नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (ब) /११

भाग – (२) – (ब)

  • ईशान्य भारत :

निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं.

(कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ;  किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या टोळ्या, हा एक संपूर्णपणें वेगळा विषय आहे. आपण फक्त भूभागांसंदर्भात  पाहूं या).

  • इरावती कर्वे यांनी असें analysis केलेलें आहे की, पुरातन कालीं, पूर्वेकडून ब्रह्मदेश (म्यानमार) व चीन भागातून लोकसमूह भारतात  आले, व इथें स्थायिक होऊन भारताचा भाग बनून गेले. या वंशाचे लोक आसामपासून बंगालपर्यंत (आणि बंगालच्या थोडे पश्चिमेस व थोडे दक्षिणेस ) पसरलेले आहेत. अर्थात्, इथल्या स्थानिक लोकांशी सांस्कृतिक व लग्नसंबंध आल्यामुळे तेथील लोक mixed  वंशाचे झाले. म्हणजेच, जसें शक, कुषाण, हूण व भारतात-वसलेले-ग्रीक यांचें झालें, तसेंच पूर्वेकडेही झालेलें आहे ; ते पूर्णपणें भारतीय संस्कृतीत मिसळून गेले आहेत, तिचा अविभाज्य भाग झालेले आहेत.
  • *बंगालबद्दल सहसा कोणी कांहीं शंका घेत नाहीं, कारण त्याबद्दल आपल्याला कांहीं माहिती असतेच. *इतिहास जाणणार्‍यांना, राजा खारवेल व उडीसाबद्दलही माहिती असते.

*(तरीही आपण त्या दोन्ही भूभागांबद्दल नंतर पाहूंच).

  • आसाममधील ‘अहोम’ राजवट ही ब्रह्मदेश-सीमेवरील भागातून मध्ययुगात आलेल्या लोकांची आहे. तरीही , त्या काळातही आसाम भागाचा व संस्कृत-संस्कृतीचा संबंध आहे.
  • आसाम, त्रिपुरा व उडीसा या भागांवर बंगालची छाप आहे, हें निश्चित. त्रिपुरा तर अगदी ब्रह्मदेशाच्या सीमावर्ती प्रदेशात आहे, म्हणजे आसामच्याही पलिकडे.  तेथें बंगाली चालते. त्यामुळे, जे बंगालला लागू होतें, तेंच भाषा व संस्कृतीच्या संदर्भात त्रिपुरालाही.
  • म्हणजेच, फक्त ईशान्य भारताचाच वेगळा, separate, विचार करून उपयोगी नाहीं; तर, ईशान्य भारत व पूर्व भारत यांचा एकत्रित विचार करायला हवा.
  • आसाम भागाचा महाभारकालीन उल्लेख ‘प्राग्ज्योतिष’ असा आहे ; तर नंतरच्या, गुप्तकालात, आसाम व बंगालचा कांहीं भाग यांचा उल्लेख ‘कामरूप’ असा आहे.

याचा अर्थ स्पष्ट आहे की, या भूभागाचा संबंध पुरातन ‘मध्यदेश’ (पश्चिम यू.पी.) व मगधाशी होता.

  • आसाममधील हरिहर विप्र यानें रामायण व महाभारत या दोन्हींवर आधारित रचना केलेल्या आहेत. माधव कंदाली यानेंही रामायणावर आधारित रचना केलेली आहे. आसामसाठी एवढी उदाहरणें पुरेशी आहेत.
  • उडियामध्येही, सरल दास यानें महाभारतावर आधारित रचना केलेली आहे. (संदर्भ : ‘The Mahabharata Revisited’, Edited by R.N. Dandekar).
  • जयदेवाचें गीतगोविंद हें सुप्रसिद्ध संस्कृत काव्य आहे. त्याचें जन्मस्थान उडीसात, किंवा बंगालमध्ये, किंवा मिथिला भागात मानले जाते. याचा अर्थ, या भूभागांचा संस्कृतशी व संस्कृत-संस्कृतीशी नक्कीच होता.
  • ब्रह्मवैवर्त पुराण बंगालच्या परिसरात निर्माण झालेलें आहे. (संदर्भ : नरहर कुरुंदकर) . बंगालमधील चंडीदास, चैतन्य महाप्रभू यांच्या रचना संस्कृत-संस्कृतीच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. उदा. कुरुंदकर सांगतात की, इ.स. च्या ९व्या शतकात राधेची  परंपरा (संस्कृतमधून) आलेली आहे.

 

  • ‘संस्कृत ही व्यवहारात निरुपयोगी भाषा ( इति निखिल जोशी ) . तसें आहे काय ? –

मी संस्कृतचा वृथाभिमानी नाहीं, आणि संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा ‘व्हायलाच’ हवी असा माझा आग्रह नाहीं. मात्र, निखिल जोशी यांची statement मला योग्य वाटत नाहीं. आज प्रादेशिक भाषा बोलल्या जातात व साहित्यही त्यांच्यात निर्माण होतें, हें खरें.  परंतु, संस्कृत निरुपयोगी कशी ?

