नवीन लेखन...

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना : भाग १

पाय जडशीळ झाले होते. हातापायातल्या बेड्या काचत होत्या . त्या अशा अडकवल्या होत्या की चालताना नुसते कष्ट होत नव्हते, तर मरणप्राय वेदना होत होत्या. त्यात भरीस भर म्हणून आपलं सामान आपणच नेण्याची सक्ती.

अंगावरची जाडीभरडी वस्त्रं , अंग झाकण्यासाठी होती , की बोटीतून उडी मारताना, सर्वांगाला झालेल्या जखमा ,पुन्हा रक्तांकित करून नव्यानं वेदना देण्यासाठी होती , तेच उमगत नव्हतं .

कदाचित इंग्रज शासकांनी दयाळूपणे , पूर्वीच्या वेदना अधिक होत्या, की आताच्या, यासाठी घेतलेली परीक्षा असावी .
‘ चल विनायका , आता पुढच्या असंख्य वेदनांना सामोरं जाण्याच्या दृष्टीनं मनोमन सिद्ध हो .’

विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली .

‘ माते , मला बळ दे , आशीर्वाद दे. पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा या भूमीची सेवा करण्यासाठी …’

तो स्वतःशीच हसला ,

‘ माते , इंग्रज सरकार राहील का तोपर्यंत ? ‘
त्यानं सर्वांकडे पाहिलं . त्याच्याभोवती कडेकोट बंदोबस्त होता , त्यानं सर्वांकडे पाहताक्षणी सगळे सावध झाले .
याची पुन्हा पळून जाण्याचा योजना नाही ना ? सर्वांनी त्याला व्यवस्थित घेरलं आणि ओढतच नेऊ लागले.

‘ माते ,मी नक्की परत येईन , तुला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा वसा घेतलाय मी माते , पुन्हा नक्की येईन .तोपर्यंत तुझी असंख्य लेकरं प्रयत्नरत असतीलच .’
त्यानं पाय उचलला , आणि समोर बघत राहिला .

समोरचा अथांग सागर स्वतंत्र होता . आभाळ स्वतंत्र होतं . वाहणारा वारा स्वतंत्र होता आणि मायभू मात्र …
त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं.

‘ होणार ! मातृभूमी सुद्धा स्वतंत्र होणार !! ‘

त्यानं मनोमन प्रणाम केला आणि पुढच्या बोटीत जाण्यासाठी उचललेलं पाऊल पाठी घेतलं .
समोरचं अंदमान कल्पनेनंच नजरेसमोर आणलं .

आपली प्रिय मातृभूमी स्वतंत्र झाल्यावर तिच्या संरक्षणासाठी याच अंदमानवर नाविक तळ उभारून शस्त्रसज्ज केला तर कुठल्याही शत्रूची वाकडी नजर होणार नाही स्वतंत्र हिंदुस्थानकडे पाहण्याची . आणि हो , ही चांगली संधी आहे अंदमानचं निरीक्षण करण्याची .स्वतंत्र हिंदुस्थान सरकारला सांगता येईल , मी अभ्यास केलाय अंदमानचा , चला शस्त्रसज्ज होऊ या …

– विनायक आपल्याच विचारात होता आणि त्याच नादात बोटीवर केव्हा चढलो हे त्याला कळलंच नाही .
एव्हाना त्याचं मन , स्वतंत्र हिंदुस्थानच्या सर्व सीमांचं संरक्षण कसं करता येईल , याच विचारात गुंतलं होत .
बोट मार्गक्रमणा करू लागली होती .

– विनायकाला हे माहित नव्हतं , की त्याला नेणारी बोट नरक यातनांच्या मार्गावर होती .

– हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा कैक योजने पाठी पडू लागला होता .

सावरकर घराणं दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकायला लागलं होतं.

नियतीसुद्धा हतबल होऊ लागली होती .

भविष्याचं गहनगूढ विवर , अथांग , अमर्याद होऊ लागलं होतं …
( क्रमशः)

श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..