नवीन लेखन...

सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा

६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचे मूळ नाव एल्डा आहे. त्यांचे वडिल अल्बर्ट सिन्हा हे बंगाली ख्रिश्चन तर आई नेपाळी होती. शाळेतील मित्रमैत्रिणी तिला तिच्या अल्डा या नावावरुन डालडा असे चिडवत असल्याने तिचे नांव बदलण्याचा निर्णय घेतला गेला.

माला सिन्हा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ साली कोलकाता येथे झाला. बेबी नझमा या नावाने जय वैष्णेदेवी या बंगाली चित्रपटातुन तिचा बालकलाकार म्हणुन प्रवेश झाला. त्यानंतर श्रीकृष्ण लिला, जोग बियोग, धुली या सारख्या चित्रपटांतुन ती बालकलाकार म्हणुन चमकली. लहानपणापासुनच तिने नृत्य व गायन या कलाप्रकारांचे प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केलेला होता. बंगाली दिग्दर्शक अर्धेंदु बोस यांनी शाळेतील नाटकातुन त्यांचा अभिनय पाहिला आणि लागलीच तिच्या वडिलांना भेटुन तिने चित्रपटांत नायिकेचे काम करावे यासाठी त्यांची संमती मिळवली.

रोशनआरा या बंगाली चित्रपटाव्दारे माला सिन्हा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्या नंतर अनेक बंगाली चित्रपटांतुन तिने अभिनय केला. अशाच एका बंगाली चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मुंबईला आलेली असतांना अभिनेत्री गीता बालीशी तिची भेट घडुन आली. त्या भेटीने प्रभावित झालेल्या गीता बालीने केदार शर्मा यांचेशी तिची गाठ घालुन दिली. अशारितीने रंगीन रातें हा केदार शर्मांचा हिंदी चित्रपट तिला मिळाला.

मात्र हिंदीत माला सिन्हा यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला बादशाह. यात अभिनेता प्रदिप कुमार नायक होता. त्यानंतर एकादिशी नावाच्या पौराणिक चित्रपटातुन त्यांनी अभिनय केला. मात्र सुरवातीचे हे दोन्ही चित्रपट आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरले. त्यानंतरचा माला सिन्हा यांची प्रमुख भुमिका असलेला प्रदिप कुमार बरोबरचा हॅम्लेट हा चित्रपट देखील अयशस्वीच ठरला मात्र यावेळी तिच्या अभिनयाबाबत बोलले जाऊन तिची दखल मात्र घेतली गेली.

प्रदिप कुमार यांचेबरोबर फॅशन, डिटेक्टीव्ह, दुनिया ना माने या सारख्या नायकप्रधान चित्रपटांतुन अभिनय केल्यानंतर अभिनेते बलराज सहानी यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट लालबत्ती, नौशेरखान ए आदिल, फिर सुबह होगी या सारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने माला सिन्हा यांची अष्टपैलु अभिनेत्री म्हणुन ओळख प्रस्थापित झाली.

आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे त्यांचा नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्‍या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.

‘फिर सुबह होगी’ तसेच यश चोप्रा दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘धुल का फुल’ या चित्रपटांतुन तिने घवघवीत यश मिळवले. प्यासा, अनपढ, दिल तेरा दिवाना, गुमराह, हिमालय की गोद में, आँखे, मर्यादा हे त्यांच्या सिनेकारकिर्दीतील यशस्वी व विशेष उल्लेखनीय चित्रपट आहेत. बहुरानी, गुमराह, गहरा दाग, अपने हुए पराये, जहाँआरा या चित्रपटांतील तिचा अभिनय चित्रपट जाणकार सर्वोत्तम मानतात.

माला सिन्हाने राजकुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार यांचे बरोबर अनेक नायिकाप्रधान चित्रपटांतुन अभिनय केलेला असला तरी अभिनेता विश्वजीत बरोबरची तिची रुपेरी पडद्यावरील जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली. आसरा, नाईट इन लंडन, दो कलियाँ, तमन्ना, नई रोशनी, प्यार का सपना, पैसा या प्यार, जाल, फिर कब मिलोगी अशा दहा चित्रपटांतुन ही जोडी पडद्यावर झळकली. २००७मधे त्यांना स्टार स्क्रिनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी दोघांना एकाचवेळी मंचावर बोलावण्यात येऊन गौरवण्यात आले.

