नवीन लेखन...

कोडं

“सोसायटीच्या आवारात काही लहान मुलं मुली गप्पा मारत , हसत खिदळत बसली होती . वयोगट साधारण ७ ते १३ वर्ष . सहज मुलांना विचारलं … “काय रे काय धमाल चाललीय ??”……. “”काही नाही … riddles riddles खेळतोय”” ..(आमच्या वेळचं कोडं आता Riddle झालंय हे विसरलोच होतो ) … आम्ही त्या वयोगटात असताना साधारण ज्या प्रकारची कोडी घालायचो त्यातलं एक पटकन आठवलं .. म्हणून त्यांना म्हणालो … “मी पण तुम्हाला एक riddle विचारतो” … “हो … विचारा ना ….” “एकदा वीस घोडे रस्त्यावरून धावत असतात.. आणि धावता धावता सगळे घोडे खड्यात पडतात …. आणि खड्यातून तेवीस घोडे बाहेर येतात … असं कसं ??” मुलं विचार करू लागली … एक मुलगी म्हणाली खड्यात आधीच ३ घोडे असतील ? …( आमच्या लहानपणी सुद्धा पहिली शक्यता हीच वर्तवली जायची )

मी म्हणालो ……नाही … खड्ड्यात आधी कोणीच नसतं … अं !! कसं होईल असं ? … twenty होते तर मग twenty three कसे बाहेर आले ??….. वगैरे वगैरे … असं सगळ झाल्यावर मी शेवटी उत्तर सांगितलं की … खड्यातून “ते” वीस घोडे बाहेर येतात… असा मराठीतला punch असलेलं कोडं मुलांना आवडलं ……” Uncle….Really Good one हां “ …..असं म्हणत त्यांनी माझा “यथोचित” सन्मान देखील केला …..

हा सगळा दंगा ऐकून थोडासा लांब एकटाच फुटबॉलशी खेळणारा चौथी-पाचवीतला मुलगा तिकडे आला आणि म्हणाला …“काय झालं मला पण सांगा ना” ……. इतर मुलांनी मला त्या मुलाला riddle विचारायला सांगितलं …. आता माझाही आत्मविश्वास थोडा वाढला होता …. एखादं successful presentation दिल्यावर तुलनेने पटवायला सोप्या client समोर team leader ज्या confidence नी जाईल ना तितक्याच आत्मविश्वासानी मी त्याला सुद्धा riddle विचारलं ….तेच “घोडं” पुन्हा दामटवलं…. —-xxxxx खड्यातून तेवीस घोडे बाहेर येतात … असं कसं ??… आणि त्या लहानग्यानी अगदी काही क्षणात सांगितलं …. ”हां…. खड्ड्यात पडल्यावर त्यातल्या एका “Pregnant घोडी” ला ३ मुलं झाली असतील “….

हे उत्तर ऐकून मी काही क्षण जरा स्तब्ध झालो … माझ्या “दिसणाऱ्या” चेहऱ्यावर हसू असलं तरी मनातला चेहरा मात्र “बघण्यारखा” झाला होता …. बाकीच्या मुलांनी पण “ए … कुछ भी हं “ … वगैरे म्हणत … मजा मस्करी करत … त्या मुलाला खरं उत्तर सांगून विषय संपवला होता ….. पण माझ्या मनात मात्र विषय सुरु झाला होता ……… त्याच्या वयाचे असताना आम्ही या कोड्याचा आणि त्या घोड्याचा कधी असा एव्हढा “पुढचा” विचार केला होता असं मला तरी आठवत नाही … “ लहान वयात किती वेगळ्या पद्धतीने विचार करतोय हा मुलगा “ असं म्हणू ?….की तो इतक्या सहज , पटकन आणि बिनधास्त हे बोलून गेला म्हणून त्याला “निरागस” म्हणू हेच कळत नव्हतं … “”कोडं सुटलं असूनही मी मात्र आता कोड्यात पडलो होतो…. ”

काळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय… . बरं… काळाप्रमाणे जायचं असेल तर या गोष्टींपासून आपण त्यांना वंचितही ठेवू शकत नाही आणि या तंत्रयुगात तसं करणं , म्हणजे त्यांच्यावर नक्कीच अन्याय ठरेल …. पण त्याच्या वापरावर काही अंशी निर्बंध घालणं ही देखील गरज निर्माण झाली आहे .. वरवर अगदी सध्या वाटणाऱ्या या घटनेने मला मात्र बराच विचार करायला लावला ……

स्पर्धेच्या युगात मुलांना आपलं स्थान निर्माण करण्याचं बळ द्यायचंय…. पण त्यांना एकाकी , स्वयंकेंद्रित देखील होऊ द्यायचं नाहीये ….. बाळबोधपणा सोडून विचारात परिपक्वता येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत पण त्यांना अकाली प्रौढत्वाकडे देखील झुकून द्यायचं नाहीये ….. त्यांची जडणघडण करताना अनेक टप्प्यांवर अनेक गोष्टींची सांगड घालण्याचं शिवधनुष्य आम्हा पालकांना उचलायचंय …. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातल्या पुसट रेषेचं लक्ष्मणरेषेत रुपांतर करण्याचं आव्हान स्वीकारायचंय ….. एकंदरीत बदलत्या काळात जुनं -नवं , पारंपारिक-आधुनिक , शिस्त-स्वातंत्र्य , theory – practical या आणि अशा अनेक गोष्टींचा “समतोल” राखण्यासाठी गरजेची असलेली “तारेवरची कसरत” करायची आहे …. आपापल्या “कोड्यांची” उत्तरं लवकरात लवकर शोधायची आहेत …

या सगळ्याच्या मार्गदर्शनासाठी अनेक बालसंगोपनाची शिबिरं , पालकत्वासाठी सेमिनार , समुपदेशन हे सगळं कितीही उपलब्ध असलं आणि त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते कितीही योग्य असलं तरी घरोघरी प्रत्येकाचं कोडं वेगळंच असतं .. वेगवेगळ्या परिस्थिती आणि पार्श्वभूमी नुसार वेगळं कोडं …. आणि ते आपलं आपल्यालाच सोडवावं लागतं …. शेवटी ज्याचं “कोडं” त्यालाच सोडवायचं असतं ..

© क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..