नवीन लेखन...

गोष्ट वाईट मुलाची आणि गोष्टीतला वाईट मुलगा

तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार  ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते .  ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! )

पण आमच्या शामच्या बाबतीत हि असली आशा फोलच होती . त्याची आई धडधाकट अन टुणटुणीत होती . ‘माझ्या माघारी —-‘असला काही प्रकार अजिबात नव्हता . उलट “मूडद्या ,लै ऊंडेगिरी केलीस तर ,तुझ्या बापा सारखा तुला पन गांडीवर लात मारून घरा भाईर हाकलून दिन !”असली धमकी द्यायची ! ( धमकी नाय , ती खरी करण्याची जिगर तीन त्याच्या पेताड बापाला घराबाहेर काढून सिद्धच केली होती !)

शाम वाईट मुलाच्या रिवाजा प्रमाणे भगवान दादाच्या आमराईत घुसला . बिनधास्त पणे झाडावरचे आंबे चोरले . त्या गोष्टीतला रामा पण असाच आमराईत घुसतो . त्याची सद्सदविवेक बुद्धी ‘चोरी करू नये , देव पहातोय ,तो तुला शिक्षा करेल ! ‘ असे बजावत असते . तरी तो झाडावर चढतो .  तो झाडावर चढला कि देव शिक्षा म्हणून तो ज्या फांदीवर उभा असतो ती फांदी मोडतो . रामा भदेलकन खाली पडतो . त्याचा पाय मुरगळतो . मग त्याला पश्चाताप होतो . ‘ देवा मी चुकलो . पुन्हा मी कधी-कधी चोरी करणार नाही . मला माफ कर . ‘ अशी मनापासून प्रार्थना करतो . त्याचे मन हलके होते व तो आनंदी होतो . किंवा मग त्या माळ्याचा कमरेएव्हडा दांडगा (हो लांडग्या सारखा पण )कुत्रा मागे लागतो . रामाला पळता भुई थोडी होते .

पण शामूच्या बाबतीत असले काहीच घडले नाही . तो झाडावर माकडासारखा चढला . भरपूर आंबे खाल्ले , त्यापेक्षा ज्यास्त नासले . पिशवी भरून घेतली . तो झाडाचया ज्या फांदीवर चढला , त्या फांदीने त्याला दणकट आधार दिला . ती मोडली नाही . उलट शामूनेच चार सहा फांद्या लटकू -लटकू मोडून टाकल्या . हा नाही म्हणायला ते माळ्याच दांडगं कुत्र मात्र भों -भों करत आलं होत . पण शामूने जवळची एक गाठाळ विटकर त्याच्या पेकाटात फेकून मारली . ते लांडग्या सारखं थोरलं कुत्र शेपूट पायात घालून पळून गेलं . शामूच त्याच्या मागे लागला , कुत्र्याला पळता भुई थोडी झाली !

दिवसभर उनाडक्या करणे हा शामूचे डेली रुटीन . गोष्टीतला रामापण हेच करतो ना . पण त्याचे गुरुजी (जे पांढऱ्या धोट केसाचे अन मायाळू असतात . शाळेतलेच नाही तर जगातले आदर्श शिक्षक ! ) त्याला एकदा नीट समजावून सांगतात .

‘अरे ,बाळा , असे उनाडक्या करत ,शाळा बुडवून हिंडत जाऊ नकोस ! नियमित शाळेत यावे . विद्या हीच खरी आणि अक्षय ‘संपत्ती ‘ आहे . जी दिल्याने कधी कमी होत नाही . आणि हो तू कोणालाही शिव्या देतोस . ते योग्य नाही . तसे करू नये . वडीलधाऱ्यास आदराने बोलावे ,त्यांना मानद्यावा . सहकारी आणि मित्रांशी प्रेमाने वागावे . माणसाने विनम्र असावे . तू खूप शहाणा आणि चांगला मुलगा हो ! ऐकणार ना माझे ?’ इतक्या प्रेमळ (आणि लांबलचक )उपदेशाने रामा गहिवरून येणे साहजिक असते . आपण वागतोय ते चुकीचे आहे . आपण इतरांना जो त्रास देतो तो देव पहात असतो . मग तो आपल्याला शिक्षा करतो . पोलीस धरून नेतात . जेल पण होऊ शकते ! बाप रे किती भयानक ! हे सगळे त्याच्या मनाला पटते . तो पटकन त्या गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवतो . रामाच्या अश्रुने गुरुजींचे पाय ओले होतात . ते त्याला पोटाशी धरून (पायाला नाही हो ,रामाला ) मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवतात .

‘ गुरुजी , आजपासून ,नव्हे आत्ता पासून मी एका चांगल्या मुला प्रमाणे वागेन . सर्वाना मदत करीन . सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागेन ! आजवर जे मी वाईट वागलोय त्याचा मला पश्याताप होतोय ! मला देव माफ करेल का ?’

‘ का नाही ? पश्यातापाने सर्व पापांचे परिमार्जन होते ! तू निर्धाराने चांगला वागलास तर ,देव नक्कीच तुला क्षमा करतील ! शुभमभवतु !’

