नवीन लेखन...

आई बाळाचे संगोपन

दिवस राह्ल्यापासून मूल मोठं होईपर्यंत त्याची सर्वार्थाने काळजी घेणारी आईच असते. बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावं लागतं ? कोणती पथ्य पाळावी लागतात ? आरोग्याची व्याख्या ही वर्षावर्षाला बदलत आली आहे आणि आज आपण आरोग्याची व्याख्या अशी करतो – शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास, रोग व्याधी मुक्त असे आनंदी बालपण आणि सृजनशील प्रौढात्व म्हणजे आरोग्य होय. ही व्याख्या जर पालकांनी विशेषतः मातांनी समजावून घेतली, तर आदर्श माता कशी असावी हे समजणं फारसं अवघड नाही.

आपण गर्भवती आहोत या गोष्टीचा स्त्रीला आनंद व्हायला हवा. तिनं गर्भारपणातही आनंदी मोकळ्या मनानं राहायला हवं. बाळाचं आगमन तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. तो क्षण यशस्वी होण्याच्या दृष्टीनं सर्वांगीण तयारी करायला हवी. गर्भाची संपूर्ण वाढ होण्याच्या दृष्टीनं तिनं मनावर आणि शरीरावर कोणताही ताण पडून देता कामा नये, प्रथिने, खनिजे, कॅलरीज आणि जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळतील असा आहार तिनं गर्भारपणात घ्यायला हवा. दूध, फळे, पालेभाज्या असा आहार उत्तम. तसंच मांसाहार करणाऱ्या स्त्रियांनी अंडी, मांस, मासे या काळात आपल्या आहारात घेत जावे.

आवश्यकतेपेक्षा जास्त आहार आणि पोषणाला अयोग्य असं अन्न खाण्यात आलं तर अपचन होत असतं. गर्भारपणी अपचन होऊ न देण्याची खबरदारी गर्भवती स्त्रियांनी घेणं आवश्यक असतं. ज्या ठिकाणी नाना तऱ्हेच्या माणसांशी बराच काळ संपर्क येऊ शकतो, अशा ठिकाणी गर्भवतींनी जाण्याचं टाळावं. सिनेमागृह हे असं ठिकाण असतं की तिथं रोज हजारो माणसं येत असतात. तीन तास बसत असतात. ही येणारी माणसं कुठल्यातरी विकारांनी आजारी असू शकतात. कुणाला सर्दी, खोकला तर कुणाला गुप्तरोगासारखे विकार झाले असण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी तीन तास बसणं हे गर्भवती स्त्रीच्या दृष्टीनं अपायकारक ठरू शकतं. त्यापेक्षा मोकळ्या हवेत फिरणं उद्यानात बसणं ठीक. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध गरोदर स्त्रीनं घेऊ नये. ते धोकादायक असतं एवढंच नाही, तर त्या काळात ओटीपोट दुखतं म्हणून किंवा आत हालचाल होऊन त्रास होतो म्हणून ओटीपोट दाबणं किंवा त्याला मसाज करणंही अत्यंत अयोग्य असतं.

आपल्या होणाऱ्या बाळाला जास्तीत जास्त काळपर्यंत अंगावरचं दूध पाजण्याची तयारी आईनं दाखवायला हवी. जर अशी मनाची तयारी झालेली असेल, तर मग दूध कमी येण्याची तक्रारच उद्भवणार नाही. डॉक्टर आणि नर्स सांगतील त्याप्रमाणं आपल्या स्तनाग्रांची तिनं काळजी घेतली पाहिजे. नियमितपणे तपासणी, योग्य पथ्यपाणी, कोणत्याही संसर्गापासून दूर राहणं, शरीरावर तसंच मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ न देणं, अतिरिक्त धूम्रपान आणि मद्यसेवन न करणं, अशा तऱ्हेनं स्त्रीनं गर्भारपणाच्या काळात काळजी घेतली तर गर्भाची सर्वांगीण वाढ होण्याच्या दृष्टीनं चांगलीच मदत होते. मुख्य म्हणजे बाळंतपण हे सुसज्ज अशा इस्पितळात किंवा निष्णात डॉक्टरांकडेच करणं हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा सर्वांगीण बाजुंनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी आणि हा विकास, ही वाढ कोणत्याही रोगविकाराची बाधा न होऊ देता होण्यासाठी आईनं बऱ्याच गोष्टी लक्षपूर्वक आणि कटाक्षानं पाळायला हव्यात.

