नवीन लेखन...

बहुरुप्याचे राजेपण

गजानन महाराजांच्या पोथीची पारायण मी काहीवेळा केली आहेत . दररोज त्याचा एक तरी अध्याय वाचायचा असेही कितीतरी वेळा केले आहे . त्याची CD अखंडपणे ऐकत कितीतरी वेळा प्रवासही केला आहे . पण याआधी कधी झाले नाही असे आज़ झाले . मी आत्ता यातले काहीही करत नसतानाही अचानक माझ्या मनात आले की संतकवी श्री दासगणू महाराज क्रुत ” श्री गजानन विजय ” या पोथी मधल्या अनेक ओव्या शेअर – बाजारांच्या संदर्भात लागू पडतात .

आता हेच बघा ना ! या पोथिच्या दहाव्या अध्यायाच्या १६१ व्या ओवीत एक ओळ आहे . . .

” बहुरुप्याचे राजेपण ¦

कोठून टिके बाजारी ”

ही ओळ आता अचानक आठवली आणि असं पटकन मनात आले की हे कोणत्याही काळातील , कोणत्याही स्थितितील , कोणत्याही देशातील शेअर – बाजाराचे हे किती चपखल वर्णन आहे . आजमितिला आपल्या शेअर – बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की त्याबाबत जरा नीट विचार करा असे कोणी कोणाला सांगायला गेले तर लगेचच त्याची संभावना ” नतद्रष्ट ” अशी केली जाईल . पण अशा बाजारात हौशी – नवशे – गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात , तोर्यात मिरवत असतात . कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि श्यामभटाची तटानी या दोघांचेही भाव चढे असतात . त्यामुळे एखादा शेअर घेताना जरी चूक झाली तरी ती चूक अशा बाजारात निस्तरताना सुध्दा नफा पदरी पडतो . आणि म्हणूनच अशा बाजारात वावरताना याच पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ९९ व्या ओवितिल एक ओळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे . ती ओळ अशी :

” उगीच पाहून पिवळेपण

सोने पितळेस मानू नका ” .

कारण उतरत्या बाजारात सोने आणि पितळ यातला फरक उघड होत राहतो . तेजिच्या बाजारात पितळ बहुरुप्यासारख सोने म्हणून कितीही वावरले तरी याच ओविचा पूर्वार्ध आठवावा लागतो . तो पूर्वार्ध असा :

” म्हणून बहुरुप्या कारण

जपण आहे अवश्य जाण ” .

अशी जाणीव आपल्याला होत राहण्यासाठी अनेकदा तद्न्य सल्लागारांची मदत घ्यावी असे सांगितले जाते . ते योग्यच आहे . पण असा सल्लागार निवडताना त्याबाबतचे निकष काय असावेत याचे विवेचन गजानन महाराजांच्या पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ८८ व्या ओवित फार छान पध्दतीने सांगितले आहे . ती ओवी अशी :

” मात्र औषधी देणारा

शास्त्रात असला पाहीजे पुरा

औषधीचा पसारा

आहे अवगत जयासी ” .

कदाचित अशा मदतीची या क्षेत्रातील माहिर माणसांना आवश्यकता वाटत नसेलही . कारण त्यांची अवस्था या पोथिच्या चौदाव्या अध्यायातील १४५ व्या ओविच्या

” स्वानुभवाच्या ठायी जाणा

वाव न तर्काकारणे ”

अशी तरी असते नाहीतर याच पोथिच्या एकोणिसाव्या अध्यायातील १०६ व्या ओविच्या

” मुक्कामास गेल्यावर

मार्गांचा न उरे विचार ”

अशी असते . पण ” अर्थ ” असो नाहीतर ” परमार्थ ” अशी चांगल्या अर्थाने ” पोचलेली ” माणसे कमीच असतात . बाकी सगळेच तुमच्या – माझ्यासारखे . रास्ता शोधणारे . त्यामुळे याच पोथीत एकोणिसाव्या अध्यायाच्या १२३ व्या ओवित म्हणले आहे तसे

” जो मुक्कामास जाई

त्याचे कौतुक करणे असे ”

अशीच भूमिका स्वीकारने योग्यच असते . पण हे कौतुक केवळ शाब्दिक असून पुरत नाहि . तसे प्रयत्न ही करावे लागतात .

हे लिहीत असताना मला ” यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ती नव्हे ” या लोकमान्य टिळकांच्या विधानाची अतिशय आठवण होत आहे . नाहीतरी या पोथीच्या पंधराव्या अध्यायाचा जवळजवळ निम्मा भाग लोकमान्य टिळक यान्च्याविशयीच आहे ना ! एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे स्थान मिळवणारा लोकमान्य टिळक सोडले तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल . असो .

