नवीन लेखन...

नवीन आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम

पाकिस्तानच्या आय एस आय चे नवीन प्रमुख ले. जनरल फैझ हमीद

विश्वचषक स्पर्धेमध्ये २९ जुन ला पाकिस्तान व अफगाणिस्तान हा सामना सुरु असताना क्रिकेट मैदानाच्या परिसरात ‘जस्टीस फॉर बलुचिस्तान’ असा संदेश लिहलेलं एक विमान उडवण्यात आले. यावरून चिडलेल्या पाकिस्तान फॅन्सने अफगाणिस्तानच्या फॅन्सना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला चढवला.यांला अफगाणिस्तानच्या फॅन्सनी जशास तसे उत्तर दिले. या हाणामारी मुळे बलुचिस्थान मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या मानव अधिकार भंगाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.

आयएसआय गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाची बदली

इंटरसर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याजागी नवीन प्रमुखाची नियुक्तीही तितक्याच घाईने झाली. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुखपदावर आठ महिने राहू दिल्यानंतर त्यांची बदली आता करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएसआयचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएसआयच्या प्रमुखपदावर इतका कमी काळ कारभार पाहिलेले असीम मुनीर हे पहिले अधीकारी असावेत. फैझ हमीद हे आजवर पाकिस्तानी लष्कराचा गुप्तवार्ता विभाग सांभाळत होते. गेला काही काळ पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणी फैझ हमीद दोघेही बलोच रेजिमेंटचे असल्यामुळे विशेष मर्जीतले अधिकारी असा फैझ यांचा लौकिक होता. असीम मुनीर यांच्या अमदानीत पुलवामा हल्ला घडला आणि त्यातून त्यांची घसरण सुरू झाली असावी. जैश ए मोहम्मदला आवर घालण्यात असीम कमी पडले असावेत.असीम मुनीर यांना पुलवामापेक्षाही पख्तून आंदोलन हाताळण्यात आलेले अपयश त्यांच्या गच्छंतीसाठी कारणीभूत ठरले.

आयएसआय प्रमुखांचे मुख्य काम

आयएसआय प्रमुखाला काही महत्त्वाच्या बाबीत लक्ष ठेवावे लागते. एक अफगाणिस्तान मध्ये पाकिस्तानची सत्ता पुन्हा स्थापन करणे. दुसरे चायना पाकिस्तान इकॉनोमिक रस्ता जिथे चीनने प्रचंड प्रमाणामध्ये पैसे गुंतवले आहे, त्याची रक्षा करणे. तिसरे तेहेरिके तालिबान पाकिस्तान दहशतवादी गट सध्या पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार करत आहे, त्या वरती कंट्रोल करणे. या सगळ्या मुद्द्यांवर असीम मुनीर  कमी पडले आहेत म्हणूनच नवीन प्रमुखाची नेमणूक.

फैझ हमीद यांनी २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांची तेहरीक-इ-इन्साफ पार्टी सत्तेवर येण्यासाठी ‘मोलाची कामगिरी’ बजावली होती. पाकिस्तान मुस्लीम लीगचे काही नेते फैझ यांच्याच सांगण्यावरून फुटून तेहरीकला येऊन मिळाले. त्या वेळी त्यांना मेजर जनरल पदावरून लेफ्टनंट जनरल पदावर बढती मिळाली होती.

भारतासाठी नव्या आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीचा नेमका अर्थ काय आहे? पाकिस्तान सध्या आर्थिक अरिष्टातून जात आहे. यातून जनतेत खदखदणाऱ्या असंतोषाचा फायदा उचलण्यासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी एकत्र आले आहेत. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठीच फैझ हमीद यांच्या हाती आयएसआयची सूत्रे सोपवण्यात आली असावी.पण त्यांचे सर्वात महत्वाचे काम असेल, भारतामध्ये दहशतवाद इतका वाढवणे यामुळे भारताला पाकिस्तानशी वाटाघाटी करायला भाग पाडणे.

