नवीन लेखन...

लोकमानस बदलणारी प्रसारमाध्यमे 

सगळ्याच विकारांची आरती ओवाळणं प्रसारमाध्यमाकडून घडत आहे. ‘या आणि ईश्वराच्या शक्तीचा अनुभव घ्या हे होतं एका जाहिरातीचं शिर्षक. एका प्रमुख वृत्तपत्रातलं. एकीकडे विज्ञानाचे लेख छापायचे. वैज्ञानिक दृष्टीकोनावर लिहायचं व अज्ञानाला खतपाणी घालणार्‍या जाहिराती छापायच्या.

समाजाला संभ्रमित करणार्‍या तसेच अनेक गोष्टींचा सोयीस्कर प्रचार, प्रसार, माध्यमांकडून होत आहे. प्रसारमाध्यमे लोकांचे मानस बदलत आहेत. कोणत्या गोष्टीला कोपरा दाखवायचा, कोणत्या गोष्टीचा कचरा करायचा, कोणत्या गोष्टीचा निचरा करायचा व कोणत्या गोष्टीला देव्हारा दाखवायचा हे प्रसारमाध्यमे ठरवत आहेत. वर्तमानपत्र रद्दी होईपर्यंत अनेकांच्या मनावर ते राज्य करतं. क्षणाची प्रसारमाध्यमे अनंत काळाची प्रचार माध्यमे ठरत आहेत. प्रसारमाध्यमांनी आज लोकांना इतकं गुंतवून ठेवलंय की, त्या गुंत्याबाहेर येणं कठीण झालंय. सजीव माणसापेक्षा प्रसारमाध्यमाला लोक आज जास्त वेळ देत आहेत. कोणत्या गोष्टीचा प्रसार करायचा व कोणत्या गोष्टी ‘पसार करायच्या, कोणता विचार जोपासायचा, कोणता संस्कार रुजवायचा, कोणता आचार पुजायचा हे प्रसारमाध्यमे ठरवत आहेत. वास्तुशास्त्र, अंधश्रध्दा विकृतीवर नकारात्मक बातम्यांवर प्रसारमाध्यमे पोसली जात आहेत.

मुद्दा हा आहे की, अशा जाहिराती नामांकित वृत्तपत्राने प्रसिध्द करावी का? एखादी घटना समाजात अनेक प्रश्न निर्माण करते. काही लोकांच्या बाबतीत घडणारा अनुभव सार्वत्रिक कसा होवू शकतो? पार्वती अम्मांकडे जाणार्‍या भिडे गुरुजींच्या बागेतला आंबा खाऊन काही स्त्रियांना अपत्ये झाली, त्याला इतरही काही कारणे असू शकतील, केवळ हात पोटावरुन फिरवल्यामुळे आंबे खाऊन चमत्कार झाला असेल का? पार्वती अम्मांकडे जावून, भिडेंचा आंबा खाऊन ज्यांना अपत्ये झाली नाहीत त्यांचे अनुभव समाजासमोर येत नाहीत. यशोगाथाच केवल समाजासमोर येत असतात. प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव असतो. कोणतीही गोष्ट चमत्कार नसते. कारण समजण्यात असमर्थता असू शकते. विशिष्ट काळापुरती एखादी गोष्ट अनाकलीय वाटते. कालांतराने सत्य समोर येते. ज्या गोष्टी उलगडत नाही त्या देवाच्या खात्यावर टाकून अनेक जण मोकळे होतात.

आज सर्व जगभर धर्मश्रध्दांचा र्‍हास होत आहे. काही जण आपला धर्म प्रबल करुन, लोकांना धार्मिक बनवत आहेत.

