नवीन लेखन...

वीर सावरकर – स्वातंत्र्य क्रांतिकारकाचे महामेरू

सावरकर कुटुंब मूळचे कोकणातील, गुहागर जवळील सावरी गावाचे, त्या गावात सावरीची खूप झाडे होती त्यामुळे त्याचा अपभ्रंश सावर झाला. सावरचे म्हणून सावरकर. पण त्यांचे पूर्वज पेशव्यांचा दरबारात रुजू झाले. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यानी सावरकर कुटुंबाला नाशिक जवळील भगुर गांव वतन म्हणून दिले. त्याच बरोबर एक तलवार व एक अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती मिळाली. त्याची स्थापना देवघरात करण्यात आली. याच भगुर येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला. दामोदर यांना तीन मुलगे, पहिले गणेश म्हणजेच बाबाराव, मधले विनायक म्हणजेच तात्याराव व धाकटे नारायण. बाबरावांचा ओढा पहिल्यापासून क्रांतिकडे होता. त्यामुळे वीर सावरकरांची साहजिकच क्रांतिकडे ओढ होती. त्यानी शाळकरी वयातच मित्रमेळा संघटना सरू केली व आपल्या वक्तृत्व व संघटन कौशल्याच्या जोरावर त्यानी धाडसी व हुशार विद्यार्थ्याना यात आकृष्ट केले.पालक मुलांना ब्रिटिश सरकारच्या भीतीने तिथे पाठवण्यास घाबरत पण सावरकर त्यांना पाटवुन देत की हे किती महत्वाच आहे १९०४ रोजी सावरकरांनी वेगवेगळ्या ठिकाणचे २०० कार्यकर्ते घेऊन एक संघटना केली ती म्हणजे अभिनव भारत . हे मित्रमेळाचे राजकीय रूपांतर होते.

. त्यांचे वक्तृत्व लहानपणापासून उत्तम होते. त्यांची प्रतिभा सुद्धा उत्तम होती. त्यानी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. त्यांचे भाषण झाले. ते श्रोत्यांना व परीक्षकांना खूप आवडले टाळ्यांचा कडकडाट झाला. पण एका परीक्षकांना ते खटकले त्यानी बोलून दाखवले.

“ बाळ हि वक्तृत्व स्पर्धा आहे दुसऱ्यांनी लिहून दिलेले, भाषण पाठ करणे नाही इतक्या लहान वयात हे लिहिता येणार नाही “
सावरकर यांनी उत्तर दिले की “ हे मीच लिहिले आहे , उद्या म्हणाल की ज्ञानेश्वर वयाने लहान होते म्हणून काय त्यानी ज्ञानेश्वरी लिहिलीच नाही काय ? मला दूसरा कोणताही विषय द्या मी तितक्याच उत्तम पद्धतीने बोलून दाखविन.”

त्यांना दूसरा विषय दिला सावरकरांनी थोडी तयारी करुन पुन्हा भाषण केले. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. सावरकरना प्रथम पारितोषिक देण्यात आले.सावरकर लहानपणापासूनच फटका रचत , हुतात्मा चापेकर यांच्यावर त्यानी फटका रचला. पोवाडे आरत्या रचत असत.शिवाजी महाराजावर आरती रचली . पुढे एका भाषणात आचार्य अत्रे म्हणाले “ आठ रसानंतर वीर सावरकर यांनी नववा देशभक्ती रस जन्माला घातला.” अत्रे यांना आचार्य उपाधी सावरकर यांनी दिली . सावरकर यांनी वयाच्या केवळ विसाव्या वर्षी जयोस्तुते, संस्कृत प्रचुर काव्य रचले. सावरकर यांनी प्रणायामाचा देखील उत्तम अभ्यास केला होता. मूलबंध, ऊडियान बंध व जालन्धर बंध यांचा उत्तम सराव केला होता.तसेच अतिशय कठीण असा कुंडलिनी जागृत करण्याचा सुद्धा अभ्यास केला होता , यांचा उपयोग त्यांना अंदमान मधील हाल अपेष्टा सोसताना झाला. ध्यान धारणा यामुळे अंदमानात त्यांना मन एकाग्र करून आत्महत्येच्या विचारांवर मात करण्यासाठी झाला. सावरकर अगदी बालवया पासून पंचाहातरी होई पर्यन्त अखंड लिखाण करत असत. बालपणी त्यांचे गाजलेले लेखन म्हणजे “स्वदेशीचा फटका “ सिंहगडाचा पोवाडा “ सर्व पेशव्यात थोर पेशवे कोण “ ऐतिहासिक पुरूषांचे उत्सव का करावेत “ वंदे मातरंम इत्यादि.

सावरकर यांचे मातापिता प्लेगच्या साथीत गेले. लहान भाऊ नारायण म्हणजे बाळ याला सुद्धा प्लेग झाला.त्याना नाशिक येथील रुग्णालयात ठेवले होते आणि सेवेसाठी बाबाराव सुद्धा होते.सावरकर त्यांच्या साठी घरून डबा घेऊन भगुर ते नाशिक चालत जात असत. संध्याकाळी तर रस्ता अगदी रिकामा असे, चिटपाखरू देखील तेथे नसे स्मशान शांतता पसरलेली असे.असे सुमारे दोन तीन महीने चालले होते. सावरकर केवळ तेरा चौदा वर्षांचे होते.तशीच पुण्यात प्लेगची मोठी साथ आली.लोकांना घराबाहेर काढण्याची आज्ञा कामिशनर Rand ने दिली त्याचा परिणाम म्हणून पुणेकरांवर अतिशय अत्याचार केले गेले, बूट घालून देवघरात जाणे, तपासणीच्या नावाखाली बायकांचा विनयभंग करणे, घरातील भांडी बाहेर फेकणे असे प्रकार सुरू केले. या प्रकाराबद्दल टिळकांनी केसरी मधून घणाघाती लेख लिहिले. ते वाचून चापेकर बंधूनचे रक्त खवळले. त्यानी Rand साहेबाचा खून करण्याचा कट रचला.. त्या काळी वर्तमान पत्र प्रत्येकाच्या घरी येत नसे. एखादी प्रतिष्ठित व्यकती असेल त्याच्या घरी ते येत असे . सावरकर ते वर्तमान पत्र मित्रमेळा या त्यांच्या संघटनेतील विद्यार्थ्याना वाचून दाखवत . असेच एके दिवशी वर्तमान पत्रात छापून आले की दामोदर चापेकर यांनी साहेबाला गणेशखिंडीत गाठून त्याच्यावर २२ जून १८९७ ला गोळ्या झाडल्या याचा परिणाम म्हणून चापेकर बंधुना व महादेव रानडे याना मे १८९९ मध्ये फाशी देण्यात आले यांचा खोल परिणाम सावरकरांवर झाला.इंग्रज सरकार अश्या दुष्टबुद्धीने वागत असेल तर आपण त्यांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांति उभारली पाहिजे . म्हणून सावरकरांनी घरातील अष्टभुजा देवीसमोर “स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता झुंजण्याची “ शपथ घेतली.इकडे ब्रिटिशांनी बाबरावांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. आणि त्यांची रवानगी अंदमानात केली. त्यांचे माता पिता वारले होते. धाकटे नारायण राव वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकाता येथे गेले होते. घरात येसु वाहिनी व विनायक असे दोघेच होते.वतानदारी संपुष्टात आली होती. तशात घरी कमावते कोणी नाही. येसु वाहिनी आपले एक एक दागिने विकून घर चालवत होत्या. त्यानी आपल्या भरजरी शालूचा त्याग केला कारण तो विदेशी होता. त्यांच्या कडे फक्त लग्नात आईने दिलेली नथ होती. सावरकर यांना मॅट्रिकच्या परीक्षेसाठी फी भरण्याचे पैसे नव्हते तेव्हा येसु वाहिनी नी मागचा पुढचा विचार न करता ती नथ विकून फी चे पैसे भरले.

