नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – २३ – शांताबाई नारायणराव सावरकर

हरिदिनी सुंदर शब्द आहे ना…म्हणजे हरीच्या दिवशी म्हणजेच एकादशीला जन्माला आलेली, ती हरिदिनी. ज्यांचा जन्म हरिदिनी झाला, त्यांच्या जन्माचे प्रयोजन पण हरीने केलंच असणार ना, मग अश्या शलाकेचा, तिने कुठे विवाह करायचा ह्याचाही विचार केलाच असणार, मग ते साल १९१५ का असेना..हरिदिनी तथा शांताबाई नारायणराव सावरकर.

१९०१ साली खान्देशात घाणेकर कुळात श्रावण वद्य एकादशीला हरिदिनी ह्यांचा जन्म झाला. गोऱ्या-गोमट्या, निळ्या डोळ्याच्या हरिदिनी सगळ्यांच्या लाडक्या होत्या. त्या काळी स्त्री शिक्षण म्हणजे विचारातही नसतांना ताईंचे ४ थी पर्यंत शिक्षण झाले. ह्याशिवाय स्त्री सुलभ आणि स्त्री असण्याची परिभाषा असलेल्या सगळ्या गोष्टी ताईंना शिकवल्या गेल्या, जसे की शिवणकाम,भरतकाम,स्वयंपाक, शिवण इत्यादी सगळं. वडिलांची फिरतीची नौकरी म्हणून ताईंचे लहानपण सिन्नर ला त्यांच्या मामांकडेच गेलं. तिकडे सावरकर परिवाराचा घरोबा होता. ताई आणि डॉ नारायण सावरकर ह्यांच बोलणं-चालणं नसलं तरी डॉ आणि त्यांचा परिवारला ताई समजून होत्या, जाणून होत्या, तेव्हाच त्यांनी मनाचा निश्चय केला की लग्न डॉ नारायण सावरकर ह्यांच्याशीच करायचे.

येसू वहिनी जेव्हा सावरकर परिवारात आल्या, तेव्हा ते एक धन कनक संपन्न कुटूंब होतं. बाबा साहेबांनी आता-आता क्रांतिकार्यात सहभाग नोंदवला होता. यमुनाबाई जेव्हा सावरकर घरात आल्या त्यावेळी बाबाराव आणि तात्या सावरकर क्रांतिकारी म्हणून इंग्रजांच्या नजरेत यायचे होते, पण शांताबाई जेव्हा लग्न करायच्या म्हणाल्या त्यावेळी बाबाराव आणि तात्या साहेब सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, नारायण राव आपल्या दोन्ही वडील बंधूंच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे वाटचाल करत होते, इंग्रजांच्या काळ्या यादीत अग्रगण्य नाव होते. नुसतंच महाराष्ट्रात नाही तर देशात कुठेही एखादी घटना घडली तरी संशयित म्हणून नारायणरावांना पकडले जात. अश्या सावरकरघरात, नारायणरावांशी वयाच्या १६ व्या वर्षी हरिदिनी ह्यांनी विवाह केला आणि त्या शांताबाई नारायण सावरकर झाल्या.

थोरल्याबाई – येसू वहिनी, धाकट्या दोघांची आईच जणू, सावरकर घराचा आधारस्तंभ, पतीच्या पावलावर पाऊल टाकून देशसेवेचे व्रत हाती घेतले. मधल्याबाई – यशोदाबाई यांनीही येसू वहिनींच्या बरोबरीने घर आणि देशकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. ह्या दोघींचे यजमान काळया पाण्याची शिक्षा भोगत होते, अशावेळी घरात आलेल्या सोळा वर्षाच्या शांताबाईंना त्यांचं दुःख समजायला वेळ लागला नाही, ह्या दोघी दुःखात असतांना आपण आनंदात कसे राहणार? त्या नारायणरावांबरोबर मुंबईला न जाता नाशकात ह्या दोघींजवळ राहिल्या आणि घडल्या. घरकामापासून ते देशसेवे पर्यंत अगदी सगळ्यात दोघींची सावली बनून राहिल्या आणि तरीही अगदी नकळत स्वतंत्र घडल्या. तीन जावा की तीन बहिणी ते तीन मैत्रिणी असा ह्या तिघींचा सुंदर प्रवास सावरकर घराण्याने पहिला, अनुभवला.

येसू वाहिनींचा बाबरावांना भेटायचा ध्यास त्यांनी पाहिला, त्यांचे जाणे जीवाला चटका लावणारे ठरले. त्यानंतर बाबाराव सुटून आल्यावर त्यांची सेवसुश्रुषा पण अगदी मनोभावे केलो. मधल्या बाईंची आणि सावरकरांची भेट, त्यांचा घरातला बंदीवास, मधल्याबाईंचे समाजकार्य ह्या सगळ्यांच्या एकदम जवळच्या साक्षीदार ठरल्या.

बाबा आणि तात्या दोघेही अंदमानात त्यामुळे अतिशय लहान वयातच डॉ नारायणरावांवर घराची संपूर्ण जवाबदारी पडली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली आणि त्याच्याबरोबर शांताबाईंनी सुद्धा. नारायण रावांनी त्यांना सांगितले होते, डॉक्टरकी ते फक्त घराचा खटाला ओढण्यापुरताच करणार,बाकी वेळ देशसेवेचे त्यांच्या घराने घेतलेले व्रत पूर्ण करणार. शांताबाईंनी सुद्धा त्यांना पूर्ण साथ दिली. जे मिळेल जेवढे मिळेल त्यात पूर्ण घर चालवले. वेळ-प्रसंगी आपले स्त्रीधन सुद्धा देऊन टाकले.

शांताबाईंनी सावरकर घरात सगळ्यांचे मृत्यू पाहिले. गांधींवधा नंतर झालेला अतोनात छळ सोसला. त्यात डॉ जखमी झाले आणि त्या आजारपणा नंतर उठलेच नाहीत. ह्या खचल्या नाहीत. थोरल्याबाई, बाबाराव, माई, तात्या सगळयांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. मुलांना एकत्र बांधून ठेवले.

“तुला पाहिजे ते इष्ट ते प्राप्त नोहे, तरी प्राप्त ते इष्ट मानुनी राहे. “ ह्या उक्ती प्रमाणे त्या जीवन जगल्या आणि सावरकर परिवाराची मोट बांधून ठेवली. ह्या तेजस्वी शलाकेला शत शत नमन.

|| वंदे मातरम् ||

— सोनाली तेलंग.

२६/०६/२०२२

संदर्भ:

१. हरिदिनी : कमल दत्तात्रय काळे : संपादन : अपर्णा चोथे

२. त्या तिघी : शुभा साठे

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..