नवीन लेखन...

भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर

इतिहास – समृध्दी आणणाऱ्या आपल्या धरणांचा – भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर…..

शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला… अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे.
निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे….

उत्तर रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे. …..

दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी – कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.

भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.

जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे – नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड – उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.

भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.

अधिकृत नाव : भंडारदरा. विल्सन डॅम / ऑर्थर लेक
अडवलेली नदि: प्रवरा
स्थान : शेंडी.
सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
उंची : ५०७ मीटर.
रुंदी : (तळाशी) ८२.२९.
बांधकाम सुरू: १९१०.
उद्घाटन दिनांक: १९२६.
बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०
क्षमता : 11 टीएमसी
भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७० गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.
दरवाजे: प्रकार : S – आकार लांबी : १९८.१० मी.
सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).
पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी.
क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य
क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.
कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.
उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी. क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.
वीज उत्पादन: टप्पा १
जलप्रपाताची उंची : ६५ मी
जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट.
टप्पा २
जलप्रपाताची उंची :
५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र x:
१ X ३४ मेगावॅट
धरणाची माहिती :
बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची :
८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..