नवीन लेखन...

भयंकराच्या उंबरठ्यावर – १ : सावध ऐका, पुढल्या हाका !

वाळू आणि धुळीचे प्रचंड लोट.
अस्मानाला भिडणारे .
दाही दिशा कोंदलेल्या . घुसमटलेल्या .
पाठीवर बांधलेल्या लहान मुलांच्या अंगावर , आसुडाचे फटके बसल्याने , उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्यांमुळे बिथरलेल्या उंटांच्या टापानी हादरून गेलेलं वाळवंट .
अगोदर स्वागत करणाऱ्या , नंतर गुलाम बनलेल्या आणि हत्यारांचे गाडे ओढता ओढता पाठीवर पडणारे कोरडे खाताखाता अर्धमेल्या असहाय जीवांच्या न ऐकवणाऱ्या किंकाळ्या .
घराघरात लपून बसलेल्या आणि सौंदर्य हा शाप वाटावा अशा मुलींवरचे , तरुणींवरचे अनन्वित अत्याचार , बलात्कार आणि त्यांचे उद्ध्वस्त झालेले भावविश्व .
वाळूत गाडल्या गेलेल्या मन आणि भावना .
समोर येईल ते कुस्करून , तोडून , मोडून , फोडून टाकून भीषण वादळ सुरू करून चाललेला मुजोर क्रूरकर्मा अफगाणिस्थानचा माजलेला सांड ,महंमद घोरी .

– अखंड हिंदुस्थान ज्याच्या नजरेत खुपत होता .
– अखिल विश्वानं जिचा हेवा करावा अशी स्वयंपूर्ण , प्रगत , समृद्ध संस्कृती पाहून ज्याच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पेटत जात होती .
– हिंदुस्थानातील आरस्पानी , स्वर्गीय सौंदर्याच्या वार्तांमुळे ज्याची नजर विखारी आणि वखवखलेली झाली होती .
– इथली मंदिरं , इथलं स्थापत्य , इथली बुद्धिमत्ता , इथला स्वाभिमान , इथलं शौर्य , इथली विद्यापीठं , इथली माणुसकी , सौजन्य , आर्थिक संपन्नता आणि इथला आरोग्यदायी निसर्ग केव्हा एकदा आपल्या राक्षसी पंज्याखाली चिरडून टाकतो , अशी घाई ज्याला झाली होती , तो आग्या वेताळ , महंमद घोरी , अफगाणिस्थानातून निघाला होता .

अखंड हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर एक भयंकर संकट , विकराल हसत उभं होतं .

महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाला , लोकप्रियतेला आणि प्रगतीला थोपविण्यासाठी जयचंदाने निमंत्रण धाडले होते महंमद घोरीला .

ते नुसतं निमंत्रण नव्हतं .
तो आत्मघात होता .
तो राष्ट्रीय एकात्मतेवरचा पहिला आणि शेवटचा घाला होता .
तो सूडचक्राचा , अनंत काळ सुरू राहणारा प्रवास होता .
तो आपल्या मुलीबाळींच्या , लेकीसुनांच्या चारित्र्यावरचा बळजबरीनं लादलेला कलंक होता .
तो आपल्या स्वाभिमानाला , शौर्याला , अखंडत्वाला चिरडून टाकणारा , वर्मी बसणारा घाव होता .

नादान , हरामखोर , देशद्रोही जयचंदाला फक्त स्वार्थ दिसला होता .

द्वेषानं आणि सूडबुद्धीनं आंधळ्या झालेल्या कपटकारस्थानी जयचंदाची दृष्टी जणू गेली होती . तो जणू बहिरा झाला होता . हातापायानं पंगू झाला होता . अक्कल गहाण पडली होती . आणि त्याचा स्वाभिमान , महंमद घोरीची विष्ठा चाटण्यात धन्यता मानत होता .

हे सगळं आत्ता , वर्तमानात घडतंय असंच वाटतंय .

भारताच्या उंबरठ्यावर घोंगावणारं भयंकर वादळ , अफगाणिस्थानमध्ये तालिबानच्या रूपाने नंगानाच घालत आहे .
बारा बारा वर्षांच्या लहानग्या मुलींवर बलात्कार करीत आहे . तान्ह्या मुलाला आईसमोर मारून टाकून आईवर अनन्वित अत्याचार करीत असल्याचा बातम्या , जीवाचा थरकाप उडवीत आहेत .
खेळ खेळत असल्यासारखे , ते जीव घेत आहेत . नासधूस , तोडफोड हे सर्रास चाललं आहे .तो उन्माद , जाहीरपणे व्हिडिओवरून प्रसारित करीत आहेत .
या बातम्या भयकंपित करणाऱ्या आहेत .
अशावेळी मला काय त्याचे ? ही वृत्ती सोडायलाच हवी .
कारण जगभर धुमाकूळ घालणारा तो राक्षस पुढे सरकणार नाही याची खात्री कुणी देऊ शकणार नाही .
आग पलीकडच्या घराला लागली आहे , मी सुरक्षित आहे . असेही म्हणून चालणार नाही .

हे जागतिक संकट आहे .
झळ सगळ्यांना पोहोचणार आहे .
अशा वेळी आपण काय करणार आहोत ?

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जयचंदी औलादी ओळखणार आहोत का ?
आपल्या हाती असणाऱ्या मोबाईलचा सदुपयोग करणार आहोत का ?
टुकार मालिका बघण्याऐवजी राष्ट्रीय न्यूज चॅनल बघणार आहोत का ? आपल्यापलीकडेसुद्धा एक विश्व आहे , याची खबरबात आपण घेणार आहोत की नाही ?
संभ्रम निर्माण करण्याऐवजी , खऱ्या खोट्याची पारख करणार आहोत का ?
आपल्या पुढच्या पिढीला आपला ऐतिहासिक वारसा सांगणार आहोत का ?
देश सर्वोपरी ही शिकवण , त्या अनुषंगाने येणारे संस्कार , नव्या पिढीवर करणार आहोत का ?

असे असंख्य प्रश्न तुमच्या माझ्या मनात उमटायला हवेत .
त्याची उत्तरे शोधायला हवीत .
त्यानुसार आपली वागणूक बदलायला हवी .

भयंकराच्या उंबरठ्यावर , महाबिलंदर श्वापद दबा धरून बसलेच आहे .
आपली अखंड सावधानता हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे .

महंमद घोरी कुठल्या रूपाने आपल्यावर चाल करून येईल ते सांगता यायचे नाही . काळ बदलतोय पण आक्रमकांची वृत्ती तीच आहे !
त्याला सामोरं जाण्यासाठी रक्त प्रवाही होऊ द्या .
त्यासाठी मनानं खंबीर व्हा .
त्या महाभयंकर इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही , याची दक्षता घ्या.

आणि हो , ताठ मानेनं जगण्यासाठी…

सावध ऐका , पुढल्या हाका !

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
—————
१४ ऑगस्ट २०२१
हा लेख फाळणीच्या वेदना स्मृतिदिनाला समर्पित !

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..