असे क्रुतिशील प्रयत्न न करणाऱ्या मंडळी विषयी ( अर्थात पोथी तील ओविला शेअर – बाजार अपेक्षित नाही ) या पोथीच्या पाचव्या अध्यायातील १०६ व्या श्लोकात एकदम झणझणते अंजन घालण्यात आले आहे . ती ओवी अशी :

” तुझ्यासारखे निरुद्योगी

जन्मले आमच्यात जागजागी

म्हणून झालो अभागी

आम्ही चहू खंडात ” .

त्यामुळे हे किटाळ टाळण्यासाठी काय मार्गाने जायचे याचा विचार करावा लागतो . मुक्कामाला पोचलेल्याला मार्गाचे महत्व नसले तरी इतरांना असतेच असते . या पोथीच्या एकोणिसाव्या अध्यायाच्या १०६ व्या ओवीत याचे वर्णन अशा शब्दांत केले आहे :

” जो मार्गी चालतो नर

महत्व त्याचे त्यास

मार्ग असो कोणताही

त्याचे मुळी महत्व नाही . ”

असा मार्ग कसा आणि काय असावा याचे अतिशय मार्मिक वर्णन या पोथीच्या अनेक ओव्यात जागोजागी येत राहते . याची काही उदाहरणे खालील – प्रमाणे :

१ . ” शक्याशक्य विचार ¦सुद्न्ये करावा निरंतर

उगीच पूल सागरावर ¦ बांधवया जाऊ नये ”

( अध्याय विसावा , ओवी १४९ . )

२ . ” कोल्हा न राही उपोशीत ¦ उसाचिया फडामधे

वा पाहून बाटूकाला ¦ बैल नाही पुढे गेला ”

३ . ” हीरे गारा एक्या ठायी ¦ मिसळल्या असती जगा ठायी

पारखी तो निवडूनी घेई ¦ गार टाकून हिर्याते ” .

(पहिला अध्याय , १०७ वी ओवी )

४ . ” स्थान एक आहे म्हणुनी ¦ किंमत नाही समान

तेज हिर्याचे हिर्यालागून ¦ भूषवी न गारेला ”

( तिसरा अध्याय , ११३ वी ओवी ) .

५ . ” मोगरा , निवडूनग आणि शेर ¦ ही जमिनीची लेकर

परी किंमतीचा प्रकार ¦ निरनिराळ तो तिघांचा ”

(तिसरा अध्याय , १४५ वी ओवी ) .

असो .

हा झाला संकल्पनात्मक भाग .

गुंतवणूक क्षेत्रात सहभागी होत असताना , कार्यरत राहताना बाळगायच्या ” आचार – संहिता ” ( Code of Conduct ) किंवा ” क्रुति – आराखडा ” ( Action Plan ) याचा विचार केला तर . . . .

अर्थातच संतकवी श्री दासगनू महाराज यांच्या ” श्री गजानन विजय ” या पोथीच्या आधारे .

असा विचार करत असताना आपण एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर – बाजारात , सहभागी होत असताना या बाजारात तर राहायचे पण आपली वैचारिक तटस्थता सोडायची नाही हे पथ्थ्य न विसरता सांभाळत राहावे लागते . तरच या क्षेत्रात यशस्वी होता येते आणि यशस्वी राहताही येते . याबाबतचा अतिशय सुंदर द्रुश्तान्त या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ६८ व्या ओवीत दिला आहे . ती ओवी अशी आहे :

” गार पाण्यात राहते ¦ परी न पाणी शिरू देते

तैसेचि वागते साचे ¦ या प्रपंच माझारी ”

ही ओवी इतकी स्वयं – प्रकाशित आहे की त्याचे आणखी विवरण करण्याची आवश्यकताच उरत नाही .

हे जमवून आणणे सहज – सोप निश्चितच नाही . निदान आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी तर नाहीच नाही . कारण आपल्या सगळ्यांचीच अवस्था ” आऊ गेली देवापाशी , चित्त तिचे चपलान्पाशी ” अशीच असते . एकनाथ महाराजांच्या अनेक भारुडातही त्याच मोठ बोलके वर्णन वारंवार येत असते . पण हे जमणारच नाही असंही नसतं ना ! त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करत राहावं लागते . त्याचं पहिले पाऊल म्हणजे काम करत राहणे . हा पैलू या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ११९ व्या ओवीत असा शब्दबद्ध होतो :

” कर्ममार्ग सोडू नको ¦ विधि निरर्थक मानू नको

मात्र त्यात होऊ नको ¦ लिप्त बाळा केंव्हाही . ”

यात असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपले स्वतचे मन . अगदी

” मन सदा आशाळभूत ¦ ते ना कदा स्थिर होत

नाना विकल्प मनात ¦ येऊ लागती वरच्यावरी . ”

( अध्याय सातवा , सातवीं ओवी ) अशीच परिस्थिति .