चिकित्सेअंती स्वामी विवेकानंद ईश्वर ‘मानवनिर्मित आहे असे म्हणतात. कृष्णमूर्ती सर्व धर्मग्रंथांनी वर्णिलेला ईश्वर नाकारतात. आगरकर आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियास ईश्वर ‘अगम्य आहे असे म्हणतात. महावीर ईश्वर नाही असे म्हणतात व गौतम बुध्द ईश्वरपूजा, प्रार्थना, तपश्चर्या इत्यादी गोष्टींना निरर्थक व थोतांड म्हणतात. संस्कार करण्यास अनेक संस्था निष्प्रभ ठरत असताना प्रसारमाध्यमांनी संस्कार द्यायला हवा, विकार नव्हे. लोकांचे विकार बळावत आहेत. चोचले पुरवले जात आहेत. कारण प्रसारमाध्यमे हवं ते देत आहेत. मंदिर कुठे बांधायचे याऐवजी संस्कार कुठे रुजवायचा याचा विचार जाणणं महत्वाचे नाही का? शांती, स्वाभिमानला सैलाबमध्ये बुडविण्याची परंपरा प्रसारमाध्यमे चमत्कार करुन समाजामध्ये आहट निर्माण करीत आहेत. समाजाची दास्तान सांगणार्‍या प्रसारमाध्यमांची बुनियाद, चट्टानप्रमाणे मजबूत हवी. गुलशनकुमारला प्रार्थना करतांनाच मृत्यू येतो, देवदर्शनाला जाणारे अपघाताने मरतात, अशा घटनाही समाजात घडतातच. श्रध्देच्या राज्यात अनेक माणसे अंधश्रध्देचे गुलाम म्हणून जगतात. मृत्युंजय मंत्र म्हणून भैय्यु महाराज मृत्यूला जवळ करतात. लोकांना उद्देश करणारे आत्महत्या करतात.

वीर सावरकरांच्या मते ईश्वर असेल, पण तो व्यक्तीच्या व समाजाच्या जीवनात किवा ऐहिक घडामोडीत लुडबुड किवा चमत्कार करु शकत नाही. चमत्कार म्हणजे कार्यकारणभावाचे अज्ञान असे त्यांचे म्हणणे. म. फुलेंच्या मतेही ईश्वराची प्रार्थना केली तर तो प्रसन्न होती व न केली तर तो अप्रसन्न होऊन दंड करतो असे मानणे चूक आहे.

जे. कृष्णमूर्तींच्या मते ‘माझे ईश्वरावर प्रेम आहे असे म्हणणे निव्वळ मूर्खपणा आहे तुम्ही देवाची आराधना करतात, तेव्हा तुमचीच पूजा करतात. करुण आराधनेमागे खरे तर प्रेमच नसते. (कुठली तरी अपेक्षा आराधनामागे असते) देवाची उदबत्तीही शेवटी आपल्याच सोयीनुसार निवडलेली असते. प्रसादही शेवटी आपल्या कुवतीनुसारच, आवडीनुसार. देवाच्या नावावर स्वतःचा उत्सव, स्वतःचा उदोउदो, स्वतःच्या अस्तित्वासाठी काहींना देव हवाच. देव असलाच तर काय घ्या म्हणून अनेकजण चिकित्सेच्या फंदात पडत नाहीत. या मान्यवरांनी केवळ दैववाद नाकारला आहे असे नसून ईश्वर असल्यास तो  मानवाच्या ऐहिक जीवनात दखल घेतो, हस्तक्षेप करतो, शाप देतो, प्रसन्न होतो अशा सर्व कल्पना स्पष्टपणे नाकारल्या आहेत. डॉ. श्रीराम लागूंनी ‘परमेश्वाराला रिटायर करा सांगितलं तरी नवीन परमेश्वराची जाहिरात व नियुक्ती होणारच, त्याचं काय? व्यवस्था चालवण्यासाठी निवृत्ती, भरती, या बाबी आवश्यक असतात.

चमत्कार सिध्द केल्यास लाखाचे बक्षीस अजून तरी कुणी घेतलेले नाही. विज्ञानाची प्रगती झाली तर चमत्कार कमी होत नाहीत. चमत्काराच्या मागील विज्ञानाऐवजी अज्ञानात लोक समाधान मानत आहेत. प्रत्येक चमत्कार विज्ञानाचा अवतार आहे.  एखाद्या व्यक्तीचं कौशल्य अनुवंशिकता व परिस्थितीची देण असते. अनुवंशिकतेचा ‘गुलमोहोर किवा ‘निवडुंग परिस्थितीनुसार होत असतो.

