नवीन लेखन...

दैव भोग !

‘दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या कर्माने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं दैव त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने हैदोस घातल्याने शेतकऱ्यांचं हिरवं स्वप्न पिवळं पडुन शेतातचं सडून गेलं होतं… खरीप हातातून गेल्यावर  किमान रब्बीचे पीक घरात येईल याची मोठी आस शेतकऱ्याला लागली होती. पण इथंही ‘दैव’ आडवं आलं. ऐन काढणीच्या मोसमात  वादळवार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने  झोडपून काढल्याने पिके अक्षरशः मातीमोल झाली. सोंगणी करुन ठेवलेल्या गहू-हरबऱ्यात पाणी घुसले. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत असताना उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून दुसरा पर्याय शेतकऱ्यांजवळ उरला नाही..

काय करावं शेतकऱ्याने?

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली की, अनेकांना कंठ फूटतो ना..! त्यांनी सांगा, काय चूक आहे शेतकऱ्यांची?
शेतकऱ्यांनी चुकीच्या मोसमात पेरणी केली का?
कारवाया टाळण्यासाठी संगणमत करून मंत्रालयातील फायली जाळल्या जातात… अपहार दडपण्यासाठी सूतगिरण्या, सहकारी बँका, साखर कारखान्यांना आगी लावल्या जातात..मग, उत्पन्न लपवण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाला लाच देऊन असे एखाद षडयंत्र तर रचलं नाही ना?
तुमच्या मनात काही शंका आहे का?
सीबीआय, एनआयए असल्या एकाद्या चौकशीची तुम्ही आता मागणी करणार आहात का?
हे बुद्धिवाद्यांनो, अवकाळीवर तुमची प्रतिक्रिया आम्हला हवी आहे..!

एसी कॅबिन मध्ये बसून झीरो बजेट शेतीची किर्तणं करणाऱ्यांनो, तुम्ही सांगा, आता काय करायचं? कशी करायची झिरो बजेट शेती?? पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च, काढणीचा खर्च.. कशातून कोणता खर्च वजा करायचा म्हणजे खाली झिरो येईल ? तुमच्याजवळ कृषीच्या डिग्री आहेत ना..! मग सांगा, शेतीचा बजेट झिरो कसं ठेवायचं?

हवामान खात्यातील तज्ज्ञांनो, तुम्ही तर सांगितलं होतं, कुठीमुठी तुरळक पाऊस पडणार आहे! आमच्याकडे तर बेफाम झाला..सोबत गार बी होती.. कसा काय अंदाज चुकला तुमचा? आता तुम्ही राजीनामा देणार आहात का?
किमान, यांची या महिन्याची पगार कपात तर झाली पाहिजे ना?

मायबाप सरकार, आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांनी कसं जगायचं? तुमचे खरिपातलं सर्व्ह अन मदत पुराण अजून संपलं नाही..हजार-पाचशेच्या नुकसान भरपाईच्या चॉकलेटची शेतकऱ्यांना अजूनही आस आहे.. आता अजून कोणतं नवीन चॉकलेट तुम्ही शेतकऱ्यांना देणार आहात?

महिनाभरापूर्वीच केंद्राचा अन् राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला.. योजनांची नावे अन शेतीसाठीच्या तरतुदीचे आकडे एकूण आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती! पण, हे कागडावरचे आकडे प्रत्यक्षात कधी उतरणार आहेत का?

शेती विकास, नवीन तंत्रज्ञान, अमूक शेती अन टमुक शेतीच्या वलग्ना करणाऱ्यांनो तुम्हाला हवामानाचा, बाजारपेठेचा, शेतकऱ्यांच्या अवस्थेचा अंदाज लावता येत नाही.. तुम्ही काय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार?

लक्षात ठेवा, अतिवृष्टी होवो की अवकाळी येवो.. गारपीट असो की अवर्षण! सगळे दैव भोग भोगून आम्ही इमानेइतबारे शेती करणार आहोत.. तुम्हा सगळ्यांना खाऊ घालणार आहोत! पण, ही आमची शेवटची पिढी आहे.. शेतीकडे तुम्ही असंच दुर्लक्ष करत राहिला तर आज ज्याप्रमाणे आपण पेट्रोलसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे… त्याचप्रमाणे उद्या आपल्याला गव्हासाठीही परकीय देशावर अवलंबून राहावं लागेल!

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..