नवीन लेखन...

समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे

महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म १४ जानेवारी १८८२ रोजी झाला.

रघुनाथ धोंडो कर्वे हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत. र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके १९४० च्या सुमारास प्रसिद्ध होत असत. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु या प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.

त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. १९२७ ते १९५३ अशी सुमारे २५-२६ वर्षे कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वत: सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत. केवळ संततिनियमनाचीच नव्हे तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी असा रघुनाथरावांनी आग्रह धरला तेव्हा त्यांना कर्मठ, सनातनी, धर्माभिमानी आणि जुनाट समजुती कवटाळणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. कायद्याच्या कैचीत पकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. विरोधाची पर्वा न करता आपल्याला पटलेले विचार समाजाला पटवून देण्याचा रघुनाथरावांनी आयुष्यभर जिद्दीने प्रयत्न केला. त्यासाठी आर्थिक ओढगस्तीचे, अस्थिरतेचे आयुष्य पत्करले पण आपल्या जीवननिष्ठेबाबत तडजोड केली नाही. जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला आहे. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’

समाजस्वास्थ्यातील प्रचारामुळे त्यांच्यावर खटलेही भरले गेले. जवळजवळ सत्तावीस वर्षे रघुनाथरावांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालवले. अश्लीलीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फकत तसा आरोप करणाऱयाच्या मनाचा गुण आहे, हे सांगणाऱ्या रघुनाथरावांच्या या कार्याचे परिणाम तत्कालीन समाजस्वास्थ्यावरही झाले. अनेक वाद झाले, खटल्यांमध्ये रघुनाथरावांना शिक्षा झाली, बराच तोटा सहन करूनही ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत. समाजाकडून होणारी अवहेलना सोसूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जे पटते ते निर्भीडपणे मांडण्याच्या रघुनाथरावांच्या वृत्तीमुळे अनंत आर्थिक अडचणींतूनही त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ चालवले. होईल ते नुकसान सोसण्याची आणि मासिकाचे काम करण्याची ताकद आहे तो पर्यंत ते चालू ठेवण्याचा बेत आहे. कोणी काहीही म्हटले तरी या मासिकाचे एकच ध्येय आहे. ते ध्येय सर्व समंजस माणसांना मान्य झालेच पाहिजे- मग त्यांचे मार्ग माझ्यापेक्षा वेगळे असले तर असोत! ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पशन्तु न कश्चित्‌ दु:खभाग् भवेत।’ या ध्येयाकरिता माझ्या अकलेप्रमाणे मी काम करीत राहणार. मग लोक काहीही म्हणोत! आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत. आणण कसेही करून त्या सांगितल्याच पाहिजेत, असे वाटून हे मासिक काढायचे ठरवले. पण त्यात केवळ बुद्धिप्रामाण्याची तत्त्वेच सांगून मला थांबायचे नव्हते, तर ती हरघडी आचरणात आणणे, प्रत्येक विषयाला लावून त्या दृष्टीने मतप्रचार करण्याचा माझा उद्देश होता. आपले अंतिम ध्येय काय, याचा विचार मासिकाचे नाव ठरवताना करावा लागला; आणण समाजाचे कल्याण हेच ध्येय ठरवून त्याला ‘समाजस्वा्स्थ्य’ असे नाव दिले.. पण समाजाचे कल्याण साधताना सत्याकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्याकडे दुर्लक्ष करून भागत नाही. कारण निसर्गाचे नियम कोणालाही बाधत नाहीत; तेव्हा त्यांना धाब्यावर बसवण्याचा फोल प्रयत्नेही न करता त्यांचा समाजाला उपयोग कसा करून घेता येईल, हेच लिहणे जरूर आहे.

फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणा या संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. २१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्नी्ने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रँग्लर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. त्यामुळे जरी ते ती केस हरले तरी त्यांना बासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.

फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्‌मय ह्यावर समाजस्वास्थ्यात टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते. एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या – महर्षी कर्वे यांच्या – पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ परकीयांशी लढणे सोपे असते;पण स्वकीयांबरोबर झुंज घेणे अवघड असते.

रघुनाथरावाणी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.

रघुनाथ धोंडो कर्वे यांचे निधन १४ ऑक्टोबर १९५३ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..