सांवरकरांसमोर दोन आदर्श होते. शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक.नाशिकला त्यांचे मॅट्रिक पर्यन्त शिक्षण झाले. त्यामुळे पदवी शिक्षणासाठी सावरकर पुण्याला आले. तो पर्यन्त त्यांचे लग्न झाले त्यांचे लग्न ठाणे जिलहयातील जव्हार संस्थानाचे दिवाण रामचंद्र चिपळूणकर यांची कन्या यशोदाशी झाले .त्यांचा उद्देश होता की जावई विलायतेला शिकून मुलीला सुखात ठेवील.पण आपल्या मुलीच्या वाट्याला काय भोग आहेत यांची त्याना कल्पना नव्हती.

पुण्यात ते टिळकांच्या संपर्कात आले. ते तर सावरकर यांचे आदर्श होतेच. त्यावेळी पुण्यात विदेशी कपड्यावर बहिष्काराची चळवळ जोरात होती. सावरकरांनी बहिष्कार चळवळीचे नेतृत्व करायचे ठरवले . दसऱ्याच्या दिवशी विदेशी कपड्यांची होळी करण्याचे ठरले. सावरकर यांनी लोकमान्य टिळकांना प्रमुख म्हणून बोलावले. पण टिळकांनी अट घातली की “ भरपूर कपडे जाळणार असाल तरच मी येईन . सारे त्याला तयार झाले मिरवणूक निघाली. लकडी पूलांशी मिरवणूक थांबली. तिथे टिळक व इतर नेत्यांची भाषणे झाली.व जमा केलेल्या साऱ्या विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली. या प्रकरणाने ब्रिटिश सरकार खवळले. त्या वेळचे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रॅनगलर परांजपे यांनी सावरकरांना दहा रुपये दंड केला. सावरकर यांच्या वर्गमित्रांनी फंड गोळा केला. त्यातील दहा रुपये दंड सावरकरांनी भरला, व इतर पैसे पैसा फन्डाला वाटले. पदवी मिळाल्यावर त्यानी बॅरिस्टर ची पदवी मिळवण्यासाठी लंडनला जाण्याची ईछा टिळकांशी व्यक्त केली.त्याना ब्रिटिश कायद्याचा अभ्यास करून ब्रिटिशांशी लढायचे होते. टिळकांनी भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणाऱ्या ब्रिटन मधील एक मान्यवर शामजी वर्मा जे भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असत. त्यांना सावरकर यांच्यासाठी चिठी लिहून दिली. सावरकर बोटीतून लंडन साठी रवाना झाले.खरे तर ते बॅरीस्टरी शिकण्यापेक्षा तेथील कायद्याचा अभ्यास करून तो तोच इंग्रजांच्या विरुद्ध वापरायचा व तेथील भारतीय विद्यार्थ्याना संघटित करून त्यांना ब्रिटिशयाविरुद्ध लढायला प्रोत्साहित करायचे हा उद्देश होता, . पण ब्रिटीशांना त्यांची पार्श्वभूमी माहिती असल्याने ब्रिटिशानी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली.लंडनला ते लंडन हाऊस मध्ये राहू लागले.( ज्या ब्रिटिशयाविरुद्ध सावरकर आयुष्यभर लढले त्या ब्रिटिशांनी लंडन हाऊस वर भारतीय देशभक्त व विचारवंत विनायक दामोदर सावरकर इथे रहात होते अशी पाटी लावली आहे ) (सावरकर चुकीच्या देशात जन्माला आले . ते जर युरोपात जन्माला आले असते तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते.)

लंडन मध्ये रहात असताना त्यांच्या लक्षात आले, की आजवर आपल्याला १८५७ चा इतिहास बंड म्हणून शिकवले जाते. म्हणून त्यानी त्याचा अभ्यास करायचे ठरवले. तासन्तास वाचन करून आणि लायब्ररीत दस्तऐवजाचा अभ्यास करून त्यानी एक पुस्तक लिहिले १८५७ चे स्वातंत्र्यसमर त्यात त्यानी पुराव्यासहित सप्रमाण सिद्ध केले की १९५७ चे बंड नव्हते तर ते एक स्वातंत्र्य समर होते.हे पुस्तक मराठीत होते. पण या पुस्तकाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही म्हणून सावरकर यांनी त्या पुस्तकांची एक कॉपी आपले मित्र डॉक्टर कुटीन्ह्ओ यांच्या कडे सोपवली ते सुद्धा मोठे देशभक्त , त्यानी हि कॉपी ४० वर्षे जपून ठेवली स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ती कॉपी सावरकर यांच्याकडे पोहोचेल यांची खात्री झाल्यावर ती सावरकर यांच्याकडे पाठवली ( यासाठी डॉक्टर कुटीन्ह्ओ यांना कोपरांपासून नमन करायला हवे.) .

१८५७ चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक भारतात पाठवण्यात आले पण ते छापायला ब्रिटिशांनी बंदी आणली. पुढे त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले व हॉलंड मध्ये छापले. भगतसिंग, सुभाषबाबू यांनी त्याच्या प्रती काढून त्यांच्या अनुयायांमध्ये वाटल्या . या पुस्तकांमध्ये मेरठ, दिल्ली , झाशी व इतर अनेक शहरात झालेल्या क्रांतीचा आढावा घेतला आहे. हे पुस्तक चार भागात विभागले आहेत ज्वालामुखी, स्फोट, अग्निकल्लोळ, व पूर्णाहुति. त्यात त्यानी मंगल पांडे , तात्या टोपे, कुवरसिंग , अमरसिंग, राणी लक्ष्मी बाई यांनी दिलेल्या लढ्याचा व शौर्याचा सप्रमाण आढावा घेतला आहे. १८५७ च्या समराचा शेवट तात्या टोपे यांच्या फाशीने झाला त्या बद्दल सावरकर म्हणाले होते. ”तात्या तुम्ही या दुर्दैवी देशात का जन्माला आलात ? या नीच व महांमूर्ख नी विश्वासघातकी लोकांकरता कश्या साठी लढलात ? तात्या आज आम्ही आपणासाठी अश्रु ढाळत आहोत ते तुम्हाला काय ? या दुर्बळ लोकांच्या अश्रु सांडावे हा कसला महाग सौदा ?” ( सावरकर यांच्या बाबतीत तरी काय वेगळे काय घडले.) ब्रिटश सरकारने सहाजिकच १८५७ एक स्वातंत्र्य समर यया पुस्तकावर त्यावर बंदी आणली.

