नवीन लेखन...

आली दिवाळी – धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी. पारंपारीक दिवाळीचा दुसरा दिवस. धनाची पूजा करण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला कापणीचा हंगाम ओसरत आलेला असतो. शेतकऱ्याच्या खळ्यात धान्याच्या राशी लागलेल्या असतात. शेतकयांच्या नजरेतून खळ्यातल्या धान्याच्या राशी हेच त्यांचे धन..! ‘धान्य’ या शब्दातूनच ‘धन’ शब्दाचा जन्म झाला असावा, उगाच नाही ‘धन-धान्य’ हा जोडशब्द तयार झाला. आणि आज पैसा जे विनिमयाचं काम करतो, तेच काम पूर्वी ‘धान्य’ करायचं. म्हणजे बार्टर एक्स्चेंजच्या काळात धान्य हे महत्वाचं धन असायचं.

सात-आठ महिने शेतात राबल्यानंतर, मातीच्या उदरातून जन्मलेलं ’धान्य’रुपी ‘धन’ घरात आलेलं असतं. या धान्याची पूजा करण्याचा दिवस, तो धनत्रयोदशी. शहरात पैसा व सोनं-नाणं म्हणजेच लक्ष्मी असं मानण्याची प्रथा खुप नंतरची, शहरीकरणानंतरची. आपल्या मुळ कृषीसंस्कृतीत हा दिवस धान्यपूजनाचा. शेतकरी ह्या दिवशी धान्याची पुजा करतो, तर शहरात आपण ह्या दिवशी दिवशी चौरंगावर लक्ष्मीची मूर्ती, घरातील सोनं-नाणं ह्यांची पूजा करतो. शहरात धान्यापेक्षा धनाला महत्व आल्याचा हा परिणाम..!

‘धनत्रयोदशी’ साजरी करण्याची प्रथा धन्वंतरीच्या स्मृतीप्रत्यर्थ्य सुरू झाली असंही म्हणतात. म्हणून या दिवशी नैवेद्याला ठेवल्या जाणाऱ्या आरोग्यवर्धक धने-गुळाच्या प्रसादालाही मोठं महत्त्व आहे. ‘लक्ष्मी’चा जन्म जसा समुद्रमंथनातून झाला, तसाच आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी याचा जन्मही समुद्रमंथनातून याच दिवशी झाल्याची पुराण कथा आहे. म्हणून वैद्यजन या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करतात. शेतात कष्ट करून सोनं पिकवण्यासाठी प्रकृती चांगली राहून ‘आरोग्यासह धन-संपत्ती’ प्राप्त व्हावी यासाठीही या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असावी. शेवटी चांगले आरोग्य हेच खरे धन असंही सांगून ठेवलंच आहे ना कुणी महानुभवाने..! अर्थात, पुराणकथा काहीही सांगत असल्या तरी, माझ्या मते हा दिवस कृषीसंस्कृतीतील ‘धान्य’पुजेचा..

मुंबईसारख्या शहरात गुजराती-मारवाड्यांच्या सहवासाने आपले मराठी लोकही या दिवसाला हल्ली ‘धनत्रयोदशी’ऐवजी चक्क ‘धनतेरस’ असं म्हणू लागलेत. गुजराती-मारवाड्यांचा धनाशी घट्ट संबंध असल्याने, हा दिवस खरा तर त्यांचाच. ते करतात म्हणून त्यांच्या संपर्काने आपणही करतो येवढच..! दोन वेगळ्या प्रांतांतील संस्कृतीची देवाण घेवाण अशीच होत असते. बाकी आपल्या मराठी लोकांचा ‘चित्त्ती समाधान, विष वाटे सोनं-धन..।’ या संत शिकवणूकीवर गाढ विश्वास असल्याने, आपण मराठीजन उगाच धनाबिनाच्या मागे जात नाही आणि आपल्याकडे भरपूर धन वैगेरे नसल्याचाही फालतू न्युनगंड आपल्या मनात नसतो. म्हणून तर धनत्रयोदशीचं महत्व आपल्याला माहित असलं, तरी हा दिवस, सण म्हणून साजरा करण्याचं प्रमाण आपल्या इथं कमी आहे.

आपला महाराष्ट्र देश हा लढवय्यांचा. आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रूला ‘चिरडण्या’तच आपला आनंद आणि आपली इतिकर्तव्यता आणि म्हणून उद्याचा, म्हणजे नरकचतुर्दशीचा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक घरात कारीटरुपी ‘नरकासुरा’ला पायाच्या अंगठ्याने चिरडून साजरा केला जातो. आपल्या मराठी माणसांची खरी दिवाळी तिथूनच सुरू होते, नरकासुराचा वध करुन, त्याचं रक्त प्राशन करुन केलेल्या ‘पहिल्या आंघोळीने’..!!

आजच्या दिवसाचा संबंध ‘धना’शी असल्याने, तुम्हा सर्वांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा ‘लक्ष लक्ष’ शुभेच्छा देणं जास्त योग्य होईल. ‘कोटी कोटी’ म्हणालो असतो, पण महाराष्ट्र ही लढवय्यांप्रमाणे संतांचीही भुमी असल्याने, त्यावर आपल्याला लगेच ‘रुपे तुझी’ किंवा ‘अनंतकोटी ब्रम्हांडनायक’ वैगेरे आठवून आपली ब्रम्हानंदी टाळी लागली, तर मग धनाच्या मागे जाणं लक्षात राहाणार नाही म्हणून ‘लक्ष लक्ष’ शुभेच्छा..!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..