योग्य आणि पुरेसा आहार

अंगावरचं दूध हा सर्वात पौष्टिक आहार समजला जातो. बाळासाठी हे निसर्गानं पुरविलेलं दूध असतं. बाळाला अंगावरचं दूध पाजल्यामुळं बरेच फायदे होतात. त्याला विविध प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येतं. प्रामुख्यानं जुलाब हगवणीसारख्या आजारापासून त्याचप्रमाणं ‘क’ जीवनसत्त्वही अंगावरच्या दूधातून मिळत असल्यामुळं बाळाला त्याची कमरतरता पडत नाही. ते निर्जंतुक असतं, त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. याचबरोबर अंगावर दूध पाजल्यानं बाळ आणि आई यांच्यात एक अतूट भावनिक नातं निर्माण होत असतं. जेव्हा दूध आईला कमी येत असेल तेव्हा बाहेरचं सर्वोकृष्ट, सकस दूध बाळाला देत जावं, बाळ ६ ते ८ आठवड्याचं झालं की, फळांचे रस, सूप द्यायला सुरुवात करावी. ते ४ महिन्याचं झालं की खिरीसारखे पदार्थ आणि वर्षापासून नेहमीचं अन्न द्यायला सुरवात करावी. परंतु देताना आईनं अतिआग्रह करून खायला घालू नये. पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी बाळावर बळजबरी करणं धोक्याचं असतं. मुलाला भूक केव्हा केव्हा लागते हे त्याच्या मागणीवरून ठरवून, दिवसातल्या ठराविक वेळीच त्याला भरवणं केव्हाही चांगलेच. पहिल्या वर्षात दिल्या जाणाऱ्या अन्नात जीवनसत्त्व – खनिजं यांची कमतरता पडू न देण्याची काळजी घ्यावी.

बाळाचा मानसिक आणि भावनिक विकास

आईवडीलांनी आपल्या बाळाबरोबर जास्तीत जास्त राह्यला हवं. त्याला फिरायला नेणं, त्याच्याशी बोलणं, हसणं, खेळणं, हलक्या हातानं पाठ थोपटणं या गोष्टी तर आवश्यक असतातच, शिवाय त्यांची दृष्टी आणि श्रवणशक्ती यांचा विकास होण्यासाठी रंगीबेरंगी, आवाज करणारी खेळणी त्यांच्यासमोर ठेवावीत. एखादी बाहुली जेव्हा आवाज करते, आगगाडी शिट्टी देते आणि धवू लागते तेव्हा मूल हसू लागतं. त्यावेळही आपणही हसून त्याच्या हसण्याला उत्तेजन द्यायला हवं. बाळाच्य प्रत्येक हालचालीला, हावभावांना आपणच उत्तेजन द्यायला हवं. हे काम इतर दुसऱ्या कुणाचं संभाळणाऱ्या मुलीचं, दाईचं नाही. असं उत्तेजन देत गेल्यानं मुलाच्या मानसिक आणि भावनिक विकासाला महत्त्वाची मदत होत असते. बुद्धिमत्ता ही केवळ मेन्दू इंवा जेन्सवर अवलंबून नसते तर परिस्थिती आणि वातावरणातून मिळणाऱ्या उत्तेजनावरही अवलंबून असते.

संसर्गापासून संरक्षण

आपले घर आणि बाळ यांची स्वच्छता ठेवणं ही गोष्ट स्त्रियांनी कटाक्षानं लक्षात ठेवली पाहिजे. यामुळं संसर्गजन्य रोगांपासून बाळाचं रक्षण होईल. सर्दी, खोकला झालेल्या व्यक्तींपासून बाळाला दूर ठेवावं उकळलेलं पाणी, शिजवलेलं अन्न आणि धुतलेली फळं भाजीपाला यांचाच आहारात वापर करावा. देवी, डांग्या खोकला, घटसर्प, धर्नुवात पोलिओ, टायफाइद अशासारख्या रोगांच्या लसी बाळाला वेळेवर देणं अत्यावश्यक आहे. संसर्गाची पुसटशी चिन्हं जरी बाळाला दिसू लागली तरी लगेच उपचार करून घेणंही आवश्यक आहे.