त्या काळात मालासिन्हा यांच्या चित्रपटांतील भुमिका या नायकांपेक्षा अधिक सशक्त व महत्वाच्या असत. त्या काळात चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नायकाच्या आधी माला सिन्हाचे नांव नमुद करण्यात येत असे. गुरुदत्त, राज कपुर, देव आनंद, प्रदिप कुमार, किशोर कुमार हे नायक मात्र वरिष्ठ असल्याने याला अपवाद होते. या वरिष्ठ नायकां प्रमाणे शम्मी कपुर, राजेंद्र कुमार, राज कुमार या समकालीन तर मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना, सुनिल दत्त, संजय खान, जितेंद्र, अमिताभ बच्चन या सारख्या त्या काळातील नवोदित अभिनेत्यांसमवेत नायिका म्हणुन माला सिन्हा यांनी अभिनय केला. नवोदितांबरोबर अभिनय करण्यास तिचा नेहमीच होकार असे फक्त तिची भुमिका सशक्त आहे की नाही हाच एक निकष ती चित्रपटांची निवड करतांना लावत असे.

मर्यादा हा त्यांच्या सिनेकारकिर्दीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपट मानला जातो.

एक अभिनेत्री बरोबरच माला सिन्हा उत्तम गायिका देखील होत्या. ऑल इंडिया रेडीओची त्या मान्यताप्राप्त गायिका होत्या. अनेक भाषांमधुन त्यांनी त्या काळी गायनाचे कार्यक्रमही केले. मात्र चित्रपटांत पार्श्वगायन करण्याची संधी तिला मिळाली नाही. याला अपवाद फक्त ‘ललकार’ या चित्रपटातील मेरे मेहबुब हे गीत.

धुल का फुल, बहुरानी, जहाँआरा, हिमालय की गोद में या चित्रपटांतील अभिनयासाठी तिला फिल्मफेअर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

उत्तम कुमार, किशोर कुमार यांचे समवेत नायिका म्हणुन तिने बंगाली चित्रपटांतुन अभिनय केला. बंगाली आणि हिंदी चित्रपटांनंतर तिने नेपाळी चित्रपटातही प्रवेश केला. माइतीघर हा तिने अभिनय केलेला एकमेव नेपाळी चित्रपट. चिदंबर प्रसाद लोहानी हे यात तिचे नायक होते. इस्टेट एजंट च्या व्यवसायात असलेल्या लोहानींच्या ती प्रेमात पडली व त्यांचेच बरोबर पुढे जाऊन घरच्यांच्या संमतीने ती विवाहबध्द झाली. लग्नानंतर तिने चित्रपटांत अभिनय करु नये अशी लोहानी यांची अट होती. सुरवातीला माला सिन्हाने ती मान्य देखील केली. परंतु तिला अभिनयाच्या चांगल्या संधी मिळत असल्यामुळे तिचं अभिनयाप्रतीचं वेड तिला स्वस्थ बसु देत नव्हते. अखेर सी पी लोहानी यांनी आपली अट मागे घेतली. काठमांडु येथे ते व्यवसाय सांभाळत असतांना माला सिन्हाला चित्रपटात अभिनय करण्यासाठी त्यांचेपासुन दुर राहावे लागत असे.

कालांतराने सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा यांनी तशी वेळ येताच चित्रपटांतुन चरित्र भुमिका करण्यास सुरवात केली. ३६ घंटे, जिंदगी, कर्मयोगी, बेरहम, हरजाई, ये रिश्ता ना तुटे, बाबु, खेल या चित्रपटांतुन माला सिन्हा चरित्र भुमिकांतुन चमकल्या.

माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांना प्रचंड भावली. ये हरियाली और रास्ता…, धीरे धीरे चल चाँद गगन में… आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे… झुमता मौसम मस्त महिना… यांसारख्या एकाहून एका सरस गाण्यांना अभिनेत्री माला सिन्हा यांनी आपल्या अदाकारीने चार चाँद लावले.

१९५४ ते १९७४ अशा वीस वर्षांत जवळपास ६५ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. प्रतिभा सिन्हा या आपल्या कन्येला तिने चित्रपटांत येण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. पण प्रतिभाला चित्रपटांत अजिबातच यश मिळवता आले नाही. राजा हिंदुस्तानी चित्रपटातील परदेसी परदेसी जाना नहीं.. केवळ या गाण्यासाठीच ती ओळखली जाते.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..