नवीन लेखन...

प्रमुख आहार सूत्र – भाग ९

दुधाचा विषय सुरू असल्याने त्यानंतरचा बनणारा पदार्थ म्हणजे दही. प्रमेह होऊ नये म्हणून जो श्लोक आधी वर्णन केला आहे, त्यातील पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द, दधिनी.

खरंतर दुधानंतर दही बनते, पण शास्त्रकारांनी त्याच्यासाठी मानाचे स्थान निर्माण करून श्लोकात दुधाच्याही आधी बसवले. एवढे विशेष लक्ष देण्यासारखा हा आंबट पदार्थ साखरेच्या आजाराचे कारण असू शकतो ? वरवर पहाता, हे पटत नाही, फक्त गोड खाल्ले तरच डायबेटीस होतो, असे काहीतरी चुकीचे मत आपले झाले आहे. पाश्चात्य तज्ञ देखील मानतात, की हा मनोशारिरीक आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे.

दृष्टीकोन बदलला की लक्ष्य बदलून जाते, तसं झालंय. शास्त्रकारांनी प्रमेह हा व्याधी कशामुळे होतो, याची जी कारणे सांगितली आहेत, ती का सांगितली असतील यावर चिंतन मनन करावे, म्हणूनच तर हे लेखन करीत आहे. लक्षात असे येतेय, प्रमेहाचे मूळ कारण जे शास्त्रकार सांगताहेत ते आहे, क्लेद ! म्हणजे चिकटपणा. न पचलेल्या अन्नातून किंवा अवयवामधे चिकटून, साठून राहिलेला एक घटक.

थोडं विषयांतर होईल पण हे नीट समजायलाच हवं म्हणून सांगतो……

रोग कसा होतो, याची एक सुरेख गुंफण शास्त्रकार वर्णन करतात, त्याला संप्राप्ती असा शब्द योजला जातो.

हे ‘अ’ असं केलं, म्हणून ‘आ’ असं. झालं, म्हणून ‘इ’ च ‘ई’ असं झालं, त्यामुळे ‘उ’ हा बदल घडला, त्याचा परिणाम म्हणून ‘ऊ’ झालं.
याला म्हणतात, संप्राप्ती !

मला गरज नव्हती, तरी मी तिच्याबरोबर बाजारात गेलो. ती खरेदी करत असताना एकावेळपर्यंत मी तटस्थ होतो, एका मोहाच्या क्षणी हातगाडीवरील द्राक्षांकडे लक्ष गेलं, सहज एक द्राक्ष तोंडात टाकले, चव आवडली, गरज नसताना त्या गाडीवाल्याने आणखी दोन द्राक्षं माझ्या हातात ठेवली, मी परत ती खाल्ली, दर विचारला, परवडला, खरेदी झाली, घरात आणली, आणि सर्वांनी खाल्ली. दुसऱ्या दिवशी व्हायचे ते झालेच. सर्दी. सर्दी होण्यामागची ही जी साखळी तयार होते, त्याचा विचार करायचा, म्हणजे परत सर्दी होऊ नये याचा उपाय समजतो. यासाठी ही साखळी अभ्यासायची.
मी जर तिच्याबरोबर बाजारात गेलोच नसतो तर….
माझे काम फक्त पिशव्या उचलणे एवढेच होते, हे माहिती असूनदेखील तिथे लक्ष न देता, रिकाम्या वेळात, बाजुच्या हातगाडीवरील द्राक्षे माझ्या डोळे या ज्ञान इंद्रियाला दिसली, ती संवेदना, वर (मना ) पर्यंत पोचली. वरून परत आदेश आला. आणि हात या कर्म इंद्रियाकडून ते एक द्राक्ष तोंडात टाकले गेले. रसनेने त्याचा बोध केला. त्यातच त्या द्राक्षवाल्याने आणखी चुचकारले, आणखी दोन द्राक्षं खाल्ली. त्याला खूप आनंद झाला. आणखी खावीशी वाटली. पण त्या द्राक्षावरील फवारलेली रसायने, आतील आंबटपणा, होणारा परिणाम सगळं मोहामुळे नष्ट झालं. आधी झालेली सर्दी विसरली गेली, आणि ‘ती’ सोबत असूनही तिला न विचारता, आपल्या खिशातील सुटे पैसे काढून, द्राक्षांची पुडी घरी आणली गेली……
आणि व्हायचे तेच झाले….सर्दी….. !!!

सर्दी होण्यामागे मुख्य कारण द्राक्षे होती. पण त्यामागील अनेक कारणे दृष्टीआड होतात. ही एक साखळी बाहेरून दिसणारी झाली. दुसरी एक साखळी आतमधे सुरू होते. द्राक्षे पोटात गेल्यावर त्यातील चांगला आणि वाईट भाग वेगळा केला गेला. रस आणि चोथा. त्यातील विषारी पदार्थ यकृताने ( लिव्हरने ) वेगळे करण्याचा प्रयत्न केला. जेवढे विष बाहेर टाकता येईल तेवढे वृक्काने ( किडनीने) टाकले, जे शिल्लक राहिले ते पचवण्यासाठी इतर अवयवांची मदत घेतली गेली, त्यांच्याकडून आणखी काही स्राव मागवले गेले, पचन पूर्ण करून, त्यातून जेवढे चांगले बनवण्याचे प्रयत्न होते, ते सर्व केले गेले. पण हाय रे दैवा, चांगल्यापेक्षा वाईट भाग जास्ती तयार झाल्यामुळे परिणाम बदलला. नको असलेले, जास्त झालेले रस, मिळेल त्या जवळच्या मार्गाने शरीरातून बाहेर काढण्याचे काम आता आतमधे सुरू झाले. वयानुसार ही प्रक्रिया बदलते. लहान मुलांमध्ये, या द्राक्षांना आल्या पावली परत माघारी पाठवले जाते, म्हणजे सरळ उलटी होते.
तर काही जणांच्या नासामार्गाचा वापर केला जातो, आपण त्याला सर्दी म्हणतो, तर काही जणांना जुलाबही होतात. कोणाला काय होणार हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार ठरते. आणि मन निर्णय घेते. आणि भोग भोगावे लागतात. आपण त्याला रोग असे म्हणतो.

ही एवढी मोठी साखळी लक्षात घेतली की सर्दी होऊ नये यासाठी काय काय करायला हवे होते हे लक्षात येते.या दोन साखळ्यांपैकी पहिल्या बाहेरील साखळीवर आपले नियंत्रण ठेवले असते, तर दुसरी साखळी सुरूच झाली नसती.
या साखळ्या समजून घेणे म्हणजेच ‘संप्राप्ती !’

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..