नवीन लेखन...

व्याधिक्षमत्व आणि कॅन्सर

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याधिक्षमत्व (Immunity) हा विषय सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे . व्याधिक्षमत्वाचा संबंध फक्त कोरोनासारख्या इन्फेक्शनशीच नसून , कुठल्याही रोगापासून शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर उत्तम व्याधिक्षमत्व ही त्याची कवचकुंडले आहेत , मग त्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा अपवाद नाही

आयुर्वेदाने व्याधिक्षमत्व हे प्रामुख्याने तीन प्रकारचे सांगितलेले आहे .
१. सहज , २. कालज , ३. युक्तिकृत

सहज म्हणजेच जन्मजात मिळणारे ( आईने घेतलेल्या उत्तम आहार – विहार , आनुवंशिकता आदींमुळे )

कालज म्हणजे कालानुसार प्राप्त होणारे , उदाहरणार्थ तरुणपणी सर्वच लोकांचे व्याधिक्षमत्व उत्तम असते किंवा हिवाळ्याच्या काळामध्ये शरीराचे व्याधिक्षमत्व उत्तम असते . याउलट पावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्ये ते खालावलेले असते .

यातील तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे व्याधिक्षमत्व म्हणजे युक्तिकृत , हे त्या त्या व्यक्तीने योग्य प्रकारचा आहार , विहार , दिनचर्या , ऋतुचर्या इत्यादी पाळून स्वतः कमवायचे असते .

उत्तम व्याधिक्षमत्व म्हणजे , शरीराला घडवणारे जे मूळ शरीरधातू आहेत रस , रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा , शुक्र या सप्तधातूंचे बल उत्तम ठेवणे . कारण व्याधी निर्माण करणारी वेगवेगळी कारणे जेव्हा एखादी व्यक्ती सेवन करते , तेव्हा प्रथम तिच्या शरीरातील वात , पित्त , कफ हे त्रिदोष बिघडतात . हे दोष प्रमाणापेक्षा जास्त बिघडलेले असले व त्यांना प्रतिकार करण्याची शरीरातील धातूंची कुवत नसेल , तर व्यक्ती रोगाला बळी पडते . म्हणजेच रोग निर्माण करणारी कारणे जास्त प्रमाणात सेवन न करणे हे उत्तम ! जर अशी कारणे सेवन केली गेली , तरी शरीराचे मूळ धातू उत्तम राखून , या कारणांमुळे शरीरात रोग निर्माण होणार नाही , इतपत शरीराची क्षमता वाढवणे म्हणजे चांगले व्याधिक्षमत्व .

यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या , ऋतुचर्या , आहार – विहार या सर्वांचे नियम घालून दिलेले आहेत . उत्तम व्याधिक्षमत्व असणाऱ्या व्यक्तींना सहसा कॅन्सर होणार नाही आणि झालाच तर तो बरा होण्याची आणि पुन्हा न होण्याची शक्यता खूपच जास्त आहे .

प्रथम कर्करोग किंवा कॅन्सर म्हणजे नेमके काय ? हे आधुनिक वैद्यकाच्या परिभाषेत थोडेसे समजून घेऊ .

आधुनिक शास्त्रानुसार कॅन्सर म्हणजे विकृत पेशींची अमर्याद वाढ . यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत
१. प्राकृत पेशींचे विकृत पेशीत रूपांतर होणे
२. अशा विकृत पेशींची अमर्याद वाढ होणे .

