्त्या.. (हो. आपलाच दत्त्या. एव्हाना त्याच्या या विलक्षणपणामुळे तो तुमच्या समोर आलाचं असेल. हो ना!) तर हा दत्त्या त्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच कडक दिसत होता. चेहऱ्यावर नेहमीचं बालीश हसू आणि हातात पूर्ण उमलेलं मोठेच्या-मोठे गावठी गुलाब घेवून व्हरांड्यात फिरत काय होता, वर्गासामोरच्या गॅलरीतून मुलींकडे बघत काय होता. विचारू नका! कोणाला इम्प्रेस करत होता कि खरचं कोणाला प्रपोज करणार होता हे त्याचे तोच जाणे. त्याचे हे ‘राज’ गुलदस्त्यातचं राहिले. नव्हे त्या भल्या मोठ्या गुलाबाच्या फुलात म्हणायला हवे. नेहमीपेक्षा त्यादिवशी आमचे जरा जास्तच मनोरंजन झाले.

नंतर-नंतर दत्त्याचे कॉलेजला येणं कमी होवू लागले. कधी तरचं उगवायचा. १-२ लेक्चरस् attend करून निघून जायचा. आणि पूर्वीपेक्षा तसा थोडा शांतही वाटायचा. कोण जाणे त्याला काय झाले होते?

अकरावीच वर्ष संपत आल्यामुळे हळूहळू मजा संपून परीक्षेचे टेन्शन येण्यास सुरवात होत होती. त्यामुळे दत्त्या हा विषय आपोआपच बाजूला पडला. पण एकेदिवशी तो मला दिसला. शेवटचाच. तशाच कडक सफारी, पायात प्लास्टिकचे बूट. जीपमधून वह्या-पुस्तकांची चळत घेवून जाताना. त्याही दिवशी तो जरा नाराजचं वाटत होता.

आमचा कधीच थेट संवाद नव्हता झाला. दत्त्या जो मला समजला तो त्याच्या हावभाव, देहबोलीतून. तो यापेक्षा वेगळाही असू शकेल. कोणास ठाऊक? पण आठवणीत राहिला तो त्याच्या चमत्कारिक, विलक्षण वागणुकीमुळे आणि त्याच्या बेफिकीर, आपल्याच धुंदीत जगण्याच्या वृत्तीमुळे..

© – शिल्पा परांडेकर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..