पण आमच्या शामूची ‘बातच कुछ और !’ या डांबिस श्याम्याला लाईनीत आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पतळ्या शेणावर दगड मारून शिंतोडे उडवून घेण्यासारखेच होते . हा गुरुजनांचा ग्रह शामूने आपल्या चुणूकदार कारनाम्याने खडकासारखा मजबूत केलाय . त्याचा मासला .
“शामू अरे ,अश्या घाणेरड्या .अश्लील शिव्या का देतोस ? देवू नये . ते वाईट असते ! ”
“मग तुम्ही का देता ?”
“मी ?केव्हा ?आणि कोणाला ?”
“तुम्ही आणि शिंदे मास्तर त्या दारूच्या दुकानातून पिऊन आला होतात . सॉलिड मारामारी केलीत सर तुम्ही ! पण शिंदे मास्तरनं चांगलाच धुतला तुम्हाला ! पण तुमच्या शिव्या भन्नाट होत्या ! ”
” आ —अन तू —”
“मी अन तुमचा किसना समुरल्या टपरीतून बिड्या घेत होतो . आमचं नेमीचंच हाय . वडा माग जाऊन दोघंजण मिळून धूर काढताव ! ”
मास्तराने विषय बदलला .
“अरे ,अशी रोज रोज शाळा बुडवू नये . शिकून मोठं व्हावं . मोठा डॉक्टर ,इंजिनियर नाहीतर कलेक्टर व्हावं .चांगला माणूस व्हावं . खूप पैसा  कमवावा !”
“हॅट , मोठं होण्याचा अन शाळा शिकण्याच काय पण कनेक्शन नाय .! आमचा बा शाळेत कुठं गेला . पर तो मोठा मोठा होतोय ! आज पचास सालाचा झालाय ! मन परीक्षा द्यावी, कलेक्टर व्हावं . पैसा कमवावा ! तेंडुलकर कुठं शिकलाय ? पण त्याचा पाशी कलेक्टर पेक्षा भारी गाड्या हैत अन दांडगा पैसा हाय ! ”
मास्तरला कोड्यात टाकून शामू नदीवर पोहायला पळाला .

नदीवर पोहताना तो गोष्टीतल्या रामा सारखा बुडाला नाही कि ‘वाचवा ! वाचवा !!’ म्हणून बोंबला नाही . उलट सोबत आलेल्या शिवाला मागून ढुशी देऊन नदीत ढकलून दिले . ‘ अरे ,असे बेसावध माणसाला नदीत ढकलणे वाईट काम आहे !’ असे त्याची सद्सदविवेक बुद्धी विव्हळी नव्हती .  शिवा  डुबुक डुबुक आवाज करत बुडू लागला . त्याला पोहता कुठं येतंय ? चल शिकवतो म्हणालो होतो . ‘नग , शाळा बुडती ‘म्हणाला . आता कुठं येती ‘शाळा ‘ वाचवायला ? लोक शिवाला वाचवायला धावले आणि शामू घराकडे धावला ! आज वर देवाने शमूला कधीच शिक्षा केली नाही !

शामूचे वय वाढत गेले . लहानपणची उंडेगिरी तारुण्यात वासूगिरीत आणि दादागिरीत बदललीय ! छोटे -मोठे पंगे रोजचेच झालेत . आईकडे तक्रारी करणारे आता पोलिसात जावू लागलेत ! धमक्या सरशी लोक पैशाच्या राशी त्याच्या पायाशी ओतायत ! भल्या भल्यानी त्याची कर्तबगारी पाहून तोंडात बोट घातली आहेत !

गोष्टीतला पश्चतापदग्ध रामा सुधारलंय !बी. ए ., एम . ए . , पीएचडी झालाय ! मोठ्या कॉलेजात छोटासा प्रोफेसर आहे !

आणि शेवटी व्हायचे तेच झालं ! आज शाम्या काय आणि कसा आहे ?

तो आज  एक सन्माननीय नागरिक आहे ! हत्ती सारख्या गाड्याचा ताफा तो बाळगतो ! राजवाड्याला लाजवील असे बंगले आहेत ! कायद्याचे एक पुस्तक हि न वाचता तो ‘तंटे ‘ मिटवतोय ! कमिशन घेतोय ! त्याच्या शब्दाला समाजात मान आणि वजन आहे ,आणि तो झेलण्यासाठी सर्व स्थरातील लोक हि आहेत ! ज्याचे पोस्टर पोलीस स्टेशनच्या ‘वॉन्टेड ‘ बोर्डावर असायला हवेत , त्याचे भव्य कटआउट्स चौका -चौकात दिमाखात झळकताहेत ! तो आता लोकांचा लाडका ‘नेता ‘ झालाय ! भूगोलाच्या पुस्तकात त्याला भलेही लंडन ,स्विझर्लंड सापडणार नाहीत , पण तो तेथे हवे तेव्हडे दिवस वास्तव्य तेही स्वतःच्या मालकीच्या भव्य बंगल्यात करतोय !

गोष्टीतला रामा, पश्यातापदग्ध , सन्मार्गाला लागलेला , आपल्या तुटपुंजा सरकारी पगारावर ,आईचे आजारपण आणि बायकोचे लाड करतोय ! कर्जावर कर्ज काढून ‘इज्जत कि जिंदगी ‘ जगतोय  आणि ‘ मेहनत की रोटी ‘ खातोय !
“तुम्हारे पास  क्या है ?”
या प्रश्नाला
” मेरे पास , सच्चाई , मेहनत , इज्जत और मा है !” आजही  हेच उत्तर देतोय . एकांतात त्याला या उत्तरातील पोकळपणा हल्ली  प्रखरतेने जाणवतोय !

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

(मूळ कल्पना त्या दृष्या लेखकाची आहे , ज्याचा मृत्यू माझ्या जन्म आधीच झालाय . माझा आवडता लेखक मार्क ट्वेन !)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..