नवीन लेखन...

अन्नातील जादू!!

सागर आणि साधनाचं क्षुल्लक विषयावरुन सकाळी भांडण झालं होतं. जास्त ताणायला नको म्हणून साधना मनातल्या मनात चरफडत सागरच्या डब्यासाठी स्वयंपाकाला लागली. चित्त थाऱ्यावर नसताना तिने स्वयंपाक उरकून, एकदाचा त्याचा डबा भरुन दिला…

नाराजीनेच तो डबा घेऊन सागर ऑफिसला गेला. दुपारी लंच टाईममध्ये त्याने डबा उघडला. त्याला सकाळचं भांडण आठवलं.. त्याने खायचा म्हणून डबा खायला. त्या जेवणात त्याला स्वारस्य, वाटलंच नाही..

याला कारण होतं, साधनाची स्वयंपाक करतानाची मनस्थिती! जर मानसिक शांततेत, आपुलकीने स्वयंपाक केला तर त्या जेवणात सकारात्मक लहरी समाविष्ट होतात..

जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला तर तो सात्त्विक स्वयंपाक होऊच शकत नाही. म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास असताना किंवा नाराज होऊन स्वयंपाक करु नये. तसेच तो करीत असताना त्या आईला, बहिणीला किंवा पत्नीला अपशब्द बोलू नये, भांडू नये. अन्यथा तेच विचार त्या अन्नात समाविष्ट होतात आणि ते जेवण पोषक रहात नाही.

जेवणाचे साधारणपणे तीन प्रकार आहेत. पहिलं.. घरचं सात्त्विक जेवण, दुसरं..हाॅटेलमधील विकतचं जेवण व तिसरं मंदिरात मिळणारं, महाप्रसादस्वरुप जेवण!

पहिला प्रकार आपण रोजच अनुभवतो. आई किंवा पत्नी, आपलेपणानं स्वयंपाक करुन जेवायला वाढते.. जेवताना आणखी एखादी पोळी मागितली तर ती खुष होऊन, आनंदाने वाढते. या जेवणाचा शरीरावर व मनावर सकारात्मक परिणाम होतो. भूकेची तृप्ती होऊन, मन प्रसन्न होते.

याउलट अलीकडच्या पद्धतीप्रमाणे पोळ्या करण्यासाठी बाई ठेवली असेल, तर तिची मानसिक स्थिती काय आहे हे खाणाराला माहीत नसल्याने, त्या बाईने केलेल्या पोळ्या खाऊन समाधान मिळेलच याची खात्री नसते. तिचं पोळ्या करणं, हा व्यवहाराचा एक भाग असतो, तिथं आपलेपणा नसतो.. ते खाणं म्हणजे फक्त पोट भरणं, एवढीच एक क्रिया होते..

दुसऱ्या प्रकारातील हाॅटेलच्या खाण्यामध्ये, आपण जे खातो आहोत ते कुणी केलं आहे किंवा कोणत्या मनस्थितीत केले आहे, याची कल्पना नसते. त्या खाण्यात व्यवहार असतो, आपुलकी अथवा प्रेम नावालाही नसते. हे अन्न पचायला अनेकदा त्रासही होऊ शकतो..

मंदिराच्या महाप्रसादाचे जेवणामध्ये सात्त्विकता तर असतेच शिवाय आपण त्या परमेश्वराचे स्मरण करुन, त्याने दिलेला प्रसाद म्हणूनच ते अन्न खातो. ते तयार करणाऱ्याने देखील पदार्थ करताना तो भक्तीभावाने केलेला असतो. त्यावेळी तो आचारी घरातील गोष्टी विसरुन, तन्मयतेने स्वयंपाक करतो. साहजिकच तो प्रसाद खाताना भक्ताच्या मनामध्ये देवाविषयी उत्कट आदरभाव असतो. परिणामी ते जेवण, भक्ताच्या अंगी लागते..

अलीकडच्या काळात सात्त्विक जेवण मिळणे हे कठिण होऊन बसले आहे. सध्याचा माणूस या धावपळीच्या जीवनात मनाने स्थिर राहून जेवण करणं विसरलेला आहे. त्याचं घरच्या पोळीभाजी पेक्षा बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्याचं आकर्षण वाढलेलं आहे.

बाहेरच्या खाण्यामध्ये अन्नाला आकर्षक रंग येण्यासाठी हलक्या दर्जाचे रंग वापरले जातात. तो पदार्थ कोणत्यातरी पुन्हा पुन्हा वापरलेल्या, स्वस्त तेलात तळलेला असतो. पदार्थ टिकण्यासाठी घातक रसायनं सर्रास वापरली जातात. शिळे पदार्थही गरम करुन दिले जाऊ शकतात. अशा खाण्याने लठ्ठपणा वाढतो व आरोग्य बिघडते. हे खाणं म्हणजे ‘विकतचं दुखणं’च असतं…

म्हणून आपल्या पूर्वजांनी, सोवळ्यानं स्वयंपाक करण्याचे नियम घालून दिले होते. ते खाणं अंगी लागायचं.. आत्ता आपण सोवळ्यानं जरी स्वयंपाक करीत नसलो तरी, देवाच्या नामस्मरणाने करु शकतो. तो करणं चालू असताना भक्तीसंगीत ऐकत राहिलं तरीही चालू शकतं.

सध्या मोबाईलशिवाय कुणालाही करमत नाही. स्वयंपाक करताना त्याचा संपर्क असू नये. जेवतानाही मोबाईल हाताळणे टाळावे. जेवताना टीव्ही लावू नये. त्याने मन एकाग्र रहात नाही.

माझ्या एका मित्राचे घरी दिवसभर बाहेर असणारे सर्वजण, रात्री जेवायला एकत्र बसतात व टीव्हीवरचे कार्यक्रम पहात पहात जेवतात. हे चुकीचं आहे. आपापसात बोलत, जेवण करणं अलीकडे माणूस विसरुन गेलेला आहे.. मांडी घालून जेवायला बसणं शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचं असूनही, डायनिंग टेबलावरच जेवण केलं जातं..

या अनावश्यक गोष्टी टाळून स्वयंपाक करा व समाधानाने जेवा.. मग बघा ‘अन्नातील जादू’, कशी आहे ती!!

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२-९-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..