नवीन लेखन...

चित्रपटसृष्टीतला जमीनदार : बिमल रॉय

सरंजामशाही, हुकूमशाही, राजे शाही वा जमिनदारी या सर्वच शोषणावर उभ्या असतात. त्यामुळे या व्यवस्थेतील माणसे बहूतांशी संवेदनहीन असतात… हे एक वैश्विक सत्य आहे आणि हे वास्तव आपण नाकारण्यात अर्थ नाही. प्राचीन काळा पासून भारतीय समाज या सर्वाचाचं अनुभवही घेत आला आहे. ब्रिटीश वसाहतवादी होते व त्यांना आपले साम्राज्य जगभर पसरवायचे होते. ते दूरदर्शी व चलाखही होते त्यामुळे भारतावर राज्य करतानां येथील पारंपारीक व्यवस्थेची वीण विस्कटणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतली. पण हे घडत असतानां जगातील आधुनिक शिक्षणाच्या वाऱ्यानां त्यांनी पायबंद केला नाही. चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ ब्रिटीशांमुळे होऊ शकली हे एक सत्य आहे. दुसऱ्या महायुद्धाचा सर्व जगावर प्रचंड प्रभाव पडला होता. जागतिक स्तरावर १९४०च्या आसपास “इटालियन न्यूओ-रिअलॅस्टिक सिनेमा” ची चळवळ जोमात सुरू झाली होती आणि भारतात या कालखंडात अनेक नामवंत चित्रपट संस्था जोमाने काम करू लागल्या होत्या. यामध्ये उच्च शिक्षित वर्गातले असंख्य तरूण ओढले गेले होते. अशा तरूणांत अनेक भारतीय तरूणही होते. यापैकी एक म्हणले बिमल रॉय. भारतीय चित्रपटसृष्टतले बारकावे आत्मसात करत असतानां त्यावेळी युरोपात जोमात असलेल्या “इटालियन न्यूओ-रिअलॅस्टिक सिनेमा”चा प्रचंड प्रभाव पडला त्यांच्यावर पडला. यातुनच पूढे त्यांच्या अमर कलाकृती जन्माला आल्या.
हा एक योगायोग म्हणावा की नियती? खरं तर बिमल रॉयचा जन्म श्रीमंत जमिनदार घराण्यातला. ऐषेरामात जगता येईल अशी श्रीमंती असताना ते या मायावीनगरीकडे ओढले गेले. नुसते ओढले गेले नाही तर जे चित्रपट त्यांनी केले ते त्यावेळच्या समाज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. मला व्यक्तीश: म्हणूनच हा माणूस खूप मोठा वाटतो. जमिनदारीमुळे सर्वसामान्य भरडली जाणारी माणसे आणि जाती व्यवस्थेमुळे हीन दिन झालेला एक फार मोठा समूह या जमिनदाराच्या पोराला अस्वस्थ् करू शकतो यावरून हा तरूण संवेदनशिल होता आणि आपल्या चित्रपटात ही संवेदनशिलता त्याने जपली देखील. कदाचित म्हणूनच वास्तवादी व सामाजिक भान असलेले चित्रपट ते तयार करू शकले. सध्याच्या बागंला देशमधील ढाका जवळच्या सुआपूर येथील जमिनदारच्या घरात ते जन्मले. चित्रपट माध्यमाच्या ओढीने ते कलकत्यात आले. त्यावेळी “न्यू थिएटर्स प्रायव्हेट लिमीटेड” ही मात्तब्बर चित्रपट संस्था कलकत्त्यात चित्रपट निर्मिती करत होती. बिमलादा इथे रूजू झाले. संस्थेचे दिग्दर्शक पी.सी. बरूआ यांच्या कडे ते पब्लिसिटी फोटोग्राफर म्हणून काम करू लागले. या संस्थेचा “देवदास” त्यावेळी प्रंचड गाजत होता. बिमलदाच्या डोक्यात या देवदासने पूर्ण शिरकाव केला होता आणि भविष्यात ते याच विषयावर चित्रपट बनवणार होते. न्यू थिएटर्स मध्ये असतानां ते समातंर चित्रपटाच्या चळवळीत पण संक्रिय होते. मग हळूहळू न्यू थिएटर ओसरणीला लागली. बिमलादा यानां आत मुंबई शिवाय पर्याय नव्हता. १९५० मध्ये त्यांनी हृषिकेश मुखर्जी (संकलक),नवेंदू घोष (पटकथाकार), असित सेन (सहाय्यक दिग्दर्शक),कमल बोस (कॅमेरा मन) यानां घेऊन मुंबई गाठली. नंतर काही महिन्याने सलील चौधरी (संगीतकार) हे ही त्यानां सामिल झाले. विशेष म्हणजे बिमलदा चे हे सर्वच सोबती कालातंराने चित्रपटसृष्टीतील दिग्गज बनले. यात हृषिदा चे सहाय्यक गुलजार ही होते.
