नवीन लेखन...

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि पाकिस्तान पंतप्रधानाची अजमेरच्या दर्ग्याला भेट

 

हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला.या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहे. दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. या हल्ल्यात अन्य सात जण जखमी आहे.बेमिना भागातील पोलीस पब्लिक स्कूलजवळ असलेल्या ‘सीआरपीएफ’तळावर हा हल्ला झाला आहे. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हे अतिरेकी शाळेच्या इमारतीत शिरले. तेथून अतिरेक्यांनी ‘सीआरपीएफ’ जवानांवर गेळीबार करण्यास सुरूवात केली. हा हल्ला झाला तेव्हा शाळा बंद होती. काही मुले शाळेच्या मैदानात खेळत होती. २०१२ मध्ये काश्मिरमध्ये १६ सामन्य नागरिक, ८४ आतंकवादि आणी १७ सैनिक मारले गेले आहेत. दहशतवाद्यांनी संसदेवरील हल्ल्यातील सूत्रधार अफजल गुरू याचा मृतदेह परत देण्याची घोषणा करत जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ३ नागरिकही जखमी झाले आहे.

या वेळेला अब्दुल्ला रडले नाही
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे विधानसभेत काही दिवसापुर्वी ओक्साबोक्शी रडले. त्यांच्या रडण्याचे कारण काय? कश्मीरच्या बारामुल्लात हिंसक निदर्शने झाली. सुरक्षा दलाने हिंसा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला. त्या युवकाच्या मृत्यूने विधानसभेतच ओमर अब्दुल्लांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ओमर म्हणाले, ‘‘हे सर्व माझे लोक आहेत. आता मी त्यांना काय उत्तर देऊ? कश्मीरातून लष्कर हटवायला हवे ही माझी मागणी आहे, पण माझे कुणी ऐकत नाही.’’ अब्दुल्ला पुढे म्हणतात, ‘‘माझे काळीज फाटलेय. बारामुल्लात मोर्चा निघाला होता. दगडफेक सुरू होती, पण त्यात कोणी आतंकवादी नव्हता. मग लष्कराने गोळीबार का केला? जमाव हिंसक झाला, दगडफेक सुरू झाली तरीही गोळीबार का केला? असे ते विचारतात, हे सर्व माझे लोक आहेत, असे ते म्हणतात. मग याच कश्मीर खोर्‍यात असंख्य हिंदूंच्या सामुदायिक कत्तली झाल्या. कश्मिरी पंडितांना घरेदारे टाकून पळून जावे लागले. हे सर्व लोक अब्दुल्लांचे कोणीच नव्हते काय? पाच सीआरपीएफ जवान शहीद झाले यावेळेला मात्र अब्दुल्लाना रडु आले नाही.

पाक पीएमचे शांततेसाठी साकडे ???
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे चटके भारत सोसत असतानाच, पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ शनिवारी अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर जाऊन पाकिस्तानात शांतता नांदावी, यासाठी प्रार्थना करून गेले. हा अश्रफ यांचा खासगी दौरा होता. अश्रफ यांच्यासोबत २० कुटुंबीयांसह ४० जणांचे प्रतिनिधीमंडळ होते. पत्रकारांशी बोलताना परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले, ‘ हा दौरा अश्रफ यांची यात्रा होती. दहशतवादाविषयी चर्चा करण्याची ही वेळ नव्हती. या आधीही आम्ही दहशतवादाविरोधात पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे, यापुढेही योग्य व्यासपीठावर तो नोंदवला जाईल.’

पाक पंतप्रधानांना परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या मेजवानीत राजस्थानातील उत्तमोत्तम पक्वान्नांचा समावेश होता. केर संगरी , लाल मास, धुंदार मुर्ग, मक्कई शहजादी, दाल बंजारी, मिस्सी रोटी, खुश्का नान आदी पदार्थांचा त्यात समावेश जेवणानंतर डेझर्ट म्हणून रबडी मालपुआ आणि मलई कुल्फी होती. पाक पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यासाठी पायघड्या घालण्यात आल्या. एवढेच नाही तर हत्ती, उंट नाचवून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. परराष्ट्र व्यवहारमंत्री खुर्शीद यांनी अश्रफ यांना बिर्याणी, मटण पुलावची शाही दावत दिली. भरपेट पाहुणचार घेतल्यानंतर कुटुंबकबिल्यासह अश्रफ यांनी अजमेरच्या दर्ग्यावर जियारत केली. यावेळी ‘शहीद जवानांचे शिर वापस करा’ अशा घोषणा दर्ग्याच्या परिसरात घुमल्या.

