नवीन लेखन...

कुछ तो लोग कहेंगे..!

कुछ तो लोग कहेंगे..!

“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो.

आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो. अर्थात, माणूस हा समाजशील आणि समाजाचाच एक भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात. त्या मानायला हाव्यातचं. पण, बहुतांश वेळा ‘लोक काय म्हणतील’ याचा बागुलबुवा करुन आपल्याला आवडणारा पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारा निर्णय आपण घेत नाही. आपले वागणे, बोलणे, पेहराव, कृती यात आपण स्वतःच्या मनाला पद्धतशीरपणे बाजूला सारून लोकांच्या मातांना प्राधान्य देतो. आणि, मनातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात करतचं नाही. त्यामुळे लोकांची ही निर्रथक भीती अनेकांच्या प्रगतीत स्पीडब्रेकर बनली आहे.

लोकलज्जेचा हा विषाणू माणसाच्या रक्तात इतका भिनलाय कि, ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपोटी स्वकीयांचे मुडदे पाडण्यापर्यंत माणसाची मजल गेलीय. ‘लोक’ नावाच्या या बागुलबुवाला विनाकारण घाबरून आजवर अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत तर अनेकांचे सोन्यासारखे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचं उज्ज्वल भवितव्य नष्ट झालं आहे व अनेक व्यक्तींची प्रगती कायमची खुंटली आहे. त्यामुळे ज्या लोकांचा आपल्या खासगी आयुष्याशि काडीमात्र देखील संबंध नाही अश्या लोकांना आपण इतके महत्व द्यायला हवे का?

सामाजिक नीती-नियम पाळणे हा भाग वेगळा. पण, कुणी काय म्हणेल, या भीतीपोटी मन मारण्याला खरंच काही अर्थ आहे का? महत्वाचे म्हणजे, ज्या लोकांची भीती आपल्या मनात घर करुन बसली आहे, ते लोक आपला विचार तरी करतात का?

‘लोक’ कोण असतात हे लोक ? आपल्या परिचयाचे,ओळखीचे-पाळखीचे, घरातले, नात्यातले, मित्र-मत्रिणी, फेसबुक फ्रेंड्स कि व्हाट्स वरचे मित्र. आणि त्यांना आपलं एवढं काय देणंघेणं असतं कि प्रत्येक गोष्ट करत असताना आपण त्यांचा विचार करतो?

वास्तविक, लोक काहीच म्हणत नसतात किंवा माणसांना काही म्हणायच ही नसत.आपलेच मन कित्येक तर्कवितर्क काढत बसते आणि जे करायचं ते राहून जात.

परीक्षेत नापास झालो, तर लोक काय म्हणतील याची आपल्याला भीती वाटते. परंतु यामागे स्वतःचच मन आपल्याला खात असतं. मित्र पास झाले, पण मी नापास झालो, याची खंत आपल्या मनाला असते. बऱ्यचवेळा लोकांना काही म्हणायचेच नसते..ते आपल्याच मनाला म्हणायचे असते. त्यामुळे प्रत्येक कामांच्या वेळी ‘समाज काय म्हणेल?’ याचा किंवा लोकांच्या कोणत्याही बोलण्याचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्याला काय वाटते, आपल्या क्षमता किती आहेत, याचा विचार करुन आपण आपली वर्तवणूक ठरवली पाहिजे. अर्थात, याचा अर्थ लोक काही म्हणतच नाही. आणि, लोकलज्जेला महत्वाचं द्यायचे नाही, असा मुळीच होत नाही. आपल्या प्रत्येक कृतीचे समाज निरीक्षण करत असतो. त्यावरूनच आपली सामाजिक प्रतिमा घडत असते. त्यामुळे सामाजिक बंधन, नीती नियम जोपासणे गरजेचेच. फक्त त्याचा बागुलबुवा करुन आपले नुकसान किंव्हा मनस्ताप करुन घ्यायचा नाही. लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण मनातला मार्ग सोडून बहुसंख्यांकांचे अनुकरण करत धोपटमार्गाने जात असू, तर आपल्याला समाधान आणि अपेक्षेत यश मिळणार नाही. त्यामुळे याठिकाणी लोक का म्हणतील, याचा विचार सोडून आपण आपल्या मनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आपले भले कशात आहे हे आपल्यालाचं कळायला हवे. आपले सामर्थ्य आणि आपल्या कमकुवत बाजू लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला त्याची जाण असायला हवी. सुयोग्य निर्णयक्षमता आपली आपल्याला विकसित करता आली पाहिजे. लोकांचे काय लोक तर दोन्ही ही बाजूनी बोलत असतात.

