नवीन लेखन...

कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार

कृतज्ञता  हे  मानवी स्वभावाचे एक अंग आहे. किंबहुना ते असायलाच  हवे. त्यावरून तो किती सुसंस्कृत आहे हे दिसून येते. तो एक महत्वाचा संस्कार आहे. काहीजणाकडे तो उपजत असतो. काही जणांकडे तो डोळसपणे आपल्या आजूबाजूला, समाजाकडे पहिल्याने येतो. त्यासाठी माणसाने सामाजिक भान ठेवायला हवे. पण कृतज्ञता संस्काराचे मूळ स्त्रोत आहे स्वत:चे कुटुंब. कुटुंबातील मोठ्या माणसांकडे तो असणे गरजेचे आहे. मुल साधारणता पाच ते बारा या वयात संस्कारक्षम व अनुकरणक्षम   असते. या वयात मुलांवर संस्कार पटकन होतात व ते आयुष्यभर टिकतात.

कृतज्ञता अनेक प्रकारची असते. ती कुटुंबाशी असते,नातलगांशी असते. सगळ्यात महत्वाची म्हणजे ती समाजाशी आणि देशाशी असते.कुटुंबातील मोठ्यांकडे ती असेल तर ती आपोआपच अंगिकारली जाते. कृतज्ञता आपल्या आयुष्याचाच भाग आहे हे मनावर नकळत बिंबले जाते. सामाजिक कृतज्ञतेचे  दुसरे नाव सामाजिक बांधिलकी.ती अनेक प्रकारची असते. ती आर्थिक असते, शैक्षणिक असते,सेवाभावी   असते.जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे, कुवती प्रमाणे कृतज्ञता व्यक्त करतो.

टाटा कुटुंबीय आर्थिक कृतज्ञेचे भारतातील एक मोठं उदाहरण. वास्तविक टाटाना अग्यारीसाठी,पारशी समाजासाठी, भरपूर मदत करता आली असती.पण तसे न करता त्यांनी cancer सारख्या जीवघेण्या व सर्वात जास्त बळी पडण्याऱ्या रोगाच्या संशोधनासाठी संस्था स्थापन केली.आज ह्या संस्थेमध्ये हजारो रोगी औषधोपचार घेतात. हा संस्कार टाटा घराण्यातूनच मिळाला.आज असे अनेक व्यापारी आहेत जे वेगवेगळ्या संस्थाना आर्थिक मदत करतात. कारण त्यांना याचे भान असते कि आपण या समाजाप्रती कृतज्ञ राहायला हवे. हा संस्कार त्यांना घरातूनच मिळालेला असतो. वाडवडील आपल्या उद्योग धंद्यातून देणग्या देताना त्यांनी लहानपणापासून पाहिलेले असते. तसेच अशीही काही उदाहरणे आहेत कि ज्यांनी आर्थिक मदतीची वाच्यता तर सोडाच पण जाणीवही इतरांना होऊ दिली नाही.एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू दिले नाही. मराठी कलाकार श्री चंद्रकांत गोखलेंनी काही लाखाची मदत जवानांच्या विधवांसाठी केली. ती सुद्धा प्रसंगी एकभुक्त राहून. पण मदतीत खंड पडू दिला नाही. हे कित्येकांना माहिती सुद्धा नाही. हे सगळे घडले ते ह्या लोकांवर कळतनकळत  झालेल्या कौटुबिक संस्कारामुळे.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढली ती गोरगरिबांच्या कल्याणासाठी. तेसुद्धा शिक्षणापासून वन्च्छित राहू नयेत, समाजात पुढे यावेत या हेतूने. अण्णा कर्व्यांनी महिला शिक्षणासाठी संस्था काढली, त्यासाठी प्रचंड कष्ट उपसले, देणग्यासाठी  गावोगाव हिंडले. संस्था निगुतीने वाढवली. ते सगळे घरी झालेल्या  कृतज्ञतेच्या संस्कारामुळेच.इतकेच नव्हे तर अण्णांवर आणखी एक संस्कार झाला होता त्यागाचा.समाज्याबद्दल कृतज्ञता म्हणून काढलेली संस्था आणखी वाढावी म्हणून ठाकरसी कडे सुपूर्द केली. कोणताही आकस बाळगला नाही. अनुताई वाघ तर सगळ सोडून ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासी साठी काम करू लागल्या.मुले शाळेत येत नाहीत म्हणून पाड्यापाड्यात मुले जमवीत फिरल्या.केवळ आदिवासिसुद्धा साक्षर व्हावेत म्हणून.