त्याच सुमारास त्यांचा वाचनात इटलीच्या मेजेनीचे चरित्र आले.त्याने यंग इटली हि चळवळ सुरू केली त्याने इटलीत क्रांति घडवून आणली.त्यासाठी त्याने गनिमी काव्याचा वापर केला. त्या आधी इटली तुकड्यात विभागली होती. त्याला त्याने एक राष्ट्र बनवले आणि इटली हे एक अखंड स्वतंत्र राष्ट्र बनले त्याच्या युद्धनीतीने इटलीला मिळालेले स्वतंत्र वाचून सावरकर खूप भारावून गेले. ते त्याला आपले आदर्श मानू लागले. त्यानी मेजेनी हे पुस्तक लिहिले.सावरकर यांच्या वकतृत्वाने सारेच प्रभावित होत असत. एक दिवस ते चर्चा करत असताना तेथे विदेशी कपडे घातलेला, अत्तर लावलेला पंजाबी मुलगा आला.तो पूर्णपणे विदेशी बनला होता त्याचे नाव मदनलाल धिंगरा . तो म्हणाला
“ मी तुमच्यासोबत काम करू का ? “
सावरकरांनी त्याची परीक्षा पाहिली. म्हणाले “ या जळत्या मेणबत्तीवर हात ठेव व मी सांगेपर्यंत काढू नको “ त्याने हात ठेवला व सावरकरांनी सांगेपर्यंत काढला नाही . त्याचा तळहात सोलून निघाला होता. आता तो क्रांतिकारक बनला होता. पुढे त्याने कर्जन वायली चा खून करून १९ ऑगस्ट १९०९ रोजी फासावर गेला.पण त्या आधी हिन्दी लोकांची मदनलाल धिंगरांचा निषेध करणारी सभा भरवली आणि त्यात धिंगरांचा निषेध सार्वमताने पास करण्याचे ठरवले पण सावरकर उठून उभे राहिले व म्हणाले

“माझा याला विरोध आहे.” यात झटापट झाली व सावरकरांना इजा झाली पण ते तिथेच थांबले . एक दिवस सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सावरकर यांच्या खोलीत दिवा चालू असलेला दिसला. ते व मित्र खोलीत आले तेव्हा कीर्तिकर नावाचा विद्यार्थी काहीतरी शोधत असल्याचे आढळले. सावरकर यांच्या सहकाऱ्यांनी त्याला मारायचे ठरवले पण सावरकर मध्ये पडले . त्यानी विचारले

“हे का करतोस ?” त्याने उत्तर दिले की
” मी लंडनला आलो आहे पण माझ्याकडे शिष्यवृत्ती नाही त्यामुळे इंग्रजांनी सांगितले तू सावरकर यांची माहिती काढ, आम्ही तुझ्या शिक्षणाचा खर्च करू “ सावरकर म्हणाले

“ आता आम्ही तुला सोडतो पण तू उलट करायचे “ ब्रिटिशांची माहिती आम्हाला द्यायची व आमच्या बद्दल खोटी माहिती ब्रिटीशांना कळवायची “.
पुढे सावरकर यांनचे बॉम्ब तयार करणे, इंग्रजी कादंबरी घेऊन त्यात पिस्तूल घालून भारतात पाठवणे अशी कामे चालूच होती. त्यातील एका पिस्तुलाने अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला मारले असा दाट संशय इंग्रजांना होता. इथे भगुरच्या मालमत्तेवर ब्रिटिशांनी टाच आणली. त्यांच्या घरच्याना जगाने कठीण झाले. त्यांचे नातलग व मित्रपरिचित सुद्धा ब्रिटिशांच्या धाकामुळे मदत कारीनासे झाले. लंडन मध्ये इंग्रज पोलिस मागावर होते म्हणून सावरकर फ्रांसला निघून गेले. तिथे त्यांच्या मदतीला मॅडम कामा व श्यामजी वर्मा होते.मॅडम कामा “बंदे मातरम” व श्यामजी वर्मा “सोशयालिस्ट” हि नियतकालिके चालवत होते व त्यातून ब्रिटिश सरकारवर आग ओकत होते. पण ते फ्रांस मध्ये असल्यामुळे ब्रिटिश काही करू शकत नव्हते. मॅडम कामांची फ्रांस सरकारात चांगली ऊठबस होती. इथे लंडन मध्ये सावरकर यांच्या सहकाऱ्यांची धरपकड होत होती. ती सहन न होऊन ते पुन्हा इंग्लंडला यायला निघाले. मॅडम कामा व वर्मा यांनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला परोपरीने समजावले की” तुम्ही ज्या क्षणी ब्रिटन मध्ये पाऊल ठेवाल त्याक्षणी तुम्हाला अटक होईल “ पण त्यानी ऐकले नाही.जाताना ते एव्हढेच म्हणाले.

“ योग असेल तर आपली मारसेलीस येथे भेट होईल.”
लंडनला येताच त्यांना अटक झाली व असे ठरले की खटला भारतात चालवायचा.कारण तो जर इंग्लंड मध्ये चालवला तर सावरकरांना शिक्षा इंग्लंड मध्येच द्यावी लागली असती. तुरुंगात त्यांचे जिवलग मित्र श्री अय्यर यांनी सावरकरांची भेट घेतली.व गुप्त वार्तालाप केला. त्यांना घेऊन मोरिया बोट भारताच्या दिशेने निघाली. ब्रिटनच्या स्कॉटलंड यारड् या गुप्तहेर संघटनेने फ्रान्सच्या पोलिसांना निरोप दिला की सावरकर यांच्या मित्रांवर पाळत ठेवा. बोट सुटायच्या आधी काही दिवस स्कॉटलंड यारड् ने कळवले की बोट मारसेलीस बंदरात थांबेल. हि गुप्त वार्ता सावरकर यांचे मित्र श्री अय्यर यांना समजली. १ जुलै ला बोट लंडनहून सावरकर यांना घेऊन निघाली. सावरकर यांनी शौचकूप यांच्या खिडक्या कश्या असतात त्याची पहाणी करून ठेवली. त्याला नुसतीच काच होती. लोखंडी जाळी नव्हती. बोट मारसेलीस च्या बंदराजवळ थांबली. याचा फायदा घेत त्यानी पहारेकऱ्याला सांगितले
“ मला शौचास जायचे आहे.”

आता शौचालयास लागली म्हणून बेड्या काढाव्या लागल्या. शौच कुपात आल्यावर त्यानी आतून दरवाजा घट्ट लावून घेतला आणि दरवाजाच्या काचेवर अंगरखा टांगला. कुपाची काच फोडली किनाऱ्याकडे पोहत निघाले.बराच वेळ झाला सावरकर बाहेर येत नाही हे पाहून त्याने दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. प्रतिसाद मिळत नाही हे पाहून त्याने आरडाओरडा केला . तेव्हा डेकवरील पहारेकऱ्यांना सावरकर पोहून किनाऱ्याच्या दिशेने जाताना दिसले त्यामागोमाग पहारेकरी निघाले.मारसेलीस बंदरात आल्यावर त्यानी इंग्रजीत सांगितले
” मला अटक करा.” त्या मागोमाग पहारेकरी चोर चोर असे ओरडत आले पण लाच घेत पोलिसांनी त्यांना ब्रिटशनच्या हवाली केले. आणि दुर्दैव असे की त्यांना सोडवण्यासाठी येणारी श्री अय्यर. यांची गाडी मध्येच बंद पडली व ते वेळेवर पोहचू शकले नाहीत .ते वेळेवर पोहोचले असते तर आज चित्र वेगळे असते.

