नवीन लेखन...

चित्रपटातील वास्तविक खरा नायक : दारासिंघ

माझ्या लहानपणा पासून अनेकजण असे म्हणतानां मी ऐकले आहे की- ‘’ सिनेमामुळे मुलं बिघडतात.’’ त्यापूर्वी असे म्हटले जाई की नाटक वा तमाशामुळे मुलं बिघडतात. त्याही पूर्वी असे म्हटले जाई की नवीन शिक्षणामुळं मुलं बिघडतात… मला पडलेला प्रश्न असा आहे की नाटक, तमाशा, सिनेमा वगैरे वगैरे कलां १८ व्या शतका पासूनच्या आहेत. मग त्यापूर्वी माणसं मुलं बिघडतच नव्हती का? भारतीय परंपरेनुसार सध्या आम्ही कलियुगात आहोत. म्हणजे वाईट युगात. आणि असे म्हटले जाते की हे कलियुग अर्जुनाचा नातू परिक्षित याच्या पासून सुरू झाले. म्हणजे आम्ही थेट महाभारताच्या पर्वा पर्यंत पोहचतो. तेव्हा असे काय होते की माणसे वाईट होती. चांगले आणि वाईट यांचा जो काही संबंध आम्ही लावत असतो तो मला चुकीचा वाटतो. चित्रपटांच्या सुरूवातीच्या काळात अधिकांश चित्रपट पौराणिक व धार्मिक विषया वरील होते म्हणून त्या काळात सर्व समाज खूप तत्ववादी आणि शुद्ध आचरणाचा होता हे म्हणणे हास्यास्पद आहे. असो मुद्दा हा की चित्रपट बघून माणसांवर वाईट संस्कार होतात का? मला तसे वाटत नाही.तसे असते चित्रपटगृहात रोज हजारोने जाणाऱ्या प्रेक्षकातील सर्वचजण वाईट संगतीला लागले असते. चित्रपटातील वास्तव हे आमच्या सभोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब असते. ते मनोरजंक व रोचक पद्धतीने मांडले जाते कारण चित्रपट हा व्यवसाय देखिल आहे.

५० ते ७० या काल खंडाला चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग म्हटले जाते. या कालखंडात चित्रपट नावाच्या जादूच्या पेटाऱ्याने सगळ्यानांच सामावून घेतले. राज,दिलीप,देव आनंद पासून राजेंद्र कुमार,प्रदीपकुमार, भारत भूषण, बलराज,मोतीलाल, अशोककुमार, प्राण,धमेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना वगैरे पर्यंत किती विविध अभिनेत्याना आमच्या प्रेक्षकांनी स्विकारले. कुठेच दूजाभाव केला नाही. या सर्वांचे धूमशान चालू असतानां एका वेगळ्या चेहऱ्याला पण या मायावी नगरीची ओढ लागली होती. खरं तर हा खराखुरा नायक.६ फूट २ इंच उंच,१२७ किलो वजन आणि ५३ इंचाची भरदार छाती. कोरीव चेहरा अन् डोक्यावरचे किंचित कुरळे केस. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हा शड्डू ठोकून आखड्यात उतरला आणि मग एक लांबच लांब सत्र सुरू झाले. अमृतसर जिल्हयातील धरमूचक या गावातल्या हरनामसिंघ या गुरूच्या पठ्ठ्याने १९४८ मध्ये थेट सिंगापूर गाठले. कशाला? तर कुस्तीतले आव्हान स्विकारायला. अतिशय सुंदर देहयष्टी लाभलेला हा तरूण म्हणजे या लेखाचा नायक दारा सिंह.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच खरे तर दाराचा डंका जगभर वाजलेला. आमच्या पिढीत तर कुणी फार दांडगाई करू लागला की त्याला म्हणत- ‘स्वत:ला काय दारासिंह समजोतस का?’पूढील दोन पिढ्या हा डॉयलॉग सुरू होता.१९५२ पर्यंत जगभर आव्हाने देत व घेत दाराने सर्वांनाच धूळ चारली. मलेशियन चॅम्पियन तरलोक सिंह याला कौलालंमपूरला मध्ये हारवून मलेशियायी कुस्ती चॅम्पियन जिंकली. १९५४ ला भारतात येऊन येथे चॅम्पियन झाले. जगभर दौरा करत ऑस्ट्रेलियाचा विश्व चॅम्पियन किंगकाँगला राजस्थान मध्ये धूळ चारली. २०० किलो वजनाच्या किंगकाँगला या बहाद्दराने रिंग बाहेर उचलून फेकले होते. कलकत्ता येथे झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत कॅनडाचा चॅम्पियन जार्ज गार्डियान्का आणि न्युझिलँडच्या जोन डिसिल्व्हाला याने आसमान दाखवले. जगात जिथे जिथे म्हणून फ्रीस्टाईल कुस्त्या होत त्या प्रत्येक देशाचा दौरा दाराने केला व जिंकत राहिला. सरते शेवटी अमेरिकचा जगज्जेता फ्रिस्टाईलपट्टू लाऊ थेज याचा २९ मे १९६८ ला त्याच्याच देशात धूळ चारून दारा जगज्जेता बनला. दाराने आपल्या कुस्तीच्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत ५०० लढती लढल्या आणि सर्वच्या सर्वच् जिंकल्या. १९८३ मध्ये आपली शेवटची लढत जिंकून तेव्हांचे राष्ट्रपती ग्यानी झैलसंग यांच्या हस्ते ‘अपराजेय पहिलवान’ हा पुरस्कार घेऊन सन्मानाने दारासिंह निवृत्त झाला. तर असा खरोखरचा नायक १९५२ मध्ये रूपेरी पडद्याकडे वळला.

