नवीन लेखन...

आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती

सोफिया कुरेशी
व्योमिका सिंग
प्रेरणा देवस्थळी

ही तीन नावे आठवतात ?
नाही ?
मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ?

अजूनही आठवत नसेल तर , काल संपन्न झालेल्या पंधरा ऑगस्टच्या कौन बनेगा करोडपती हा विशेष भाग बघा .
नक्की आठवतील ही नावे .
अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वासह .

मी पाहिला तो खास विशेष भाग .

अमिताभ बच्चन यांचे धीरगंभीर आवाजातील निवेदन .
त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्क्रीन व्यापून टाकणाऱ्या , सैन्यदलांच्या कर्तृत्वाच्या व्हिडिओतील काही प्रसंग .
आणि नमवी पहा या भूमी चालताना या उक्तीची प्रचिती देणाऱ्या सोफिया , व्योमिका आणि प्रेरणा या आदिशक्तीच्या तीन रूपांचे कौन बनेगा करोडपतीच्या रंगमंचावर आगमन .
त्याचवेळी प्रेक्षागृहात बसलेल्या आबालवृद्धांच्या आणि तरुणाईच्या , वंदे मातरम् , भारतमाता की जय च्या गगनभेदी घोषणा …

पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची उत्कंठा वाढवणारा , अंगावर रोमांच उभे करणारा तो प्रसंग .
आणि प्रत्येक क्षण जिवंत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या निवेदनातून साकार होत असलेले अनोखे विश्व .

डोळ्यांचे पारणे फेडणारा ,
देशभक्तीची भावना जागृत करणारा ,
गोपनीयतेची मर्यादा आणि भान ठेवून अनोखे भावविश्व , कर्तृत्व उलगडून सांगणारा कार्यक्रम मी पाहिला .
आणि वाटलं हे तुमच्या पर्यंत पोहोचवायला हवं .

अशा कार्यक्रमात पाहुण्यांना बोलकं करण्यासाठी किंवा तणाव , अस्वस्थता कमी करण्यासाठी अमिताभ खूप वेगवेगळे प्रयोग करतात . हे आपण पाहिलं असेल .
पण या कार्यक्रमाची जातकुळीच मुळी वेगळी होती .
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य होतं.
समोर विलक्षण कर्तृत्ववान आणि राष्ट्र सर्वप्रथम मानणाऱ्या धीरोदात्त आदिशक्ती होत्या .
त्यांच्या पराक्रमाने धन्य झालेले त्या आदिशक्तींचे कुटुंबीय होते .
आणि त्या सर्वांपासून प्रेरणा घेणारी तरुणाई आजूबाजूला बसली होती .
त्यामुळे अमिताभ बच्चन यांची कसोटी होती .

कसोटी होतीच .
कारण स्वतःबद्दल बोलताना अत्यंत कमी शब्द वापरणाऱ्या आदिशक्तीना बोलकं करणं सोपं नव्हतं .

पण ते शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं .

प्रत्येकीच्या घरात सैन्यदलाची परंपरा तरी होती किंवा तशी स्वप्ने होती , किंवा जोडीदार सुद्धा सैन्य दलातील होता .
सोफिया यांची पणजी तर राणी लक्ष्मीबाई यांची सावली बनून त्यांच्या बरोबरीने स्वातंत्र्यसंग्रामात लढली होती .

आपण निवडलेल्या सैन्य दलात आपण कोणत्या पदावर आहोत , काय कर्तृत्व गाजवले हे सांगताना नम्रपणाची दुर्मिळ भावना सारखी जाणवत होती .
चेहऱ्यावरचा करारीपणा , ठाम आश्वासक देहबोली ,भावनाविवश करणारे प्रसंग सांगताना मनातले भाव चेहऱ्यावर न आणण्याची कर्तव्यकठोरता …
सगळं सगळं जाणवत होतं.

अधूनमधून अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समर्पक योग्य उत्तरे दिल्यानंतर मिळालेल्या रकमेबद्दल संयमित आनंद व्यक्त करताना त्या जाणवत होत्या .
बक्षिसाची मिळणारी रक्कम त्या तिघी आपापल्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वापरणार होत्या .

जिवावर बेतलेले प्रसंग , लढाईसाठी सदैव सज्ज राहण्याची सवय हे ऐकताना भारावल्यासारखे झाले होते .

राष्ट्र सर्वप्रथम .
नागरिकांनी पाळावयाचे नियम , शिस्त .
मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन .

हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतेच पण त्यापेक्षा मला जास्त भावलेला भाग म्हणजे त्या तिघी चांगल्या वाचक आहेत . आणि वाचलेले पुस्तक हे आचरणासाठी विचार देणारे असावे आणि तशी वर्तणूक आपल्याकडून घडली पाहिजे , याचे त्यांनी आग्रहाने केलेले प्रतिपादन .

अशा अनेक गोष्टीतून त्या तिघींचे व्यक्तिमत्व उलगडले .
अर्थात सगळे शब्दबद्ध करता येणे अशक्य आहे .

तुम्ही तो खास एपिसोड बघाच .
मी त्या तिघींना आदिशक्ती असे का म्हटले हे लक्षात येईल .

सर्व तरुणाईला बोध घेण्यासारखे त्यांचे आयुष्य आहे .
विशेषतः तरुण मुलीसुद्धा राष्ट्र संरक्षण करण्यात मागे नाहीत हा संदेश या भागातून मिळतो .

आजच्या व्यसनाधीन होणाऱ्या , बहकत जाणाऱ्या , केवळ एन्जॉयमेंट म्हणजे आयुष्य असे समजणाऱ्या , कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांच्या दावणीला आपले आयुष्य बांधून बरबाद होणाऱ्या नव्या पिढीने हा एपिसोड पहायलाच हवा .

प्रत्येक घरातील मातृपितृशक्तीने आपल्या घरातील सर्वांना आदिशक्तीची ही नवी रूपे , नवे विचार , नवे अवकाश दाखवायला हवे ,
यासाठी हा लेखनप्रपंच !

त्या आदिशक्तीसह सैन्यदलातील सर्वांना प्रणाम !
————
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..