भारतात त्यांच्यावर खटला भरण्याचे नाटक झाले. निकाल आधीच ठरला होता त्याना दोन काळ्यापाण्याची शिक्षा झाली. सहसा असा नियम असतो की जर एखाद्याला दोन शिक्षा झाल्या असतील तर दोन्ही शिक्षा एकत्रच भोगायच्या असतात. पण सावरकर यांना मात्र पंचवीस वर्षाच्या दोन जन्मठेप दिल्या आणि त्याही भारताच्या बाहेर अंदमानात व त्याहि एक संपल्यावर दुसरी कारण ब्रिटीशांना भीती होती की जर सावरकर लवकर सुटले तर आपल्या विरुद्ध कट रचतील .त्या वेळी सावरकर म्हणाले “ दोन जन्मठेपेच्या शिक्षा म्हणजे ब्रिटीशांना सुद्धा पुनर्जन्म असतो यांच्यावर विश्वास आहे तर “ तुरुंगातच त्यांची व पत्नीची शेवटची भेट झाली. त्या भेटीत ते तिला म्हणाले…

“चार काटक्या गोळा करून घरटी बांधणे नी मुलांची वीण वाढवणे यालाच जर संसार म्हणायचे असेल. तर आपला संसार कावळे चिमण्याहि करतात. पण मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण कृतकृत्य झालो. आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली , पण त्यामुळेच पुढेमागे हजारोच्या घरी कदाचित सोन्याचा धूर निघेल. “१९१० सावरकरना अटक झाली. कोठडीत त्यांना मित्र भेटायला गेले. तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले.” प्राप्त परिस्थितीचा विचार करता तक्रार करण्यासारखे काही नाही. मला अंदमानात नेले तर माझ्या वडील बंधुचे दर्शन होईल “. एक महिन्यानंतर सावरकरांना डोंगरीहून भायखळा येथील तुरुंगात नेण्यात आले. तिथेच जॅक्सन हत्या कटातील ज. ना . थत्ते शिक्षा भोगत होते. एका वॉर्डरच्या मदतीने त्यांना सावरकरांशी गुप्त भेट घेता आली. त्यांच्या हाता पायात बेडी होत्या. पण त्यांची निर्भय व प्रसन्न वृत्ती पाहून थत्ते अचंबित झाले त्यांनी सावरकरांना झालेल्या शिक्षेचा धिक्कार केला पण त्यावर सावरकर म्हणाले.”चापेकर, धिंगरा, कान्हेरे , अश्या थोरानी आपले बलिदान दिले त्यांच्या पुढे मी कोण ?”

सावरकर यांची ब्रिटीशांना इतकी भीती होती की बाकी कैदयाना फक्त बेड्या घालून नेले जाई पण सावरकर यांना कडेकोट बंदोबस्तात नेले जाई. सावरकरांना गाडीने मद्रासला नेण्यात आले.नेताना हातांपायात बेड्या होत्याच, शिवाय त्यांच्या डब्याच्या सर्व खिडक्या लावून घेण्यात आल्या तेथून त्यांना महाराजा बोटीतून अंदमानला नेण्यात आले. बोटीतून उतरताना सुद्धा त्यांच्या हातांपायात बेड्या होत्या.तशाही अवस्थेत सावरकर म्हणाले “ स्वतंत्र भारतात अंदमान उत्तम लष्करी तळ होईल.” त्यांना सेल्युलर तुरुंगाच्या सात क्रमांकाच्या इमारतीत ठेवण्यात आले होते.सावरकरांना दिलेल्या बिल्यावर “डी” असे कोरले होते त्याचा अर्थ डेंजर असा होता. २४ /१२/ १९१० ते २३/ १२ /१९६० बिल्ला क्रमांक ३२७७८.असे लिहिले होते. त्यांना प्रथम नारळाची साले सोलण्याचे काम देण्यात आले.नंतर त्यांना घाण्याला जुंपले जाई. अंदमानात पहिल्या दिवशी आंघोळ करण्यासाठी लंगोटी देण्यात आली.सावरकर मनात म्हणाले “ अरे रामदास स्वामी तर आयुष्यभर लंगोटीच नेसत असत तर मी कोण त्यांच्यापुढे कोण ?” . कोलुचा दांडा फिरवून ३० पौंड तेल काढावेच लागे. कधी थकल्यावर नुसत्या हाताने कोलू ढकलला जात नसे तेव्हा त्याला लोंबकळून तेल काढावे लागे. थोडेसे थांबले तरी जमादार ओरडे “बैठओ मत पुरा तेल निकालनाही पडेगा “पांच वाजेपर्यंत तेल काढावेच लागे.अंग ठणके चक्कर येई, ३० पौंड नाही निघाले तर लाथा बुक्के यांनी तुडवले जाई.हे काम करताना इतरांशी बोलले किंवा खाणाखुणा केल्या तर सांखळदंडाला बांधून वेताचे फटके पाठीवर मारले जात.पाठ रक्तबंबाळ होत असे.जेवणात कच्या रोटया, रानटी झाडांची भाजी असे. त्यात असंख्य अळ्या असत.अर्धाकचा भात खावा लागे. रॉकेल युक्त कांजी महिन्यात दोनदा मिळे. रात्री ७ x ११ च्या खोलीत डांबले जाई. तेथे विधी करण्यासाठी एकच भांडे असे.रात्रभर अंग ठणकत असे. काही दिवसांनी त्यांना दोरखंड वळण्याचे काम दिले. सावरकर व इतर कैदी यांचा संपर्क होणार नाही.यांची काळजी घेतली जाई.

सगळ्यात कठीण त्रास म्हणजे मलमूत्र अवरोध धरायचे काम दुपार व संध्याकाळ या व्यतिरिक्त शौचास जाता येत नसे.संध्याकाळी सहा सात वाजता कोंडले जाई ते सकाळी बाहेर काढत. लघवी साठी एक मडके दिले जाई.रात्रीत कोणालाही शौचास लागता कामा नये अशी जेलर बारीची ताकीद असे. लघविला दिलेले मडके अगदी लहान असे. सकाळ पर्यन्त मलावरोध धरून थांबलेच पाहिजे. अंदमानात असताना उल्हासकर दत्त यांच्या बंडाच प्रकरण झाले, तो आजारी पडला त्याच्या अंगात १०७ ताप होता त्याच्याच्याने काम करवेना, पण तो आजारपणाच ढोंग करतोय असे सांगून त्याला विजेची पेटी लावून विजेचे धक्के दिले.तो तीन दिवस बेशुध्द होता. त्याला वेड लागले तेव्हा बंदिपाल बारी सावरकरांना म्हणाला “ तुम्हाला कधी वेड लागणार ?”सावरकर म्हणाले “तुम्हाला वेड लागल्यानंतर” पुढे ते म्हणाले “ मागे इंदुभूषण राय याने गळफास लाऊन घेतला तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात, त्याने वेडाच्या भरात कृत्य केले.उल्हासला वेड लागले त्याचे कारण असह्य कष्ट होते.” बारी म्हणाला, ” तो काम चुकवण्यासाठी ढोंग करतोय “ सावरकर म्हणाले “ जर उल्हासकरला वेड नसेल लागले तर तुम्हाला लागले असेल, तुम्ही राजबंद कैद्यांचा छळ थांबला नाहीत तर आम्हाला संप करावा लागेल “ बारीसारख्या क्रूरकर्माला बंदिवासात असताना सुनावणे हि सोपी गोष्ट नव्हती.