१९५२ मध्ये बिमल रॉय यांनी आपली दुसरी इनिंग सुरू केली. आगोदरच्या चित्रपटा बाबत अधिक चर्चा मी टाळत आहे कारण बिमल दा चे अत्यंत महत्वाचे चित्रपट हे १९५२ ते १९६६ या कालखंडातले आहेत. दिग्दर्शक म्हणून जागतिक पातळीवर जे त्यांचा लौकिक झाला तो याच काळात. बिमल दा नी या काळात माँ (१९५२), परिणीता (१९५३), दो बिघा जमिन (१९५३), नोकरी (१९५४), बीराज बहू (१९५४), बाप बेटी (१९५४) देवदास (१९५५), यहूदी (१९५८), मधूमती (१९५८), सुजाता (१९५९), परख (१९६०), प्रेमपत्र (१९६२), बंदीनी (१९६३) असे १३ चित्रपट केले. पैकी परिणीता, दो बिघा जमिन, बीराज बहू, देवदास, यहूदी, मधूमती, सुजाता, बंदीनी हे त्यांचे असे चित्रपट आहेत की ज्यामुळे त्यांची दखल जागतिक चित्रपटसृष्टीला देखील घ्यावी लागली. प्रत्येक चित्रपटाचा विषय तसा वेगळा जरी असला तरी पण त्यांची सामाजिक भानाची पकड मात्र विलक्षण होती. “दो बिघा जमीन” हा त्यांनी अनुभवलेल्या जमिनदार व्यवस्थेचा परीपाकच होता. एखादे वाहन ओढण्यासाठी पशुचा वापर करणे यात कोणालाच वावगे वाटण्याचे कारण नाही पण माणसाने एखादे वाहन पशू सारखे ओढत न्यावे आणि त्या वाहनावर माणसांनी स्वार व्हावे हा अमानुष प्रकार आजही मन काळवंडून टाकतो. “दो बिघा जमीन” मध्ये एका प्रसंगात घोडागाडी आणि माणूस गाडी याच्यातील एक रेस आहे. शंभू महातो (बलराज सहानी) आपल्या दो बिघा जमीनीचा तुकडा जमिनदाराच्या तावडीतुन सोडविण्यासाठी कलकत्त्यात येऊन रिक्षा ओढण्याचे काम करू लागतो. एकदा एक पैसेवाली आसामी याच्या रिक्षात बसते. शंभू रिक्षा ओढत असतानां एक घोडागाडी त्याला ओव्हरटेक करते. ते बघून ती आसामी शंभूला म्हणते- तू जर या घोडा गाडीच्या पूढे गेलास तर तुला जास्त पैसे देईन. आणि मग सुरू होते ती माणूस आणि पशू याच्यातील रेस..खरं तर आजही ही रेस कुठे थाबंलीय? ती सुरूच आहे. वाहनं बदलली असतील माणस बदलली असतील पण रेस कायम आहेच. बलराज सहानी या अभिनेत्याने या प्रसंगात अक्षरश: कमाल केली आहे. त्यांनी स्वत: खरोखरच ही रिक्षा ओढली. कलकत्त्याच्या सिंमेट रोड वरून भर दुपारी ते अनवाणी पायाने रिक्षा ओढत होते आणि कुणालाच हे समजले नाही की हा माणूस बलराज सहानी आहे. आपल्या कामाप्रती अशी निष्ठावान माणसे होती म्हणूनच आमच्या चित्रपटांचा डंका परदेशा पर्यंत वाजू शकला. बा…बलराज.. तुझ्यातल्या शंभूला माझा त्रिवार सलाम…
