नवीन लेखन...

मसुरे …. पाचूचा सुंदर गाव

ब-याच वर्षांपासून कोकणात जाऊन एक आठवडाभर तरी राहायचं मनात होतं … आम्ही ट्रेकला गेलो की दरवेळी कोकणात जायच्या ट्रीपचा विषय हमखास निघायचा …. आणि प्रत्येकाच्या मनात अशा ट्रीपला जायची इच्छा अत्यंत प्रबळ होती …. मात्र कोकणात जाऊन शक्यतो हॉटेलात राहायचं नव्हतं …. खरं म्हणजे ट्रीपला जायचंच नव्हतं तर गावाला जायचं होतं …. गावासारखंच राहायचं होतं …. अतिशय साधं …अंगणात बसून गप्पा मारायच्या होत्या …. आणि जेवढं जमेल तेवढं मनमुराद पायी भटकायचं होतं …. अतिशय साधं … तांदळाची भाकरी …. कुळथाची पिठी …. भाजी भात …. असं मन भरेपर्यंत जेवायचं होतं … त्यामुळे मोटारदेखील न्यायाची नव्हती …हे सगळे मनातलं प्रत्यक्ष होत नव्हतं …

आमची सहकारी आणि मैत्रीण … सौ विनोदिनी सावंत …. माहेरची बागवे …. तिच्या बाबांचं गाव …. मसुरा…तिथल्या ‘देऊळवाडा’ या वाडीत त्यांचं वडिलोपार्जित घर आहेच आणि गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी अजून एक छोटंसं घर तिथे बांधलंय ….तिचे बाबा सतत तिथे जात असतात …एका ट्रेकला रात्री गप्पा मारताना असाच विषय निघाला आणि तिने सांगितलं की आपण मसु-याला आमच्या बाबांच्या घरी जाऊन राहूया …. आणि लगेच तारखा ठरल्या आणि आम्ही नोव्हेंबर मध्ये एक आठवडा काही नाही पण चार-पाच दिवसांकरता गेलो … वर लिहिलंय ते सगळं जमलं नाही …कारण आम्हाला आचरा …. धामापूर …. वेंगुर्ला ….आरवली … शिरोडा …. अशी अनेक गावं बघायची होती … त्यामुळे मनमुराद पायी चालणं राहून गेलं …. पण रोज रात्री मस्त गप्पा मारल्या …आणि साध्या सुग्रास जेवणाचा आनंद पुरेपूर घेतला …विनोदिनी-विजय या दोघांनी एकदा तर कमाल केली … गावातल्या दोन बापयांना बोलावलं … एक माडावर चढला तर दुसरा अंगणात कोयती घेऊन बसला …. आणि इतकी शहाळी काढली …… कोवळं खोबरं खाता खाता दम लागला ….शहाळयाचं इतकं मधुर पाणी मन भरेपर्यंत प्यायलं …. माडावरच पाडकरी खाली उतरेना …. अजून अडसर (शहाळं) काढू का सारखे विचारी …. शेवटी मी म्हटलं …. बाबा आता उतर ….

मसुरा आहे साधारण मध्यभागी …… म्हणजे कणकवली आणि मालवण पासून साधारण सारख्या अंतरावर …. गाव एकदम हिरवागार ……तेजस्वी पाचूसारखा …. घनदाट अरण्याचं कोंदण असलेला …लालमातीच्या देखण्या टेकड्यांचा …. त्यावरच्या काजूच्या बागांचा … गर्द आमरायांचा …. आणि त्यात वसलेल्या साध्या पण सुंदर घरांचा …. एक एक घर बघत राहावं असं …. सांडलेलं तेल टिपून घ्यावं … असं स्वच्छ अंगण आणि त्यात मनाला प्रसन्न करेल असं तुळशीवृंदावन …