हे शेअर – बाजारात तर सततच होत असते . कारण तिथे गन्मतीने म्हणायचे तर लोकशाहीचा अतिरेक सुरू असतोच असतो . ” नाना मति , नाना रीति ” अशी सदा स्थिति . पण यावर आपले मत अभ्यासांती तयार करून त्यावर स्थिर राहावे असे सांगताना या पोथीची सातव्या अध्यायातील ५२ वी ओवी सहजच म्हणते की :

” जन्बुकाच्या चेष्टला ¦ गजपती न मानी भला

श्वानाचिया भुंकणयाला ¦ व्याघ्र न दे किंमत ” .

हे जमले नाही तर ” दारिद्रयाचे मनीच्या मनी , जाती जिरोनि मनोरथ ” हे विधिलिखितच !

अर्थातच अशा ओव्या लिहिताना संतकवी श्री दासगनू महाराजांना गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर – बाजार अभिप्रेत नव्हता हे उघडच आहेत . पण वेळ ही गोष्ट , आणि त्यातही वेळ साधणे ही गोष्ट , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तेही प्रत्येक क्षेत्रात महत्वाची ठरते . ” Time is essence of contract ” हा गुंतवणूक क्षेत्राचा पायाभूत सिध्दांत आहे . त्याचं समर्पक वर्णन याच पोथीच्या चौथ्या अध्यायाच्या ११४ व्या आणि ११५ व्या ओवित अशा शब्दांत येते :

” तरूणपणी ब्रम्हचारी ¦ म्हातारपनी करसी नारी

अरे वेळ गेल्यावरी ¦ नाही उपयोग साधनाचा

जे करणे ते वेळेवर ¦ करावे की साचार

घर एकदा पेटल्यावर ¦ कूप खणण निरर्थक . ”

असे प्रयत्न करतांना वेळ जशी आणि जितकी महत्वाची आहे आणि असते , तेवढीच आणि तितकीच अपेक्षा वास्तव असण्याची नितांत गरज असते . हे संपूर्ण आयुष्याबाबतीत लागू पडनारे आहे . याला शब्दान्कीत करतांना या पोथीच्या २० व्या अध्यायातील १४९ वी ओवी सांगत राहाते :

” शक्याशक्य विचार ¦ सुद्न्ये करावे निरंतर

उगीच पूल सागरावर ¦ बांधावया जाऊ नये ” .

हे जमवायचे असले तर ” अहो साजेल ते बोलावे , जे का पचेल तेच खावे ; उसने ना कधी आणावे , अवसान ते अंगात ” ( अध्याय अकरावा , ओवी १५३ ) हे जसे खरे तसेच असे वास्तव अपेक्शान्चे अविरत प्रयत्न कुठे करायचे तेही ठरवणे महत्वाचे निश्चितच असते . कारण

” बीज पेरता खडकावरी ¦ ते वाया जाते साचार

त्यास कधी ना येणार ¦ मोड हे ध्यानी धरावे . ”

( तेरावा अध्याय , चोविसावी ओवी . )

अशा प्रयत्नातून मिळणाऱ्या यशाची अपेक्षा मोठी ठेवण्यास काहीच आडकाठी नाही हे सांगायला ना गुंतवणूक क्षेत्र विसरत ; ना ही पोथी . श्री गजानन विजय या संतकवी श्री दासगनू महाराज विरचित या पोथिची १५० वी ओवी निःसंदिग्ध पणे सांगते कि

” कल्पवृक्षाच्या तळवटी ¦ बसून इच्चिली गारगोटी

वा मागितली करवनटी ¦ कामधेनूपासून . ” .

सदा – सर्वकाळ , तिन्ही – त्रिकाल या कसोट्यांवर उतरतो तो राजा .

बाकीचे सगळे बहुरूपी .

बहुरूपी एखाद्या क्षणाला असं काही बेमालूम काम करून जातो कि तो त्या क्षणाला खरंच राजा वाटतो .

तो राजा ” वाटतो . ” ; राजा ” नसतो ” .

तो असतो फक्त बहुरूपी .

शेअर – बाजार तर स्वतःच एक बहुरूपी आहे .

” बहुरुप्याचे राजेपण ¦ कोठून टिके बाजारी ” .

चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-mail :  tilakc@nsdl.co.in

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..