नवीन लेखन...

कबुतरखान्यांच्या निमित्ताने…

Kabutarkhana - Interesting Facts

p-39039-Kabutarkhana-Dadar

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे. असो.

बऱ्याच वर्षापूर्वी काही देशांनी कबुतरखान्यांचा खतासाठी आणि कबुतरांचा संदेशवाहक म्हणून कसा उपयोग करून घेतला हे पाहणार आहोत.

इराणच्या इस्फहान प्रांतात ठराविक अंतरावर काही मनोरे उभे दिसतात. या मनोर्‍यांची आता पडझड झाली आहे. हे मनोरे माती व विटांनी बांधलेले आहेत. ते थोडेसे टेहळणी बुरुज असतील असे वाटते. याला बंदुकांसाठी असतात तसे झरोके नाहीत हे लक्षात येते व आपण अजुनच गोंधळून जातो, विचार करायला लागतो. अशा ओसाड प्रदेशात जेथे ना शहर, ना लोकवस्ती तेथे कोण कशाला असले टेहळणी बुरुज उभे करेल? बरे गंमत म्हणजे जर टेहळणी बुरुज असतील तर एवढ्या जवळ कोण उभे करेल? कारण याची उंची आहे जवळ जवळ ३० ते ४० फूट. हे धान्य साठवायची कोठारे असतील का? का प्राचीन विट भट्ट्या असाव्यात? का दुपारच्या उन्हात झळींपासून संरक्षण करुन मस्त पैकी झोप काढायच्या या श्रीमंतांच्या जागा असाव्यात?

सतराव्या शतकात एका जर्मन माणसाने इराणमधे प्रवास केला आणि त्यावर एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने इराणच्या कलिंगडाचे आणि बागांचे फारच गोडवे गायले आहेत. या पुस्तकात हे मनोरे म्हणजे कबुतरांसाठी बांधलेली घरे आहेत याचा उलगडा होतो. ही बांधली गेली १५०० सालात शहा अब्बासच्या काळात. कबुतरांसाठी घरे बांधण्या एवढा हा राजा कोमल ह्रद्याचा होता असा गैरसमज करून घेऊ नका. हा एक बुद्धिमान व शास्त्रीय दृष्टिकोन असलेला राजा होता. ही कबुतरखाने हजारो कबुतरांना आसरा द्यायची. इराणमधे त्या काळात ३००० पेक्षा जास्त असले मनोरे उभे केले गेले होते. एका परदेशी प्रवाशाने तर म्हटले, “जनतेची घरेही एवढी चांगली असती तर बरे झाले असते.” काही राजांनी तर कबुतरांच्या शिकारीवर बंदीही घतली होती. या कबुतरखान्याची रचना मोठी वैशिष्ठ्यपूर्ण असायची. याची बाहेरची भिंत कच्च्या विटांची व त्याच्या गिलाव्यासाठी चुना व जिप्सम वापरण्यात येई. मोठ्या कबुतरखान्या्चा व्यास ७० फूटापर्यंत असायचा तर उंची साठ फुटापर्यंत व ही शेतांमधे उभी केली जायची.

या कबुतरांसाठी एवढे सगळे करायचे खरे कारण होते त्यांची विष्ठा. हे कबुतरखाने त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे ही विष्ठा गोळा करण्यासाठी वापरले जायचे. या विष्ठेत नत्राचे प्रमाण खूप असते त्यामुळे ज्या जमिनीत नत्र कमी असते त्याच्यासाठी ही विष्टा म्हणजे वरदानच ! शिवाय यात फॉस्फरसचे प्रमाणही खूप असते. थोडक्यात हे त्यावेळचे एक चांगले खत होते असे म्हणायला हरकत नाही.

हेच खत इस्फहानमधे फळांच्या झाडाला, काकड्यांच्या वेलांना व कलिंगडाला घालत असत. त्या काळात हे खत वर्षाला एका झाडा्ला ९०० ग्रॅम घालत असत. म्हणजे एका हेक्टरला साधारणत: १७०० किलो खत लागे. या खताने पीकाचे उत्पन्न दुप्पट होई असे लिहून ठेवलले आहे. कोणीतरी हा प्रयोग सध्या करायला हरकत नाही. हिशेब केला तर एका मोठ्या कबुतरखान्यात त्या काळी साधारणत: ५ ते ७ हजार कबुतरे निवास करत असावीत असे गृहीत धरुया. एक कबुतर वर्षाला साधारणत: २७५० ग्रॅम विष्टा तयार करते हे गृहीत धरले तर वर्षाला १६५०० किलो खत तयार होत असे. सर्व साधारण परिस्थितीत हे खत १८००० झाडांना पुरत असे म्हण्जे जवळ जवळ २४ एकर जमिनीला.