डॉक्टरांना कॅन्सरची शंका आल्यापासून FNAC , BIOPSY इ . द्वारा त्याचे निश्चित निदान होणे , मग त्याची शस्त्रकर्म , केमोथेरपी इ . ट्रीटमेंट घेणे , या ट्रीटमेंट मुळे होणाऱ्या दुष्परिणामांना रुग्ण तोंड देणे . तरीही यातून पूर्ण बरे झाल्यानंतर हा रोग पुन्हा होणार नाही ना ? अशी एक टांगती तलवार कायम डोक्यावर असते . अनेक वेळा रोगाचे निदान होईपर्यंत रोग खूप पुढच्या अवस्थेत पोचलेला असतो व त्यावेळी कोणतेही उपचार उपलब्ध नसल्यामुळे येणारे नैराश्य किंवा एकदा हे सर्व दिव्य करून पूर्णपणे बरे झाल्यानंतर , पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर अशा परिस्थितीत रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक , मानसिक व शारीरिक स्थिती खालावते .

विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठः ।
चिंता ही सर्व प्रकारचे रोग वाढवण्यात सर्वश्रेष्ठ आहे , असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे . कॅन्सरच्या बाबतीत तर सतत चिंता करणे हे रोगाचे अतिशय महत्त्वाचे कारण आहे .

गेल्या ३० ते ४० वर्षात कॅन्सरचे प्रमाण समाजात भयावह पद्धतीने वाढत चाललेले दिसते आहे , त्याची नेमकी कोणती कारणे आहेत हे आपण समजून घेऊ . पारंपरिक शेतीच्या पद्धतीत गेली काही वर्षे आमूलाग्र बदल झालेला आहे .

उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी संकरित वाणे , ही संकरित वाणे मुळात दुर्बल असल्याने , त्यांना टिकवण्यासाठी कीटकनाशके , रासायनिक खते यांचा बेसुमार वापर केला जात आहे . आपण सध्या जे अन्न खातो , त्यातच काही कस नाही . मग खाणाऱ्याची प्रतिकारशक्ती कशी चांगली राहणार ? त्यात अन्नातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पोटात जाणारी रसायने , जी विषसमान आहेत . ती चांगल्या पेशीत जनुकीय बदल घडण्यासाठी व त्यांचे रूपांतर कॅन्सर पेशीत करण्यासाठी जबाबदार ठरतात .

शहरीकरणामुळे वाढलेले पाणी व हवेचे प्रदूषण, विज्ञानाने उपलब्ध झालेल्या सुखसुविधांमुळे बिघडलेली दिनचर्या , श्रमांचा अभाव , पारंपरिक आहाराची जंक फूडने घेतलेली जागा , अनावश्यक स्पर्धा , पैशाचा हव्यास व त्यातून वाढलेले मानसिक ताणतणाव , व्यसनाधीनता ही सर्वच व्याधिक्षमत्व कमी करणारी तसेच कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत ठरणारी मूलभूत कारणे आहेत .

त्यामुळे केवळ विकृत पेशींना शस्त्रकर्म करून काढून टाकणे किंवा केमोथेरपी , रेडिएशन करून नाहीसे करणे , हा अत्यंत अपुरा चिकित्सा दृष्टिकोन आहे . जीवनशैलीतील सर्वांगीण बदल हेच कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कॅन्सरच्या रुग्णांना उपशय देण्यासाठी अतिशय आवश्यक आहे .

कोणत्याही व्याधीची चिकित्सा करत असताना , त्याची कारणे दूर करणे ही चिकित्सेची पहिली पायरी आहे . त्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध करायचा असल्यास किंवा झालेला कॅन्सर लवकर बरा करायचा असल्यास वरील सर्व कारणे टाळणे , जीवनशैली सुधारणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे .

कॅन्सरच्या सध्या प्रचलित असणाऱ्या चिकित्सेमध्ये , ज्या ठिकाणी कॅन्सरची वाढ झालेली आहे ती गाठ काढून टाकली जाते आणि तो अन्य ठिकाणी पसरू नये म्हणून केमोथेरपी , रेडिएशन याद्वारे विकृत पेशी नाहीशा केल्या जातात . परंतु या चिकित्सेमध्ये वरील सर्वांगीण कारणांचा कोणताच विचार केलेला दिसत नाही . शिवाय चिकित्सा म्हणून देण्यात येणारी केमोथेरेपीची औषधेही स्वतःच विषारी असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा परिणाम म्हणून पुन्हा नवीन ठिकाणी कॅन्सर झालेला आढळतो . त्यामुळे रोगाची चिकित्सा हेच पुन्हा होणाऱ्या रोगाचे कारण ठरते .

