नवीन लेखन...

जागतिक कर्णबधिर दिन

कर्णबधिर लोकांच्या देनदिन जीवनातील समस्यांविषयी सर्वसाधारण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक कर्णबधिर दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

जगात कर्णबधिरांच्या प्रश्नांवर ख-या अर्थाने काम करण्यास सुरुवात झाली ती २९ सप्टेंबर १९५१ रोजी. याच दिवशी इटलीच्या रोममध्ये जागतिक कर्णबधिर महासंघाची ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ दी डेफ’ची स्थापना झाली. या निमित्ताने गेल्या सहा दशकांत प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा कर्णबधिर सप्ताह तर शेवटचा रविवार हा आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस म्हणून साजरा केला जातो.

जगातील कर्णबधिरांसाठी वापरण्यात येत असलेल्या भाषेत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याची, त्यांना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, माहिती आणि सेवा पुरवणे, त्यांना देण्यात येणा-या अधिकारांमध्ये अधिक सुधारणा करणे, त्यासाठी संस्थांची स्थापना करणे आदी कार्य अव्याहतपणे सुरू आहेत. त्यासोबतच जगभरातील कर्णबधिरांसाठी मानवी अधिकार आणि समता मिळवून देणे, त्यांची कर्तबगारी, त्यांचे सांस्कृतिक योगदान जगाच्या समोर आणणे आणि या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यासाठी जागतिक कर्णबधिर महासंघाचे कार्य चालते.

संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित असलेल्या जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक बँक, युरोप आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, जागतिक आर्थिक व सामाजिक परिषद आदींचे सहकार्य महासंघाच्या कामाला मिळत आहे. अपंगांना संधी देणे, त्यांना बरोबरीचा दर्जा उपलब्ध करून देणे यासाठी प्रत्येक संघटनेकडून एक महत्त्वाचे योगदान मिळत असले तरी यातील शेकडो संस्थांचे जाळे नियंत्रित करण्याचे कामही जागतिक कर्णबधिर महासंघाकडून केले जाते.

या महासंघाच्या स्थापनेनंतर १९५१ मध्ये कर्णबधिरांसाठी पहिली जागतिक काँग्रेस परिषद इटलीमध्ये झाली होती. त्यानंतर महासंघाकडून युगोस्लाव्हिया, जर्मनी, स्वीडन येथे दर चार वर्षानी काँग्रेस परिषदा झाल्या. मात्र या वेळी महासंघाकडे कोणत्याही प्रकारच्या संकल्पना नव्हत्या, मात्र १९६७मध्ये पोलंड येथे झालेल्या परिषदेपासून प्रत्येक परिषदेत एक विशेष संकल्पना घेऊन कार्यक्रम आखण्याची सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक दर चार वर्षानी पॅरिस, वॉशिंग्टन, बल्गेरिया, इटली, इथिओपिया, फिनलँड, टोकियो, व्हिएन्ना, ब्रिस्बेन, माँट्रियल, माद्रिद आणि २०११ मध्ये डर्बन या ठिकाणी या परिषदा झाल्या आहेत. ही जागतिक काँग्रेस परिषद २०१५ मध्ये तुर्कीच्या इस्तंबुल येथे झाली होती.

१३३ देशांमध्ये या महासंघाचे जाळे पसरले असून त्यात आशिया खंडात भारतातील प्रमुख केंद्र मुंबईतील ‘अलीयावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था’ हे आहे. महासंघाच्या स्थापनेची उद्दिष्टे कर्णबधिरांच्या एकूण विकासाशी संबंधित होती. यामुळे कोणत्याही प्रकारे मानवी हक्कांचे जतन करत कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषेचा विकास करणे आणि त्या माध्यमातून जगातील या लोकांना एकत्र करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जात आहे. जगभरात काम करणा-या विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींच्या परिषदा आयोजित करून त्यातून अनेक नवीन मार्ग चोखाळले जात आहेत. महासंघाने आजवर विविध प्रकारच्या संकल्पना राबवल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह, आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करून कर्णबधिरांसाठी अनेक प्रकारच्या विकासांचे मार्ग खुले करून देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतात १९८३ मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील ‘अलीयावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थे’ला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या तीस वर्षात संस्थेने आपल्या कामाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारे आवश्यक आणि प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. देशाच्या कानाकोप-यात या संस्थेतून प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांनी आपल्या कामाचा एक ठसा उमटवला आहे. बहिरेपणा काय असतो, त्याची कारणे, उपाय, निदान, चिकित्सा, उपचारपद्धती, सेवा, सुविधा, त्याविषयी संशोधन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनजागृतीचेही काम केले आहे.

या संस्थेचे जनमाध्यम व प्रसारण अधिकारी म्हणून काम पाहत असलेले डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी सांगितले, ‘निलगिरी पर्वताच्या रांगा असो किंवा आसाममधील आदिवासी पाडे अथवा जम्मू काश्मीरमधील बर्फाळ प्रदेश अशा अनेक ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी जाऊन याविषयी मोलाचे कार्य करत आहे.
जागतिक कर्णबधिर महासंघाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हे काम चालत असलं तरी त्याही पलीकडे जाऊन संस्थेने आपल्या कामाची एक वेळी छाप निर्माण केली आहे. यामुळे गेल्या तीन दशकांत संस्थेला दोन आंतरराष्ट्रीय आणि तब्बल १२हून अधिक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेची कोलकाता, नवी दिल्ली, सिकंदराबाद, भुवनेश्वर येथे विभागीय तर भोपाळ आणि अहमदाबाद येथे संयुक्त विभागीय केंद्रे आहेत.