आपल्या भोवताली असलेलं जग हे दुहेरी तोंडाचे आहे. लोक, पुढे काय बोलतील आणि मागे काय याचा नेम नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात

” जग दुहेरी तोंडाचे | एक नेम नाही वाचे ||

घरी बसता ‘घरघुसा’| निघता बाहेरी म्हणती ‘पिसा’||

स्वस्थ बसता म्हणती ‘मुका’| ‘बोलघेवडा’ बोलका ||

तुकड्या म्हणे काही राहो| आम्ही आपुलेचि पाहो ||

घराबाहेर राहिला तर पिसाटल्या सारख नुसत फिरते म्हणायचे, घरात बसला तर घरघुसा म्हणतिल, स्वस्थ बसून राहिला तर मुका, आणि बोलका असला तर बोलघेवडा म्हणतील. त्यामुळे लोकांचा विचार करूचं नये. स्वतः आपल्या विवेक बुद्धिने निर्णय घ्यावा आणि त्यानुसार मार्गक्रमण करावे. कारण या जगात चुकीच्या कामाला चुकीचं म्हणणारी जशी माणसं आहेत, तशी चांगल्या कामालासुद्धा वाईट घोषित करून त्याचा अपप्रचार करणारे महाभाग समाजात खूप आहेत. त्यांच्या तोंडी लागले म्हणजे मूर्खपणा.. कारण मुर्खांच्या नांदी लागलं कि ते आपल्यालाही त्यांच्या पातळीवर आणून सोडतात. म्हणून “ऐकावे जणांचे करावे मनाचे” हाच आपला मूलमंत्र. People Memory is Short असं एक इंग्रजीत वाक्य आहे. लोकांना दररोज चर्चा करण्यासाठी एक नवीन विषय हवा असतो. नवा विषय मिळाला कि जुना विषय संपतो. त्यामुळे लोकांची समरणशक्ती फार कमी असते. आणि तसेही जे आज आपली निंदा नालस्ती करतात उद्या आपल्या एकाद्या विषयावर टाळ्या वाजविणारेही हेच लोक असतात. मग, लोक काय म्हणतील याचं अवडंबर कशाला ?

आपण लोकांना देत असलेलं फाजील महत्त्व व लोकांकडे बघण्याचा आपला चष्माच आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. लोकांना तुमच्या प्रगतीपेक्षा अधोगतीशीच जास्त देणं-घेणं असतं. चुकीचे सल्ले कसे देता येतील, प्रोत्साहन न देता सतत टीका कशी करता येईल, तुमच्या प्रगतीत अडथळे कसे निर्माण करता येतील याबाबतीत लोकांचा उत्साह अफाट असतो. त्यामुळे ‘लोक काय म्हणतील’ या अत्यंत फालतू गोष्टीचा विचार मनातून काढून टाकायला हवा.

अभिनेते राजेश खन्ना यांच्या अमर प्रेम चित्रपटातील गीताच्या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातील. चला त्या ओळींतून का होईना “लोक काय म्हणतील” या वृत्तीला फाटा देऊया.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना..!

— ऍड. हरिदास उंबरकर
बुलडाणा
9763469184

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..