नवीन लेखन...

बंगाली आणि हिंदी गायक, अभिनेते संगीतकार पंकज मलीक

पंकज मलीक ह्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचा जन्म १० मे १९०५ रोजी झाला. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते. रवीन्द्र टागोर यांचे पंकज मलिक हे लाडके होते. रवीन्द्र टागोर यांची एक कविता दिनेर शेषे घुमेर देशे ला पंकज मलिक यांनी संगीत दिले होते. ते रवीन्द्र टागोर यांना आवडले व त्यांनी हे गाणे पंकज मलिक यांना पी सी बरुआ यांचा चित्रपट मुक्ति मध्ये वापरण्यास परवानगी दिली.

पंकज मलिक यांनी प्रथम न्यू थिएटर्ससाठी मूकपट व बोलपटात संगीत सहाय्य केले. रवींद्र संगीताचा खुबीने केलेला वापर व वाद्यवृंदाचा घसघशीत वापर हा त्यांचा विशेष होता. ते दशक म्हणजे सर्वकाही पंकज मलिक असेच होते. हिंदी गीतांमध्ये “टांगा ऱ्हीदम‘ आणण्याचा पहिला यशस्वी प्रयोग मलिक यांनीच केला. त्यानंतर तोच धागा इतर संगीतकारांनी पकडला. त्यांच्या ‘डॉक्टर’ ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत. तो चित्रपट तर स्वतः पंकज मलिक ह्यांनी आपल्या संयत सुरेख अभिनयाने सजवला होता. या सिनेमामध्ये पंकज मलिक यांनी संगीत दिलेले व गायले ‘चले पवन की चाल’ या गाण्यामध्ये घोड्यांच्या टापांचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी केला होता. व ‘आई बहार आज आई बहार’ किंवा ‘कबतक निरास की अंधियारी’ ही गीते कमालीची सुंदर आहेत.

सैगल यांची ‘सोजा राजकुमारी’ किंवा ‘मैं क्या जानू’ ही अजरामर गाणी पंकज मलिक यांनी संगीतबद्ध केलेली होती. पंकज मलीक यांना भारत सरकारने पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला होता. पंकज मलिक हे कलकत्ता आकाशवाणीला पहिल्या पासून जोडलेले होते.

पंकज मलिक यांच्या वर एक चरित्रपट सई परांजपे बनवला होता त्या बद्दल बोलताना सई परांजपे म्हणतात, पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले. त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले.

पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत. त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स!

नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले. ‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता. रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली.

हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही. पंकज मलिक यांचे १९ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..