नवीन लेखन...

।। सद्गुरु संत श्री बाळुमामा ।।

गुरुतत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरुपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या, मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा मुलगा अंगभूत कर्तृत्वाने पुढे मोठा होऊन जगाच्या कल्याणासाठी धनगर समाजातील रूढी व अनिष्ट विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणले. ३ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील “अक्कोळ” या खेडेगावात गुरुतत्त्व अवतरले. मायाप्पा-सत्यवा या पतीपत्नीचे अवघे आयुष्य समृद्ध झाले. सध्याच्या कागल-निपाणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या “आप्पाची वाडी” या खेडेगावातील “सत्यवा” हिला बालपणपासून पंढरीच्या विठूरायाची ओढ होती. घरचे वातावरण आध्यात्मिक होते. सत्यवा नित्यनेमाने एकादाशीचे व्रत करीत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे. पुढे सत्यवाचा विवाह मायाप्पासोबत झाला. धनगर कुटुंबात “सून” म्हणून दाखल झालेली सत्यवा लवकरच सासरच्या रीतिभातीमध्ये रुळली आणि भैरु, बाळू आणि भीमाप्पा या तीन लेकरांना जन्मास घालून तिच्या संसाराला पूर्णत्वही देती झाली.

थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने अवतीभवतीच्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. मातापिता-भावंडे-गणगोत-सवंगडी अन ग्रामस्थां पासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा बाळू घरच्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठीही चिंतेचा विषय बनला होता. त्याला लोक खुळ म्हणायचे.

आपला गुलगा इतर मुलांसारखा वागावा, राहावा यासाठी मायाप्पांनी त्यास गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्याचे काम व्यवस्थित करीत अतला तरी अनेकदा बाभळीच्या इतस्तहा पसरलेल्या झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसत असे आणि इतकेच नव्हे तर त्यावर आरामात बसून “ही माझी खुर्ची आहे” असे सांगत असे. तिथून गुरुण दमदाटी करून उठवल्यास जवळच्याच एवाद्या झाडावर चढून उंच ठिकाणी बसत असे आणि “हे माझे शिखर आहे” असे सांगत असे.

“बाळु” मधील ईश्वरी अंशाची जाणीव त्याला स्वत:ला जरी पुरेपूर असली तरी इतर कुणाला असणे निव्वळ अशक्य होते. कधी कधी मनस्वी बाळू अनाकलनीय वर्तन करीत असे. स्वतःवर आसुडाचे फटकारे मारणे, तर कधी अल्लड, खेळकर, गमत्या स्वभावाने बघ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे यामुळे हे एकलकोंडे, मनस्वी पोर गावकऱ्यांसाठी एकाच वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचाही विषय होते. चंदूलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळू निवांत पडून रहात असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून पुसून स्वच्छ करुन ठेवत असे.

एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी पडलेल्या भोकातून तिला थाळीच्या पलीकडे तिच्या बस्तीचे (जैन मंदिराचे) दर्शन घडले. बाळु हा लग्न झाल्यावर सुधारेल म्हणून दरम्यान, मायाप्पा आणि सत्यावा यांनी बाळूचे लग्न लावून दिले. बाळू वरकरणी संसारात रमला असला तरीही त्याच्या अंतर्यामीचे गूज काहीतरी वेगळेच सांगत होते याचे कारण आता बाळूचा प्रवास “बाळूमामा” होण्यापर्यंतची वेळ नजीक येऊन ठेपली होती. योग्य त्या वेळी बाळूमामांना गुरुप्रात्पी झाली. श्री मुळे महाराजांच्या चरणकमलांचे दर्शन घडले आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य- अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त – श्रीनृसिंहसरस्वती – श्री स्वामी नारायण महाराज – श्रीमैनी महाराज (पाटगाव) आणि मुळे महाराज अशी होती. श्रीगुरुंचा अनुग्रह लाभल्यावर बाळूमामांचे आध्यात्मिक जीवन विलक्षण तेजाने झळाळून उठले. स्वस्वरूपाची ओळख झाली.

दिवसरात्र भजनामध्ये रममाण होणे, विविध तीर्थक्षेत्री भेट देणे, अन्नदान करून भोजनाच्या पंक्ती उठवणे, दर्शनार्थींना त्यांच्या अडी अडचणींवर मार्गदर्शन करणे, नामजपाचा महिमा सर्वदूर पसरविणे भोळ्याभाबड्या भक्तांमधील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती आणि रुढी-परंपरेमागील अवैज्ञानिक दृष्टिकोन यावर बाळूमामा लोकांना जागृत करीत असे. सामाजिक दंभाविषयी त्यांना विलक्षण तिटकारा होता. दरम्यान, बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जात असे.

बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असे. त्यांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन ध्यान्य झाले. कित्येकांचे आयुष्य बहरास आले. कित्येकांच्या भौतिक समस्या दुर. मात्र “जे काही घडत आहे ते सारे विधिलिखित आहे, आपण केवळ निमित्त मात्र आहोत.” असे बाळूमामा सांगत असत. त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही.

स्वच्छ धोतर, पूर्ण वाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चामडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलीतपाणे बोलत, तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. नीटनेटकी राहणी, गमतशीर बोलणे, भजन-कीर्तनाची आवड ही विशेष ओळख असलेले बाळूमामा प्रत्येकालाच आपलेसे वाटत. त्यांना वाचासिद्धी आणि योगसिद्धी प्राप्त होती. बाळूमामांनी त्यांच्यातील देवत्व कधी उघड केले नाही. बाह्य वर्तनावरून त्यांच्यातील सिद्ध सत्पुरुषाचा अंदाज बांधणे कठीण जात असे. माणसाने माणससारखं वागावं ही त्यांची शिकवण होती. “अखंड नामस्मरण” आणि “रामकृष्णहरी ” चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा ४ सप्टेंबर १९६६ रोजी आदमापूर येथे त्यांनी देह विसर्जित करते झाले.

–श्री संतोष शामराव जोशी

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १२ वा, (अंक २४)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..