कर्णबधिरांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी विविध प्रकारचे संशोधन करणे आणि मोफत सोयी-सुविधा पुरविणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आजघडीला याचसाठी संस्थेकडे सुमारे पाच लाख रुपये किमतीची पुस्तके, ग्रंथ, संदर्भग्रंथ, अहवाल उपलब्ध आहेत. वाक् व श्रवण भाषा आणि विशेष शिक्षण (कर्णबधिरता) क्षेत्रात केवळ पदवीच नाही, तर पदव्युत्तर आणि पीएच.डी. आणि बी.एड्, एम.एड्.पर्यंतचे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. यातील बहुतेक अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ व त्याअंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये सुरू आहेत. मात्र देशभरात पारंपरिक विद्यापीठे, राष्ट्रीय मुक्त विद्यापीठे, खासगी शिक्षण संस्था, एनजीओ यांच्यामार्फत अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आणि उपक्रम राबविले जात आहेत. कोणत्याही संस्थेतून पदवी, पदव्युत्तर, बी.एड्., एम.एड्. केलेल्या विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यात नोकरी अथवा अध्यापनाचे कार्य करता येते. ही या अभ्यासक्रमांची मोठी जमेची बाजू आहे.

श्रवण, वाक् व भाषा अभ्यासक्रम हे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत तर विशेष शिक्षण हे मुंबईत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत चालवण्यात येते. हे सर्व अभ्यासक्रम भारतीय पुनर्वसन परिषदेच्या मान्यतेनुसार चालतात. यासोबतच संस्थेकडून वैद्यकीय, निमवैद्यकीय शिक्षण, आरोग्य शिक्षण, माध्यम शिक्षण व सामाजिक, आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध समूहांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जातात. देशाच्या कानाकोप-यात संस्थेचे प्रतिनिधी जाऊन अभिमुखीकरण, कार्यशाळा, मेळावे, प्रदर्शने, चर्चासत्रांचे आयोजन करतात. याच माध्यमातून संस्थेच्या मुंबई व विभागीय केंद्रांवर श्रवण, वाक् व भाषा शिक्षणविषयक निदान, चिकित्सा व उपचार सेवा पुरविली जाते. वाक् व भाषा विशेषज्ञाबरोबरच बालरोग व मेंदूविकारतज्ज्ञ, विशेष शिक्षक व सामाजिक कार्यकत्यरंच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्यात येते. तर संस्थेकडून राबवण्यात येणा-या योजनेतून श्रवणयंत्र व कर्ण संच मोफत पुरवला जातो.

संस्थेकडून अपंग पुनर्वसन सेवांमध्ये काळानुरूप सुधारणा केल्या जातात. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकआधारित नवीन मोडय़ुल्सचा नियमित वापर करूनच पुढील संशोधनाला प्राधान्य देण्यात येते. ते नागरी आणि ग्रामीण भागातील समस्यांवर आधारित असते.त्या आधारावरच पुनर्वसन आदी उपक्रम राबवणे सोयीस्कर होते. या क्षेत्रात रुची असलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी विशेष रोजगार सेवा केंद्रांच्या माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. राज्य अपंग आर्थिक महामंडळ आणि इतर आर्थिक संस्थांकडूनही स्वयंरोजगारासाठी मदत मिळते.

संस्थेकडून राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांपैकी माहिती व प्रलेखन, विकास साधने हा भागही महत्त्वाचा आहे. संस्थेकडे असलेल्या सुसज्ज ग्रंथालयात अपंगत्व आदी विषयांवर जगातील सर्व प्रकारची पुस्तके, संदर्भग्रंथ, सीडी ऑनलाइन आणि अपंगांसाठी खास असलेल्या ‘डिसअॅबिलिटी इन्फॉर्मेशन लाइन’च्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून दिल्या जातात. तसंच ‘आयव्हीआरएस’ या संगणक प्रणालीवर आधारित देशातील विविध राज्यांतील लोकांना अपंग पुनर्वसनविषयक सेवा कशा उपलब्ध केल्या जातील, त्या कुठे मिळतील याची माहिती हिंदी आणि इंग्रजीसह त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध केली जाते. यासाठी संस्थेने देशातील कोणत्याही व्यक्तीला सहज माहिती मिळेल, अशी व्यवस्था दूरध्वनीवरून सुरू केली आहे.

अपंगत्व, कर्णबधिरता आदींची माहिती सहजपणे लक्षात यावी, यासाठी ९५हून अधिक प्रकारची छापील माहिती संस्थेने तयार केली असल्याचे या संस्थेच्या सामग्री विकास विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरूण बनिक यांनी सांगितले. यासोबतच कर्णबधिरता, त्याची कारणे, उपाय, वाक् व भाषादोष, विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, सेवा-सुविधा आणि सर्वसामान्यांनाही कळेल या भाषेत माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातात. या पुस्तिका देशातील सर्वच मुख्य भाषांत उपलब्ध आहेत. आतापर्यंत माहिती पुस्तके आणि जनजागृतीच्या सामग्रीच्या तब्बल दहा लाखांहून अधिक प्रतींचे वितरण करण्यात आले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..