“निचा नगर” या चित्रपटा नंतर कान्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये पुरस्कार प्राप्त करणारा “दो बिघा जमिन”हा दुसरा चित्रपट ठरला. बॉलिवूड मधील पहिल्या सर्वोत्कृष्ट २५ चित्रपटात या चित्रपटाची गणणा होते. सुजाता आणि बंदीनी हे दोन्ही चित्रपट स्त्री प्रधान व्यक्तीरेखा असलेले. दोन्हीमध्ये नूतनचा उत्कृष्ट अभिनय आहे. “सुजाता” ही एका अनाथ् अस्पृश्य मुलीची कथा. अत्यंत टोकदार पणे बिमलदाने ही कथा हाताळली. त्या काळची समाज व्यवस्था बघता अस्पृश्यता हा विषय खूपच कमी लोकांनी हाताळला आहे. कदाचित व्यवसाय डोळ्या समोर असावा. “बंदिनी” हा विषय देखिल असाच. एक तरूण स्त्री खूनाच्या आरोपात तुरूंगवास भोगत आहे. फ्लॅश बॅक पद्धतीचा अत्यंत सुंदर वापर करत ही बंदिनी बिमलदा नी उलगडून दाखविली आहे. या चित्रपटाने उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शन, छायाकार,ध्वनी संयोजक अणि कथा असे पाच फिल्म फेअर पुरस्कार मिळवले. १९६३ चा राष्ट्रीय पुरस्कार पण या चित्रपटाने मिळवला. नुतनच्या अभिनय क्षमतेचे सर्व पैलू बिमलदाने यात उलगडून दाखविले आहेत.
“मधूमती” हा तसा एका अर्थी सुंदर आदर्श व्यवसायिक चित्रपट. ऋत्विक घटक यांची कथा पटकथा असलेल्या या चित्रपटात पूर्नजन्माची कथा अत्यंत वेगळया पद्धतीने सादर केली गेली. मात्र या चित्रपटात सर्वात मोठा वाटा सलील चौधरी यांच्या संगीताचा होता. सर्वच गाणी एकापेक्ष एक सरस आहेत. हा चित्रपट आणखी एका वेगळ्या कारणांनी गाजला. त्या वर्षी या चित्रपटाला ७ राष्ट्रीय तर ६ फिल्म फेअर असे तब्बल १३ पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर पुरस्काराचे हे रेकॉर्ड तर ३७ वर्षे अबाधित होते. १९९५ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “दिलवाले दुल्हनिया ले जाएगें” या चित्रपटाने मग हे रेकॉर्ड तोडले. यातील सर्व गाणी शैलेंद्र यानी लिहली होती. बिमलदाची जागतिक चित्रपटसृष्टीवर बारीक नजर होती. शिवाय तंत्रज्ञानाचा अभ्यासही सूक्ष्म होता. कृष्णधवल चित्रपटात प्रकाश योजनेला खूप महत्व असते. शॉडो अन्ड शेड चे अचूक ज्ञान त्यांचे चित्रपट बघताना लक्षात येतं. चित्रपटात छोट्या छोट्या प्रतिकांचा खूपच सुंदर वापर ते करीत असत. नुतनच्या चेहऱ्याचे अतिशय सुंदर क्लोजअप्स “सुजाता” आणि “बंदीनी” मध्ये बघायला मिळतात. गुलजार यांना बंदीनी मध्ये सर्वप्रथम गीत लेखनाची संधी बिमलदा नी दिली….मोरा गोरा अंग लै ले…
सर्वात मोठी मुलगी रिंकी हीने प्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टायार्च यांच्यांशी दोन्ही कुटूंबाचा विरोध पत्करून लग्न केले. दूर्देवाने हा प्रतिभावान दिग्दर्शकी ही अल्पायुषी ठरला. पत्नी मनोबिना आणि रिंकी, यशोधरा, अपराजिता या तीन मुली व जॉय रॉय या मुलांना मागे ठेवून ८ जानेवारी १९६६ ला वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी पॅकअप केले. आज त्यांचा वाढ दिवस….त्यांना विनम्र अभिवादन
-दासू भगत (१२ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..