नवीन लेखन...

एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या “बंदिनी’ या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले “मोरा गोरा अंग लै ले..’ हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.

बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.

बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. मा.बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती
दो बिघा जमींन
साल:- १९५३
या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.

देवदास
साल:-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.

मधुमती
साल:-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.

सुजाता
साल:-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.

बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..