आणखी एक कृतज्ञता म्हणजे समाज सेवा. अश्याच एका कौटुंबिक कृतज्ञतेच जातिवंत उदाहरण म्हणजे आमटे कुटुंबीय.त्यांची कृतज्ञता म्हणजे नुसतीच कौटुंबिक नव्हे तर अनुवंशिक आहे.नाहीतर व्यवसायाने मालगुजार असणाऱ्या, श्रीमंतीत वाढलेला एक तरुण कुष्ठरोगात खितपत पडलेला माणूस पाहतो काय, त्याबद्दल घृणा येते काय आणि नंतर विचार येतो की आपल्याच घरात असा रोगी असता तर आपण काय केले असते. त्याला वार्यावर सोडले असते? ह्या एकाच विचाराने ऐहिक सुखे झुगारून त्यांच्यासाठी आनंदवन उभारतो, फुलवतो.सुरवातीला एकट्यानेच नंतर इतरांच्या सोबतीने.म्हणूनच ते म्हणत ” साथ सोबत हवी कशाला  मी तर आहे माझा सोबती एकटाच चालत राहीन घेऊन वादळ खांद्यावरती” .तेच वादळ खांद्यावर घेऊन प्रकाश ,विकास आमटे आणि त्यांची मुल चालवत आहेत. हि मंडळी तरी शिकली संवरलेली होती पण गाडगेबाबा तर अशिक्षित होते.तेहि समाजासाठी कृतज्ञ होते. म्हणून ठिकठिकाणी धर्मशाळा काढल्या.शिक्षण संस्था काढल्या ते कृतज्ञतेचे संस्कार  झाल्यामुळेच. सामाजिक बंधील्केच भान जेव्हढे गाडगे बाबांना होते तेवढे भल्या भल्या सुशीक्शिताना नसते.गाडगेबाबांनी याच बरोबर समाजाला स्वच्छता शिकवली.समाजातल्या अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला चढवला.

देशाशी असलेल्या कृतद्यतेमुळे लोकं सैन्यात भरती होतात. शीर तळ हातावर घेऊन लढतात. प्रसंगी वीर मरण पत्करतात.त्यांनी दिलेल्या अहुतीचा देशाला आणि त्यांच्या नातेवाईकांना अभिमान असतो.काही घराण्यात लोकं पिढ्यानपिढ्या सैन्यात भरती होतात.  काही गावच्या गाव अशी आहेत ज्यांचा घरटी एक माणूस सैन्यात आहे.

हि झाली कृतज्ञतेची मोजकी उदाहरणे.पण अशी कितीतरी माणसे जी प्रसिद्धीपरान्मुख आहेत व आपले कार्य अविरत चालू ठेवत आहेत त्यांना प्रसिद्धीची हाव नाही. अशी माणसे आहेत म्हणुन त्यांच्या कर्तुत्वावर  समाजपुरुष खंबीर उभा आहे.

कौटुंबिक संस्काराचे भान कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला असायला हवे. ज्या पालकांनी आपल्याला वाढवले.मार्गी लावले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे.त्यांनी खस्ता खाऊन,प्रसंगी कर्ज काढून आपल्याला शिकवलं, आपल्या पायावर उभं केलं. त्या कृताज्ञेची परतफेड करण आपली जबाबदारी आहे. अर्थात हे होण्यासाठी आपल्यावर तसे संस्कार व्हायला हवेत. त्यासाठी कुटुंब संस्था मजबूत हवी.आणि जोवर कुटुंबसंस्था मजबूत आहे तोवर कुटुंबाचे संस्कार आपल्यावर होत राहतील.आणि कृतज्ञतेच्या माध्यमातून आपण परतफेड करत राहू हि काळ्या दगडावरची रेघ असेल हे नक्की.

— रवींद्र शरद वाळिंबे  

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..