नवीन लेखन...

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

प्रदीप कबरे यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. कलाक्षेत्राची प्रदीप कबरे यांना सुरुवातीपासून आवड होती. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी अभिनयाला सुरवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘वेटिंग फॉर घासलेट’ ही पहिली एकांकिका केली होती. ती ‘आयएनटी’मध्ये सादर झाली होती. व या एकांकिकेसाठी ‘आयएनटी’चं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. त्याच सुमारास त्यांनी ‘कोंडी’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातही काम केलं. ‘आयएनटी’ची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक होते शंभू मित्रा. या नाटकात सतीश दुभाषी, गणेश सोळंकी वगैरे तगडी स्टारकास्ट होती. रमेश पवार यांनी पिसाट खुनी रामन राघवच्या जीवनावर ’वरचा कानून’ हे नाटक लिहिलं होतं. त्यामध्ये रामन राघवनची भूमिका अशोक सराफ करत होते. तर रमेश पवार इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होते. प्रदीप कबरे यांनी या नाटकात हवालदाराची विनोदी भूमिका केली होती. व तेव्हाच प्रदीप कबरे यांच्या मनात आलेकी स्वत:ची नाटय़संस्था स्थापन करावी.

स्वत:ची नाटय़संस्था स्थापण्याचा विचार सुचला तरी तो लगेच अमलात आला नाही. कारण दरम्यानच्या काळात प्रदीप कबरे यांची अभिनय कारकीर्द जोरात धावू लागली होती. कमलाकर सारंग यांच्या ‘खोल खोल पाणी’, ‘सखारम बाईंडर’ आणि ‘जोडीदार’ या नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या. ‘माऊली प्रॉडक्शन’ची ‘कार्टी प्रेमात पडली’,‘ देखणी बायको दुस-याची’ आणि ‘दांडेकरांचा सल्ला’ ही नाटकंही त्यांच्या वाट्याला आली. बाळ कोल्हटकर लिखित ‘लहानपण देगा देवा’चं दिग्दर्शन त्यांनी केलं आणि याबद्दल कोल्हटकरांकडून दादही मिळवली. याच काळात सुधीर कवडी यांनी लिहिलेलं ‘बोल बाबी बोल’ हे नाटक प्रदीप कबरे यांच्या वाचनात आलं. यातली बॉबीची मध्यवर्ती भूमिका खूप सशक्त होती. प्रदीप कबरेंना ती आवडली, पण इतर कुठल्याही निर्मात्याने हे नाटक केलं असतं तर त्याने ती त्यांना दिली नसती. या बद्दल कबरे त्याचं कारण सांगताना म्हणतात, ‘‘त्यावेळी मी काही नावाजलेला नव्हतो. मला कुणाचं पाठबळ नव्हतं. माझ्याकडे एखादा ग्रुप नव्हता. त्यामुळे ते मीच करायचं ठरवलं. तत्पूर्वी हे नाटक मी माझा मित्र कमलाकर सारंगला वाचायला दिलं. कमलाकर माझ्यामागे उभा राहील, अशी मला आशा होती. त्याने हे नाटक दिग्दर्शित करायचं कबूल केलं. आणि १९८७ मध्ये प्रदीप कबरे यांनी ‘गुरू प्रॉडक्शन’ची स्थापना केली. हे नाटक प्रेक्षकांना आवडलं. सुधीर कवडीला या नाटकाबद्दल त्यावर्षीचं राज्य सरकारचं सर्वोत्कृष्ट नाटय़लेखनाचं पारितोषिक मिळालं.’’

या नाटकाने कबरे यांना आर्थिक फायदा करून दिला नसला तरी लोकप्रियता भरपूर मिळवून दिली. त्यांच्या मध्यवर्ती भूमिकेचं कौतुक झालं. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘धांदलीत धांदल’ या दुस-या नाटकाची निर्मिती केली. राजा मयेकर, शेखर विश्वासराव, सुषमा तेंडुलकर, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर यांच्या भूमिका या नाटकात होत्या. बाबा पार्सेकर, कमलाकर केळुसकर, गिरिधर मोरे, प्रदीप रांजणकर, उल्हास सुर्वे, शरद विचारे यांच्या साथीने ‘गुरू प्रॉडक्शन’ची वाटचाल सुरू राहिली. ‘मनात माझ्या’ हे ‘गुरू’चं तिसरं नाटक. ते कबरे यांनीच लिहिलेलं. ‘सेंड मी नो फ्लॉवर्स’ या इंग्रजी नाटकाचं ते रूपांतर होतं. या नाटकावरून ‘हाय मेरा दिल’ हे हिंदी नाटक आलं होतं. त्याच्या लेखकाकडून रीतसर परवानगी घेऊन कबरे यांनी त्याचं मराठी रूपांतर केलं होतं. स्मिता जयकरने या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘‘या नाटकाचे ५० प्रयोग झाले. आर्थिक गणित यावेळीही चुकलं तरी या नाटकाने मला बरंच काही शिकवलं. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाने प्रदीप कबरे यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी तिहेरी ओळख दिली.’’

‘गुरू’च्या वाटचालीत ‘हँडस अप’ आणि ‘चाफा बोले हा’ ही दोन नाटकं महत्त्वाचा टप्पा ठरली. ‘हँडस अप’ नाटकाचे आजवर २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या नाटकात भूमिका केल्या होत्या.
प्रदीप कबरे यांच्या ‘गुरू प्रॉडक्शन’ने आत्तापर्यंत नऊ नाटकांची निर्मिती केलीय.

‘गुरू प्रॉडक्शन’ ने अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर ब्रेक दिलाय. ‘एप्रिल फूल’ या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचं ते पहिलंच नाटक होतं.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या “मराठी नाट्य कलाकार संघा‘च्या अध्यक्षपदी प्रदीप कबरे यांनी काही काळ काम केले आहे.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..