म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारता समोर अंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि हिंसाचार वाढू शकतो ,ज्या करता गुप्तचर संस्थांना जागृत राहण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही.

पोलिसांचे खबर्यांचे जाळे मजबुत करण्याची गरज

अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांनाना तोंड देण्याकरता पोलिस आणि अर्ध सैनिक दलाची ताकद नेहमीच अपुरी पडते. म्हणूनच जर देश सुरक्षित ठेवायचे असेल तर त्याकरता गुप्तचर संस्थांची सक्षमता वाढवणे हा महत्त्वाचा उपाय आहे.पोलीस खात्याला आणि गुप्तचर यंत्रणेला अत्याधुनिक तंत्र आणि साहित्याने कितीही सज्ज बनविले तरीही खबर्यांचे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही. नेमक्या याच दुव्याला हाताळण्यात राज्यातील पोलीस यंत्रणा फारशी यशस्वी होत नाही.

दरवेळी गुप्तवार्ता विभागाला अॅलर्ट होता का, यावरून चर्चा होते. अॅलर्ट दरवेळीच असतो, पण त्याने काहिच निष्पन्न होत नाही.म्हणूनच यासाठी गुप्तवार्तांचं जाळं बळकट करावंच लागेल. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमध्येही सरळसेवा भरतीने गुप्तवार्ता अधिकारी नेमायला हवेत. सर्व पोलिसांना  गुप्तवार्ता संकलनातच तरबेज करायला हवं. त्यांच्यासाठी पुरेशा खर्चाची तजवीज करायला हवी. त्यांना आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करून द्यायला हवी. त्यांचं ज्ञान कायम वाढवत राहणंही तितकंच आवश्यक आहे. कारण गुप्तवार्ता मिळविण्याचे स्त्रोत अनेक असतात, त्यासाठी त्यांचे कान, नाक, डोळे तयार करणं आवश्यक आहे.

धार्मिक कट्टरवादाची विषवल्ली कोणतीही बंधने जुमानत नाही. धर्मांधतेची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी गोबेल नीतीचा ज्या पद्धतीने अवलंब केला जातो, तिची भुरळ तरुणांना पडते आणि ते जिवावर उदार होण्याच्या तयारीला लागतात. या विषवल्लीला फुटीरतेची फळे लगडतात आणि ती शांततेला, बंधुभावाला, सहजीवनाला सुरूंग लावतात. या आव्हानाला चितपट करण्यासाठी दहशतवादी चळवळींच्या ठिकाणांवर आणि माध्यमांवर करडी नजर ठेवण्यास तरणोपाय नाही.

अभेद्य गुप्तचर यंत्रणा उभी करा

आयएस किंवा इतर दहशतवादी संघटनांशी संधान साधणारे तरुण उच्चशिक्षित आहेत आणि इंटरनेटसारखे माध्यम त्यांच्या हाती आहे. पण इंटरनेटवर सहज लक्ष ठेवले जाऊ शकते, कारण प्रत्येक संगणकाला ठराविक पत्ता (आयपी) असतो. फक्त ही हालचाल टिपणारी यंत्रणा अद्ययावत असावयास हवी. ज्या शहरांमधून दहशतवादाविषयी सहानुभूती दाखविली गेल्याचा इतिहास आहे, त्या शहरांवर करडी नजर ठेवावयास हवी. गुन्ह्यांचा तपास ज्याप्रमाणे व्यावसायिक पद्धतीने केला जातो, तसाच छडा लावून दोषींना न्यायालयासमोर हजर करण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणांची आहे. अभेद्य गुप्तचर यंत्रणा उभी केली गेली, तरच या संकटावर मात करता येईल