बाळाचं वात्सल्यानं संगोपन करा

सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असं नाही बाळाला प्रेम, वात्सल्यही हवं असतं. आईवडीलांचं प्रेम त्याला मिळणं आवश्यक असतं. आपण एका कोवळ्या जिवाला वाढवितो आहोत. या दृष्टीनं हळुवार मनानं, हिडीसफिडीस न करता, न कुरकुरता, प्रेमानं त्या जिवाची काळजी घ्यायला हवी. दाया, नर्सेस यांच्यापेक्षा आईची माया त्याला मिळायला हवी.वयाची दोन ते पाच वर्षांचा काळ बाळाच्या वाढीच्या दृष्टीनं अत्यंत नाजूक असा असतो. आणि या वयोगटाच्या मुलांचं संगोपन जर नीट काळजीपूर्वक झालं नाही, तर पुढं पालकांच्या दृष्टीनं त्यांचं मूल म्हणजे एक समस्याच होऊन बसते. म्हणूनच या वयोगटातल्या मुलांकडे पालकांनी विशेषतः आईनं काही बाबतीत अत्यंत काळजी घ्यायला हवी ( बाळाचं आगमन स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. त्याच्या स्वागताची सर्वांगीण तयारी स्त्रीनं करावी.) ( अंगावरचं दून निर्जंतुक असतं. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात अंगावरच्या दुधामुळं बाळाला संसर्गापासून दूर ठेवता येतं. ) या कालखंडात खालील महत्त्वाच्या गोष्टी बाळाच्या शरीरात घडत असतात.

वाढीचा वेग वाढतो आणि मंदावतो.भाषा कळू लागते. बोलणं आणि समजणं हे या काळातच घडत असतं.बुद्धीचा विकास होतो.वागण्याच्या पद्धतीचा म्हणजे वर्तनाचा विकास होतो.मज्जासंस्था स्नायू यांच्या परस्परसंबंधाचा विकास होतो.मल आणि मूत्रावर नियंत्रण करता येऊ लागते.

बाळाच्या भवितव्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा या कालखंडात विकास घडत असल्यामुळे आई-वडिलांवर त्यांच्या संगोपनाची यावेळी आणखीनच जबाबदारी येऊन पडत असते.

या वयोगटातील मुलांच्या बाबतीत निर्माण होणारे प्रश्न

नित्कृष्ट अपुरा आहार मिळाला तर मुलाची वाढ खुंटते.संसर्गजन्य जंतूंची लागण होऊ शकते. क्षय, डांग्या खोकला, घटसर्प, पोलिओ, गोवर इत्यादी आजारांची लागण होण्याची शक्यता याच वयात होऊ शकते.अंथरुणात लघवी होणं, अंगठा चोखणं, चिडचिडा स्वभाव बनणं, तोतरेपणा येणं, बद्धकोष्ठतेची सवय होणं अशा सवयी जडतात.अपघात, विषबाधा होण्याची शक्यता दुर्लक्ष झाल्यामुळं होते.

आपल्या बाळानं भविष्यात मोठं व्हावं खूप शिकावं, सुशील असावं, जगातील अनेक बऱ्यावाईट गोष्टींना तोंड देण्यासाठी संकल्पना पेलण्यासाठी त्यानं धैर्यवान व्हावं, त्याचबरोबर त्यानं प्रेमळही असायला हवं आणि दणकट धडधाकट प्रकृतीचं राह्यला हवं, अशी प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते. पण त्यासाठी पालकांनी विशेषतः आईनं ते जगात येण्यापूर्वीपासून ते त्याच्या वाढीच्या वयापर्यंत त्याची अतिशय काळजी घ्यायला हवी.

मुलाच्या विकासासाठी तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत?

मुलांना पुरेसा पौष्टिक आहार द्या. पण त्यांना अन्न खाण्यासाठी दुराग्रह करू नका. बळजबरी केली तर अन्नाचा परिणाम होणार नाही.रोगप्रतिबंधक लस मुलांना टोचून घेण्याची खबदारी घ्या.मुलांना मार्गदर्शन करा. शिकवत रहा. त्यांना प्रेम, माया द्या. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढा. त्यांना उगीचच सतत आपल्या संरक्षणाखाली ठेवू नका. त्यांना मोकळेपणानं खेळू बागडू द्या.तीन ते पाच वर्षांपर्यंत दुसरं मूल होऊ देऊ नका. आणि दुस्रऱ्या मुलाच्या आगमनाच्यावेळी पहिल्याच्या मनाची तयारी करून ठेवा.मुलाला शाळेची गोडी लावा.अपघात आणि विषबाधा होऊ न देण्यासाठी काळजी घ्या.सुखी कुटुंबासाथी आदर्श माता हवीच. आई ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. कुटुंबाचं स्वास्थ्य, सुख, आरोग्य आईबरोबरच अवलंबून असतं. आजचं मूल उद्याची आई किंवा बाप होणारं असतं. त्यासाठी, आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी योग्य ती काळजी घ्या.

— आरोग्यदूत WhatsApp Group वरुन 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..