एवढ्या सुंदर निसर्गाचं वरदान लाभल्यामुळे गाव एकदम मातब्बर …. गावाला… महानवाडी … अंगणेवाडी …. मसदे … खेरवंद …. बिळवस … अशा बारा टुमदार वाड्या ….सगळीकडे भरगच्च हिरवी झाडी … माडाची बने … आणि ऐश्वर्यवान वन …गावाचं अजून एक सामर्थ्य म्हणजे इथली ‘गड’ नदी …. सह्याद्रीच्या डोंगरउतारावरून ती पावसाळ्यात …. लालबुंद होऊन जी फुसांडत वाहते …तिचा जोर माजलेल्या बैलाच्या थरकाप उडवणाऱ्या मुसंडी सारखाच असतो …. वरवडा … बंदिवडा करीत ती कणकवलीला पोचेपर्यंत तिच्या हौराला बंध उरत नाही …पुढे ती ‘सर्जेकोटची’ खाडी बनते … एका बाजूला भगवंतगड या परसाराची राखण करीत महाराजांच्या काळापासून ठाम उभा आहे …. या खाडीतच ‘जुवे’ नावाचे सुंदर बेट आहे ….

आम्ही जेव्हा मोठ्या रिक्षातून विनोदिनीच्या घरासमोर उतरलो …. सामान घरात ठेवलं आणि क्षणात समोर दिसणा-या मातीच्या सुंदर वाटेने कुतूहल म्हणून सहज चालत गेलो …. दोन तीन मिनिटं सुद्धा चाललो नसेन आणि सगळी कडे निरव शांतता जाणवायला लागली …. आणि घनदाट जंगल सुरु झालं …. गेली चाळीस एक वर्ष जंगलात भरपूर चाललोय … पण असं जबरदस्त रान घराच्या जवळपास असेल असं मनातही न आल्यामुळे एवढी गर्द झाडी बघून थोडसं भय वाटलं … काही क्षण … आणि मूळची धाडसी वृत्ती परत स्थिरावली …. आणि मस्त भटकून आलो ….
अर्थात मी घरी परत आल्यावर परिसराचं वर्णन केलं …. विनोदिनी लहान असल्यापासून तिथे जात असल्याने ती म्हणाली …. होय … रानडुकरांचे मोठे कळप सतत येतात …. पूर्वी हरणं देखील होती …. आता क्वचितच दिसतात …. मुंगुस तर इतके की कोंबड्यांना सांभाळावं लागतं …

अर्थात आम्ही सगळेजण एका सकाळी चांगला तीन चार तासांचा सुंदर फेरफटका त्या पाचूच्या वाटेवरून करून आलो …. सगळ्या प्रकारचे पक्षी दिसले ….

यावेळी खूप चालायला मिळालं नाही … परत एक आठवडा जाणार आहे … निवांत …. घड्याळाला झुगारून … मनमुराद फिरायचंय …. सकाळ संध्याकाळ …. तीन चार तास … काजू…. आंब्याच्या मोहोराचा सुवास अनुभवत …. आणि रात्री अंगणात बसून मस्त गप्पा… अर्थात काही जणांना असा प्रवास कदाचित पटणार नाही …. इथे वातानुकुलीत हॉटेलातल्या ऐय्याशी खोल्या नाहीत …. गुबगुबीत गाद्या गिरद्या नाहीत … मटर…. पनीर नाही …. की बटरात लडबडलेल्या मैद्याच्या रोट्या नाहीत … आहे ते मस्त सारवलेले गार अंगण …. त्यावर चटई …. आणि तांदळाची मखमलीसारखी भाकरी …. कुळथाची पिठी आणि जाडा पण मनाला गोडवा देणारा सुवासिक उन उन भात … त्यामुळे ज्यांना हे पटेल त्यांना मात्र हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय आणि मनाला अपार आनंद देणारच वाटेल …. यात कुसभरही शंका नाही …

एक सुरेख कविता हे लिहिताना आठवली ….

हाकेवरी आहे गाव
याच आशेने चालले
गेले दिवस-महिने :
वाटे युगच संपले ……
दूर दूर तेवणारा
दिवा कसा तो दिसेना
डोंगराच्या पायथ्याशी
रेघ धुराची वळेना ……
ऐकू येईना पावरी
आणि घुंगरांचा नाद
राऊळीच्या घंटेचाही
उमटेना पडसाद ……
कुठे असेल ते गाव
जिथे आहे पोचायचे
कुठे असेल ते घर
जिथे आहे थांबायचे

…… इंदिरा संत

 

— प्रकाश पिटकर
7506093064
9969036619
prakash.pitkar1@gmail.com

या फोटोंचे कॉपी राइट्स Prakash Pitkar

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..