नवीन लेखन...

योगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…

घटस्थापना – अश्विन शुद्ध प्रतिपदा … नवरात्रीचा पहिला दिवस.

या दिवसात मला माहित असलेल्या देवींच्या काही स्थानांबद्दल नऊ दिवस लिहायचा मानस आहे. रोज एक. अर्थात वेळ मिळाल्यास.

‘योगेश्वरी’ आमची कुलस्वामिनी असल्याने आज पहिला मान देवी योगेश्वरीचा ….!

आंबेजोगाई हे मराठवाडयातलं प्रमुख संस्कृतिक केंद्र म्हणून फार पूर्वीपासूनच सुपरिचित आहे. अलिकडच्या काळात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे या दोघानी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्याचं समर्थ नेतृत्व याच शहरातून केलं. मराठीतले आद्यकवी मुकुंदराज आणि दत्तसंप्रदायातले संतकवी दासोपंत यानांही या भूमीनं भुरळ घातली. त्यांनी इथे दीर्घकाळ वास्तव्य केलं. आंबेजोगाईची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे महाराष्ट्रातल्या साड़ेतीन शक्तीपीठांशिवाय जी महत्वाची स्थानं आहेत, त्यात इथल्या योगेश्वरीचं महत्व खूप आहे. भौगोलिकदृष्ट्याही आंबेजोगाई मराठवाडयाच्या केंद्रस्थानी वसलंय.

तसं समर्थ रामदासानांही इथल्या वास्तव्यात एक वेगळीच प्रेरणा मिळाल्याची कथा परंपरेनं सांगून या स्थानाचं वेगळेपण सांगितलंय. बोहल्यावरून पळाल्याच्या घटनेनंतर जवळ जवळ दहा बारा वर्षांनी ते तीर्थयात्रा करत इथे आले होते. त्याच वेळी त्यांच्या जांब या गावच्या एका ब्राम्हणाने त्यांना ओळखलं. समर्थ घर सोडून गेल्यानंतर त्यांची आई विरहाने खूप दुःखी झाल्याचं त्याने समर्थांना सांगून आईची भेट घेण्याची गळ घातली. परत घरी गेलो तर प्रपंचात गुरफटले जाण्याच्या शंकेने ते अजिबात तयार झाले नाहीत. त्याच वेळी “सहयोशी पातलसिघ्रजोगाई … वदली समर्था सर्वसामान्य होई …. मनोरथ पुरवी, आहळती आई …. संशयो काही न धरावा… हा योगेश्वरीचा आदेश त्यांना जाणवला. ते जांबला आपल्या आईच्या भेटीला गेले.

आंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं.

योगेश्वरी देवीविषयी परंपरेने अनेक कथा गुंफल्या आहेत. एक कथा सांगते की फार पूर्वी जयंती नगरीवर दंतासुर नावाचा एक राक्षस राज्य करीत होता. त्याची राजधानी आंबेजोगाईपासून दहा मैलावरच्या बर्दापूरला होती. तो शंकराचा परमभक्त होता. त्याला यज्ञयाग पसंद नसल्याने तो त्यात वारंवार विघ्न आणत असे. या कारणाने देवाना हविर्भाव मिळेनासा झाला. जेव्हा त्याचा प्रादुर्भाव खूपच वाढला तेव्हा ऋषी-मुनी स्वर्गात विष्णू आणि शंकराला भेटायला गेले. नंतर सर्वांनी आदिमाया जगदंबेची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून देवी प्रकट झाली व तिने दंतासुराचा वध करण्यासाठी मी जयंती नगरीत अवतार धारण करेन, असे आश्वासन दिले. पुढे मार्गशीर्ष पोर्णिमेस योगेश्वरीने अवतार धारण केला. ज्या ठिकाणी देवी प्रकट झाली ते ठिकाण ‘मूळपीठ’ म्हणून प्रसिद्ध झाले.

इकडे दंतासुराला ही बातमी कळल्यावर तो आपल्या प्रचंड सेनेसह देवीवर चालून आला. देवी त्याची वाट बघतच होती. देवीने दंतासुराचा दात पकडला आणि जोराचा हिसड़ा देऊन तो उपटुन दूर फेकून दिला. नंतर तुंबळ युद्ध झालं. शेवटी देवीने आपल्या खड़गाने त्याचे शीर धड़ापासून वेगळे केले.

अश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना होवून नवरात्रोत्सव सुरु होतो. अष्टमी आणि नवमीस शतचंडी हवनाची पुर्णाहुती होते. नवमीला देवीची षोडोपचारे पुजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी वाजत गाजत निघते. पेटलेल्या शेकडो पोतांनी सारा आसमंत उजळून निघतो. पोतराजाचे हलगीच्या तालावर नाचणे होते. पालखीच्या मार्गावर देवीची जागोजागी ओटी भरली जाते. मार्गशीर्षात सुद्धा असाच उत्सव होतो.

