चांदोबाच्या पाठीवर ५० सेंटीमीटरची ‘ती’ छोटीशी उडी… आणि नासाचे शास्त्रज्ञ चक्रावून गेले
दशकोंपासून ज्या अंतराळ विज्ञानावर जगातील मोजक्या महाशक्तींची मक्तेदारी होती, त्याच विज्ञानाचा इतिहास भारताच्या एका छोट्याशा प्रयोगाने रातोरात बदलून टाकला आहे. चंद्राच्या ज्या भयानक, अंधार्या आणि गोठवून टाकणार्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवायला अख्खं जग घाबरत होतं, तिथे भारताने काहीतरी असं करून दाखवलंय ज्याची कल्पना अमेरिकेच्या नासानेही केली नव्हती.
पण तीन वर्षांपूर्वी पाठवलेल्या चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरने अचानक असं काय केलं, की आज जगभरातील सर्वात प्रगत अंतराळ संस्थांचे शास्त्रज्ञ चक्रावून गेले आहेत?
चला, थोडं मागे जाऊया. २३ ऑगस्ट २०२३ हा तो ऐतिहासिक दिवस होता, जेव्हा भारताचं चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील ‘शिवशक्ती पॉईंट’वर यशस्वीपणे उतरलं आणि भारत जगातला पहिला देश बनला. विक्रम लँडर तिथे एकटा गेला नव्हता, तर सोबत ‘प्रज्ञान’ रोव्हर आणि अनेक प्रगत उपकरणे घेऊन गेला होता. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उपकरण होतं ‘चेस्ट’ (ChaSTE). सोप्या भाषेत सांगायचं तर, हा चंद्राची माती, तिची उष्णता आणि घनता मोजणारा एक अतिशय हायटेक थर्मामीटर होता.
१४ दिवस भारताचा रोव्हर चंद्रावर फिरला, नवनवीन माहिती पृथ्वीवर पाठवत राहिला. पण खरा थरार तर मिशनच्या शेवटच्या दिवसांत सुरू झाला, जेव्हा चंद्रावर उणे २०० अंश सेल्सिअसपेक्षाही भयानक थंडी असणारी काळी रात्र होणार होती. मिशन संपत आलंय असं समजून वैज्ञानिक आपला डेटा गोळा करत होते, तेवढ्यात इस्रोच्या कंट्रोल रूममधील इंजिनिअर्सना विक्रम लँडरच्या टँकमध्ये थोडं इंधन शिल्लक असल्याचं दिसलं.
सामान्यतः कोणताही देश असता तर त्यांनी हे इंधन असंच सोडून दिलं असतं. पण भारतीय शास्त्रज्ञांनी इथेच आपली कमाल दाखवली! त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी विक्रम लँडरला चंद्रावरून पुन्हा एकदा उडवून पाहण्याचं ठरवलं.
आणि मग काय झालं? इस्रोने पृथ्वीवरून एक कमांड पाठवली, विक्रमने आपले रॉकेट इंजिन पुन्हा सुरू केले आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाला चकवा देत तो तब्बल ४० ते ५० सेंटीमीटर वर हवेत उसळले थोडं पुढे जाऊन त्याने पुन्हा एकदा सुरक्षित लँडिंग केलं. या अभूतपूर्व प्रयोगाला अंतराळ विज्ञानात ‘लूनर हॉप एक्सपेरिमेंट’ असं नाव देण्यात आलं. सुरुवातीला जगाला वाटलं की भारत फक्त आपली ताकद दाखवतोय, पण जेव्हा या ५० सेंटीमीटरच्या उडीचा डेटा समोर आला, तेव्हा शास्त्रज्ञांचे डोळेच पांढरे झाले!
पण विचार करा, फक्त ५० सेंटीमीटरच्या या छोट्याशा उडीने चंद्राचं असं कोणतं रहस्य उघड केलं असेल?
विक्रमने जेव्हा पुन्हा उड्डाण केलं, तेव्हा त्याच्या इंजिनमधून निघालेल्या अतिशय गरम वायूंनी चंद्राच्या वरची ३ सेंटीमीटर जाडीची अत्यंत मऊ, हलकी धूळ उडवून दिली. ही धूळ कोट्यवधी वर्षांपासून तिथे शांत पडलेली होती. ही धूळ उडताच त्याखाली असलेली खरी, फ्रेश आणि अंतराळाशी कधीही थेट संपर्क न आलेली माती समोर आली.
जेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वरच्या मातीचा आणि खालच्या मातीचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना समजलं की चंद्राची माती एखाद्या लेयर केकसारखी आहे! वरची ३ सेंटीमीटर माती अगदी मोकळी आणि हलकी होती, जी एखाद्या थर्मस फ्लास्कसारखं उष्णता रोखण्याचं काम करत होती. तर तिच्या अगदी खाली असलेली माती प्रचंड घट्ट, कडक आणि वेगळ्याच गुणधर्मांची होती. केवळ काही सेंटीमीटरच्या अंतरात चंद्राच्या मातीचे गुणधर्म एवढे बदलू शकतात, हे विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच समोर आलं होतं.
आता तुम्ही म्हणाल, या माहितीने नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी एवढ्या का चक्रावून गेल्या आहेत? याचं उत्तर आहे भविष्यातील ‘मून बेस’!
नासा आपल्या आर्टिमिस मिशनद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी वस्ती उभारण्याच्या तयारीत आहे. पण तिथे घर कसं बांधायचं? तिथली जमीन वजन पेलू शकेल का? ड्रिलिंग करता येईल का? या सर्व प्रश्नांची खरी उत्तरं जगाकडे नव्हती. पण भारताच्या या ‘जुगाड’ प्रयोगाने अब्जावधी डॉलर्स खर्च न करता जगाला याचं अगदी अचूक उत्तर मिळवून दिलं आहे. भविष्यात जेव्हा माणूस चंद्रावर बांधकाम करेल, तेव्हा त्याला भारताचाच डेटा वापरावा लागणार आहे.
एवढंच नाही, तर या उडीनंतर भारताच्या विक्रम लँडरने चंद्रावरील ‘ट्विलाइट फेज’ म्हणजे दिवस संपून रात्र सुरू होतानाचा काळ रेकॉर्ड केला. चंद्राची माती हळूहळू कशी थंड होते आणि आपली उष्णता अंतराळात कशी सोडते, हे जगाने पहिल्यांदाच थेट पाहिले.
या प्रयोगाने भारताची एक भयानक ताकदही जगाला दाखवून दिली आहे. चंद्रावरून पुन्हा टेक-ऑफ करण्याची ही तंत्रज्ञान क्षमता भविष्यातील ‘मून सॅम्पल रिटर्न मिशन’ची पहिली पायरी आहे, म्हणजेच चंद्रावरील माती आणि दगड पृथ्वीवर परत आणण्यासाठी हीच तंत्रज्ञान प्रणाली वापरली जाईल. ज्या तंत्रज्ञानासाठी अमेरिका, चीन आणि रशिया वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपये फुंकत आहेत, ते भारताने एकाच मिशनमध्ये, कोणत्याही अतिरिक्त बजेटशिवाय करून दाखवलं!
चंद्राचा हा दक्षिण ध्रुव आज जगासाठी सर्वात मौल्यवान बनला आहे, कारण तिथे अंधार्या दर्यांमध्ये अब्जावधी टन पाणी बर्फाच्या स्वरूपात जमा आहे. भविष्यातील अंतराळवीरांना हेच पाणी पिण्यासाठी लाभेल, यातूनच श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळेल आणि याच पाण्यातून हायड्रोजन काढून रॉकेटचं इंधन बनवलं जाईल. म्हणजेच चंद्राचा वापर भविष्यात मंगळ ग्रहावर जाण्यासाठी एका ‘पेट्रोल पंपा’सारखा केला जाईल.
२००८ मध्ये भारताच्या चंद्रयान-१ ने चंद्रावर पाणी शोधून जगाचा दृष्टिकोन बदलला होता आणि आज चंद्रयान-३ ने चंद्राच्या मातीची खोली मोजून इतिहास रचला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलंय की, भारत आता अंतराळ शर्यतीत मागून पाहणारा देश राहिलेला नाही, तर जगाचे नेतृत्व करणारा ‘स्पेस सुपरपॉवर’ बनला आहे! आपल्या वैज्ञानिकांच्या या दैदिप्यमान कामगिरीवर प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हाला काय वाटतं, भारतीय शास्त्रज्ञांच्या या ‘जुगाड’ आणि ‘ऑन द स्पॉट’ घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट करून नक्की सांगा!
©संतोष कारखानीस
संदर्भ
https://www.youtube.com/watch?v=T0ajgv8xn80


Leave a Reply