वॉर्डर् पठाण असे.त्याच्या हाताखाली हिंदू असत. ते त्यांच्यावर काफर म्हणून डाफरत. १८५७ च्या बंडातिल कैदी जीवंत परत जात नव्हते हे ऐकून सावरकर यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण त्यानी स्वताला सावरले. हिंदू बंदिवान बाटवून मुसलमान केले आहेत हे सावरकर यांच्या लक्षात आले. कारण काय तर तो मुसलमान कैदयासोबत जेवला व त्याचे हिंदू कैदयाना विशेष वाटत नसे.. १९१३ साली सावरकरांनी पुढाकार घेऊन बाटवणाऱ्या विरुद्ध खटला भरवला. म्हणून गुंडांनी सावरकरांवर हल्ला करायचा प्रयत्न केला. पण या चळवळीने अंदमानातील नवे हिंदू बाटवणे अशक्य झाले. पण पूर्वी बाटलेले हिदू आता सावरकर शुद्ध करून घेऊ लागले. ख्रिस्ती झालेले सुद्धा हिंदू करून घेऊ लागले. सावरकर आता तेथील कैद्यांना साक्षर करू लागले. अनेक जण जे गुंड येथे शिक्षा भोगत होते ते आता थोडेसे लिहू वाचू लागले. त्यामुळे ते सावरकर याना बडे बाबू म्हणून मान देवू लागले.

बाबाराव सावरकर सुद्धा सेल्युलर तुरुंगात होते पण त्यांची व सावरकरांची भेट झाली नव्हती. एका संध्याकाळी वॉर्डरने कैद्यांनी आपली कामे दाखवायच्या निमित्ताने दोघांची भेट घडवली. त्यावेळी बाबारावांना आश्चर्य वाटले त्यानी विचारले
“ तात्या तू इथे कसा ?”

पुढे काही दिवसांनी बाबरावांची गुप्त चिठी सावरकरांच्या हाती पडली. मध्यंतरी काय घडले होते याची बाबारावांना काहीच कल्पना नव्हती.त्यात त्यानी लिहिले होते ” तू अजून बाहेरच आहेस आणि फ्रांसमधून कार्य करत आहेस हेच मी समजत होतो. या एका आशेवर मला शिक्षा झाली ती मी समाधानात भोगत होतो. तुझ्या ज्ञानाचे, कार्याचे काय होणार आणि नारायणाचे सुद्धा काय होईल. तू इथे आला आहेस याच्यावर विश्वासच बसत नाही.” या चिठीला काय उत्तर द्यावे हे त्यांना समजत नव्हते.

सावरकरांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.त्यांचे मन व बुद्धी यांच्यात द्वन्द्व सुरू झाले. खिडकीला टांगून गळफास घेणारे कैदी त्यांनी पाहिले होते.पण बुद्धीने मनावर मात केली आणि त्यानी आत्महत्येचा विचार सोडून दिला. भगूरला अष्टभुजा देवीसमोर घेतलेली शपथ अशीच व्यर्थ घालवायची का ? मन एकाग्र करून त्यानी एक मार्ग शोधला. हातात लेखणी नाही, कागद नाही म्हणून त्यानी खिळे, व टोकदार वस्तुनि कोठडीच्या भिंतीवर कमला नावाचे महाकाव्य लिहायला सुरुवात केली. लिहायचे व पाठ करायचे . कोठडीला सेफदी केली की नव्याने पुढे लिहायला सुरुवात करायची. अनेक प्रयत्न करून पत्रव्यवहार करून १९१९ साली तीन भावांना भेटण्याची परवानगी मिळाली. १९०६ नंतर ते आत्ता भेटत होते.सावरकर व त्यांच्या पत्नीला भेटीची वेळ केवळ अर्धा तास मिळाली. त्यानंतर ताबडतोब सावरकर कुटुंबीयांना पोर्ट ब्लेयर वरून बोटीतून भारतात धाडण्यात आले. ब्रिटिशना सावरकर यांची इतकी भीती वाटत होती की न जाणे या लोकांनी टेहळणी करून समुद्र मार्गे किंवा विमान मार्गे सावरकरांची सुटका केली तर काय करायचे. (आज जे सावरकर यांच्यावर थंड हवेत बसून वेडेवाकडे लिहितात त्यानी जरा अंदमानला जाऊन यावे. किमान रत्नागिरीच्या तुरुंगात जावे..) इथेच त्यांना हिंदूच्या हितासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले.

सर्व शारीरिक श्रमाचा परिणाम म्हणून सावरकर आजारी पडले. त्यांचे वजन ११९ पौंड वरून ९८ पौंड वर आले.अमाशांचा प्रचंड त्रास सुरू झाला. पुढे सावरकर यांचे काही बरे वाईट झाले तर मोठा प्रसंग ओढावेल असे वाटून त्याना कडेकोट बंदोबस्तात अंदमानच्या सेलुलर जेल बाहेर काढण्यात आले, इथेच त्यांना हिंदूच्या हितासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले.सावरकर याना अलिपुरच्या तुरुंगात नंतर डोंगरीच्या तुरुंगात व तिथून ०२ मे १९२१ रोजी रत्नागिरी तुरुंगात आणले. तिथे एका कोठडीत (एव्हढी लहान की नीट पाय पसरून झोपता येत नसे.) साखळदंड व पायात लोखंडी गोळे बांधून ठेवले कारण ब्रिटिश सरकार त्याना इतके घाबरत होते न जाणे . तिथूनही सटकले तर काय करा ? ०६ जानेवारी १९२४ ला राजकारणात सक्रिय भाग घ्यायचा नाही अटीवर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध केले.त्यामुळे आता त्यांना राजकारणात भाग घेता येणार नव्हता. पण सावरकर स्वस्थ बसणारे नव्हते. त्यानी आता आपले लक्ष समाजकारण व लिखाण या कडे वळवले, रत्नागिरीत गांधीजिनी त्यांची भेट घेतली त्याभेटीत टोकाचे मतप्रदर्शन झाले . गांधीनी दलितांना हरिजन संबोधले ते सावरकर यांना मान्य नव्हते त्यांचे म्हणणे होते हरिजन म्हणजे देवाचे जन आपण सगळेच हरिजन आहोत. गांधीना वर्ण व्यवस्था मान्य होती तर सावरकर यांचे म्हणणे होते तो हिंदू धर्माचा कलंक आहे . सावरकर म्हणाले अजाणतेने किंवा जबरदस्तीने धर्मपरिवर्तन झाले आहे त्यांना पुन्हा आपल्या धर्मात आणले पाहिजे . गांधी म्हणाले ते सुद्धा धर्मपरिवर्तनाच्या विरोधात आहेत, पण काही पिढ्यापुर्वी जे परिवर्तीत झाले आहेत त्यांना हिंदू धर्मात परत आणण्याची गरज नाही. सावरकर म्हणाले

“ ज्यांनी स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव केला आहे त्यांचे मी पुतळे जाळले”

