नवीन लेखन...

थकवा

सर्वसामान्य जनतेत “थकवा‘ ही तक्रार वारंवार आढळते. डॉक्टारां‘कडे येणाऱ्या रुग्णांपैकी दहा टक्के लोकांची “”थकवा जाणवतो आहे‘‘ ही तक्रार असते. सर्व रुग्णांत एकवीस टक्के थकवा जाणवतो. थोड्या काळापुरता आणि नव्याने जाणवला जाणारा थकवा ही अनेक रुग्णांची तक्रार असते. दीर्घकाळ रेंगाळणारा थकवा हा विकार त्यामानाने क्वचितच आढळणारा आजार असतो. पौगंडावस्थेत जाणवणारा थकवा हा बऱ्याच वेळा खिन्नतेचे (डिप्रेशनचे) लक्षण असते. अशा व्यक्ती एका टोकाला आपले आयुष्य आळसात आणि निष्क्रियतेत घालवीत असतात, तर दुसऱ्या टोकाला अतिरेकी धडपड आणि प्रमाणाबाहेर हालचाल करीत असतात. ६५ वर्षांवरच्या स्त्रियांना थकवा जास्त प्रमाणात जाणवताना आढळतो. स्त्री-पुरुषांत या वयात मधुमेह, रक्तक्षय (ऍनिमिया) आणि आर्थिक ताण ही कारणे असू शकतात. कौटुंबिक कलह हेदेखील एक महत्त्वाचे कारण असू शकते. विविध जंतू-संसर्गदेखील या वयात होतात. शारीरिक हालचाल कमी असणे, झोप पुरेशी न मिळणे आणि मानसिक तणाव यामुळे थकवा रेंगाळतो. याचा अर्थ नियमाने व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक प्रकृती नीट राखणे याबाबत दक्ष राहणे प्रत्येक व्यक्तीला आवश्यरक आहे.
थकवा आलेल्या व्यक्तीला “”बरे वाटत नसल्याची‘‘ तक्रार असते. कोठे ना कोठे शरीरात अस्वास्थ्य जाणवत राहते. दैनंदिन व्यवहारदेखील नकोशी वाटतात. व्यायाम आणि आंघोळ करणे टाळले जाते. तात्पुरता थकवा तापासारख्या आजाराने किंवा अतिश्रमाने येतो. थोड्या दिवसांच्या विश्रांतीने किंवा “हवा पालटा‘ने तो जातोही. दीर्घकाळ टिकणारा थकवा एका महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतो आणि क्रॉनिक फटीग सिंड्रोम सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रेंगाळतो.
“”अशक्तपणा,‘‘ “”निरुत्साह‘‘ आणि “”थकवा‘‘ हे तीन शब्द वेगवेगळ्या स्थितींचे निदर्शक आहेत. “अशक्तपणा‘ म्हणजे शक्ती कमी झाल्याचे जाणवणे. वजन उचलणे किंवा पायी चालणे अशा क्रियांना शक्ती लागते. जी व्यक्ती वीस पौंड वजन उचलू शकत होती, ती आता तेवढे वजन उचलू शकत नाही. किंवा जी व्यक्ती एका तासात तीन किलोमीटर्स अंतर पायी चालू शकत होती, ती आता तेव्हढे चालू शकत नाही, तर शक्ती कमी झाली आहे, “अशक्तपणा‘ आला आहे, अशी स्थिती शारीरिक आजारामुळे येते. “निरुत्साह‘ म्हणजे काम करण्याची इच्छा नसणे. अशी स्थिती शारीरिक किंवा मानसिक समस्यांचा परिणाम असू शकते. उदाहरणार्थ, हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला चालल्यानंतर धाप लागणे किंवा छाती भरून येऊन छातीत, गळ्यात किंवा पाठीत दुखण्याचा अनुभव येत असला तर हे श्रम करू नयेत असे वाटते. या तक्रारीला “अर्गो – फोबिया‘ म्हणतात. “ग्रीक शब्द‘ “अर्गॉन‘ म्हणजे काम किंवा श्रम, आणि दुसरा ग्रीक शब्द “फोबॉस‘ म्हणजे भय, भीती,आपल्या शरीरातील शक्ती वापरण्यात व्यत्यय येणे आणि विश्रांती किंवा झोप घेण्याची प्रबळ इच्छा होणे या स्थितीला “थकवा‘ म्हटले जाते. थकवा येण्यामागे दोन महत्त्वाच्या प्रतिसादांचा भाग असतो. पहिला म्हणजे “”युद्ध अथवा पलायनाचा‘‘ प्रतिसाद – आणि दुसरा म्हणजे “”संरक्षण – माघार‘‘ प्रतिसाद. युद्ध अथवा पलायनाचा प्रतिसाद प्राणिमात्रांना संकटांना तोंड देण्यास, प्रसंगी आक्रमक होण्याची व स्वतःला इजा झाल्यास त्याच्या तयारीची तरतूद करतो. या करता विविध मज्जा केंद्रे, अनैच्छिक मज्जासंस्था व विविध संप्रेरके (हॉर्मोन्स) कार्यान्वित केली जातात. यश मिळाल्यावर किंवा जीव वाचण्याची खात्री झाल्यावर हा प्रतिसाद शमतो. “”संरक्षण-माघार‘‘ प्रतिसादीत आगामी शक्तीच्या निचऱ्याची सूचना मिळताच सर्व हालचाल थांबवून सर्व संवेदना अधिक तीव्रतेने जाणविल्या जाण्याची स्थिती निर्माण केली जाते. हा प्रतिसाद विश्रांती किंवा झोपेनंतर शमतो. या संरक्षण – माघार प्रतिसादामुळे ऊर्जा वाचवली जाते. “युद्ध अथवा पलायन‘ या प्रतिसादामुळे ऊर्जा खर्च करण्याची तयारी होते व प्रत्यक्षात ऊर्जा खर्चही होते. युद्ध अथवा – पलायनाचा प्रतिसाद शमल्यावर संरक्षण आणि माघार हा प्रतिसाद सुरू करता येतो. म्हणजे, खर्च झालेली ऊर्जा आता भरून काढता येते.

