नवीन लेखन...

जेष्ठ संगीतकार वसंत देसाई

वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर… मा.वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली मा.वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी). राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी’ ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.

अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो. मा.वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना – सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली.

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. ‘गूंज उठी शहनाई’मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते ‘गूंज उठी’ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही ‘झनक झनक’ च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने ‘लिबर्टी’ चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवा खाँ साहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात.

पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, व मृदुंगवादक रामदास हे वादकही ‘झनक झनक ’मुळे प्रथम चमकले. रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. ‘केदार’ रागातली ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ ही रचना इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली. ‘दो आँखे बारह हाथ’ मधले ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या प्रार्थना गीताला ‘मालकंस’ रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.

‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा.वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले.
www.vasntdesai.com या वेब साईटवर मा.वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.

वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा २२ डिसेंबर १९७५ रोजी अपघाती निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

वसंत देसाई यांची गाणी.





https://www.youtube.com/watch?v=QSOSKrpHvyE

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..