गांधी म्हणाले “याने हिंसा भडकेल . माझे म्हणणे आहे अहिंसेने हिंसक माणसाचे हृदय परिवर्तन होते, त्याने जर एका गालावर थप्पड मारली तर आपण दूसरा गाल पुढे करावा.” सावरकर याना ते मान्य नव्हते .एकदा .एक गृहस्थ सावरकर यांच्या कडे आले त्यांचा चॉकलेटचा कारखाना होता. ते ती चॉकलेट घेऊन सावरकरांकडे गेले. ती वेगवेगळी चॉकलेट बघून सावरकरांना खूपच आनंद झाला.त्यांनी विचारले ” हि पावसाळ्यात चिकट बनतात का ?” गृहस्थ म्हणाले “ हो, कारण विदेशी चॉकलेट मध्ये जिलेटीन असते, ते विदेशी म्हणून आम्ही वापरत नाही.” सावरकर म्हणाले “ तुम्ही चॉकलेट तर विदेशातून मागवत नाही आहात फक्त एक जिलेटीन घटक विदेशी वापरल्याने चॉकलेट विदेशी होत नाही तुम्ही ते जरूर वापरा असं केल्यानी तुम्ही विदेशी उद्योजकांशी स्पर्धा करू शकाल “श्री गोगटे हे सावरकरांना रत्नागिरीत भेटले त्यावेळी ते विद्यार्थी दशेत होते. त्यानी सावरकरांना विचारले “ आम्ही तरुण विद्यार्थ्यानी देशाच्या स्वातंत्ऱ्यासाठी काय करावे “ सावरकर म्हणाले “ प्रथम तुम्हाला कोण व्हायचे आहे याचे उदिष्ट ठरवा संपादक व्हायचे आहे की लेखक व्हायचे आहे , क्रांतिकार्यकांसारखे हुतात्मा व्हायचे आहे लेखक किंवा संपादक होऊन लेख लिहून देशात जागृती होत नसते त्या साठी क्रांतिकारक व्हावे लागते. त्यांचा त्याग वाया जात नाही.” मग गोगटे यांनी विचारले “ त्यासाठी हत्यारे कुठून आणायची.” सावरकर म्हणाले “ इछा असेल तर मार्ग सापडतो.” गव्हर्नर हॉटसन याने खूप अत्याचार केले होते. गोगटे यांनी सुड घ्यायचं ठरवले. हॉटसन फरग्सन कॉलेजात आले असताना गोगटेने हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडल्या, पण नेम चुकला व त्याच्या शेजारचा माणूस मेला . गोगटेला अटक झाली. यांचा गांधीनी निषेध केला. त्यावर सावरकर यांचे म्हणणे होते शिशुपालाचे शंभर अपराध झाल्यावर कृष्णाने सुद्धा त्याला मारले.

१९३७ मध्ये सावरकर पुण्याला आले होते.तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक निघाली.श्री शं.ग.चापेकर त्यावळी वर्ग चालवत.त्यावेळी त्यांनी सावरकरांना हार घातला.व वंदन केले.सावरकरांनी विचारले “ हे गृहस्थ कोण ?” त्याना त्यांचे नाव चापेकर आहे असे समजले. सावरकर म्हणाले “ मी यांच्या कडून हार घालून घेऊ शकत नाही .मीच चापेकराना हार घालायचा कारण मी चापेकर बंधुंपासून स्फूर्ती घेतली”.असे म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील हार श्री चापेकर यांना घातला. १९३८ मध्ये सावरकर पनवेल येथे गेले होते.तेथे त्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतण्याने त्यांना हार घातला.व सांगितले कि फडक्यांच्या पत्नी जवळच शिरढोण येथे राहतात.व्याखान झाल्यावर सावरकर शिरढोण येथे गेले, त्यांना लवून नमस्कार केला.व पायावर हार घातला.१९३९ मध्ये सावरकर कलकत्याला गेले होते. त्यांच्या सत्कारावेळी त्यांना हार घातले गेले.त्यावर ते म्हणाले “ याच पावन भूमीत क्रांतिकारक झाले.तेव्हा मला त्यांची आठवण येते आहे.”

त्यानंतर त्यांच्यासोबत अंदमान मध्ये हृषीकेश, भूपेश गुप्ता, आशुतोष लाहिरी यांनी शिक्षा भोगली होती.त्यांचाही सन्मान व्हायला हवा म्हणून आपल्या गळ्यातील हार काढून त्यांना घालून मिठी मारली. सावरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे नेपाळचे ठाकूर चंदनसिंग हिंदुमहासभेच्या अकोला अधिवेशनाला उपस्थित होते. १९४१ मध्ये ग्वाल्हेरच्या महाराजांनी नेपाळ राजकन्या लेखादेवीशी विवाह केला, ( या लेखादेवी म्हणजेच जोतिरादित्य शिंदे यांच्या आजी, राजमाता विजयाराजे शिंदे.)

सावरकर यांनी आपले बहुतेक लिखाण स्थानबद्धतेतच केले. तिथेच त्यानी “ हिंदुत्व” पुस्तक लिहिले. त्यात ते लिहितात, आधी संस्कृति सिंधु व सप्तसिंधू यांपर्यंत मर्यादित होती. पुढे ती वाढत जाऊन गंगा नदी पर्यन्त पोहोचली त्यामुळे त्याला भारतखंड असे नाव पडले. हुण व शक यांना हुसकावून लावल्यावर सिंधुस्थानाला अनेक वर्षे वैभव प्राप्त झाले. त्यात त्यांनी हिंदू शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल लिहिले आहे. जो सिंधु नदीवरून पडला आहे . हिंदू असण्याचे पहिले लक्षण म्हणजे सिंधु नदीपासून ते सिंधु समुद्रापर्यंत ( कन्याकुमारीला जिथे तीन सागर एकत्र होतात तिथपर्यंत ) जी ती त्यांची पितृभू, मातृभू तीच त्याच्या ऋषींची व पूर्वजांची भूमी असायला हवी . हिंदुत्वाचे लक्षण, प्रत्येक हिदू हा हिंदू माता पितांचा वंशज असला पाहिजे. मुसलमान व ख्रिस्ती झालेले भारतीय यांची पितृभू जरी हि असली तरी त्यांची पुण्यभू भारत होऊ शकात नाही, कारण त्यांची पुण्यभू अरबस्थान, किंवा जेरूसलेम असते . त्यांचे आदेश मानतात त्यामुळे ते हिंदुस्थानला पुण्यभू मानत नाहीत. एकदा सावरकर म्हणाले होते की “एक वेळ मला स्वातंत्र्यवीर नाही म्हटले तरी चालेल, पण मला हिंदुहितरक्षक जरूर म्हणा “ सावरकर यांनी स्थान बद्धतेत असताना तीन नाटके लिहिली कारण त्यांना राजकीय मते मांडण्याला बंदी होती त्यामुळे त्यानी लेखणी हेच आपले शस्त्र बनवले हे मी आधीच सांगितले आहे. पहिले “उशाप “ जे नाट्य कला प्रसारक मंडळाने रंगभूमीवर आणले. त्यात चोखामेळा सोयराबाई आणि श्रीकृष्ण यांच्या व्यक्ति रेखेवर ते आधारलेले आहे दुसरे नाटक उत्तरक्रिया जे नाट्य कला प्रसारक मंडल यांनी रंगभूमीवर आणले. त्या उत्तरक्रिया म्हणजे तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पाडाव झाला. त्याचा प्रतीशोध म्हणून उत्तरेला असलेल्या भारतावर पुन्हा कब्जा मिळवणे. संन्यस्थ खड्ग हे नाटक लिहिले त्यात त्यांनी अहिंसा उपयोगाची नाही. गरज पडली तर संन्यासी बनलेली तलवार उपसावी लागते. हे दाखवून दिले . हे नाटक दीनानाथ मंगेशकर यांनी रंगभूमीवर आणले ते त्यांचे निस्सीम चाहते होते. या नाटकावर टीका करताना श्री वी ना कोठीवाले म्हणाले होते “ या नाटकाची भाषा नाटकांसारखी वाटत नाही “सावरकर म्हणाले “ तुमचे म्हणणे योग्य आहे पण मराठी नाटकांचा भरभराटीचा काळ होता तेव्हा मी अंदमानात व नंतर रत्नागिरीला स्थानबद्धतेत होतो, त्यामुळे मला मराठी नाटके पाहता आली नाहीत. “