कॅन्सरचे निदान झाल्यावर रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडून ते निदान नीट समजून घ्यावे . कॅन्सरची स्टेज , त्यावर उपलब्ध असणारे उपचार , उपचारांनी होणारे फायदे आणि तोटे , त्यासाठी येणारा खर्च , रुग्णाचे वय , रुग्णाची शारीरिक , मानसिक क्षमता , कुटुंबाचे पाठबळ या सर्वांचा डॉक्टरांबरोबर विचारविनिमय करून , मगच कोणत्या प्रकारची चिकित्सा करायची याचा निर्णय घेणे योग्य ठरते . सर्व विचारविनिमयानंतर आधुनिक चिकित्सा घेण्याचे निश्चित झाल्यास , सर्व तपासण्या होईपर्यंत जो बराच वेळ जातो , या काळात स्वस्थ बसून न राहता , त्याच वेळी आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याच्या दृष्टीनेही विचार करावा . बऱ्याच वेळा रुग्णाच्या शारीरिक , आर्थिक मर्यादा यामुळे आधुनिक उपचार करणे शक्य नसते , ग्रामीण भागात तशा सोयी उपलब्ध नसतात , काही रुग्णांना आधुनिक उपचारांचे दुष्परिणाम सहन होत नाहीत . अशा वेळेस आधुनिक चिकित्सा चालू असतानाच बरोबरीने आयुर्वेदाचे उपचार घेणे हे रुग्णाच्या वेदना कमी करणे , आयुष्य लांबवणे , आयुष्याचा दर्जा सुधारणे या दृष्टीने उत्तमरित्या सहाय्यभूत ठरू शकतात . त्यामुळे सर्व उपचार करून थकल्यानंतर , काहीच आशा उरलेली नसताना , शेवटच्या स्थितीत आयुर्वेदाकडे वळण्यापेक्षा , आधुनिक चिकित्सेच्या बरोबरीने किंवा त्याला पर्याय म्हणूनही आयुर्वेदीय उपचार सुरू करता येतात .

आधुनिक चिकित्सेचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने , आयुर्वेदाची पूरक चिकित्सा घेणारे रुग्ण , केवळ आयुर्वेद चिकित्सा घेणारे रुग्ण , आधुनिक चिकित्सा पूर्ण झाल्यावर रोग पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आयुर्वेद चिकित्सा घेणारे रुग्ण अशा सर्व प्रकारच्या अवस्थांमध्ये रुग्णांना दिलेले उपचार फायदेशीर ठरतात , असा अनेक नामांकित वैद्यांचा अनुभव आहे .

शरीरातील दोष , धातू आणि अग्नी यांची साम्यावस्था व आत्मा , इंद्रिय , व मन यांची प्रसन्न अवस्था म्हणजेच संपूर्ण स्वास्थ्य कॅन्सरमध्ये शरीरातील काही ठिकाणी धातूंची निर्मिती , विभाजन , परिपक्वता या स्तरावर मोठा बिघाड झालेला असतो . हा बिघाड पूर्णपणे दुरुस्त करणे शक्य नसले , तरी शरीराचे संतुलन प्राप्त करण्यासाठी योग्य औषध , आहार , पंचकर्म , रसायन , मानस चिकित्सा या सर्वच उपचारांचा उपयोग करावा लागतो .

वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये अनेक प्रकारची लक्षणे निर्माण होतात , उदाहरणार्थ ताप , खोकला , रक्तस्राव आदी लक्षणे कमी करून ; रुग्णाला आराम देणारी , अनेक उत्तम औषधे आयुर्वेदात आहेत . त्यालाच शमन चिकित्सा म्हणतात . उदाहरणार्थ रक्तस्रावात दूर्वा , नागकेशर , खोकल्यामध्ये सितोपलादि चूर्ण , अडुळसा , ज्वरामध्ये सुदर्शन घनवटी इत्यादी .

