नवीन लेखन...

बिझिनेस स्त्री-पत्रकार सुचेता दलाल

बिझिनेस स्त्री-पत्रकार सुचेता दलाल यांचा जन्म ३० जानेवारी १९६२ रोजी मुंबई येथे झाला.

सुचेता दलाल या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्या मध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियां सारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन मधील गडबडी उघडकीस आणल्याच, परंतु त्यांनी ५०० कोटी रुपयांचं ‘बिग बुल’ प्रकरण उघडकीस आल्याने इतिहास घडवला.

सुचेता यांच्या वडिलांची नोकरी बदलीची. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणं झालं. आई माहेरची भातखंडे असल्याने घरात मराठी बोलण्याची सवय होती तरी, शिक्षण इंग्रजीत. बेळगाव येथे शालेय शिक्षण. घर तसं मध्यमवर्गीय. आई-वडिलांनी मुलगा-मुलगी असा फरक न करता तिघांनाही सारखंच वाढवलं. पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात शेअर मार्केट, त्यातील चढ-उतार, बॉण्ड्स, रोखे, ट्रेडिंग आदी शब्दांशी सुचेता यांची ओळखसुद्धा नव्हती. पण आईने या मुलांना स्वावलंबी तर बनवलंच, पण मुख्य म्हणजे त्यांचं सामान्यज्ञान वाढवलं, जगातील व्यवहारांची कल्पना ते देत गेले. रोजच्या बातम्या-अर्थात रेडिओवर- ऐकल्या पाहिजेत असा नियम होता. त्यावर काही तरी बोलणं होई. शाळेतील सगळ्या कार्यक्रमांत मुलांनी भाग घ्यायला हवा, मुलांचा सर्वागीण विकास व्हावा याबद्दल आई विशेष जागरूक असे. त्याबरोबरच त्यांचे पाय जमिनीवरच राहावेत हेही त्यांनी शिकवलं. बुद्धिमान सुचेता तशी फारशी बोलकी नव्हती, (आताही आवश्यक तेवढंच, ठाम पण मृदू बोलणं). बहीण मात्र बोलकी, लोकांत मिसळणारी, रमणारी! पण एन्.सी. सी.चा उपक्रम, कॅम्पला जाणं, एकटीनं, जबाबदारीनं राहणं, आपल्या कामाचं, वेळेचं नियोजन करत ते नीट पार पाडणं हे सुचेता यांच्या आवडीचं होतं.

त्यामुळेच स्टॅटिस्टिक्सची घेऊन पदवी घेतल्यावर, कायद्याची पदवी मिळवायची ठरवून त्या मुंबईला आल्या आणि स्वतंत्रपणे मुलींच्या वसतिगृहात राहू लागली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी हॉटेल ओबेरॉयमध्ये दीड वर्ष नोकरीही केली, पदवी मिळवली. त्या काळात खूप अनुभव गाठीशी बांधले. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक जणी शिकाऊ पत्रकार किंवा चित्रपटक्षेत्रात धडपडणाऱ्या होत्या. त्यांचे एकेक विलक्षण अनुभव ऐकताना आपण पत्रकारच व्हायचं हा विचार पक्का होत गेला. आई-वडील डॉक्टर असले तरी मुलांनी तोच व्यवसाय निवडावा, असा त्यांचा आग्रह नव्हता. पण पत्रकारितेशीही तशी काहीच ओळख नव्हती. नाही म्हणायला मुंबईला आल्यावर काही दिवस त्या आपल्या बहिणीकडे राहिल्या. ‘लोकसत्ता’चे पहिले संपादक त्र्यं. वि. पर्वते हे त्यांच्या बहिणीचे सासरे. तिथे त्यांची प्रथम पत्रकारितेशी ओळख झाली होती.

ओबेरॉय मधील नोकरीत त्यांचा जीव रमला नाही, पण एका वेगळ्या वातावरणाशी परिचय झाला. १९८४ मध्ये पत्रकार म्हणून ‘फॉर्च्यून इंडिया’ या नियतकालिकात आरंभ केला. त्या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. तरी नंतरच्या ‘बिझिनेस स्टॅण्डर्ड’मधील नोकरीच्या साडेचार वर्षांनी आपल्याला पत्रकार म्हणून घडवलं, असं सुचेताजींना वाटतं.

दोन वर्षांपूर्वी ‘मनीलाइफ’च्या मासिकातील एका लेखात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’मधील अफरातफर त्यांनी उघडकीला आणली. त्यामुळे आपली बदनामी झाली असं म्हणत ‘एनएसई’ने त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा लावला होता. गेल्याच महिन्यात त्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. ‘एनएसई’ला पन्नास लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला. मात्र यातील ४७ लाख रुपये ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल व मसीना हॉस्पिटल’ यांना देऊन आपल्या खर्चापोटी केवळ तीन लाख सुचेता व देबाशीष यांना मिळतील अशी व्यवस्था आहे. वाटले, ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ असं यांच्या बाबतीत म्हणता येईल.

१९९२ सालचा आर्थिक घोटाळा हा त्या वेळेपर्यंतचा सर्वात मोठा, पहिला घोटाळा होता. त्याचा आकार एवढा प्रचंड होता की, लोकांना किंवा त्या क्षेत्रातील इतरांनाही त्याची खरी व्याप्ती आरंभी कळलीच नाही. बोफोर्स घोटाळ्याच्या पन्नासपट अधिक होती. उघडकीस आलेल्या या घोटाळ्याने शेअरबाजारात बॉम्बस्फोटच झाल्यासारखी स्थिती झाली. फेरवानींसारख्या काही संबंधितांचे अचानक मृत्यूही झाले. योगायोगाने, वर्षांच्या आत शेअरबाजार साखळी बॉम्बस्फोटांनीही हादरला.