मोपल्या बंड हि कादंबरी सावरकरांनी लिहिली. २५ सप्टेंबर १९२१ च्या दोन दिवस आधी मोपल्यानी टेलेग्रामच्या तारा तोडल्या. रेल्वे रूळ उखडले. दळणवळणाचे मार्ग बंड केले खूप पाऊस कोसळत होता. आणि २५ सप्टेंबर १९२१ रोजी हिंदूंचा नरसंहार घडवला. एक तर मुस्लिम हो नाही तर मरणाला तयार हो. इतका नरसंहार होऊनही हिदू मात्र थंड होते आणि यालाच चिडून सावरकरांनी मोपल्याचे बंड नावाची कादंबरी लिहिली. ( सावरकर नावाच्या हिंदुरक्षक नेत्याने आपल्याला सतत जागे करायचा प्रयत्न केला आणि आपण त्यांना सतत अपमानित करत आलो आहोत.आजही मोपल्याचे बंड अर्थात मला काय त्याचे यांचे वाचन यू ट्यूबवर आहे.) सावरकर यांनी लिहिलेली आणखी एक कादंबरी म्हणजे सहा सोनेरी पाने, यामध्ये त्यानी चंद्रगुप्त मौर्य व चाणक्य, सिकन्दरची स्वारी, सम्राट पुष्यमित्र राजा विक्रमादित्य, यशोधर्मा, मराठ्यांचा अटकेपार झेंडा पासून ते इंग्रजांशी लढणाऱ्या क्रांतिकारकापर्यंत वेगवेगळ्या लढवइये यांचे समग्र वर्णन केले आहे.

सावरकरांनी आणखी बरीच कार्ये या काळात केली त्यातील एक म्हणजे भाषाशुद्धी आपल्या मराठी भाषेत इतर परदेशी भाषांतील शब्द वापरात आहेत.हे सावरकरांच्या लक्षात आले. म्हणून त्यानी भाषा शुद्धीचे कार्य हाती घेतले. चित्रपट निर्माते बाबुराव पेंढारकरांना त्यांनी इंग्रजीचे कितीतरी मराठी प्रतिशब्द सुचवले. जसे चित्रपट, बोलपट कलागृह , छायाचित्रण , बाह्यचित्रण , ध्वनीलेखन जे आपण चित्रपटाच्या सुरवातीस पाहतो. त्याशिवाय कितीतरी शब्द आहेत. जे आपण रोजच्या व्यवहारात वापरतो ते सावरकरांनी सुचवले आहेत यांची आपल्याला कल्पना नसते. जसे दिनांक क्रमांक, उपस्थित, नगरपालिका, महापालिका, महापौर, पर्यवेक्षक, विश्वस्थ, स्तंभ, शुल्क, हुतात्मा, इत्यादि.याशिवाय सावरकरांनी स्त्री, किर्लोस्कर इत्यादि मासिकात हिंदूंचा व मुसलमानांचा अडाणीपणा , गाय एक उपयुक्त पशू , साथ, रशियातील स्वातंत्रयचा प्रयोग, भूतदया की भूत बाधा, परकीय शब्द, धर्मभोळेपणाचा कळस , असे अनेक लेख लिहिले.

सावरकर यांचे आणखी महत्वाचे कार्य म्हणजे अस्पृश्यता निवारण, सावरकर यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळत नाही म्हणून भागोजी किर यांच्या आर्थिक मदतीने पतीतपावन मंदिर उभारले. त्यात सर्व दलितांना प्रवेश मिळत असे. सावरकर यांनी दलीतासमावेत भोजने आयोजित केली. सावरकर यांच्या पत्नी माई यांनी दलितासोबत हळदीकुंकू केले त्याचा परिणाम म्हणून ते ज्या श्री दामले यांच्या घरात रहात होते त्यांच्यावर दोन तीन वर्ष रत्नागिरीकरांनी बहिष्कार घातला. सावरकर यांनी आदेश दिला की माझा वाढदिवस अस्पृश्यता निवारण म्हणून पाळा.” व कार्यकर्ते यांना सूचना केली की घरोघर जाऊन पत्रके भरून घ्या की “मी सार्वजनिक व खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही.” दलित मुलांना शाळेत एकत्र बसवावे या साठी जिल्हाधिकाऱ्याकडून तसा आदेश काढला. दलिता बरोबर गाभार्यात जाऊन पूजा करवली. सावरकर म्हणत असत “पतितानाच उधरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे “ त्यांना एका गोष्टीचे आणखी वाईट वाटे दलितांना सवर्ण शिवू देत नसत पण त्याने ख्रिस्त किंवा मुसलमान धर्म स्वीकारला तर त्याला आपले दरवाजे उघडे करून देत , मग तो दलित असताना त्याच्यावर असा अन्याय कशासाठी ? सावरकर विज्ञान निष्ठ होते त्यांचे स्पष्ट मत होते की “ विज्ञानाच्या कसोटीवर जे खरे उतरेल तेच ग्राह्य मानायचे. त्या व्यतिरिक्त काहीही ग्राह्य मानायचे नाही . ते म्हणत “ प्रयोगसिद्ध विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्रांचा वेद झाला पाहिजे.” त्यामुळे त्यांनी गाय हा एक उपयुक्त पशू आहे असे सांगितले”.यंत्रा मुळे बेकारी येत नाही तर त्याचा योग्य व पुरेसा वापर न केल्याने बेकारी येते असे सावरकर यांचे म्हणणे होते . त्यानी अंधश्रद्धा निरमुलनाचे कार्य हाती घेतले भूकंप हा भुगर्भाच्या खालील हलचालीतून यामध्ये कुठेही पापपुण्याचा संबंध नाही . त्यानी किर्लोस्कर मासिकात अंधश्रद्धेवर अनेक लेख लिहिले व जनजागृती केली.