रामबाग पॅलेस येथे राजा परवेझ अश्रफ व त्यांचा कुटुंबकबिला बिर्याणी खात असताना बाहेर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत होती. अजमेरात दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी अतिशय चिंचोळे रस्ते आहेत. ज्या ज्या रस्त्यावरून अश्रफ यांचा काफिला गेला त्या रस्त्यांवर काळे झेंडे लावण्यात आले होते. आपल्या जवानांचा शिरच्छेद करणार्‍या राष्ट्राचे पंतप्रधान ज्या ज्या रस्त्यांनी गेले, ते रस्ते व्यापार्‍यांनी नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काढले.अतिथींचा सत्कार करणे ही आमची संस्कृती आहे. त्यानुसारच पाकचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यासाठी शाही दावत ठेवण्यात आली होती. राजकीय व दहशतवादाच्या मुद्यावर आम्ही एक शब्दही बोललो नाही.’खुर्शीद यांनी ‘ख्वाजांची इच्छा असल्यामुळेच आपण येथे आलात’ अशा शब्दांत अश्रफ यांचे स्वागत केले.

राष्ट्रभक्ती हाच माझा धर्म
भारतीय जवानांचा शिरच्छेद करणार्‍या पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यावर बहिष्कार टाकणारे अजमेरच्या दर्ग्याचे दिवाण जैनूल आबेदीन अली खान यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीला मानाचा मुजरा. अजमेरच्या पवित्र दर्ग्यात पाकिस्तानी पंतप्रधान अश्रफ यांची प्रार्थना अदा करण्यास दिवाण जैनूल खान यांनी ठाम नकार दिला. इस्लामला हा रक्तपात मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांवर बहिष्कार टाकला. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, राष्ट्रभक्ती हाच माझा धर्म आहे आणि इस्लामला तेच कबूल आहे. गरज पडली तर देशहितासाठी मी याहीपेक्षा कडक भूमिका घेईन असे जैनूलखान म्हणाले. आता त्या देशात निवडणुका होऊन नवे सरकार स्थापन झाल्यावरच भारताला चर्चा पुढे कशी न्यायची हे ठरवावे लागणार आहे. अर्थात दोन्ही देशांतील चर्चेतून निकट भविष्यात काहीही निष्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही.

जे पाठीमागे सुरा लपवून वार करण्यासाठी आमच्याकडे येतात, बिर्याणीची ताटे घेऊन आम्ही त्यांचे स्वागत करतो! . कणा नसलेल्या आणि गठ्ठा मतांसाठी लाचार होऊन सरकारचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद मात्र स्वागताला जयपूर, अजमेरला गेले. तेथे त्यांनी त्यांना शाही खाना दिला. हा खाना म्हणजे आपल्याच सरकारने आपल्या जनतेच्या मनात खोलवर झालेल्या जखमेवर मीठ चोळले आहे.पाकिस्तानची बदमाशी जगजाहीर आहे. भारतात मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, विमान अपहरण करून खतरनाक अतिरेक्यांना सोडविण्याचे कारस्थान, काश्मीरमध्ये रोज फेकले जाणारे दगड, दहशतवाद्यांनी केलेले खून आणि अत्याचार, सीमेवर भारतीय सैनिकांचे केलेले शिरकाण ही सगळी पाकिस्तानची मोठी यादी आहे. ही वरचेवर वाढत जाणारी आहे. अशा वेळी या दगाबाज पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतात येण्यास परवानगीच का दिली?

‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्‍वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारतात येऊन निरपराध लोकांना गोळ्या घालून मारणारे अझमल कसाब, संसदेवर हल्ला करणारा अफजल खान हे जेवढे दोषी आहेत तेवढेच या नराधमांना पाठबळ देणारे, त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन, पैसा, प्रशिक्षण आणि हत्यारे देणारे पाकिस्तानचे सरकार दोषी आहे. अबु जिंदालने मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानची कशी फूस आणि पाठिंबा होता, हे जाहीर केले आहे. अजमेरच्या वासियानी या कार्यक्रमाचा निषेध केला, बंद पाडला आणि आपल्या मनातील राग व्यक्त केला. मात्र, जे अजमेरच्या दर्ग्यातील लोकांना कळले, ते भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना कळले नाही! भारताचा सतत द्वेष करणार्‍या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. कणाहीन, स्वाभिमानहीन अशा सरकारचे हे दर्शन अशा पद्धतीने पुढे आले आहे. सलमान खुर्शीद या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत. मात्र, त्यांची चाल आणि वक्तव्ये अतिशय चीड आणणारीच असतात. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विचार उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत मांडला होता. आता पाकिस्तानच्या सरकारच्या पंतप्रधानांच्या पुढे पुढे करत त्यांना शाही खाना द्यावा, हे चीड आणणारे आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..