सुचेताजींनी ‘स्कॅम’ या आपल्या पुस्तकासाठी, सट्टेबाजांसकट, असंख्य लोकांच्या मुलाखती घेत, शेअर बाजारातील उलाढालींची संपूर्ण, अंतर्गत माहिती मिळवलीय. ते तुकडे जोडत समग्र, सुसंबद्ध पट तयार केलाय. ललितेतर अशा या पुस्तकात एखाद्या उत्कृष्ट कादंबरीप्रमाणे कथानकाची गुंफण करत, त्यातील उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. या खेळातील सारे खेळिये अतिशय तयारीचे होते. त्यांची कार्यपद्धती, मनोभूमिका, काय होती हे सांगणारी शब्दचित्रं इतक्या नेमकेपणाने व तपशीलवार रेखाटली आहेत की, ती सारी माणसं वाचकांच्या डोळ्यांसमोर साक्षात उभी राहतात. पुन्हा हे सारं वास्तव आहे याचा विसर त्या पडू देत नाहीत, सोप्या भाषेत समजावून देतात. यातील आणखी नोंद घेण्याजोगी बाब अशी की, स्वत: केलेलं एवढं मोठं धाडस, पत्करलेले धोके यांचा कुठेही उल्लेख नाही. ‘मी-आम्ही’ला एवढं बाजूला ठेवण्याचा त्यांचा निश्चय व तटस्थपणा तेथे सहजतेने दिसतो.

मात्र कोणताही मोघमपणा न ठेवता परदेशी बँका, स्वदेशी बँका, त्यातील अधिकारी, सरकारी बाबू, उच्चपदस्थ या साऱ्यांच्या चुका त्यांनी त्यांच्या पदरात घातल्या आहेत. कदाचित त्यामुळेच, सरकारी यंत्रणा हालल्या. अर्थसुरक्षेसाठी शेअर डिमॅट करण्यासारखे काही उपाय योजावे लागले. काही नियम नव्याने केले गेले. १९९३-९४ या वर्षांत या पुस्तकाने सर्वाधिक खपाचा विक्रम केला. त्यानंतर हे पुस्तक २००१ मध्ये नवीन माहितीसह From Harshad Mehta to Ketan Parekh -The Scam या नावानं प्रसिद्ध झालं. आर्थिक उदारीकरणाचा आरंभ झाल्यावर साऱ्या विधिनिषेधांना गुंडाळत झटपट पैसे मिळवण्याची माणसाला सुटलेली प्रचंड हाव, आत्यंतिक स्वार्थ हे सामाजिक रोग साथीसारखे वेगाने पसरत होते. हर्षदप्रमाणेच केतनने एकविसाव्या शतकाच्या स्वागता(?) साठी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये घोटाळे केले. ती कहाणी यात समाविष्ट केली आहे. त्यामुळे एका तपाच्या काळातील शेअरबाजाराच्या इतिहासाचं दस्तावेजीकरण यात झालं आहे.

गेली दहा वर्ष सुचेता दलाल व देबाशीष बसू स्वतंत्र रीतीने आपल्या ‘मनीलाइफ फाऊंडेशन’तर्फे अर्थसाक्षरता वाढवणं, सुरक्षित आर्थिक व्यवहारांबाबतचं समाजप्रबोधन करणं, सामान्यांच्या त्याबाबतच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणं, ही कामं करत आहेत. त्यासाठी विविध चर्चासत्रे, गाठीभेटी, समुपदेशन असे अनेक पर्याय वापरत आहेत. माणसामधील उद्यमशीलता, सर्जनक्षमता, आव्हानं झेलण्याची तयारी, चाकोरीबाहेर जात नवं विश्व उभारण्याची धडपड या गुणांची कदर सुचेताजींना मनोमन आहे. त्यांनीही आपल्या आयुष्यात नवनवीन आव्हानं यशस्वीपणे झेलली आहेत. त्यामुळे न रुळलेल्या वाटेने जाणाऱ्या अशा ‘पाथब्रेकर्स’बद्दल त्यांना कुतूहल होतं. त्यांपैकी निवडक व्यावसायिक, उद्योजक, कलावंत, यांच्या दीर्घ मुलाखती घेऊन त्या ‘पाथब्रेकर्स’ या नावाने दोन खंडांत प्रकाशित केल्या आहेत. शिवाय आर्थिक क्षेत्रात धाडसी प्रयोग करणाऱ्या ए. डी. श्रॉफ यांचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. २००६ मध्ये भारत सरकारने सुचेता दलाल यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. सेबीचे सल्लागारपद, ग्राहकोपयोगी व ग्राहकहितासाठी काम करणाऱ्या देशभरातील काही संस्थांचं विश्वस्तपद आदी मान सुचेता दलाल यांना मिळाले आहेत.

सुचेता यांना पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरीबद्दल चमेलीदेवी पुरस्कार, मुंबई पत्रकार संघ पुरस्कार व फेमिना वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

देबाशीष बसू आणि सुचेता दलाल यांच्या ‘द स्कॅम’ या पुस्तकावर गेल्या वर्षी ‘स्कॅम ९२’ ही वेब सीरिज आली होती.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..