  • आजच्या काळात बरेच प्रश्न आहेत, व ते सोडवायला हवेत, हें मान्य ; पण पुरातन साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासानें नक्कीच आपलें व्यक्तिमत्व समृद्ध होतें, mature होतें, व आपण society ला त्याचा फायदा करून देऊं शकतो. आणि, हें समाजातील सगळ्या लोकांनी करायला हवें असें नाहीं. पूर्वीही सगळीच्या सगळी जनता, across-the-board, संस्कृत व संस्कृतीचा विचार व अभ्यास करत नसे, व आजही सर्वांनी तसें करायची आवश्यकता नाहीं.
  • पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे मुद्द्दे पुढे आहेत.
  • पहिलें उदाहरण : बडोद्याचे multi-disciplinary विद्वान प्रा. दिनेश माहुलकर यांच्याकडून मला मिळालेल्या महत्वाचा माहितीचा  मी इथें उल्लेख करत आहे.

माहुलकर हे, इंग्रजी-भाषा, भाषाशास्त्र, संस्कृत, गणित वगैरे विविध विषयाचें ज्ञान असलेले बहुआयामी विद्वान होते. त्यांचे,  ‘वृद्धि:’ , ‘Pre-Paninian Grammer’ हे महत्वाचे ग्रंथ आहेत. पाणिनीच्या आधीच्या , म्हणजे  आर्ष-संस्कृतबद्दलचा त्यांचा ग्रंथ आधुनिक काळातील एक महत्वाचा ग्रंथ आहे. अगदी उतारवयातही माहुलकर , शिमला / देहरादून येथील एका संस्थेचे consultant म्हणून कार्यरत होते. ही संस्था संस्कृतच्या आधारानें महासंगणकाची आज्ञावली ( software) तयार करूं पहात होती. त्या संस्थेचें व माहुलकारांचेंही म्हणणें  असें  की, संस्कृत ही अगदी compact भाषा आहे,  आणि,  महासंगणकाच्या आज्ञावलीसाठी ती ideal आहे. प्रत्यक्ष या आज्ञावलीचें काय झालें / होणार , याची मला कल्पना नाहीं, माहुलकरही आतां हयात नाहींत. पण, वरील गोष्टीवरून, संस्कृतच्या,  आजच्या काळातही असलेल्या महत्वाची कल्पना येईल.

– दुसरें उदाहरण : श्री. द.मा .लेले हे ‘दाते पंचांगा’त पावसाचें भविष्य लिहीत असत. त्यांनी १९८५ मध्ये भरलेल्या हवामान परिषदेत, ‘वृष्टिविचार’ या नांवाचा प्रबंध वाचला होता. त्यात त्यांनी, कृषि-पराशर, वराहमहिराची बृहद्-संहिता इत्यादी पुरातन ग्रंथांचा उपयोग करून,  वर्षा-ऋतूत किती व कधी पाऊस पडेल याचें पूर्वानुमान कसें करायचें, हें स्पष्ट केलें होतें. विशेष म्हणजे, इस्रोचे कांहीं शास्त्रज्ञही लेले यांचा पावसाच्या पूर्वानुमानाच्या बाबतीत सल्ला घेत असत.  (संदर्भ : ‘कृषिज्ञानकोश’ चे संपादक श्री. अशोक माहदेव जोशी यांचा, २०.३.२०१६ च्या लोकसत्तातील लेख ).

-तिसरे उदाहरण : आजच्या काळात ऍलोपथीचें खूप महत्व आहे यांत वाद नाहीं. पण कांहीं वेळा, ऍलोपथीपेक्षा, उपचाराच्या अन्य पद्धती अधिक-उपयुक्त  व  कमी-हानिकारक ठरतात. त्यामुळे हल्ली ‘Alternate Medicine’ या क्षेत्राला पुन्हां महत्व येऊं लागलें आहे ; आणि त्यातील एक महत्वाची पद्धति आहे आयुर्वेद. (तिबेटी चिकित्सापद्धतीतही आयुर्वेद आहेच, कारण तिच्यात आयुर्वेद व चिनी चिकित्सापद्धतीचें मिश्रण आहे ) .आयुर्वेदाचें खरें ज्ञान हवें असेल तर, चरक-सुश्रुत-वाग्भट इत्यादींचे संस्कृत ग्रंथ वाचायलाच हवेत. मला एक केरळीय आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनें सांगितलें की, केरळमध्ये, आयुर्वेद शिकणार्‍यांसाठी संस्कृत भाषेचें शिक्षण अनिवार्य होतें / आहे, आणि अर्थातच, संस्कृतमधील आयुर्वेदीय ग्रंथाचा अभ्यासही.

(पुढे चालू )

 

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..