ही विष्टा चामडे कमविण्याच्या उद्योगातही वापरले जायची कारण पाण्यात मिसळल्यावर त्याचे अमोनियम क्लोराईड तयार व्हायचे ज्याने कातडे मऊ पडते. ही विष्ठा बंदूकीची दारू तयार करण्यासाठीही वापरली जायची. या दारूत त्या काळी ७५ % पोटॅशियम नायट्रेट, १० % सल्फर, आणि १५ % कार्बन असतो. त्या काळात पोटॅशियम नायट्रेट इराणमधे फक्त याच विष्ठेतून मिळायची सोय होती.

कबुतरखान्यात कबुतरांना अन्न मिळत नसे ते त्यांना बाहेरून आणावे लागे. ही कबुतरे फक्त रात्रीच या इमाततीत आसर्‍याला येत. विटांच्या जाळीत बसण्यासाठी अत्यंत योग्य अशी जागा कबुतरांना उपलब्ध करून देण्यात आली होती. कबुतरांची विष्टा सरळ मधे एका हौदात पडेल अशी याची रचना आहे जेथे ती वाळे. हा हौद वर्षातून एकदा उघडला जाई व आतील खत विक्रीला काढण्यात येई. याचा दर साधरणत: पाच किलोला चार ब्रिटिश पेन्स असा होता. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कबुतरे निवार्‍याला येतील असे वास्तूशास्त्र या इमारतीत वापरले गेले आहे.

उल्लेखनीय असा ‘संदेशवाहक कबूतर’ आणि मानवी संबंधाचा इतिहास खूपच रोमहर्षक आहे. इ.स. ३००० पूर्वी मेसोपोटेमिया आत्ताचा आधुनिक इराकच्या पुराणकथेत कबुतारांविषयी माहिती सापडते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रायटर्स वृत्तसंस्थेने १८५० मध्ये आपली सेवा सुरू केली. त्यात ४५ कबुतरांना रिपोर्टर बनवले. ते जर्मनीच्या आतेन शहरापासून ते बेल्जियम ब्रुसेल्स पर्यंत ताज्या बातम्या पोहोचविणे आणि शेअर भावांच्या सूचना देण्याचे काम करत होती. जरी दोन्ही देशांच्या दरम्यान टेलीग्राफिक  सेवा उपलब्ध होती परंतु तांत्रिक कारणास्तव सूचनांची देवाणघेवाणीत विलंब होत असे. कबूतर रेकॉर्ड दोन तासामध्ये ७६ मैल अंतर पार करत असतं. ट्रेनपूर्वी चार तास आधी पोहोचत असतं, परंतू विमानाच्या गती पेक्षा कबूतरांची गति ४० टक्के कमी होती. कबुतरं सूर्याची दिशा, गंध आणि पृथ्वीचे चुम्बकत्व यांच्या मदतीने जेथून त्यांना पाठवण्यात आलं त्याच ठिकाणी परत येण्याची दिशा निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग करीत असतं. टेलीग्राफ, टेलिफोन आणि दळणवळणाच्या नवीन व्यवस्था सुरु झाल्यानंतर ‘कबूतर संदेशवाहक सेवा’ खंडित करण्यात आली.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हजारो जणांचे प्राण वाचविण्याचे काम केलेली संदेशवाहक कबुतरे जरी संदेश पोहोचवण्यात तरबेज असली तरी ती काही गंभीर आजारांची संवाहक आहेत. कबुतरांच्या पंखातून निघणाऱ्या ‘फिदर डस्ट’मुळे अति संवेदनशील निमोनिया आणि फुफुसांचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. धूळ, प्रदूषण, कबुतर आणि किड्यांच्या विष्ठेपासून वेगवेगळ्या प्रकारच्या २०० हून अधिक प्रकारच्या अलर्जी होतात. आणि यावर प्रतिबंध घातले नाहीत तर दम्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता वाढते. यासाठी मुंबईतील सर्व कबुतरखाने शहरातील नागरी वस्त्यांपासून दूर जागी स्थलांतरित करायला हवेत. याबाबतीत मुंबई महापालिका आणि प्रशासनाने नवीन धोरण आखून त्याची त्वरित अंमलबजावणी करणे आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत गरजेचे आहे.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..