१९३७ साली पूर्ण मुकत्तता केली व त्यांना सक्रिय राजकारणात भाग घेण्याची अनुमती दिली. त्यावेळी त्यानी हिंदुमहासभेत प्रवेश केला.ते हिंदू महासभेचे अनेकवेळा अध्यक्ष झाले. ते हिंदुत्वाचा उघडपणे प्रचार करू लागले. एकदा त्यांचा बार्शी येथे सत्कार होता सावरकर कॉंग्रेसमध्ये गेले नाहीत म्हणून काही जणांचा त्यांच्यावर राग होता मिरावणुकीच्या वेळी सावरकरांवर हला करण्यासाठी एक गुंड ठरवला. तो सावरकरांवर हल्ला करण्यासाठी आला, जवळ येताच तो म्हणाला “ ये तो हमारे बडे बाबू है, इनहोने हमे अंदमान मे पढना सिखाया “ त्यामुळे हल्ला करणे राहिले बाजूला त्याने मिरवणूकभर साथ केली सावरकरांनी हिंदुत्वाचा स्वीकार करून त्याचा प्रचार करणे कोंग्रेस नेत्यांना खूप झोंबले. कारण ते तथाकथित सेक्युलर धोरण अवलंबत् होते. व उघडपणे मुस्लिमांचे तुष्टीकरण करत होते. त्यामुळे त्यांनचा सावरकरांवर आकस होता. त्याच वेळी मुस्लिम लीग चे अध्यक्ष बॅरिस्टर जिना वेगळ्या देशाची मागणी करत होते. सावरकर समजून चुकले की आता स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची फाळणी होणार म्हणून त्यानी विरोध करायला सुरुवात केली स्वातंत्र्य अखंड मिळाले पाहिजे. असे त्यांचे मत होते तसे त्यांनी भाषणात सांगायला सुरुवात केली. दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू झाले, त्यानी हिंदूना ब्रिटिश लष्करात भारती होण्यास सांगितले. त्याची टिंगल करण्यात आली. त्यांना रिक्रूटवीर संबोधले गेले. पण त्याना माहिती होते की जर हिंदूच्या हाती शस्त्र आले तर त्याचा पुढे फायदा होईल. मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा त्यानी लेखणी मोडा आणि शस्त्र हाती घ्या असे आवाहान केले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने त्यानी सुभाष बांबुना हिटलरची भेट घेण्याचा सल्ला दिला . त्याप्रमाणे सुभाष बाबू हिटलरला भेटले. पुढे त्यानी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि सावरकरांना अपेक्षित होते तसे अंदमानवर आझाद हिंद सेनेचा झेंडा फडकावला. दुसऱ्या महायुद्धात जर्मन हरली. पण ब्रिटन फार कमजोर झाला. त्यांना आता इतरदेशांवर राज्य करणे अशक्य झाले. जागतिक परिषदेने सगळ्या देशांना स्वातंत्र्य देण्याचा ठराव संमत केला. ब्रिटन मध्ये चर्चिल हरला. एटली पंतप्रधान झाला. आणि भारताला स्वातंत्र्य द्यायचे ठरले मुस्लिम लीगला वेगळे राष्ट्र हवे होते. आपल्या नेत्यांना सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्याची घाई झाली होती. त्यामुळे देशाचे तीन तुकडे झाले. सावरकरांना काळजावर दगड ठेवून हे स्वीकारावे लागले. त्याच वेळी धर्माच्या लोकांची अदलाबदल करण्याचे पाकिस्तानने ठरवले. तिथे हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाले. काही हजार हिंदूंच्या हत्या झाल्या. त्यांना भारतात पाठवण्यात् सुरुवात केली. १५ ऑगस्ट १९४७, . भारताला खंडित स्वातंत्र्य रक्तपात होऊन मिळाले देशाचे तीन तुकडे झाले.सावरकर यांचे म्हणणे होते की की धर्माच्या आधारावर फाळणी झालीच आहे तर सर्व हिंदू व मुस्लिम यांची आदलाबदल होई पर्यन्त फाळणी करू नका पण कोणीही त्यांचे ऐकले नाही.एव्हढेच नव्हे तर पाकिस्तान चे पंत प्रधान लियाकत् अली भारतास भेट देणार म्हणून आमचा भारत निधर्मी आहे हे दाखवण्यासाठी सावरकरांना पुन्हा बेळगावच्या तुरुंगात डांबले. तेव्हा येणारी निवडणूक संपेपर्यंत राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर त्यानं सोडण्यात आले.(ब्रिटिशांनी अशी अट घालणे समजु शकतो , पण भारत सरकारनेही अशी अट घालणे म्हणजे सुडबुद्धीचा कळस होता. (त्याचा परिणाम आपण आज भोगतो आहे ). डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी काश्मिरात जाऊन सत्याग्रह करणार ही कळल्यावर एका विश्वासू माणसाच्या हाती सावधानतेचा इशारा देणारे पत्र एका कार्यकर्त्यासोबत पाठवले, टपालाने पाठवले नाही. समर्थ कुबडीत शस्त्र बाळगत तर सावरकर खिशात लहान खंजीर बाळगत. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली. त्या नंतर सावरकरांना हत्येतिल एक आरोपी म्हणून अटक करण्यात आली. पण न्यायालयाला कोणताही पुरावा सापडला नाही .त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता केली गेली ( १९६९ ला पुन्हा कपूर आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सावरकर हयात नव्हते ) स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सावरकर सतत सांगत होते की देशाच्या सीमा सुरक्षित करा. लष्कर सशक्त करा . पण कोणीही ऐकले नाही. सगळ्यांना वाटत होते. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सगळे प्रश्न सुटले. आम्ही आता शांततेचे दूत आहोत. काहीना तर वाटत होते आम्ही शांततेचे दूत म्हणजे आपल्याला आता लष्कराची सुद्धा गरज नाही . पण वल्लभभाई पटेल यांनी ऐकले नाही व लष्कर हटवले नाही. हिन्दी चीनी भाई भाई चे नारे देण्यात आले . १९६२ साली त्याचा परिणाम भोगावा लागला.{चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा पुन्हा सावरकर यांच्यावर पाळत् ठेवली. त्यांची पत्रे कसोशीने तपासली जावू लागली.} भारताचे सैनिक लढून हुतात्मा होण्यापेक्षा थंडीत गारठून मेले हे दुर्दैव व त्यात भर म्हणून कित्येक मैलाचा “अकसाई चीन” भाग चीन ला देऊन टाकला. सावरकरांचे लष्कर मजबूत करण्याचे धोरण स्वीकारले असते तर हि परिस्थिति ओढवली नसती. त्यावेळी सावरकर सांगत होते की इस्राइल शी संबंध वाढवा, कारण ते किती फायद्याचे आहेत हे सावरकरांनी ओळखले होते.

१९६५ साली पंतप्रधान शास्त्रीनी जय जवान जय किसान नारा देत पाकिस्तानला धडा शिकवला. त्याचे सावरकर यांना समाधान वाटले. रशियाने आपले पंतप्रधान व पाकिस्तानचे अध्यक्ष यांना वाटाघाटी साठी ताशकंदला बोलावले तेव्हा सावरकरांना वाटत होते शास्त्रीजिनी ताशकंदला जाऊ नये, कारण जे आपण लढून मिळवले आहे त्याच्यावर पाणी सोडण्यासाठी दडपण येईल तसेच ताशकंद ला शास्त्री गेले तर त्यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होईल अशी दाट शंका होती आणि ती खरी ठरली. . आता शरीर थकत होते. त्यानी जनसंपर्क कमी केला. पुढे त्यानी ठरवले की आता आपले कार्य झाले आहे. आयुष्यभर मृत्यू कायम त्यांच्या सोबत वावरत होता पण हात लावु शकला नाही . त्यांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले. ( अन्न पाणी त्यागायचे ठरवले) त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत जाऊ लागली . इतरांनी आग्रह करूनही त्यानी अन्न घेण्यास नकार दिला. इतकी वर्ष मृत्यूला हुलकावणी देणारे स्वताहून मृत्यूकडे जाऊ लागले . त्यांची प्रकृती दिवसेंदिवस आणखी ढासळू लागली त्यांच्या तब्येतीच्या चौकशीची अनेक पत्रे येत असत पण त्यानं उत्तर देवू नका असे सावरकरांनी सांगितलं. अन्न नाही औषधे सुद्धा नाही त्यामुळे मृत्यू अगदी जवळ येवून ठेपला. नाडी अतिशय क्षीण झाली २६ फेब्रूवारी १९६६ साधारण १० च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले.त्यावेळी कोणताही मंत्री त्यांच्या अन्त्यदर्शनाला आला नाही.

रवींद्र वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 83 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..