केमोथेरपी किंवा रेडिएशन घेणाऱ्या रुग्णात केस गळणे , त्वचेचा दाह , रक्तातील पांढऱ्या आणि लाल पेशींचे प्रमाण घटणे असे दुष्परिणाम होतात . या काळात शरीरातील निरोगी पेशींचे बल रक्षण करणारी रसायन औषधे अतिशय उपयुक्त ठरतात . उदाहरणार्थ आवळा , गुळवेल , शतावरी इत्यादी .

रोगाचे बल , अवस्था यांचा विचार करून पंचकर्माचा प्रयोग करणे हितकर ठरते . अभ्यंग ( सर्वांगाला तेलाचा मसाज करणे ) , स्वेदन ( औषधी द्रव्यांनी शेक देणे ) ही पूर्वकर्मे व गरज असेल त्यानुसार वमन ( उलटी करवून दोष काढणे ) , विरेचन ( जुलाब देणे ) , औषधी तेल आणि काढ्यांची बस्ती देणे , नस्य ( नाकात औषध टाकणे ) आणि रक्तमोक्षण ( जळवा किंवा सिरिंजद्वारे रक्त काही प्रमाणात काढून टाकणे ) ही पंचकर्मे , पुन्हा पुन्हा रोग होऊ नये या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतात .

कॅन्सर ही शरीरातील धातूंच्या विकृतीमुळे होणारी व्याधी आहे . त्यामुळे धातूंचे बल वाढवणारा , शरीराचे व्याधि क्षमत्व वाढवणारा असा आहार घेणे सर्वांनीच व विशेषतः कॅन्सर रुग्णांनी घेणे अत्यावश्यक आहे . सेंद्रिय पद्धतींनी पिकवलेले अन्नधान्य विशेषतः कमी पॉलिशचे जुने तांदूळ , लाल साळी , सालीसकटच्या डाळी , मूग , सेंद्रिय फळभाज्या , स्थानिक व ऋतुनुसार मिळणारी फळे , देशी गायीचे दूध , देशी गायीचे तूप , तिळाचे तेल , सैंधव मीठ , काळ्या मनुका , खजूर , अंजीर , आवळा , डाळिंब , आले , पुदिना , कोथिंबीर , एरंडेल , मध , गोमूत्र , सोने घालून उकळलेले पाणी आदीचा वापर वैद्यांच्या सल्ल्यानुसार आहारात करणे हे कॅन्सर रुग्णांसाठी परम हितकर आहे .

रुग्णाच्या मनाला आनंददायी वाटेल असे वातावरण आजूबाजूला असणे अतिशय गरजेचे आहे . वरील उपायांमुळे रुग्णाचे व्याधिक्षमत्व टिकून राहते व रोगाचे बल कमी होते . रुग्णाचा जीवनकाल वाढणे , जीवन सुखकर होणे , कॅन्सर चिकित्सेचे दुष्परिणाम कमी करणे , या सर्वच बाबतीत आयुर्वेद चिकित्सा कॅन्सर रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरते .

रुग्णाने आपल्या रोगाचे जास्तीत जास्त शास्त्रीय ज्ञान प्राप्त करून , आपण घेत असलेल्या चिकित्सेवर पूर्णपणे विश्वास ठेवून , चिकित्सेच्या मर्यादांचे भान ठेवून , योग्य चिकित्सा घेतल्यास , रुग्णाला स्वतःच्या जीवनात आयुर्वेदाच्या माध्यमातून आनंद नक्की फुलवता येतो .

वैद्य उर्मिला पिटकर
सेवाधाम क्लिनिक ,
मुंबई
९८२०३३९५४८

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..