मी दारासिंहला अभिनेता म्हणत नाही तो यासाठीच. कारण तो खरोखरचा नायक होता. त्याचं व्यक्तीमत्वच असं होतं की सिनेमात खास त्याच्यासाठी भूमिका लिहल्या गेल्या. १९५२ मध्ये आर.सी.तलवार यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘संगदिल’ या चित्रपटाद्वारे दारासिंह रूपेरी पडद्यावर अवतरला. या चित्रपटात दिलीपकुमार मधूबाला मूख्य भूमिकेत होते. नंतर १९५५ मध्ये आलेल्या ‘पहली झलक’ या चित्रपटात ते पहलवान दारासिंह म्हणूनच अवतरले. १९६२ मध्ये आलेल्या ‘किंगकाँग’ ने मात्र ते प्रसिद्धीस आले.बाबूभाई मिस्त्री ज्यानां भारतीय स्पेशल इफेक्टचे पितामह म्हटले जाते ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. दारासिंह जरी जगज्जेते पहिलवान असले तरी स्वभावाने मात्र एकदम शांत. कधीच कुणाला त्रास देत नसत. मनमिळावू स्वभावाचे. त्यात दिवसरात्र कितीही काम करून घ्या थकत नसत त्यामुळे अनेक व्यावसायिक निर्मात्यांना दारासिंह त्यांच्या सिनेमात हवे असत. पण एक अडचण असायची ती मूख्य अभिनेत्रीची. दारासिंह बरोबर काम करण्यास बहूतेक नट्या उत्सूक नसत. अगदी हलके जरी थप्पड लगावली तर काय होईल ही चिंता. त्यामूळे ए ग्रेडच्या अभिनेत्री तर तयारच होत नसत. कूमकूम बरोबरचा किस्सा तर त्याकाळी बराच गाजला. एका चित्रपटात दारासिंहला तिच्या गालावर चापट मारायची होती. दिग्दर्शकाने हळू मारा अशी सूचना पण दिली होती. मात्र प्रत्यक्ष शुटींगच्यावेळी दाराच्या हाताचा जोर थोडा अधिक झाला असावा..लोखंडी हातच तो……कूमकूम कोसळली. बऱ्याचवेळाने मग शुद्धीवर आली. दारासिंह बरोबर हेलेन, मूमताज, कूमकूम,निशी वगैरे सारख्याच अभिनेत्रींनी काम केले.

वडील सूरतसिंह रंधावा आणि आई बलवंत कौर यांनी दाराचे खूपच कमी वयात आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न लावून दिले होते. त्यात आईने बदाम, दूध, तूप प्रेमापोटी खूप खाऊ घातले परीणामी १७ व्या वर्षीच दारा एका मुलाचा पिता झाला. प्रद्युम्न हे त्याचे नाव. त्यांचा लहान भाऊ सरदारा सिंह देखिल कुस्तीगिर झाला. दोघांनी मिळून आपल्या गावाला भरपूर इनाम जिंकून दिले. पूढे दाराचा लहान भाऊ देखिल चित्रपटात रंधावा या नावाने काम करू लागला. दारासिंह चित्रपटात खरा ओळखला गेला तो हनुमानाच्या भूमिकेमुळे. प्रेक्षकांनी या हनुमानावर भरपूर प्रेम केले. दरासिंहचा हनुमान, जीवनचा नारदमूनी, शाहू मोडकचा विष्णू आणि कृष्ण, त्रिलोक कपूरचा महादेव, इफ्तेखार आणि जगदिश राज याचा पोलिस इन्स्पेक्टर हे सर्व चित्रपटसृष्टीतले खास मानदंड होते. प्रेक्षकानां दाराचा अभिनय बघण्यात विशेष रस नव्हताच कधी. ज्यांनी दारासिंहची प्रत्यक्ष कुस्ती कधीच बघितली नव्हती त्यांच्यासाठी दाराचे चित्रपट एक खजिनाच होता. त्यांचा हनुमान बघतानां लहानमोठे सर्वच प्रचंड खूष होत असत. थिएटर मध्ये प्रचंड आरडाओरड. एकेकाला सहज दोन्ही हाताने उचलून जेव्हा दारा फेकत तेव्हा प्रचंड शिट्या वाजत. त्या काळातील ते एक आयकॉन होते. पडद्या वरील त्याचे शक्ती प्रदर्शन बघतानां प्रेक्षकांचे तोंड तो प्रसंग संपे पर्यंत आ वासलेलेच राही. दारासिंहने त्याचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला होता यात वादच नाही.जवळपास १०० एक चित्रपटात दाराने भूमिका केल्या. अभिनेता धमेंद्र त्यांचा खास मित्र.