“युद्ध अथवा पलायन,‘ “संरक्षण आणि आधार‘ किंवा “उपस्थित राहून मैत्री वाढविणे‘ यापैकी कोणती स्थिती आपण जोपावयाची हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात्‌ त्या करता आत्मपरीक्षणाने आपल्या मनाचे व्यवहार जाणणे ही पहिली पायरी आहे. ऊर्जा खर्च करणे अथवा ती आपल्या दैनंदिन कामकाजात उपलब्ध नसणे म्हणजेच थकव्याला निमंत्रित करणे होय, हे स्पष्टच आहे. आपल्या उपरनिर्दिष्ट सर्व भावनांचे मूळ आपल्या अहंकारात आहे हे समजणे ही दुसरी पायरी होय. अहंकार समजणे म्हणजेच “अहम्‌‘ला जाणणे. आत्मज्ञान होणे. खरोखरी आत्मज्ञानी व्यक्ती थोड्याच असतील. आपले ऋषी, संत आणि महात्मे यांना तसे झालेले होते. सर्वसामान्यांना तशी स्थिती येणे सोपे नाही. ज्यांना थकवा जाणवतो, त्यांनी सुरवात आपल्या शारीरिक प्रकृती तपासण्यापासून सुरवात करणे इष्ट आहे. रक्तक्षय, मधुमेह, क्षयरोगासारखा संसर्ग, चुकीची जीवनशैली इकडे लक्ष पुरवून ते आधी दुरुस्त करावे. थॉयरॉईड ग्रंथीचे विकार ओळखणे व त्यावर योग्य उपचार करणे हे आता सोपे झालेले आहे. कोणताही शारीरिक विकार नसल्यास चिंतातुरता किंवा खिन्नता हे मानसिक विकार नाहीत ना, याची खात्री तज्ज्ञ आणि अनुभवी मानसोपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावी. याच्या जोडीला स्वतः आपल्या मनाचे व्यवहार पहावेत. सुप्त मनात डोकावण्याचा प्रयत्न करावा, येथे एखाद्या समुपदेशकाची मदत निश्चिचत उपयोगी पडेल. थकवा माणसाच्या इतर अनेक गुणांना झाकतो आणि आयुष्यात यशस्वी होऊ देत नाही. थकवा जाणलाच पाहिजे आणि योग्य उपचारांनी थकवा या स्थितीवर मात केलीच पाहिजे.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- डॉ. ह. वि. सरदेसाई /सकाळ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..