कोणत्याही माणसाने ईश्वराला चर्मचक्षूंनी पाहिलेले नाही किवा कधी  कोणी पाहणार नाही. ईश्वर ही मनुपत्रनिर्मित अशी मनुष्याची प्रतिमूर्ती आहे. स्वतःचा उध्दार स्वतःच करुन घे… असे विवेकानंदांनी म्हटलं आहे. आधी देवाचे अस्तित्व मानणारा व नंतर ‘मी नास्तिक का आहे? या लेखात भगतसिह म्हणतो, ‘श्रध्दा व अंधश्रध्दा धोकादायक आहेत.त्या माणसाचा मेंदू शिथिल करतात व त्याला प्रतिगामी बनवतात. जो मनुष्य स्वतःला वास्तववादी म्हणवतो त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रध्दांना आव्हान दिले पाहिजे. मानवेंद्र नाथ रॉयच्या मते ‘बुध्दीने शोध करीतच मानवाने कृती केली तर त्यामुळे मानवी जीवन सफल होईल. केवळ श्रध्देने कृती केल्यास मानव वैफल्याचा धनी होईल. या सर्व पार्श्वभूमीवर कोणते विचार समाजासमोर ठेवायचे.

एका दैनिकांत उल्कापात झाल्याची बातमी आली होती. उल्का पडल्याचा परिसर, खड्डा किती खोल पडला व किती व्यासाचा हे काही लोकांची नावे व मुलाखती घेवून वार्तापत्रात छापलं होतं. प्रत्यक्षात तिथे जावून, लोकांना विचारले असता उल्का कुठे पडली ते स्थळ सापडले नाही.

खरंच उल्का पडली का? का बातमीसाठी व वार्तापत्रासाठी पाडली? अशा वार्तापत्राला उत्कृष्ट वार्तापत्र बक्षिससुध्दा मिळेल. समूहसंपकर्साधनांनी उल्कापात घडविलाच पण प्रत्यक्षात संभ्रमच होता. वर्तमानपत्राचे खुलासे न आल्याने संभ्रम निर्माण होतो. हवामानखात्याचा अंदाजही संभ्रमात टाकतो.

निवडणूक आयोगाने निवडणुकांचा अंदाज व्यक्त करण्यास बंदी घातली आहे. प्रसारमाध्यमांचा अंदाज अचूक हवा, सोनियाचा दिन येणार अशी आशा लावणारा नसावा. ‘आहे मनोहर तरी… शरदाच्या चांदण्याची दुसरी बाजूही लोकांसमोर यायला हवी. प्रसारमाध्यमांतून अंधश्रध्देबाबत, प्रेमाबाबत, विवाहबाह्यसंबंध, कामजीवनाबाबत, मानवी स्वभावाबाबत संभ्रमच निर्माण होणार असेल तर त्यांच विकतचे संस्कार कशाला? निवडणुकीच्या काळात कोणतं वर्तमानपत्र खरं ग्राह्य धरावं हा संभ्रम पडतो. एकाच सभेच्या वर्णनाचे तीन तेरा झालेले असतात.

आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्यांचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा? सेलच्या जाहिराती, नियुक्तीसाठी जाहिराती, फसवणूक जोपासणार असतील तर आदर्शांचे अग्रलेख कशासाठी? दिशाभूल करणार्‍या गोष्टी भूल देवून केल्या जात आहे. एकीकडे वैधानिक इशारा द्यायचा आणि दुसरीकडे मृत्यू स्वस्त करायचा असे किती दिवस चालणार?

‘संभ्रम असतो तिथे अस्वस्थता असते, ही अवस्था व्यवस्था संभ्रमात टाकते.

— डॉ. अनिल कुलकर्णी 
मोबा. नं. ९४०३८०५१५३

ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

 

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 28 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..