मराठीतील आद्यकवी मुकुंदराजांच्या समाधीचे दर्शन हे देखील आंबेजोगाईच्या भेटीतले एक महत्वाचे अंग आहे. शहरापासून वायव्येला साधारण चार पाच किमी वर डोंगराच्या कुशीत हे नयनरम्य आणि शांत असं स्थान आहे. पन्नासएक दगडी पायऱ्या उतरून जावं लागतं. आंबेजोगाई ही संतकवी दासोपंतांचीही कर्मभूमी. त्यांनी या ठिकाणी कायमचे वास्तव्य करून धर्मप्रसार आणि अलोट साहित्य लिहिलं. त्यांची समाधी मुकुंदराज मार्गावरच नृसिंह तीर्थावर आहे. मंदिरापासून जवळच नदीवर एक शिवलेणे आहे. लेण्याचा मंडप बत्तीस खांबांवर आधारलेला आहे. सुमारे दोन हजार माणसे सहज बसू शकतील, इतका तो प्रशस्त आहे. याला जोगाईचे माहेर म्हणतात.

बहुसंख्य कोकणस्थ ब्राम्हणांची योगेश्वरी कुलदेवता आहे. आंबेजोगाई जरी मराठवाडयाच्या केंद्रस्थानी असलं तरी मुंबई-पुण्याहून इथे नक्की जायचं कसं, हे पहिल्यांदा जाणाऱ्यांना सहज समजत नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वेनं परभणीला उतरून पुढे दोन-सव्वा दोन तास परळी वैजनाथ मार्गे एस.टी.नं जावं लागे. आता मुंबईहून रात्री नऊ वाजता सुटणाऱ्या लातूर एक्सप्रेसने लातूरहून इथे जाणं सोयीस्कर आहे. ही गाडी सकाळी सात वाजता पोचते आणि रात्री आठ वाजता परत मुंबईला निघते. लातूररोड स्टेशनहून लातूरचा एस.टी. स्टॅन्ड चार पाच किमी वर आहे. शेअर रिक्षा आणि बसेस आहेत. लातूरहून अंबेजोगाई पन्नासएक किमी वर आहे. लातूरहून दिवसभराकरता जीप देखील भाडयाने मिळतात. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं, अंबेजोगाईहून बावीस किमी वरचं परळी वैजनाथचं दर्शन देखील घेता येतं. ही जीप आपल्याला संध्याकाळी लातूररोड स्टेशनवर सोडते. आणि आपण रात्री आठ वाजता मुंबई करता सुटणारी लातूर एक्सप्रेस पकडू शकतो. मुक्कामाचा प्रश्न येत नाही.

मुंबईहून आपली मोटार घेऊन जायचं असल्यास कल्याण-नगर रोडवर माळशेज घाट पार करून आळेफाट्याला पुणे-नाशिक रोड ओलांडला की टाकळी ढोकेश्वर, अणे पार करत आपण नगरला पोचतो. नगरहून एक रस्ता जामखेड करत बीडला जातो. जामखेड ओलांडले की गावाबाहेर आल्यावर थोडं अंतर गेल्यावर एक रस्ता उजवीकडे जातो. हा लहान असलेला आतला रस्ता ‘पाटोडा’ करीत मांजरसुंभ्याला जातो. मांजरसुंभ्याहून ‘केच’ मार्गे आंबेजोगाई आहे ८० किमी. मुंबईहून हे अंतर साधारण पावणे पाचशे किमी भरतं. तसं पुणे एक्सप्रेस वे ने तळेगाब एक्सिटला बाहेर पडून ‘चाकण’मार्गे नगर गाठला येतं. हा रस्ता चाकणपुढेही टोलचा असल्याने चांगला आहे.

देवळासमोर यात्रेकरुंसाठी भक्तनिवासात राहाण्याची बरी सोय आहे. त्याच दिवशी परतायचं असेल तर या भक्तनिवासात फक्त अंघोळीचीही व्यवस्था होते. पुजाऱ्यांच्या घरांतून देखील राहण्या-जेवण्याची व्यवस्था आहे. देवस्थानाच्या परिसरात इतर हॉटेल्स तेवढी चांगली वाटली नाहीत. त्यात इथलं जेवण अतिशय तिखट असतं. त्यामुळे पुजाऱ्यांच्या घरातलं आमटी भाजी भाताचं जेवण उत्तम. उन्हाळ्यात मात्र या परिसरात प्रचंड तलखी आणि फुफाटा असतो. मात्र पावसाळ्यात-हिवाळ्यात सगळा परिसर हिरवागार आणि प्रसन्न असतो. अंबेजोगाई तसं मुंबई पासून लांब आणि आडमार्गावर असल्याने मनात कुलदेवतेला प्रत्यक्ष जाऊन नमस्कार रुजू करण्याची प्रबळ इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. जरी वाटत असलं तरी खूप जणांना ते सहज जमत नाही. मात्र एखादया शनिवारी रात्रीच्या ट्रेननं निघालं तर परत सोमवारी सकाळी घरी जाऊन ऑफिस गाठता येतं. कुलस्वामिनीची व्यवस्थित पूजा करुन, खण-नारळाने ओटी भरुन मनोभावे नमस्कार केला की नक्कीच मनाला वेगळा आनंद आणि परंपरा सांभाळल्याचं समाधान मिळतं.

(एक संपर्क माझ्याकडे आहे .. श्री शाम ओसेकर गुरुजी – 0244-6245437 / 09970305970)

(वारांगलच्या भद्रकाली देवीवरच्या लेखात मी नवरात्रात नऊ लेख लिहिल्याचा उल्लेख केला होता … त्यावर काही जणांनी ते लेख वाचायची इच्छा व्यक्त केली … त्याप्रमाणे हा पहिला लेख …)

— प्रकाश पिटकर
७५०६०९३०६४
९९६९०३६६१९

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..