गुप्तचर यंत्रणांपुढील बदलती आव्हाने

भारतात ‘आयबी’, ‘रॉ’, ‘एनसीटीसी’, ‘एनआयए’, ‘एनटीआरओ’ आदी संस्था एकमेकांना माहिती देत असतात. या गुप्तचर यंत्रणांतील प्रशिक्षित संख्याबळाचा प्रश्नही मोठा आहे. अंतर्गत सुरक्षेचा विचार करता, देशातील विविध राज्यांत, विविध क्षेत्रांत अनेक प्रश्न आहेत. तेथील माहिती मिळविण्यासाठी भाषा, पेहराव, संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा असंख्य गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. नक्षलग्रस्त भागात योग्य ती माहिती हवी असेल तर स्थानिक लोकांचीच गुप्तहेर म्हणून निवड करावी लागते.  दहशतवादाबाबत माहिती हवी असेल, तर त्यासाठी तंत्रज्ञानासह भाषेवरही प्रभुत्वाची गरज आहे. जातीय सलोखा, एकात्मता टिकवण्यासाठी आणि देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचे कार्य महत्त्वाचे आहे. देशाची एकता व अखंडता केवळ लष्करी व आर्थिक शक्तीवरच अवलंबून नसते. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणा बळकट व कार्यक्षम करणे गरजेचे आहे.

तंत्रज्ञानाद्वारा गुप्तहेर माहिती गोळा करण्याकरता

काही वर्षांपूर्वी सरकारला वाटले की आपल्या गुप्तहेर संघटनांची कार्यक्षमता व माहितीची गुणवत्ता वाढवण्यासाठी या संस्थांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे म्हणून अनेक नवीन तंत्रज्ञान गुप्तहेर संघटनांना उपलब्ध करून देण्यात आले. याचाच एक भाग म्हणून तंत्रज्ञानाद्वारा गुप्तहेर माहिती गोळा करण्याकरता एन.टी.आर.ओ  ही संस्था स्थापन करण्यात आली. मोबाइलवरून होणार्या संभाषणाद्वारे दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्याचे काम ही संस्था करत आहे. तसेच सॅटेलाईटच्या मदतीने शत्रू राष्ट्रांच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे व त्यांचे फोटो काढण्याचे कामही  ही संस्था करत आहे. त्याचप्रमाणे युएव्ही म्हणजे “अनआर्म व्हेइकल” ही शत्रूच्या प्रदेशावर उडवून त्याद्वारे माहितीचे संकलन करणे हे कामही ती करत आहे.

आज गुप्तहेर संस्थांकडून सर्वांत जास्त गरज आहे ती आहे अचूक गुप्त माहितीची.

गेल्या वर्षाभरामध्ये १४० वेळा इंटेलिजन्स ब्युरोने असा इशारा दिला होता की देशाच्या आत दहशतवादी हल्ले होणार आहेत. नशिबाने हे हल्ले झाले नाहीत. याचा अर्थ अनेक वेळा इंटेलिजन्स ब्युरो किंवा गुप्तहेर संस्था लांडगा येणार, लांडगा येणार अशा प्रकारची माहिती देत असतात आणि एखाद्या वेळी लांडगा खरोखरच येईल आणि त्यावेळी मात्र आपल्याकडे अचूक माहिती नसेल. आपल्याला जनरल माहितीची नव्हे तर अचूक माहितीची गरज आहे.

अशा प्रकारची अॅक्शनेबल गुप्तहेर माहिती मिळवणे हे सोपे नसते. आशा करून की आपल्या गुप्तहेर संस्थांचा येणार्या काळात दर्जा वाढेल आणि देशावर होणारे अनेक दहशतवादी हल्ले रोखण्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल.

आय.एस.आय.विरोधात सुसंगत आणि निर्धारित व्यूहनीती

भारतीय नेतृत्व कार्यवाहीपेक्षा भाषणबाजीचाच आधार जास्त घेते. अतिरेक्यांना शिंगावर घेण्याऐवजी तीव्र वक्तव्यांना त्याचा पर्याय मानते. आय.एस.आय. नावाचा राक्षस नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो . राजकीय इच्छाशक्ती असल्यास आणि मतपेटीचे राजकारण दूर ठेवल्यास त्याला ताळ्यावर आणणे शक्य आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..