मला आठवते १९६९चे वर्ष होते. माझ्या शहरात म्हणजे नांदेडला शिवाजी महाराजाच्या पुतळ्या शेजारीच ‘अप्सरा’ नावाची एक बऱ्यापैकी मोठी लॉज होती म्हणजे आजही असावी. या लॉजच्या मागे माझा वर्गमित्र कालूराम यादव रहात असे. आणि त्याच्या घराला खेटूनच प्रभात टॉकिज नावाचे चित्रपटगृह होते.(आता हे आहे की नाही माहित नाही)तर एक दिवस मी या मित्राच्या घरी जायला निघालो. शिवाजी पुतळ्या जवळ आलो तर तेथे लोकांची प्रचंड गर्दी.खरं तर निवडणूका वगैरे नव्हत्या व मोर्चाही दिसत नव्हता. मीही गर्दीत जाऊन् उभा राहिलो. शेजारच्याला विचारले की ही गर्दी कशाची? तो म्हणाला- समोरच्या लॉजमध्ये प्राण आणि दारासिंह उतरले आहेत. त्यांची झलक दिसावी म्हणून ही गर्दी होती. माझे तर दोन्हीही आवडीचे. मग मीही तिथेच थांबलो. बऱ्याच वेळा नंतर प्राण यांनी गॅलरीत येऊन सर्वांना हात केला. माझ्या आयुष्यात मी पहिल्यादांच चित्रपटातील अभिनेत्याला त्या दिवशी बघितले. जीव अगदी आनंदून गेला. नंतर समजले की दोन दिवस एका चित्रपटाचे शुटींग नांदेडला होणार आहे आणि त्यासाठी हे दोघे आले आहेत. मग दोन दिवस माझ्यासाठी आनंदाला पारावार नव्हता. दुसऱ्या दिवशी एका गल्लीत चित्रपटाचे शुटींग सूरू झाले. प्राण तर ओळखायलाच आला नाही. एका शिख साधूच्या मेकअपमध्ये ते होते. कॅमेऱ्याचे मागे दारासिंह. मला आताही त्यांच्यावर चित्रीत झालेले गाणे स्पष्ट आठवते….’नानक दुखिया सब संसार’…महेंद्र कपूर गायक होते. नांदेडच्या विविध भागात याचे चित्रीकरण झाले. स्वत: दारासिंह या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक होते. आयुष्यात बघितलेले पहिले चित्रपट शुटींग…पूढे जवळपास वर्षभरा नंतर हा चित्रपट नांदेडला प्रदर्शीत झाला. ’नानक दुखिया सब संसार’ हा पंजाबी चित्रपट बघायला तोबा गर्दी झाली. अनेकानां वाटले आपण नक्की कुठे ना कुठे तरी दिसणार. पण संकलन नावाची कात्री तेव्हा कोणालाच माहित नसल्यामुळे अनेकांचा हिरेमोड झाला…
दारासिंह यांनी त्यांच्या कुस्तीची कारकिर्द बहरत असतानां आपल्या आवडीच्या सूरजित कौर या एम.ए. पास मुलीशी लग्न केले.

दुसऱ्या पत्नी पासून त्यांना तीन मुली व दोन मुले झाली. यातील विन्दू दारासिंह हा पण चित्रपटसृष्टीत आहे. छोट्या पडद्ययावर देखिल दारासिंह दिसायचे. १९७८ मध्ये त्यांनी पंजाबमधील मोहाली येथे दारा स्टुडिओची स्थापना केली. १९९८ मध्ये ते भारतीय जनता पार्टीत गेले. २००३ ते २००६ या काळात राज्य सभेत पोहचणारे ते पहिले खेळाडू मेंबर होत. हिंदीतला ‘’जब वुई मेट’’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. त्यांच्यामुळे त्या काळात अनेक तरूण कुस्तीकडे वळले. आपले शरीर दारा सारखे असावे म्हणून व्यायामाकडे पण अनेक तरूणांचा कल झुकला. मला हे चित्रपटाचे सकारात्मक परिणाम वाटतात. चित्रपटामुळे चांगले संस्कारही होऊ शकतात. यादृष्टीने मला दारासिंह हे महत्वाचे वाटतात. अभिनय करणारे नट नाही तर प्रत्यक्ष जीवनातले खरेखुरे नायक म्हणून दारसिंहने काही काळ का होईना चित्रपट माध्यमाद्वारे आमच्या पिढीवर राज्य केले हे मान्यच करायला हवे. ७ जुलै २०१२ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यानां दाखल करण्यात आले. पाच दिवस त्यांनी इथेही लढत दिली. मात्र ५०० लढती जिंकणाऱ्या दाराला ही शेवटची लढत मात्र हरावी लागली. १२ जुलै २०१२ हा त्यांचा स्मरण दिवस. खरं तर याच दिवशी मला त्यांच्यावर लिहावयाचे होते पण जमले नाही.

दासू भगत (१७ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..